श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – पडिलो भोवनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
पडिलों भोवनीं
बहु चिंतवणी //१//
*
होतो चुकलो मारग /
लाहो केला लागवेग //२//
*
इंद्रियांचे संधी /
होतो सापडलो बंदी //३//
*
तुका म्हणे बरे झाले/
विठ्ठलसें वाचे आले //४//
*
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
मी जन्म घेतला तेव्हापासूनच संसाराच्या भोव-यात अडकून पडलो होतो. खूप अडचणीत अडकलो होतो. खरे तर मी निवडलेला माझा रस्ताच चुकला होता.
मी मग लगबग करून तो बदलूनच टाकला. इंद्रिय सुखाच्या जाळ्यात अडकल्यामुळे मी तिथेच पुरता बंदिवान झालो होतो. गुरफटून गेलो होतो. पण मग अचानक पुढे विठ्ठलाचे नाव माझ्या मूखी आले.मी त्याच्या नामाचा नामघोष चालू केला आणि त्या जंजाळातून माझी सुखरूप सुटका झाली.हे खूप बरे झाले.
प्रपंच करताना सतत येणा-या अडचणीतून कुणाची कधीच सुटका होत नाही. त्या अडचणी कुणालाही टाळता येत नाहीत.त्या मुळे संसारात गुंतलेला माणूस सतत चिंताग्रस्त असतो.त्या मुळेच तो इंद्रिय सुखाच्या मागे लागतो आणि तेथेच कायमचा गुंतून पडतो.पण जेव्हा असे होवू लागते तेव्हा आपला रस्ता चुकला आहे हे त्याच्या ध्यानात यायला पाहिजे. आपण प्रापंचिक चिंतेतच गुंतून पडलोय, इंद्रिय सुखाच्याच मागे धावतोय हे काही बरे नाही असे वाटायला पाहिजे. यातून आपण बाहेर पडण्यासाठी धडपड केली पाहिजे हे सुचले पाहिजे. अशावेळी शांतचित्ताने मुखाने विठ्ठलाचा नामघोष केला तरी पुरेसे आहे. केवळ तसे केले तरी या सतावणा-या चिंतेत पासून आपली मुक्तता होईल. आणि मुक्तीचा सन्मार्ग आपल्याला नक्कीच सापडेल. पण त्यासाठी प्रबळ इच्छा शक्ती मात्र निर्माण करायला हवी. सामान्य माणसाला येवढे करणे सहज शक्य आहे. असे तुकाराम महाराज येथे सांगतात.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







खूप छान! काव्य समजले तरच काव्यानंद घेता येतो.तुम्ही छान उलगडून सांगितले.