ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २३ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
यशवंत पाठक :
संत साहित्याचे अभ्यासक व लेखक श्री.यशवंत पाठक यांनी मराठी व संस्कृत भाषा घेऊन एम्. ए. केल्यानंतर ‘कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य’ या विषयामध्ये डाॅक्टरेट
संपादन केली.मनमाड येथील महाविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापनाचे काम केले.
धार्मिक विषयावरील लेखनाव्यतिराक्त कथा,कादंबरी,ललित असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले.त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.चतुरंग,डाॅ.
निर्मलकुमार फडकुले,संत ज्ञानेश्वर,संत विष्णूदास कवी अशा पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.महाराष्ट्र राज्य सरकारचा त्यांना तीन वेळेला साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.जळगाव येथे भरलेल्या दहाव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच नाशिक येथे 2013मध्ये झालेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २२ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
जयंत बेंद्रे
जयंत बेंद्रे (23 डिसेंबर 1951 -22 मार्च 2015) हे मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक व लेखक होते.
अहमदनगर येथे त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर, तसेच किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना मोहन जोशी यांच्याबरोबर कामं करण्याची संधी त्यांना मिळाली.
बेंद्रेनी ‘मोरूची मावशी ‘मध्ये काम केले होते. ते विविध नाट्यसंस्थांशी जोडलेले होते. प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं, तसेच मराठी चित्रपट व चित्रवाणी मालिकांतून त्यांनी भूमिका केल्या.
‘नटखट नट -खट’ या मोहन जोशींच्या 500 पानी आत्मचरित्राचे शब्दांकन बेंद्रे यांनी केले. वेगळ्या आकृतिबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले.
याशिवाय त्यांनी सात एकांकिका, इंग्रजी एकांकिका व तीन कथासंग्रह लिहिले.
त्यांच्या ‘अभिनय सम्राट’ या लघुकथेस जी. ए. कुलकर्णी पुरस्कार, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ‘ या लघुकथेला ‘कथा दिल्ली’चा राष्ट्रीय पुरस्कार, ‘शेवटी काय वर घेऊन जायचंय?’ या कथेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथा पुरस्कार तर ‘माणसं आणि माणसं’ या कथासंग्रहाला जयवंत दळवी स्मृती पुरस्कार मिळाला.
‘मैत्री’ या संस्थेद्वारे ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते.
प्रभाकर आत्माराम पाध्ये
प्रभाकर आत्माराम पाध्ये(4 जानेवारी 1909-22 मार्च 1984) यांनी पन्नास वर्षे वृत्तपत्रीय लेखनाबरोबर कथात्म साहित्य, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, ललित गद्य, समीक्षा व सौंदर्यमीमांसा अशी निर्मिती अखंडपणे केली.
त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. शालेय शिक्षण रत्नागिरी, पुणे, मुंबई येथे झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. केलं.
सुरुवातीला ते ‘प्रतिभा’ पाक्षिकात लेखन करत असत. नंतर त्यांनी श्री. रा. टिकेकर यांच्या सहकार्याने ‘आजकालचा महाराष्ट्र -वैचारिक प्रगती’ हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाच्या अखेरीस 1799 ते 1934 या प्रदीर्घ कालखंडातील प्रमुख घटनांचा कालपट दिला आहे. मराठी ग्रंथांमध्ये कालपट देण्याची सुरुवात या ग्रंथापासून झाली.
नंतर पाध्ये ‘चित्रा’,’धनुर्धारी’मध्ये पत्रकार होते.पुढे ‘नवशक्ती’चे संपादक झाल्यावर त्यांनी त्याचा खप प्रचंड वाढवला.
मार्च 1953मध्ये ‘नवशक्ती’ हे वृत्तपत्र सोडून ते ‘द इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे चिटणीस झाले. जून 1955मध्ये ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आशिया खंडाचे सेक्रेटरी जनरल म्हणून ते दिल्लीला गेले.त्यायोगे एक तप ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक घटना व मोठमोठ्या व्यक्ती यांच्याशी निगडित होते. यामुळे पाध्येंच्या व्यक्तिमत्त्वाला नवेनवे पैलू पडले.
पाध्ये यांनी पाच कथासंग्रह,एक कादंबरिका, पाच प्रवासवर्णनपर पुस्तके, चार व्यक्तिचित्रसंग्रह, स्फूट लेखांचे तीन संग्रह, राजकारणावरील चार पुस्तके, सौंदर्यशास्त्रविषयक तीन पुस्तके व सहा समीक्षा पुस्तके असे त्यांचे अफाट लेखन आहे.
त्यांच्या ‘सौंदर्यानुभव’ला साहित्य अकॅडमीचे पारितोषिक मिळाले.
जयंत बेंद्रे व प्रभाकर आत्माराम पाध्ये यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया,
प्रभाकर पाध्ये, प्रा. डॉ. विलास खोले, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
मोरेश्वर रामचंद्र वाळिंबे, तथा मो.रा. वाळिंबे यांचा जन्म ३०.जून १९१२चा.
ते शिक्षणतज्ज्ञ, मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठी लेखनपद्धती’ या विषयवावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी शिक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक म्हणून काम केले. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात मराठी भाषेचा शब्दकोश करायचे कामही त्यांनी केले. मराठी साहित्यात त्यांना रस होता. खांडेकर, फडके., माडगूळकर, मालतीबाई बेडेकर इये. दिग्गज लेखकांशी त्यांचा संपर्क होता.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इ. ५वी, ६वी, ७वी व्याकरणविषयक पुस्तकाचे लेखन, सुगम मराठी शुद्धलेखन व सुगम मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखन केले.
वनाराणी एल्सा या बालसाहित्याच्या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला. मराठी शुद्धलेखन प्रदीप हे पुस्तक लिहिले. त्यांच्या सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाची ५१ वी आवृत्ती२०१६मध्ये प्रकाशित झाली. या आधी त्यांच्या कन्येने ब्रेलमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून दिले.
याखेरीज आंग्ल भाषेचे अलंकार, श्री बाळकृष्ण यांचे चरित्र, सुबोध वाचन (३भाग), शिकरीच्या सत्यकथा याही पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
☆☆☆☆☆
पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ यांचा जन्म २९ मार्च १९२६ मधला.
बाळ गाडगीळ पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते, तसेच सिंबायसिस संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी विनोदी लेखन केलेच, त्याचबरोबर आर्थशास्त्रीय लेखनही केले. त्यांनी अनुवादही केले. गाडगीळ यांनी ६०हून अधीक पुस्तके लिहिली. त्यांनी विनोदी कथा, कादंबर्याक, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रे, टीकाग्रंथ, भाषांतर, बालवाङ्मय असे विविध स्वरूपाचे लेखन केले.
बाळ गाडगीळ यांची काही पुस्तके –
१. अखेर पडदा पडला, २. अमेरिकेत कसे मारावे, ३. लोटांगण, ४फिरकी, ५. वाशिल्याचं तट्टू , ६ आकार आणि रेषा, ७. आम्ही भूगोल घडवतो, ८ उडती सतरंजी, ९. एक चमचा पु.ल. एक चमचा अत्रे १०. गप्पागोष्टी –भाग ५ ११. सिगरेट आणि वसंत ऋतु (प्रवास वर्णन ), १२ वळचणीचे पाणी ( आत्मचरित्र)
बाळ गाडगीळयांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
१. ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्या विनोदी संग्रहास राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
२. सिगरेट आणि वसंत ऋतु या प्रवास वर्णनास राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले.
३. बडोदे येथे झालेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे ते अध्यक्ष होते.,
४. मुंबईत ९२मध्ये झालेल्या विनोदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
५. कोथरूडमध्ये १९९५मध्ये झालेल्या कोथरूड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.,
☆☆☆☆☆
गोविंद तळवलकर
गोविंद तळवलकर यांचा जन्म २२ जुलै १९२५ रोजी झाला. इंग्रजी आण मराठी दोन्ही भाषेत त्यांनी पत्रकारिता केली. त्याचप्रमाणे या दोन्ही भाषेत लेखन केले. अग्रलेखांकरिता ते विशेष परिचित होते. त्यांना अग्रलेखांचे बादशहा म्हणत. ते स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, अंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते भाष्यकार होते, तसेच ते साक्षेपी संपादक होते.
लोकसत्तामध्ये १२ वर्षे त्यांनी उपसंपादकाचे काम केले. त्यानंतर २८ वर्षे ते महाराष्ट्र टाईम्सचे संपादक होते. महाराष्ट्र टाईम्सला एक प्रभावी व परिणामकारक दैनिक म्हणून घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
टाईम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड विकली, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, फ्रंटलाईन मॅगेझिन अशा इंग्रजी वृत्तपत्रातून आणि साप्ताहिकातून त्यांनी लेखन केले. ‘एशियन एज’ साठी ते अमेरिकेतून लिहीत असत.
गोविंद तळवलकरांचे बरेचसे लेखन पुस्तक रूपातही आहे. लो.टिळकांची परंपरा जपणारे , संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे असे त्यांचे लेखन होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आण प्रचंड व्यासंग याच्या बळावर अग्रलेखांना त्यांनी खूप उंचीवर नेले. माडगूळकरांनी त्यांचा उल्लेख ‘ज्ञानगुण सागर’ असा केला होता.
गोविंद तळवलकरांची एकूण २५ पुस्तके आहेत. त्यापाकी काही निवडक पुस्तके –
१. अग्नीकांड, २ अग्रलेख, ३.अफगाणिस्तान, ४. अभिजात, ५. अक्षय, ६. ग्रंथसांगाती, ७. नवरोजी ते नेहरू ८. परिक्रमा, ९. पुष्पांजली १०. (व्यक्तिचित्रे आणि मृत्यूलेख संग्रह) ११. मंथन १२. वाचता वाचता ( पुस्तक परीक्षणांचा संग्रह), १३. सौरभ साहित्य आणि समीक्षा
पुरस्कार
१. उत्कृष्ट पत्रकारितेचे दुर्गा रतन व रामनाथ गोयंका
२. लातूर – दैनिक एकमत
३. न.चि.केळकर पुरस्कार – सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त या पुस्तकासाठी
४. जीवनगौरव पुरस्कार २००७
५. महाराष्ट्र सरकारचा लो. टिळक पुरस्कार
६. सामाजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार
आज मो.रा. वाळिंबे, बाळ गाडगीळ, गोविंद तळवलकर या मराठी भाषेतील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणार्या. दिग्गजांचा स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
बाळ सीताराम मर्ढेकर बाळ सीताराम मर्ढेकर (१ दिसंबर १९०९ – २० मार्च १९५६)
मराठी नवकवितेचे आद्य प्रवर्तक असे ज्यांना संबोधले जाते त्या बा.सी.मर्ढेकर यांचा आज स्मृतीदिन.कवी केशवसुतांनंतरचे युगप्रवर्तक कवी म्हणून मर्ढेकरांचे नाव घेतले जाते.जोष,ठसठशीतपणा,
निर्भिडपणा,आशयसंपन्न नव्या प्रतिमा,धक्का देणा-या दोन विभिन्न कल्पनांची घातलेली सांगड ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यावर त्यानी काही दिवस टाईम्स ऑफ इंडिया मध्ये संपादकीय विभागात व नंतर अध्यापक म्हणून नोकरी केली.त्यानंतर ते आकाशवाणीत रूजू झाले.
इंग्लंडमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी तेथील वांड्मयीन चळवळीळीचा अभ्यास केला.अनेक श्रेष्ठ साहित्यिक व समीक्षक यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.बदलते सामाजिक जीवन,ताणतणाव,जीवनाची तीव्र गतीमानता,सर्वसामान्य माणसाची अगतिकता त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबीत झालेले दिसतात.
शिशिरागम हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.त्यानंतर काही कविता , व आणखी काही कविता हे दोन संग्रह आले.तांबडी माती,रात्रीचा दिवस,पाणी या कादंब-यांचे लेखन त्यांनी केले.कर्ण नावाची संगितिका व नटश्रेष्ठ नावाचे नाटकही त्यांनी लिहिले.पण काव्यलेखनातच त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.
काव्याबरोबरच त्यांनी साहित्य समीक्षाही केली आहे.सौंदर्य आणि साहित्य,वाड्मयीन महात्मा,आर्टस् अॅन्ड मॅन हे त्यांचे समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
20मार्च 1956 रोजी त्यांचे निधन झाले.त्यांचे स्मृतीस अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : मराठीसृष्टी, विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
दिनकर नीलकंठ देशपांडे
दिनकर नीलकंठ देशपांडे (17 जुलै 1933 – 18 मार्च 2011) हे मराठीतील पत्रकार व साहित्यिक.
त्यांचे शालेय शिक्षण जबलपूर व वर्ध्याला झाले. शालेय जीवनात ते ‘उत्कृष्ट विद्यार्थी’ म्हणून नावाजले गेले.
नंतर ते ग्रामसेवक म्हणून नोकरी करू लागले. तेव्हाच त्यांना लिहिण्याचा छंद लागला.
1951 मध्ये ते नागपूरला परत आले व त्यांनी ‘अशोक प्रकाशन’ व ‘उद्यम प्रकाशन’ मध्ये नोकरी केली. नंतर ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’, ‘दैनिक महाराष्ट्र’ या वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता केली.
स्वतःच्या नावाला ‘राव’ हा शब्द जाणीवपूर्वक लावून ते तो खास वैदर्भी ठसक्यात उच्चारायचे. त्यांचा स्वभाव मोकळा, उमदा व मिश्किल होता.
त्यांनी ‘बहरले सोन्याचे झाड’, ‘हं हं आणि हं हं हं’ वगैरे शंभराहून अधिक बालनाट्ये लिहिली. त्यापैकी बहुसंख्य नाटके सुधा करमरकर यांच्या ‘लिटिल थिएटर’ने सादर केली व गाजवली.दिनकररावांनी नागपूरला अभिनयाची नाट्यशाळा चालवली.
याशिवाय त्यांनी मोठ्यांसाठी विनोदी लेखसंग्रह, कथासंग्रह, दोन कादंबऱ्या व अन्य बालसाहित्यही लिहिले.
ठाणे येथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाली. बालनाट्यलेखनासाठी राज्यशासनातर्फे देण्यात येणारा ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ दोनदा मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक आहेत.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर:
शिक्षण, लेखन, राजकारण, समाजकारण, पत्रकारिता अशा विविध प्रांतात उल्लेखनीय कार्य करणा-या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची आज पुण्यतिथी!
पुणे येथे पूना काॅलेज व डेक्कन काॅलेज येथे आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.काही वर्षे त्यांनी रत्नागिरीत ही घालवली. त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, नीतीशास्त्र, इंग्रजी, संस्कृत व मराठीतील उत्तमोत्तम ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे वडिलही लेखक होते.वडिलांच्या ‘शालापत्रक’ या मासिकात त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली होती. मासिकातील लेखन हे तत्कालीन ब्रिटिश सरकारला न रूचल्यामुळे या मासिकावर बंदी घालण्यात आली. पण विष्णूशास्त्र्यांनी त्यापूर्वीच म्हणजे 1874 मध्ये ‘निबंधमाला’ चालू केले होते. त्यातून टिकात्मक व साहित्य विषयक लेखन होत असे. त्यांनी निबंधमाला आयुष्याच्या अखेरपर्यंत चालवली. याशिवाय इतिहास व काव्याभिरूची वाढावी या हेतूने ‘काव्येतिहास संग्रह’ हे मासिक सुरू केले.पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. मराठी साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ‘किताबखाना’ हे पुस्तकांचे दुकान सुरू केले. केसरी व मराठा या वृत्तपत्रांची धुरा त्यांनीच सांभाळली. तसेच पुणे येथे राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने लो. टिळकांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल च्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.
त्यांची काही ग्रंथसंपदा:
अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी –6 भाग
आमच्या देशाची स्थिती
इतिहास
संस्कृत कवीपंचक
केसरीतील लेख
कादंबरी..अनुवादित
कालिदासावरील निबंध
पद्य रत्नावली
विष्णूपदी…तीन खंड
संस्कृत कविता…..इ.इ.इ.
कामाची ही व्याप्ती अवघ्या बत्तिस वर्षांच्या आयुष्यातील आहे. 1882 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या कार्यास अभिवादन! 🙏
☆☆☆☆☆
काशिनाथ नारायण साने
विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या काव्येतिहास या मासिकाचे का.ना.साने हे संपादक होते. ते स्वतः इतिहाससंशोधक होते. भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे या संस्थेचे ते अध्यक्ष होते.
त्यांची ग्रंथ निर्मिती अशी:
विविध बखर लेखन
होळकरांची कैफियत
छ.संभाजी महाराज व थोरले राजाराम महाराज यांचे चरित्र.
ऐतिहासिक पत्रे यादी श्रीमंत भाऊसाहेब यांची कैफियत इत्यादी.
का.ना.साने यांच्या स्मृतीस अभिवादन. 🙏
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर
गणेश दामोदर ऊर्फ बाबाराव सावरकर (13 जून 1879 -16 मार्च 1945)हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हे सर्वांत मोठे बंधू.
घरच्या परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांना मॅट्रिकपर्यंत जाता आले नाही. पण त्यांनी योगविद्या, वैद्यक, फलज्योतिष, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, वेदांत या शास्त्रांचा, त्याचप्रमाणे इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र,कला वगैरे अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला.
‘राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप’, ‘धर्म कशाला हवा?’, ‘हिंदुराष्ट्र -पूर्वी -आता – पुढे’, ‘ख्रिस्तपरिचय’ वगैरे अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. ‘वीर बैरागी’ हा मूळ हिंदी भाषेतील पुस्तकाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. याशिवाय त्यांनी वेळोवेळी विविध विषयांवर लिहिलेले लेखही वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले.
1946साली त्यांनी लिहिलेल्या ‘ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’या पुस्तकात त्यांनी ‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू – विश्वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे,’असे विचार मांडले होते.26.02.2016 रोजी हे पुस्तक पुनःप्रकाशित करण्यात आले.’ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चन कौन्सिल’ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.
स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या क्रांतिकार्यामुळे त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची व सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.1911 ते 1921 या काळात त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या. 1921मध्ये त्यांची अंदमानहून सुटका होऊन त्यांना भारतातील विविध तुरुंगांत पाठवण्यात आले. त्यांची तब्येत खूपच बिघडल्याने 1922 साली त्यांची शिक्षा संपवण्यात आली. पण नंतरही क्रांतिकार्य सुरू असतानाच 16 मार्च 1945 रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.
ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी
ऍडवोकेट ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी (13 जून 1930 -16 मार्च 2013) हे पुण्यातील एक नामवंत वकील, इतिहासाचे गाढे अभ्यासक असे विद्वान गृहस्थ होते.
‘A New Perspective To The Language Of Indus Script’,’रोमन आणि देवनागरी लिप्यांची जननी :सिंधू लिपी ‘, ‘सिंधू संस्कृती’, ‘हडप्पा संस्कृती? नव्हे, महाभारतकालीन हिंदू राज्येच!’ इत्यादी अनेक मराठी व इंग्रजी ऐतिहासिक पुस्तके, त्याचप्रमाणे ‘श्रीपाद श्रीवल्लभ ‘ हे दत्त संप्रदायावरील पुस्तक, तसेच ‘अजिंक्य’ हे 81 व्या वर्षीही असणाऱ्या स्वतःच्या सुदृढ प्रकृती चे रहस्य सांगणारे पुस्तक, तसंच ‘आकाशगंगा’ व ‘ ऋतुराज’ हे कालिदासाच्या ग्रंथांचे अनुवाद वगैरे विविध विषयांवरील विविध पुस्तके त्यांनी लिहिली.
16 मार्च 2013 रोजी त्यांचे निधन झाले. पण शेवटपर्यंत त्यांची वकिली चालू होती.
गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर आणि ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
आदिमाया अंबाबाई, आला आला वारा, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?, जरा विसावू या वळणावर, फिटे अंधाराचे जाळे, रात्रीस खेळ चाले, सांज ये गोकुळी सावळी सावळी या सारख्या सदाबहार गीतांनी श्रोत्यांच्या मनावर गारुड केलं, नव्हे अजूनही करताहेत, ती गीते सुधीर मोघे यांच्या लेखणीतून लिहिली गेली. कवी, गीत, चित्रपट गीत, पटकथा लेखन, ललित लेखन, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण, दिग्दर्शन या बहुविध माध्यमातून, रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट इ. क्षेत्रात त्यांचा संचार झाला.
‘कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे ध्वनी –प्रकाश योजनेच्या सहाय्याने आपल्या मराठी कविता, गीते सादर करत.
सुधीर मोघे यांचे कविता संग्रह –
१. आत्मरंग, २. गाण्याची वही, ३. पक्ष्यांचे ठसे, ४. शब्दधून, ५. स्वातंत्रते भगवती
सुधीर मोघे यांचे गद्य लेखन –
१. अनुबंध, २. कविता सखी, ३. गाणारी वाट, ४. निरंकुशाची रोजनिशी
सुधीर मोघे यांनी ५०हून अधीक चित्रपटांसाठी गीतलेखन केले.
सुधीर मोघे- पुरस्कार आणि सन्मान –
१. सर्वोत्कृष्ट गीतकार – अल्फा गौरव
२. ग. दी. मा. प्रतिष्ठान – चैत्रबन
३. महाराष्ट्र साहित्य परिषद – ना.घ. देशपांडे पुरस्कार.
४. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान – शांता शेळके पुरस्कार.
सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ चा. आज त्यांचा स्मृतीदिन. या प्रतिभासंपन्न कवी, गीतकार, लेखकाला शतश: वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
सुरेश भट
मी कसे थोपवू शब्द माझे?
हिंडती सूर आसपास किती.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
सांभाळतात सारे आपापली दुकाने
मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे
जीवना,तू तसा,मी असा
खेळलो खेळ झाला तसा
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्याना परंतु
तापल्या मातीत माझ्या
घाम मानाने गळू दे
असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी—कधीतरी
असायचे–नसायचे
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही
किती काव्यपंक्तींचा उल्लेख करावा ? काही ओळखीच्या,काही अनोळखी.एखाद्या झंझावाताने झपाटून टाकावे तशा कविता आणि नंतर झालेली त्यांची गीते.शब्दांच्या काफिल्याचा रंगच वेगळा.एकदा एल्गार पुकारल्यावर रसवंतीने मुजरा करावा अशा या सप्तरंगी कवितांचे जनक श्री.सुरेश भट यांचा आज स्मृतीदिन.त्यांचे काव्य हीच त्यांची खरी ओळख.संगीताची आवड बालपणा पासून असलेल्या सुरेश भटांनी आपल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी स्वतःचे शरीर मजबूत बनवले.कोमल ,रसिक मन आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची वृत्ती यामुळेच की काय त्यांची कविताही कोमल आणि तितकीच सशक्त झाली.मराठीत गझल लेखनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून मराठी साहित्यात गझल लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्यांना ‘गझलसम्राट’ही पदवी मिळाली.गडचिरोली येथे झालेल्या एकोणचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .
हिंडणारा सूर्य या गद्य लेखना व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेल्या कवितांचे संग्रह असे:
एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग आणि सुरेश भट यांच्या निवडक कविता.
‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ असे त्यांनी लिहिले असले तरी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर’अजुनी सुगंध येई दुलईस मोग-याचा’ प्रमाणे त्यांच्या काव्य दरवळचा आस्वाद घेत त्यांच्या स्मृती जपूया.
गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर:
काव्य वाचनाचे कार्यक्रम करून मराठी कविता गावोगावी पोचवून लोकप्रिय करणरे तीन कवी म्हणजे कविवर्य वसंत बापट,मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर.
आज विंदांची पुण्यतिथी. कोकणातील देवगड जवळील खेड्यात जन्मलेल्या या कवी लेखकाने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून मराठीला पुन्हा एकदा सन्मान मिळवून दिला. विंदा हे कवी तर होतेच पण अनुवादक, समीक्षक आणि बालसाहित्यिकही होते.वास्तववाद आणि प्रयोगशिलता हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होते.त्यांचे बालसाहित्य वाचताना त्यांच्यातील खट्याळ स्वभावाचे दर्शन होते.’माझ्या मना बन दगड’ असे म्हणणारा हाच का तो कवी असा प्रश्न पडावा इतक्या मनोरंजनात्मक बालकविता त्यांनी लिहील्या आहेत.
‘माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वतःला जिंकणे,एवढे लक्षात ठेवा’
‘मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे,ते मागचे इशारे’
‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर’ किंवा
देणा-याने देत जावे, तेच ते अन् तेच ते, सब घोडे बारा टक्के,
यासारख्या कविता त्यांच्या प्रतिभेचे पैलू दाखवतात. राणीचा बाग, सशाचे कान, एकदा काय झाले, परी ग परी अशा बाल कविता थोरांनाही बालपणात घेऊन जातात.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या मते करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे,शैली वक्तृत्वपूर्ण आहे पण भाषणबाजी नाही.तर कविवर्य शंकर वैद्य म्हणतात की विंदांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धीवादी,पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे.
कबीर पुरस्कार, कवी कुसुमाग्रज, केशवसुत, कुमारन् आसन, कोणार्क, जनस्थान, महाराष्ट्र फौंडेशन, म.सा.प,डाॅ. लाभसेटवार,सोविएट लॅन्ड नेहरू लिटररी पुरस्कार आणि अष्टदर्शन ला ज्ञानपीठ पुरस्कार.
ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला अर्पण केली व अमराठी साहित्य मराठीत अनुवादीत करण्यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव पुरस्कार सुरू केला.
अनेक विद्यापीठांनी त्यांना डी.लीट.ही पदवी बहाल केली आहे.
“वाचकांचे अनेक थर आहेत.यातला कोणताही थर वंचित ठेवणे हे पाप आहे.”असे मानणा- या विंदाना आदरपूर्वक प्रणाम.
इंदुमती शेवडे
इंदुमती शेवडे या विदर्भातील पत्रकार व लेखिका.तसेच त्या उत्तम चित्रकारही होत्या.मराठी कथेचा उद्गम आणि विकास या विषयावर त्यांनी पी.एच्.डी. केले होते. जी. डी. आर्टस् ही कलापदवी प्राप्त केली होती.
तरूण भारत, नागपूर या दैनिकात पत्रकारिता करून ‘महिलांचे मनोगत’ हे सदर अनेक वर्षे चालवले होते. आकाशवाणी,नागपूर येथे सहायक कार्यक्रम निर्माता (मराठी भाषण) या पदावरही काम केले. बी.बी.सी.च्या प्रशिक्षण वर्गात त्यांचा सहभाग होता.नंतर त्यांना दिल्ली येथील यु.पी.एस्.सी. च्या मराठी विभागात काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला.तसेच मिर्झा गालीब यांचेविषयी माहिती घेऊन त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहीली. चौथे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन त्यांचे हस्ते पार पडले.
साहित्य निर्मिती:
इथे साहिबाचिये नगरी(प्रवासवर्णन)
पु.य.देशपांडे(चरित्र)
संत कवयित्री: पाच संत कवयित्रींचा वेगळ्या पद्धतीने विचार.
कथा एका शायराची (मिर्झा गालीब कादंबरी)
विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणा-या इंदुमती शेवडे यांना वंदन.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया व संबंधित कवींचे काव्यसंग्रह.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
दत्तात्रय कोंडो घाटे
दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त (27 जून 1875 – 13 मार्च 1899). हे मूळचे श्रीगोंद्याचे. त्यांचे शालेय शिक्षण नगरमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई, इंदूर, कलकत्ता येथे झाले. नंतर ते पुण्याच्या नू. म. वि.मध्ये शिक्षक होते.
रेव्ह. ना. वा. टिळक, कविवर्य चंद्रशेखर वि कवी दत्त या तिघांचे सख्य होते.
‘बा नीज गडे ‘ ही कवी दत्तांची लोकप्रिय कविता. त्यांनी 1897-98 मध्ये बहुसंख्य कविता लिहिल्या. त्या वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी 48 कवितांचा ‘दत्तांची कविता ‘हा संग्रह त्यांचे पुत्र शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक वि. द. घाटे यांनी 1922 साली प्रसिद्ध केला. डॉ. मा. गो. देशमुखसंपादित संग्रहात त्यांच्या सर्व म्हणजे 51 कविता आहेत.
आकाशानंद
आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (1933-13 मार्च 2014). आकाशानंद हे पूर्वी नागपूर नभोवाणी केंद्रात कार्यक्रम निर्माते होते. नंतर 1972 पासून मुंबई दूरदर्शन केंद्रात आले.1992 साली ते तिथे उपसंचालक पदावरून निवृत्त झाले.
त्यांनी सादर केलेले ‘ऐसी अक्षरे ‘, ‘शालेय चित्रवाणी’ व ‘ज्ञानदीप ‘हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले.
1988मध्ये ‘ज्ञानदीप’ या कार्यक्रमावर बीबीसीच्या एलिझाबेथ स्मिथ यांनी 45 मिनिटांचा लघुपट केला. याच कार्यक्रमावर अमिता भिडे यांनी पीएचडी मिळवली.
‘ज्ञानदीप’वर आधारित असलेले ‘ज्योत एक सेवेची’ हे मासिक त्यांनी 25 वर्षे चालवले.
1992मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पहिल्या ‘ज्ञानदीप’ मंडळाची स्थापना केली. त्यांचा विस्तार होऊन राज्यात 1500 मंडळे स्थापन झाली.
त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ वगैरे पाच पुस्तके व बालसाहित्यात 300 गोष्टीची पुस्तके लिहिली.
त्यांच्या ‘माध्यम चित्रवाणी’ या दूरचित्रवाणी या विषयावरील पहिल्या मराठी पुस्तकाला राज्यसरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय त्यांना गोंदियाभूषण व सेवाश्री पुरस्कारही मिळाले.
मालतीबाई किर्लोस्कर
मालतीबाई किर्लोस्कर या विख्यात मराठी संपादक व लेखक शंकरराव किर्लोस्करांच्या कन्या.
त्या सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्या अतिशय सुंदर शिकवत असत.
पक्की वाङ्मयीन व वैचारिक बैठक, भारदस्त व्यक्तिमत्त्व व विपुल व्यासंग ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये. त्या परखड व स्पष्टवक्त्या होत्या.
त्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ मध्ये अधूनमधून लिहीत असत.
‘भावफुले’ व ‘फुलांची ओंजळ’ हे त्यांचे व्यक्तीचित्रसंग्रह प्रसिद्ध आहेत.
13 मार्च 2017 ला त्यांचे निधन झाले.
रमेश मुधोळकर
बालसाहित्यकार व चित्रकार रमेश मुधोळकर (19.07.1935 – 13.03.2016) यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे झाले.पुढे ते मुंबईला आले. तिथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले.
1972मध्ये त्यांचे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध झाले.1974 मध्ये त्यांनी ‘शालापत्रक’ हे मासिक सुरू केले. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे 300 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यात ‘इसाप’, ‘गलिव्हरच्या गोष्टी’, ‘बिरबल आणि बादशहाच्या 175 गोष्टी’ यांचा समावेश आहे.
जयको पॉकेट बुक्स व अमर चित्रकथा तसंच एको बुक्स या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा मोठाच वाटा आहे.
देशोदेशीच्या रसाळ कथा, तसंच खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीत असे बरेच लेखन त्यांनी मराठी व इंग्रजीतून केले. त्याचप्रमाणे शंकरमहाराज व दिगंबरदास महाराज यांच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.
‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ या संस्थेचे ते संस्थापक -सदस्य होते.
2009मध्ये त्यांच्या लेखनाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली.
13 मार्च 2016 मध्ये पुणे येथे त्यांचा देहांत झाला.
कवी दत्त, आकाशानंद, मालतीबाई किर्लोस्कर व रमेश मुधोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया, इंटरनेट. मराठीसृष्टी. कॉम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈