सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ भीती मेंदूत आरपार… कवी- दासू वैद्य  ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ भीती मेंदूत आरपार… ☆

आता फारशी जत्रा भरत नाही,

भरली तरी

मुलं पुंग्या विकत घेत नाहीत,

घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक

 

मुलं कुठं खेळतात खेळ पाणी

खेळतात युद्ध युद्ध

 

बैठकीतल्या उशांचा बांध रचून

पोरांनी एकदा

माझ्यावरच रोखली, स्टेनगन

गोळीला घाबरलो नाही

पण चिमुकल्या डोळ्यात

हिंस्रतेचा अविर्भाव पाहून,

हातातली खोटी बंदूक

कधीही खरी होण्याची भीती

मेंदूत आरपार घुसत गेली.

 कवी – दासू वैद्य

  रसास्वाद

दासू वैद्य हे विसाव्या शतकाच्या नवव्या दशकापासून लेखन करणारे आघाडीचे कवी, गीतकार, नाटककार. त्यांनी बाल व कुमार वाङ्मयात देखील मोलाची भर घातली आहे. त्यांच्या एकांकिका, नभोनाट्य, ललित लेख इत्यादी विपुल साहित्य असून ते टी व्ही, चित्रपट यासाठी गीतलेखन देखिल करतात. त्यांच्या बाल कवितांचं वाचन विजय तेंडुलकरांसारख्या चिकित्सक साहित्यिकाने केले आहे.

ते आपल्या आजूबाजूच्या जीवनात रमतात व त्या जीवनाशी निगडित विषयांवर साहित्य निर्मिती करतात. त्यांची कविता जगण्याचे वास्तव सांगते, स्वप्नरंजनात रमत नाही. ती तत्वज्ञान सांगत नाही तर बहुसंख्यांच्या जगण्याचं वास्तव सांगते. कवी म्हणून समकालाकडे बघण्याची त्यांची दृष्टी प्रस्तुत कवितेत स्पष्टपणे जाणवते. सद्यस्थितीचं सखोल आकलन व ते व्यक्त करून समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज ज्या साहित्यिकांना कळते तेच समाजाचं देणं फेडू शकतात. दासू वैद्य त्यातलेच एक व प्रस्तुत कविता अशातलीच एक.

सदर कवितेत कवी आपल्या दाराशी येऊन ठेपलेल्या भयावह भविष्याबाबत आपल्याला जागरूक करतात. ही कविता, हा विचार, समाजातल्या विशेष करून मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित, एक किंवा दोनच मुले असणारे, आपल्या मुलांचे सर्व लाड पुरवणारे, मुलांना सर्व अत्याधुनिक व महागडी खेळणी आणून देणारे पालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याची निकड दासू सरांना जाणवते म्हणून ते अशा कविता लिहितात.

आपण वेळीच जागे झालो नाही तर पाश्चात्य देशातील शाळांत घडणाऱ्या दुर्दैवी घटना आपल्याकडेही लवकरच पहायला मिळतील. अल्पवयीन मुले गंमत म्हणून किंवा किरकोळ कारणावरून घरातल्या वडिलधाऱ्यांचे पिस्तुल वापरायला मागेपुढे बघणार नाहीत.

कवी म्हणतात पूर्वी जत्रा भरायच्या, तिथं मुलं आण्या, दोन आण्याला मिळणारी पुंग्यांसारखी खेळणी घ्यायची पण आता मुलांना धडाडणारी, खोट्या का असेनात पण सटासट गोळ्या झाडणारी मशीनगन आवडते, त्यांना युद्ध युद्ध खेळायला आवडतं. उशांचाअडसर बनवून, त्यामागून मुलाने जेव्हा वडिलांवर बंदूक रोखली तेव्हा त्याच्या डोळ्यातील हिंस्र भाव बघून कवीचे काळीज चरकलं व त्यातूनच जन्मली ही कविता.

पाश्चात्य देशांत अधुनमधून अल्पवयीन मुलांकडून अशी हिंसा घडत असते पण आपण त्यातून कांहीच बोध घेणार नाही का? खेळण्यांचे निर्माते पैसे कमवण्यासाठी कसलीही खेळणी बनवतील पण आपण कसलाही विचार न करता ती खेळणी मुलांना आणून देणार आहोत का? सिनेमातील हिंसा बघून बघून आपणही हिंसेला निर्ढावलो आहोत का? लहान मुलांच्या निष्पाप मनात आपणच हिंसेची बीजं तर रोवत नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरे दासू सर या कविते द्वारे समाजाकडे मागत आहेत.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments