ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २३ डिसेंबर –  संपादकीय  ?

 आज २३ डिसेंबर — 

कला व नाट्यक्षेत्रातील आस्वादक समीक्षक आणि लेखक म्हणून ख्यातनाम असलेले श्री. ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचा आज स्मृतिदिन. (२१/५/१९२८ – २३/१२/२०१०) 

‘उत्कृष्ट कलासमीक्षक ‘ ही श्री. नाडकर्णी यांची महत्वाची ओळख तर होतीच. पण त्याचबरोबर,  साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट, अशा विविध कलाप्रकारांचा मागोवा घेतानाच, त्या काळात येऊ घातलेल्या नवनवीन बदलांची दखल घेणारे लेखन , मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल प्रमाणात केले. त्यांच्या अशा समीक्षणांना जगभरातले अनेक सन्मान मिळाले होते.—- फ्रांस सरकारचा कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, ब्रिटिश सरकारचे गौरवचिन्ह, फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताब, हे त्यापैकी काही विशेष सन्मान. 

मराठी आणि इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात पन्नासपेक्षाही जास्त वर्षे कार्यरत असणारे श्री. नाडकर्णी यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत— पाऊस, भरती, प्रस्थान, चिद्धोश, हे कथासंग्रह, – दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित, या कादंबऱ्या, – एम.एफ.हुसेन यांच्यावर लिहिलेला ‘ अनवाणी ‘ नावाचा, आणि पिकासो, हिचकॉक, डी .डी .दलाल, गायतोंडे यांच्यावरचे चरित्रग्रंथ,– अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, असे समीक्षा ग्रंथ, – ‘ विलायती वारी ‘ हे प्रवासवर्णन, इंग्रजीत लिहिलेले बालगंधर्वांचे चरित्र, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली होती. 

आजच्या स्मृतिदिनी श्री. नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली. 

☆☆☆☆☆

सुप्रसिद्ध कवी वसंत सावंत यांचा आज स्मृतीदिन. ( ११/४/१९३५ – २३/१२/१९९६ ) 

“ अर्वाचीन मराठीतील प्रवासवर्णने ( १८०० ते १९६५ ) : प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार “ या एका वेगळ्याच विषयात श्री. सावंत यांनी पी.एच.डी.मिळवली होती. एकीकडे त्यांचे काव्यलेखनही जोमाने चालू होते.  वारकरी संत साहित्य, आणि बा.भ.बोरकर, मंगेश पाडगावकर, यांच्या सौंदर्यवादी कविता, यांच्या संस्कारांमधून आपले वाङ्मयीन व्यक्तिमत्व घडत गेले असे ते प्रांजळपणे म्हणत असत. तरल संवेदनांनी भारलेले त्यांचे कविमन त्यांच्या प्रत्येक कवितेत आपसूकच जाणवत असे. त्यांच्या कवितांमध्ये तळकोंकणातल्या सांस्कृतिक जीवनाचे काव्यात्मक दर्शन, धार्मिक संज्ञांचा आणि प्रतीकांचा अनेकदा केलेला वापर, अव्यक्त दुःखाची नकळतपणे व्यक्त होणारी अनुभूती, हे सगळे जाणवायचे. निसर्गकवितांमधली ईश्वरी रूपाच्या प्रत्ययाची घेतलेली नोंद, हे  सुद्धा त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कवितेतला विविध वृत्त-छंदांचा वापरही मुद्दाम अधोरेखित करावा असाच. 

‘ स्वस्तिक ‘ या पहिल्या काव्यसंग्रहानंतर, उगवाई, देवराई, माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड, सागरेश्वर, असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ‘ दगड तरे पाण्यावर ‘ ही रामकथेवर आधारित असलेली त्यांची संगीतिका, हा त्यांचा एक वेगळाच काव्याविष्कार. ‘ वसा ‘ हे साडेतीन चरणी ओव्यांचा नियम पाळत त्यांनी रचलेले खंडकाव्य, ही त्यांची विशेष निर्मिती ठरली. आधुनिकतेचे घाव बसू लागल्याने नाश पावत चाललेले कोकणाचे सौंदर्य निदान शब्दरूपात तरी  जपण्याचा ध्यास त्यांना लागला होता, हेच या काव्यातून जाणवते. शापित होऊन भोग भोगावे, तद्वतच बदलत चाललेल्या कोकणाचे हे जणू ‘ प्रदेशचित्र ‘च आहे. ‘ देवराई ‘ मधून कोकण-संस्कृतीची वेगवेगळी रूपे दाखवतांना –

“ अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग रक्तास दे चेतना ।

  इथे नांदते संस्कृती भारताची, घरातून दारात वृंदावना ।।

—असे म्हणणारे प्रेमळ कवीमन, ‘ वसा ‘ मध्ये मात्र अतिशय हळवे झाल्याचे जाणवत रहाते. 

श्री. सावंत यांना पुढील पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे —- “ प्रवासवर्णन- एक वाङ्मयप्रकार “ हा समीक्षाग्रंथ म.रा. साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित करणे हा एक पुरस्कारच म्हणायला हवा. याच मंडळाने दिलेला ‘ कविवर्य केशवसूत ‘ पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार , ‘ उगवाई ‘ या काव्यसंग्रहाला महा. साहित्य परिषदेचे ‘ह. स. गोखले पारितोषिक. 

श्री. सावंत यांना भावपूर्ण वंदन.   

☆☆☆☆☆

आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रीय असणारे मराठी साहित्यिक श्री. वामन होवाळ यांचा आज स्मृतिदिन. ( १९३५ – २३/१२/२०१६ ) 

‘ माणूस ‘ ही त्यांची पहिली प्रसिद्ध झालेली कथा. त्यानंतर बऱ्याच मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. “ अस्मितादर्श “ या नियतकालिकासाठीही त्यांनी नियमित लेखन केले. आवर्जून सांगायचे म्हणजे,  त्यांच्या ‘ मजल्याचे घर ‘, ‘पाऊसपाणी ‘, या कथांचे इंग्लिश आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झाले आहेत. तसेच इतर काही कथांचे हिंदी,उर्दू आणि कानडी भाषेतही अनुवाद केले गेले आहेत. दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन, आणि मुंबईतील झोपडपट्टीतील रहिवाश्यांच्या जीवनाचे चित्र रेखाटणाऱ्या आपल्या कथा ‘ कथाकथन ‘ या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रमुख कथाकथनकार ही त्यांची विशेष ओळख. 

त्यांचे प्रकाशित साहित्य असे — ऑडिट, बेनवाद, येळकोट, वाटा आडवाटा, वारसदार, हे कथासंग्रह. आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात, आणि जपून पेरा बेणं, ही लोकनाट्ये, आणि आमची कविता हे त्यांनी संपादित केलेले पुस्तक. 

श्री. होवाळ यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे साहित्य संमेलन, आणि कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते. 

दलित साहित्यिकांमधील प्रमुख साहित्यिक अशी ख्याती प्राप्त केलेल्या श्री. होवाळ यांना आदरपूर्वक प्रणाम.  

☆☆☆☆☆

आज ज्या आणखी एका लेखकांना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंदन करायला हवे, ते म्हणजे श्री. विष्णू सीताराम चितळे. ( १०/३/१९०० – २३/१२/५३ ) 

ह्यांनी रूढार्थाने ललित-साहित्य निर्मिती केली नव्हती. पण इतिहास संशोधन आणि इतिहास-विषयक लेखन करतांना , लहानांबरोबरच मोठ्यांनाही आपल्या देशाचा इतिहास समजला पाहिजे, आणि त्यासाठी मुळात त्यांना तो वाचण्यात रुची निर्माण झाली पाहिजे, म्हणून ते सतत प्रयत्नशील होते. आणि याच तळमळीने त्यांनी कितीतरी चित्रे, नकाशे, आलेख  यांचा समावेश असलेली पुढील पुस्तके लिहिली होती.—– ब्रिटिशांचा इतिहास, हिंदुस्थानचा अभिनव इतिहास, नवभारताच सांस्कृतिक इतिहास, शनिवारवाडा, सिंहगड, इ.– कुणालाही वाचण्यात रस वाटावा अशा या पुस्तकांबरोबर ‘ इतिहास संचार ‘ नावाचा त्यांचा स्फुटलेखांचा संग्रहही प्रसिद्ध झाला होता. ऐतिहासिक वंशावळी तयार करण्याच्या रियासतकार सरदेसाईंच्या मोठ्या कामात श्री. चितळे यांचा मोठा सहभाग होता. 

स्वान्तसुखाय “ लेखन न करता, अखिल भारतीयांचा विचार करत आपल्या शब्दसामर्थ्याचा सार्थ उपयोग करणाऱ्या श्री. चितळे यांना आदरपूर्वक नमस्कार. 

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  २२ डिसेंबर –  संपादकीय  ?

मराठी साहित्यातील शाहीरी वाङ्मयात मोलाची भर घाणारे पठ्ठे बापूराव म्हणजेच श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचा जन्म ११ नोहेंबर १८६६ ला रेठारे हरणाक्ष इथे ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढे ते औंघच्या महाराजांनी बोलवल्याने तिकडे गेले. महाराणींनी त्यांना बडोद्याला नेले. तिथे त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. आई-वडील लवकर गेल्याने ते पुन्हा गावी परतले.

शाळेत गेल्यावर त्यांना कविता करण्याचा छंद  लागला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्‍या जात्यावरच्या ओव्या ऐकता ऐकता त्यांनी त्यात बादल केले. ‘श्रीधरची गाणी’ म्हणून तीही लोकप्रीय झाली.

गावी घरासमोर असलेल्या वाड्यात तमाशाचा फड चालायचा. त्यांचं मन तिकडे ओढ घ्यायचं. जातीने ब्राम्हण, आणि कुलकर्णी वृत्ती यांनी तिकडे जाताना लाज वाटायची. सुरूवातीला ते चोरून मारून तमाशाला जायचे पण पुढे पुढे तमाशाची ओढ अनिवार झाली आणि शेवटी

‘श्रेष्ठ वर्ण मी ब्राम्हण असूनी    सोवळे ठेवले करूनी घडी

मशाल धरली हाती तमाशाची    लाज लावली देशोधडी

असं म्हणत ते राजरोस तमाशात शिरले. संसार आणि पूर्वापार चालत आलेला आपला व्यवसाय ( कुलकर्णी वृत्ती) सोडून दिला. त्यांनी  इतर तमासागीरांना फडासाठी लावण्या लिहून दिल्या. पुढे स्वत:चा फड काढला. त्यांच्या फडाला विलक्षण लोकप्रियता मिळाली. त्यांच्या फडात पोवळा नावाची लावण्यावती नृत्यांगना होती. बापूरावांची काव्यप्रतिभा पोवळाच्या सहवासात बहरली.  त्यांनी एके ठिकाणी म्हंटले,

‘दोन लक्ष आम्ही केली लावणी   केवढी म्हणावी बात बडी’ अर्थात त्यांच्या सगळ्या लावण्या काही उपलब्ध नाहीत. १९५८ मध्ये त्यांच्या काही लावण्या तीन भागात प्रकाशित झाल्या. त्यांनी गण, गौळण, भेदीक, झगड्यांच्या, रंगाबाजीच्या, वागाच्या इ. विपुल रचना केल्या बापूरावांच्या फडाला अतिशय लोकप्रियता मिळाली. १९०८-१९०९ साली त्यांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांसमोर ‘मिठाराणीचा वग’ सादर केला. तोही अतिशय गाजला.   

पुढे पोवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्यात बेबनाव झाला. त्यांचा फड विस्कटला. या प्रतिभावंताची अखेर अतिशय विपन्नावस्थेत झाली. २२ डिसेंबर १९४५ ला त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिंनानिमित्त त्यांच्या काव्यप्रतिभेला प्रणाम .

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २१ डिसेम्बर –  संपादकीय  ?

कै. नरहर रघुनाथ फाटक 

विचार प्रवाहाविरूद्ध विचार करणारे व स्वतंत्र प्रज्ञा असणारे ,मराठी संत साहित्याचे समीक्षक,पत्रकार,इतिहास संशोधक,चरित्र लेखक अशा विविध भूमिका बजावून मराठी साहित्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे न.र.फाटक यांचा आज स्मृतीदिन.(1979)
त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर,अबू,ग्वाल्हेर,लाहोर असे अनेक ठिकाणी झाले.तत्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाची पदवी प्राप्त केली.शिवाय चित्रकल व संगीत या कलाही त्यांना अवगत होत्या.सुरूवातीला त्यांनी सहाय्यक शिक्षक या पदावर काम केले.नंतर विविधज्ञानविस्तार,इंदुप्रकाश,नवाकाळ,इ.
नियतकालिकांत संपादकीय विभागात काम केले.पुढे एस्.एन्.डी.टी. व रूईया काॅलेज मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांनी अनेक संशोधनात्मक   व चरित्रात्मक पुस्तकांचे लेखन केले आहे.अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरूष,श्री एकनाथ वाड्मय व कार्य,कलावती कादंबरी,थोरांच्या आठवणी,पानिपतचा संग्राम भाग 1 व 2,भारतीय राष्ट्रवादाचा विकास ही त्यापैकी काही पुस्तके.न्यायमूर्ती म.गो.रानडे यांच्या चरित्राचे लेखन करून त्यानी चरित्र लेखनाला प्रारंभ केला.त्यानंतर कृ.प्र.खाडीलकर,यशवंतराव होळकर,लोकमान्य,श्री समर्थ रामदास, इ.चरित्रे लिहीली.त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या ‘आदर्श भारत सेवक’ या लिहीलेल्या चरित्राला साहित्य अकादमीचा 1970 चा पुरस्कार मिळाला आहे.
कै.फाटक यांचा अनेक संस्थांशी संबंध आलेला आहे.मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते.भारत इतिहास संशोधन मंडळ ,प्राज्ञ पाठशाला मंडळ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,मुंबई मराठी साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध ठिकाणी त्यांनी सदस्य किंवा पदाधिकारी या नात्याने काम केले आहे.
त्यांच्या या कार्य कर्तृत्वाला आज स्मृतीदिनी शतशः प्रणाम!

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया, मराठी  विश्वकोश.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २० डिसेंबर –  संपादकीय  ?

आज २० डिसेंबर —श्री अरुण कृष्णाजी कांबळे यांचा स्मृतिदिन. (१४/३/१९५३ – २०/१२/२००९). 

दलित चळवळीचे अग्रणी नेते, आणि “ दलित पँथर्स “ संघटनेचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष म्हणून परिचित असणारे श्री. कांबळे यांची “ मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक, संशोधक, आणि साहित्याचे गाढे अभ्यासक “ अशीही ठळक ओळख होती. समाजातील विषमता नष्ट होऊन समाज एकजिनसी व्हावा यासाठी कणखर नेतृत्व करत आयुष्य खर्ची घालतांना , त्यांच्यातला  प्रभावी वक्तृत्व गुणही, त्यांच्या प्रभावी लेखनाइतकाच महत्वाचा भाग ठरला होता. अर्थात या लक्षवेधी समाजकार्यात त्यांचा ‘ दुर्दम्य आशावाद ‘ हाही एक महत्वाचा भाग होता. त्यांचे साहित्य याकामी खूप मोलाचे ठरले होते, असे नक्कीच म्हणता येईल. 

सांस्कृतिक संशोधन म्हणावे अशा “ रामायणातील संस्कृतीसंघर्ष “ या त्यांच्या प्रबंधासारख्या पुस्तकामुळे त्यांचे विचार महाराष्ट्रभर पोहोचले, आणि विशेष म्हणजे, या लहानशा पुस्तकातून दिसून आलेल्या त्यांच्या व्यासंगाची मान्यवरांना नोंद घ्यावी लागली. “ या जेमतेम ७५ पानातून कांबळे यांनी आपली विद्वत्ता आणि संशोधनाची तळमळ सिद्ध करत, सत्याचा शोध घेतला आहे,” असे श्री विजय तेंडुलकर यांनी या पुस्तकाबद्दल गौरवाने म्हटलेले होते.

त्यांचे इतर प्रसिद्ध साहित्य म्हणजे —धर्मांतराची भीमगर्जना हे आणखी एक सांस्कृतिक संशोधन म्हणून गाजलेले पुस्तक, वाद-संवाद, आणि युगप्रवर्तक आंबेडकर या नावाने दोन वैचारिक पुस्तके, चिवर हा ललित लेख संग्रह, एक काव्यसंग्रह, आणि, चळवळीचे दिवस हे आत्मकथन. 

सांगलीतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ दक्षिण महाराष्ट्र ‘ या साप्ताहिकात ते स्तंभलेखन करत असत. त्यांनी ‘आंबेडकर भारत ‘ हे अनियतकालिक सुरु केले होते. तसेच बाबासाहेबांच्या ‘ जनता ‘ पात्रातील लेखांचे संपादनही कांबळेच करत असत. 

श्री. अरुण कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?   १९ डिसेंबर –  संपादकीय  ?  

आपटे गुरुजी या नावाने ओळखले जाणारे आणि येवला येथे पहिली राष्ट्रीय शाळा सुरू करणारे गांधीवादी लेखक म्हणजे पांडुरंग श्रीधर आपटे. त्यांचा जन्म ६, ऑक्टोबर रोजीझाला.

त्यांची पुस्तके – १. अलौकिक अभियोग – पशू, पक्षी आणि वनस्पती यांनी मानवनिर्मितीत होणार्‍या निसर्गर्‍हासाबद्दलकेलेली तक्रार असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

२. आपल्या पूर्वजांचा शोध – डार्विनच्या सिद्धांतावर हे पुस्तक आधारलेले आहे.

३.कुटुंब रंजन, ४. जवाहरलाल नेहरू, ५. म. गांधी दर्शन ६. लाडला मुलगा, ७. श्रीकृष्णाची आत्मकथा ८.श्री विद्यानंद सरस्वती महाराज व श्री केशव गोविंद महात्म्य ९ सानेगुरूजी ओझरते दर्शन १०. सेनापती बापट ओझरत दर्शन, ११.स्वराज्य मार्गदर्शक लो. टिळक इये. पुस्तके लिहिली.

☆☆☆☆☆

सुरेंद्र बरलिंगे                

तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि तत्वचिंतक म्हणून जगभर मान्यता पावलेले लेखक म्हणजे सुरेंद्र शिवदास बारलिंगे. १९३२ ते ४२ च्या काळात ते स्वातंत्र्य सैनिक होते. १९४०च्या सुमाराला हैद्राबादच्या संग्रामातही ते सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २० जुलै १९१९चा. त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच डी॰ घेतली. प्रबंध उत्तम झाल्यामुळे त्यांना पुढील संशोधनासाठी त्यांना छात्रवृत्ती मिळाली. त्यांच्या प्रबंधाचा वविषय होता, द कन्सेप्ट ऑफ चेंज.  त्यांनी मराठी, हिन्दी आणि इंग्रजी  आशा तीनही भाषातून तत्वज्ञानपर ग्रंथ लिहिले. त्यांनी  पुणे विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, युगोस्लाविया इ. ठिकाणी अध्यापनाचे  काम केले. त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा तत्वज्ञान विषयक आहे.  व ती तीनही भाषांतून आहे. त्यांनी ३ त्रैमासिकांचे संपादन केले. त्यापैकी, परामर्श ही मराठी व हिंदी त्रैमासिके व इंग्रजीत फिलॉसोफिकल क्वार्टरली हे त्रैमासिक होते. तत्वज्ञाना पुस्तके सोडून त्यांनी मराठीत खालील पुस्तके लिहिली. आकाशाच्या सावल्या, इन्किलाब , खरा हा एकाची धर्म, गोष्टीचे गाठोडे, , माझा देश, माझे घरइये. त्यांचे कथासंग्रह आहेत. ओंजळभर पाणी हे आत्मकथन आहे. पुन्हा भेटू या हे   व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे. मी पण माझे ही कादंबरी आहे.

सुरेंद्र बरलिंगे हे १९८० ते १९८९ साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते.

त्यांच्या देहावसानांनंतर त्यांच्यावर परामर्शने विशेषांक काढला. ‘डॉ. बरलिंगे यांचे तत्वज्ञान आणि ललित लेखन यातून त्यांचे जाणवणारे ‘विचारविश्व’ हा विशेषांकाचा विषय होता.                

सुरेंद्र बरलिंगे आणि पांडुरंग श्रीधर आपटे या विद्वानांना त्यांच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक प्रणाम.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १७ डिसेंबर –  संपादकीय  ?

कोशकार, लोकसाहित्याचे अभ्यासक, संपादक आणि संग्राहक अशी विशेष ओळख असणारे श्री. चिंतामण गणेश कर्वे यांचा आज स्मृतिदिन. ( ४/२/१८९४ –१७/१२/१९६० ) 

श्री. कर्वे यांनी रूढार्थाने साहित्यनिर्मिती केली नसली, तरी अशा निर्मितीसाठी अत्यावश्यक सहाय्य करणाऱ्या शब्दकोशांच्या निर्मितीचे फार महत्वाचे आणि मोठे काम त्यांनी करून ठेवलेले आहे. १९१९ साली डॉ. केतकर यांच्या ‘ ज्ञानकोश ‘ प्रकल्पात काम करताकरता त्यांनी ‘कोश संपादन ‘ म्हणजे नेमके काय , त्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन असणे, कुठचाही पूर्वग्रह न बाळगता काळाबरोबर विस्तारणाऱ्या ज्ञानाच्या कक्षांचा सतत वेध घेणे, यासारख्या महत्वाच्या आणि अशासारख्या, कुठल्याही कोशाच्या निर्मितीसाठी मर्मस्थानी  असणाऱ्या गोष्टी आत्मसात केल्या. आणि ज्ञानकोशाचे काम पूर्ण झाल्यावर काही सहकाऱ्यांच्या मदतीने “ महाराष्ट्र शब्दकोश, खंड १ ते ७ “ याची निर्मिती केली. मराठी भाषेत तयार केलेला हा व्यापक स्वरूपाचा पहिला सर्वसमावेशक कोश समजला जातो. त्यासाठी वऱ्हाडी, खानदेशी, कोंकणी, बागलाणी, अशासारख्या वेगवेगळ्या रूपातल्या पण मराठी म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या ज्या ज्या भाषा बोलल्या जातात, अशा बोलीभाषांमधले शब्दसंग्रहही त्यांनी प्रयत्नपूर्वक गोळा केले होते. या शब्दकोशाच्या रूपाने त्यांनी भाषेच्या अभिवृद्धीचे कायमस्वरूपाचे आणि संस्मरणीय असे मोठेच काम करून ठेवले आहे. याव्यतिरिक्त ‘ सुलभ विश्वकोश ‘–६ भाग, ‘ संयुक्त महाराष्ट्र ज्ञानकोश ‘- दोन खंड, ‘ महाराष्ट्र परिचय ‘, असे इतर कोशही त्यांनी स्वतंत्रपणे संपादित केलेले आहेत, ज्यातून वाचकांना बऱ्याच गोष्टींची विस्तृत माहिती उपलब्ध होईल. 

पाश्चात्य नीतिशास्त्र , सुबोधन आणि धर्मचिन्तन, मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी, असे वेगळ्याच विषयांवरचे ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत. 

‘ लोकसाहित्य ‘ या त्यांच्या आवडत्या विषयातल्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची नोंद घेत, महाराष्ट्र शासनाने १९५६ साली स्थापन केलेल्या ‘ लोकसाहित्य समिती ’चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. 

ज्ञानोपासक आणि  ज्ञानसंग्राहक अशी ख्याती प्राप्त केलेल्या ‘ कोशकार ’ कर्वे यांना विनम्र श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

संस्कृतचे प्रगाढ पंडित असणारे श्री. श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर यांचा आज स्मृतिदिन. 

( २/८/१८७७ – १७/१२/१९४२ ) 

मुंबई विद्यापीठाचे मराठी विषयात एम.ए. केलेले हे पहिले विद्यार्थी (सन १९०३ ). कवी आणि साहित्य-समीक्षक म्हणून ते सर्वांना परिचित झालेले होते. याच्या जोडीने त्यांना नाटकाची विशेष आवड असल्याने, “ उत्तम नाटक कसे असावे “ याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्यामुळे तेव्हाची ‘ नाटक मंडळी ‘ आणि अभिनेते नेहेमी त्यांचे मार्गदर्शन घेत असत. ते अभिनय-क्षेत्रातलेही जाणकार असल्याने, अनेक नटांनी त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले होते. 

‘ एकावली ‘ हा एकश्लोकी कवितांचा संग्रह ( सन १९३३ ), ‘ गुणसुंदरी ‘ या नावाने, सरस्वतीचंद्र नावाच्या गुजराथी कादंबरीचा मराठी अनुवाद ( सन १९०३ ), आणि ‘ सुवर्णचंपक ‘ हा १९२८ सालातला काव्यसंग्रह, असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झालेले होते. 

पुण्यामध्ये १९२३ साली भरलेल्या १९ व्या, आणि १९२७ साली भरलेल्या २२ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते. 

काव्यसमीक्षेचा महत्वाचा भाग असणाऱ्या ‘ काव्यातील रसव्यवस्था ‘ या विषयावर महत्वपूर्ण लेखन करणारे श्री. श्री. नी  चापेकर यांना मनापासून अभिवादन. 

☆☆☆☆☆

साहित्यक्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतले एक दिग्गज म्हणून सुपरिचित असणारे श्री. मधुसूदन कालेलकर यांचा आज स्मृतिदिन. ( २२/३/१९२४ – १७/१२/१९८५ )

गणेशोत्सवाच्या निमित्ताने लिहिलेले एक नाटक, ही त्यांच्या लिखाणाची सुरुवात. इथेच त्यांनी साहित्यक्षेत्रात आपले पाऊल ठामपणे रोवले, आणि पुढची कितीतरी वर्षे त्यांनी विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. नाटककार, कथाकार, कवी म्हणून प्रसिद्धी मिळवत असतांनाच, मराठी आणि हिंदी चित्रपट-विश्वात ते गीतकार आणि पटकथाकार म्हणून ख्यातनाम झाले. त्यांनी थोडीथोडकी नाही तर एकूण २९ नाटके, आणि मराठी व हिंदी मिळून तब्बल १११ चित्रपटकथा लिहिल्या होत्या. त्यामध्ये कौटुंबिक, सामाजिक, गंभीर, विनोदी, असे अनेक विषय हाताळले होते. त्यांची अनेक नाटके गुजराती भाषेत अनुवादित झाली आहेत, ज्याचे प्रयोग अजूनही होताहेत. काही नाटकांवर मराठी, तसेच हिंदी चित्रपटही झाले आहेत. त्यांनी स्वतः चार नाटकांची निर्मितीही केलेली होती. ‘ बात एक रातकी ‘, ‘ झुमरू ‘, ‘ ब्लफ मास्टर ‘, अखियोंके झरोकेसे ‘, गीत गाता  चल ‘,’ फ़रार ‘, हे त्यांचे काही नावाजलेले हिंदी चित्रपट. त्यांच्या ‘  दुल्हन वही जो पिया मन भाये ‘ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा  १९७८चा सर्वोत्तम पटकथालेखक हा पुरस्कार मिळाला होता. 

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात, सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद, यासाठी दिले जाणारे पुरस्कार त्यांना नऊ वेळा दिले गेले होते. ‘ आम्ही जातो आमुच्या गावा ‘, ‘ पाहू रे किती वाट ‘,

‘ अपराध ‘, ‘ जावई विकत घेणे आहे ‘, ‘ अनोळखी ‘, हे त्यातले काही चित्रपट. ‘ हा माझा मार्ग एकला ‘ या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना मिळालेले इतर पुरस्कार असे —-    

‘ निंबोणीच्या झाडाखाली –’ या त्यांच्या अंगाईगीताला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार.

रसरंग- फाळके गौरव पुरस्कार ( हा त्यांना तीन वेळा दिला गेला आहे. )

गदिमा प्रतिष्ठानकडून उत्कृष्ट लेखक म्हणून विशेष गौरव व पुरस्कार. 

‘ जन्मदाता ‘ या चित्रपट कथेला गुजरात शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार ( मरणोत्तर ). 

‘ मधुघट ‘ हा त्यांनी लिहिलेला व्यक्तिचित्र-संग्रह, ज्याला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. 

‘ तो राजहंस एक ‘ हे त्यांच्या या प्रदीर्घ साहित्यिक कारकिर्दीवर लिहिलेले पुस्तक, श्री रमेश उदारे यांनी संपादित केलेले आहे. 

श्री. कालेलकर यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १४ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १४ डिसेंबर –  संपादकीय  ?

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

जन्म – 1 ओक्टोबर 1919  मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆

☆ कवितेचा उत्सव ☆ झटकून टाक जीवा.. ☆ महाकवी ग.दि. माडगूळकर ☆  

आज १४ डिसेंबर : –

‘कवी, गीतकार, साहित्यिक, पटकथा व संवाद लेखक, आणि मोजक्याच भूमिका करूनही त्या सर्वच भूमिका संस्मरणीय करणारे चरित्र-अभिनेता, अशा अनेक पैलूंनी नटलेले अतिशय ख्यातनाम व्यक्तिमत्व ‘ म्हणून रसिकांना सुपरिचित असणारे, आणि आपल्या लेखन-कर्तृत्वाने, “ आधुनिक वाल्मिकी “ म्ह्णूनच अगदी उत्स्फूर्तपणे आणि उचितपणे गौरविले जाणारे श्री. ग.दि.माडगूळकर यांचा आज स्मृतिदिन. ( ०१/१०/१९१९–१४/१२/१९७७ ) 

‘ गदिमा ‘ हे त्यांचं सगळ्यांच्या तोंडी असणारं आवडतं नाव. 

संत काव्य, पंडिती काव्य, शाहिरी काव्य, भावकाव्य, अशा वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या काव्यशैलींचा अनुभव या एकाच कविवर्यांच्या असंख्य गीतांमधून रसिक घेऊ शकतात हे गदिमांचे खास वैशिष्ट्य. “ अतिशय अर्थपूर्ण असणाऱ्या कितीतरी सुरेख काव्यांचा चित्रदर्शी सुंदर गोफ “ असेच ज्याचे यथार्थ वर्णन करायला हवे, त्या त्यांच्या अजरामर झालेल्या ‘ गीतरामायण ‘ या काव्याचे, इतर भारतीय भाषांमध्येही अनुवाद झालेले आहेत. “ भूमिकन्या सीता “ या नाटकातली ”मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी“, “ मानसी राजहंस पोहतो “, यासारखी भावगीतांच्या धाटणीची असलेली त्यांची नाट्यगीतेही खूप गाजलेली आहेत. त्यांनी उत्तम बालगीते आणि समरगीतेही लिहिलेली आहेत.

सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करत असतांना गदिमांनी त्यांच्याकडची खूप पुस्तके वाचली, आणि त्यांच्या गद्य लेखनाला जोमाने सुरुवात झाली. त्यांनीच लिहिलेली चित्रपट कथा, त्यांनीच लिहिलेले संवाद, आणि त्यांनीच लिहिलेली गीते, यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या “ लोकशाहीर रामजोशी “ या एका चित्रपटाचे उदाहरणही याबाबतीत पुरेसे आहे. कारण इथूनच “ मराठी चित्रसृष्टीचा भक्कम आधार “ अशी त्यांची ख्याती झाली. त्यांचे सोपे पण प्रभावी आणि मनाला सहजपणे भिडणारे संवादलेखन, हा अनेक वैविध्यपूर्ण आणि यशस्वी चित्रपटांचा कणा होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कथाकार आणि संवादलेखक म्हणून त्यांनी पंधरा हिंदी चित्रपटांसाठीही काम केले होते, हे विशेषत्वाने सांगायला हवे.

 गदिमांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या अत्युत्कृष्ट आणि चौफेर कामगिरीबद्दल अगदी तपशीलवार लिहायचे झाले तर आपोआपच एक प्रदीर्घ प्रबंध तयार होईल. १ ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण “ गदिमा विशेषांक “ प्रकाशित केला होता, ज्यात आपल्या लेखक-लेखिकांनी त्यांच्या साहित्यासंदर्भात उत्तम लेख लिहिले होते. त्यामुळे आज पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळत आहे. 

पद्मश्री गदिमा यांना अतिशय भावपूर्ण आदरांजली.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १३ डिसेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १३ डिसेंबर –  संपादकीय  ?  

  २००३मध्ये कर्‍हाडमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नंतर वळवयी येथे झालेल्या अखिल गोमंतकीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष भेंडे यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ मध्ये बोरी यथे झाला. केपे हे त्यांचे मूळ गाव. तिथून ते शिकण्यासाठी आधी सांगलीला मग पुण्याला गेले. त्यांनी अर्थशासत्रात डॉक्टरेट मिळवली. नंतर मुंबईतील कीर्ती कॉलेज इथे अध्यापन केले. गोवा मुक्तीसंग्रहानंतर साहित्यिक म्हणून ते प्रकाशात आले.

सुभाष भेंडे यांची आगतिक, अदेशी, अंधारवाटा , आमचं गोय आमका जय, उध्वस्थ, ऐसी कळवळ्याची जाती, कागदी बाण, खुसखुशीत, गंभीर आणि गमतीदार , द्राक्ष आणि रुद्राक्ष  इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते अतिशय वाचकप्रिय लेखक होते. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण या ग्रंथाचा शिल्पकार चरित्र कोश या दुसर्‍या खंडाचे त्यांनी संपादन केलेगोमंतकाच्या ७० – ८० वर्षात झालेल्या राजकीय, सामाजिक परिवर्तनाचा वेध घेणारी कादंबरी ‘होमकुंड’ या नावाने प्रसिद्ध आहे.

भेंडे यांनी काही अनुवादही इंग्रजीतून मराठीत केले. अल्लाउद्दीन आणि अलीबाबा, इसापाच्या गोष्टी कुमाऊंचे नरभक्षक इ. त्यांची अनुवादीत पुस्तके आहेत.  

आपल्या अमेरिकेतील अनुभवावर ‘गाड्या आपुला गाव बरा हा लेख त्यांनी लिहिला. तो १२वीच्या पाठ्यपुस्तकात आहे.

सुभाष भेंडे यांचा आज स्मृतीदिन . त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भेंडे कुटुंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी नवोदित लेखकांसाठी पुरस्कार ठेवला आहे. 

आत्तापर्यंत हा पुरस्कार, बाबन मिंडे, किरण गौरव, गणेश मतकरी, शिल्पा कांबळे, बालिका ज्ञानदेव, रश्मी कशाळकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

 ☆☆☆☆☆

सखाराम कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ला बेळगाव येथे झाला. घराची गरीबी असल्यामुळे त्यांना कॉलेजचे शिक्षण मोठ्या कष्टाने, स्वत: अर्थार्जन करून घ्यावे लागले. वी.स. खांडेकर यांच्या प्रयत्नाने त्यांना देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या कॉलेजमध्ये ग्रंथपालाची  नोकरी लागली. साहित्याची आवड असल्याने ते या नोकरीत रमले. शेवटी या कोलजमधील ग्रंथपाल पदावरूनच ते  निवृत्त झाले. थोडेच पण कलात्मक लेखन त्यांनी केले. ‘हिरवी काच’ ही त्यांची कथा १९५९ साली सत्यकथेत आली. या कथेला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांचे बहुतेक लेखन सत्यकथेत प्रकाशित झाले आहे. सांज, ढग, हे त्यांचे कथासंग्रह आहेत, तर ‘पार्टी’ हा ललित लेख संग्रह आहे.

सुभाष भेंडे, सखा कलाल या लेखक द्वयीला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र श्रद्धांजली.

 ☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हााड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ डिसेम्बर–संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १२ डिसेम्बर –  संपादकीय  ?

पं. महादेवशास्त्री जोशी.

वेदान्त, व्याकरण, ज्योतिष, काव्यशास्त्र अशा विषयांचे पारंपारिक पद्धतीने अध्ययन करून शास्त्री ही पदवी संपादन करणारे पं. महादेवशास्त्री जोशी यांचा आज स्मृतीदिन! (1992)

गोव्यात जन्मलेले शास्त्रजी गोवा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप झाले होते. गोवा व सांगली येथे शिक्षण घेतल्यानंतर  त्यांनी गोव्यात सत्तरी शिक्षण संस्था स्थापन केली व शैक्षणिक कार्याला वाहून घेतले. चैतन्य या मासिकाचे संपादन करून लेखन चालू केले. ‘राण्यांचे बंड ‘ ही त्यांची पहिली कथा याच मासिकातून प्रकाशित झाली.  वेलविस्तार हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर  त्यांनी एकूण दहा कथासंग्रह लिहिले. कल्पवृक्ष, खडकातील पाझर, विराणी हे त्यापैकी काही. शिवाय भारतदर्शन प्रवासमाला,   मुलांचा नित्यपाठ व आईच्या आठवणी हे बालसाहित्य, आत्मपुराण, आमचा वानप्रस्थाश्रम ही  आत्मचरित्रे असे त्यांचे अन्य साहित्य आहे. त्यांनी भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड संपादित केले आहेत. तसेच मुलांच्या संस्कृती कोशाचे चार खंड  

संपादित केले आहेत. त्यांच्या रसाळ, ओघवत्या भाषेतून गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडते.

त्यांच्या काही कथांवर चित्रपट निघाले असून ते लोकप्रिय झाले आहेत. कन्यादान, धर्मकन्या, वैशाख वणवा, मानिनी, जिव्हाळा, थांब लक्ष्मी कुंकू लावते हे सर्व चित्रपट त्यांच्या, कथांवरील आहेत.

1980 साली गोवा येथे झालेल्या गोमंतकीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

☆☆☆☆☆

निरंजन  उजगरे.

सुप्रसिद्ध कवी, लेखक व अनुवादकार  निरंजन उजगरे यांचाही आज स्मृतीदिन आहे. (2004)ते व्यवसायाने अभियंता होते. पण त्याचबरोबर त्याना लेखन कलेची देणगीच लाभली होती. सुरूवातीला ते ‘किरण’ या टोपणनावाने लिहीत असत. पुढचे लेखन मात्र त्यांनी निरंजन या नावानेच केले. इंग्रजी, रशियन, तेलगू, सिंधी, हिंदी, मराठी अशा विविध भाषा त्यांना अवगत होत्या.

काव्यपर्व, जायंटव्हील, परिच्छेद, फाळणीच्या कविता,

हिरोशिमाच्या कविता, दिनार, दिपवा, तत्कालीन, कवितांच्या गावा जावे ही त्यांची काही पुस्तके. कवितांच्या गावा जावे हा  कार्यक्रमही त्यांनी लोकप्रिय केला होता.

सोविएट लॅन्डचा नेहरू पुरस्कार आणि  कविवर्य ना. वा. टिळक हे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

1996 साली  मालवण येथे झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1999 साली डोंबिवली  येथील 32व्या काव्य रसिक मंडळाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वास सलाम !

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकिपीडिया,विकासपिडीया.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ११ डिसेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ११ डिसेंबर –  संपादकीय  ?

आज ११ डिसेंबर : –

संस्कृत आणि भारतीय संस्कृती या विषयांचे गाढे अभ्यासक, आणि त्यासंदर्भात विपुल लेखन करणारे प्रसिद्ध लेखक श्री. रामचंद्र नारायण तथा रा.ना. दांडेकर यांचा आज स्मृतिदिन. ( १७/०३/१९०९ – ११/१२/२००१ ) 

१९३६ साली जर्मनीतून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. नंतर पुणे विद्यापीठात संस्कृत व प्राकृत भाषाविभाग प्रमुख, कला विभाग प्रमुख, पुढे संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक, भांडारकर प्राच्यविद्या मंदिराचे मानद सचिव आणि नंतर उपाध्यक्ष, अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली होती. आपल्या उपखंडातील विविध भाषांसंदर्भात संशोधन आणि इतर संलग्न कामे करणाऱ्या अनेक भारतीय, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कामात त्यांचा सतत सक्रीय सहभाग असायचा. “ युनेस्को “ चे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते. 

त्यांनी बरेचसे साहित्य इंग्लिशमध्ये लिहिले होते– वैदिक सूची– ६ खंड, इनसाईट इनटू हिंदुइझम, हडप्पन बिब्लिओग्राफी, रिसेन्ट ट्रेंड्स इन इंडॉलॉजी, संस्कृत स्टडीज आउटसाइड इंडिया, वैष्णविझम अँड शैविझम,- अशासारखी त्यांची अतिशय सखोल अभ्यासपूर्ण पुस्तके म्हणजे अभ्यासकांसाठी महत्वाचे मार्गदर्शक ठरलेले आहेत. हिंदुधर्म–इतिहास आणि आशय, तसेच, वैदिक देवतांचे अभिनव दर्शन, ही त्यांची मराठी पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. 

१९६२ साली भारत सरकारने “ पद्मभूषण “ हा सन्मान देऊन त्यांना गौरविलेले होते. आणि २००० साली त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिप देण्यात आली होती. 

पद्मभूषण श्री रा.ना.दांडेकर यांना आजच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली. 

☆☆☆☆☆

आज र. गो. ( रघुनाथ गोविंद ) सरदेसाई यांचाही स्मृतिदिन. ( ७/९/१९०५ – ११/१२/१९९१ ) 

लेखक, पत्रकार, संपादक, कथाकार, नाट्य-चित्र समीक्षक, आणि क्रीडाविषयक पुस्तकांचे लेखक,  अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारा  कर्तृत्ववान माणूस अशीच श्री. सरदेसाई यांची ओळख सांगायला हवी. 

चित्रमय जगत, आणि स्फूर्ती या मासिकांचे ते अनु. सहसंपादक व संपादक होते. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या चित्रा, तारका, नवयुग, विविधवृत्त, विहार, या साप्ताहिकांमध्ये, मराठा या दैनिकामध्ये, आणि यशवंत या मासिकासाठी त्यांनी अनेक वर्षे संपादकीय काम केले होते. नवाकाळ या प्रसिद्ध दैनिकाचे सहसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. क्रीडा व नाट्य या विषयांवर त्यांनी वृत्तपत्रातून विपुल लेखन केले होते. त्यांचे क्रीडाविषयक लिखाण ‘ हरिविवेक ‘ या टोपणनावाने ते करत असत.  

याव्यतिरिक्त, त्यांची पुढील पुस्तकेही प्रसिद्ध झाली होती —-’ आमचा संसार ‘ हा विनोदी लेखसंग्रह, ‘ कागदी विमाने ’ , ‘ चलती नाणी ‘, हे लघुनिबंध संग्रह, ‘ खेळ किती दाविती गमती ‘ 

या नावाने विविध खेळांच्या कथा, ‘ खेळाचा राजा ‘ हा लॉन टेनिसचा संपूर्ण इतिहास सांगणारा ग्रंथ, 

‘ क्रीडा ‘ हे खेळ आणि खेळाडू यांच्याबद्दलचे चुटके सांगणारे पुस्तक, ऑलिम्पिक सामन्यांविषयी माहिती देणारे ‘ खेळांच्या जन्मकथा ‘ हे २ भागातले पुस्तक.

 त्यांनी लिहिलेले ‘ हिंदी क्रिकेट ‘ या नावाचे पुस्तक हे मराठीतले क्रिकेटसंबंधीचे पहिले पुस्तक म्हणून ओळखले जाते. 

चित्रा, स्वाती, महाश्वेता, असे त्यांचे कथासंग्रह, बहुत दिन नच भेटती या नावाने ललित लेख, माझ्या पत्र-जीवनातील शैली हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह, सुरसुरी हा विनोदी लेखसंग्रह, असे त्यांचे इतर वैविध्यपूर्ण साहित्यही  प्रसिद्ध झालेले होते. 

श्री र.गो.सरदेसाई यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी सादर अभिवादन.  

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares