ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
आदिमाया अंबाबाई, आला आला वारा, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?, जरा विसावू या वळणावर, फिटे अंधाराचे जाळे, रात्रीस खेळ चाले, सांज ये गोकुळी सावळी सावळी या सारख्या सदाबहार गीतांनी श्रोत्यांच्या मनावर गारुड केलं, नव्हे अजूनही करताहेत, ती गीते सुधीर मोघे यांच्या लेखणीतून लिहिली गेली. कवी, गीत, चित्रपट गीत, पटकथा लेखन, ललित लेखन, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण, दिग्दर्शन या बहुविध माध्यमातून, रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट इ. क्षेत्रात त्यांचा संचार झाला.
‘कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे ध्वनी –प्रकाश योजनेच्या सहाय्याने आपल्या मराठी कविता, गीते सादर करत.
सुधीर मोघे यांचे कविता संग्रह –
१. आत्मरंग, २. गाण्याची वही, ३. पक्ष्यांचे ठसे, ४. शब्दधून, ५. स्वातंत्रते भगवती
सुधीर मोघे यांचे गद्य लेखन –
१. अनुबंध, २. कविता सखी, ३. गाणारी वाट, ४. निरंकुशाची रोजनिशी
सुधीर मोघे यांनी ५०हून अधीक चित्रपटांसाठी गीतलेखन केले.
सुधीर मोघे- पुरस्कार आणि सन्मान –
१. सर्वोत्कृष्ट गीतकार – अल्फा गौरव
२. ग. दी. मा. प्रतिष्ठान – चैत्रबन
३. महाराष्ट्र साहित्य परिषद – ना.घ. देशपांडे पुरस्कार.
४. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान – शांता शेळके पुरस्कार.
सुधीर मोघे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ चा. आज त्यांचा स्मृतीदिन. या प्रतिभासंपन्न कवी, गीतकार, लेखकाला शतश: वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
सुरेश भट
मी कसे थोपवू शब्द माझे?
हिंडती सूर आसपास किती.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
सांभाळतात सारे आपापली दुकाने
मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे
जीवना,तू तसा,मी असा
खेळलो खेळ झाला तसा
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्याना परंतु
तापल्या मातीत माझ्या
घाम मानाने गळू दे
असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी—कधीतरी
असायचे–नसायचे
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही
किती काव्यपंक्तींचा उल्लेख करावा ? काही ओळखीच्या,काही अनोळखी.एखाद्या झंझावाताने झपाटून टाकावे तशा कविता आणि नंतर झालेली त्यांची गीते.शब्दांच्या काफिल्याचा रंगच वेगळा.एकदा एल्गार पुकारल्यावर रसवंतीने मुजरा करावा अशा या सप्तरंगी कवितांचे जनक श्री.सुरेश भट यांचा आज स्मृतीदिन.त्यांचे काव्य हीच त्यांची खरी ओळख.संगीताची आवड बालपणा पासून असलेल्या सुरेश भटांनी आपल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी स्वतःचे शरीर मजबूत बनवले.कोमल ,रसिक मन आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची वृत्ती यामुळेच की काय त्यांची कविताही कोमल आणि तितकीच सशक्त झाली.मराठीत गझल लेखनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून मराठी साहित्यात गझल लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच त्यांना ‘गझलसम्राट’ही पदवी मिळाली.गडचिरोली येथे झालेल्या एकोणचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते .
हिंडणारा सूर्य या गद्य लेखना व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेल्या कवितांचे संग्रह असे:
एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग आणि सुरेश भट यांच्या निवडक कविता.
‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ असे त्यांनी लिहिले असले तरी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर’अजुनी सुगंध येई दुलईस मोग-याचा’ प्रमाणे त्यांच्या काव्य दरवळचा आस्वाद घेत त्यांच्या स्मृती जपूया.
गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर:
काव्य वाचनाचे कार्यक्रम करून मराठी कविता गावोगावी पोचवून लोकप्रिय करणरे तीन कवी म्हणजे कविवर्य वसंत बापट,मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर.
आज विंदांची पुण्यतिथी. कोकणातील देवगड जवळील खेड्यात जन्मलेल्या या कवी लेखकाने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून मराठीला पुन्हा एकदा सन्मान मिळवून दिला. विंदा हे कवी तर होतेच पण अनुवादक, समीक्षक आणि बालसाहित्यिकही होते.वास्तववाद आणि प्रयोगशिलता हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होते.त्यांचे बालसाहित्य वाचताना त्यांच्यातील खट्याळ स्वभावाचे दर्शन होते.’माझ्या मना बन दगड’ असे म्हणणारा हाच का तो कवी असा प्रश्न पडावा इतक्या मनोरंजनात्मक बालकविता त्यांनी लिहील्या आहेत.
‘माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वतःला जिंकणे,एवढे लक्षात ठेवा’
‘मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे,ते मागचे इशारे’
‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर’ किंवा
देणा-याने देत जावे, तेच ते अन् तेच ते, सब घोडे बारा टक्के,
यासारख्या कविता त्यांच्या प्रतिभेचे पैलू दाखवतात. राणीचा बाग, सशाचे कान, एकदा काय झाले, परी ग परी अशा बाल कविता थोरांनाही बालपणात घेऊन जातात.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या मते करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे,शैली वक्तृत्वपूर्ण आहे पण भाषणबाजी नाही.तर कविवर्य शंकर वैद्य म्हणतात की विंदांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धीवादी,पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे.
कबीर पुरस्कार, कवी कुसुमाग्रज, केशवसुत, कुमारन् आसन, कोणार्क, जनस्थान, महाराष्ट्र फौंडेशन, म.सा.प,डाॅ. लाभसेटवार,सोविएट लॅन्ड नेहरू लिटररी पुरस्कार आणि अष्टदर्शन ला ज्ञानपीठ पुरस्कार.
ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला अर्पण केली व अमराठी साहित्य मराठीत अनुवादीत करण्यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव पुरस्कार सुरू केला.
अनेक विद्यापीठांनी त्यांना डी.लीट.ही पदवी बहाल केली आहे.
“वाचकांचे अनेक थर आहेत.यातला कोणताही थर वंचित ठेवणे हे पाप आहे.”असे मानणा- या विंदाना आदरपूर्वक प्रणाम.
इंदुमती शेवडे
इंदुमती शेवडे या विदर्भातील पत्रकार व लेखिका.तसेच त्या उत्तम चित्रकारही होत्या.मराठी कथेचा उद्गम आणि विकास या विषयावर त्यांनी पी.एच्.डी. केले होते. जी. डी. आर्टस् ही कलापदवी प्राप्त केली होती.
तरूण भारत, नागपूर या दैनिकात पत्रकारिता करून ‘महिलांचे मनोगत’ हे सदर अनेक वर्षे चालवले होते. आकाशवाणी,नागपूर येथे सहायक कार्यक्रम निर्माता (मराठी भाषण) या पदावरही काम केले. बी.बी.सी.च्या प्रशिक्षण वर्गात त्यांचा सहभाग होता.नंतर त्यांना दिल्ली येथील यु.पी.एस्.सी. च्या मराठी विभागात काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे प्रकाशित इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला.तसेच मिर्झा गालीब यांचेविषयी माहिती घेऊन त्यांच्या जीवनावर कादंबरी लिहीली. चौथे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन त्यांचे हस्ते पार पडले.
साहित्य निर्मिती:
इथे साहिबाचिये नगरी(प्रवासवर्णन)
पु.य.देशपांडे(चरित्र)
संत कवयित्री: पाच संत कवयित्रींचा वेगळ्या पद्धतीने विचार.
कथा एका शायराची (मिर्झा गालीब कादंबरी)
विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणा-या इंदुमती शेवडे यांना वंदन.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :विकिपीडिया व संबंधित कवींचे काव्यसंग्रह.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १३ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
दत्तात्रय कोंडो घाटे
दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त (27 जून 1875 – 13 मार्च 1899). हे मूळचे श्रीगोंद्याचे. त्यांचे शालेय शिक्षण नगरमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई, इंदूर, कलकत्ता येथे झाले. नंतर ते पुण्याच्या नू. म. वि.मध्ये शिक्षक होते.
रेव्ह. ना. वा. टिळक, कविवर्य चंद्रशेखर वि कवी दत्त या तिघांचे सख्य होते.
‘बा नीज गडे ‘ ही कवी दत्तांची लोकप्रिय कविता. त्यांनी 1897-98 मध्ये बहुसंख्य कविता लिहिल्या. त्या वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी 48 कवितांचा ‘दत्तांची कविता ‘हा संग्रह त्यांचे पुत्र शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक वि. द. घाटे यांनी 1922 साली प्रसिद्ध केला. डॉ. मा. गो. देशमुखसंपादित संग्रहात त्यांच्या सर्व म्हणजे 51 कविता आहेत.
आकाशानंद
आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (1933-13 मार्च 2014). आकाशानंद हे पूर्वी नागपूर नभोवाणी केंद्रात कार्यक्रम निर्माते होते. नंतर 1972 पासून मुंबई दूरदर्शन केंद्रात आले.1992 साली ते तिथे उपसंचालक पदावरून निवृत्त झाले.
त्यांनी सादर केलेले ‘ऐसी अक्षरे ‘, ‘शालेय चित्रवाणी’ व ‘ज्ञानदीप ‘हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले.
1988मध्ये ‘ज्ञानदीप’ या कार्यक्रमावर बीबीसीच्या एलिझाबेथ स्मिथ यांनी 45 मिनिटांचा लघुपट केला. याच कार्यक्रमावर अमिता भिडे यांनी पीएचडी मिळवली.
‘ज्ञानदीप’वर आधारित असलेले ‘ज्योत एक सेवेची’ हे मासिक त्यांनी 25 वर्षे चालवले.
1992मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पहिल्या ‘ज्ञानदीप’ मंडळाची स्थापना केली. त्यांचा विस्तार होऊन राज्यात 1500 मंडळे स्थापन झाली.
त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ वगैरे पाच पुस्तके व बालसाहित्यात 300 गोष्टीची पुस्तके लिहिली.
त्यांच्या ‘माध्यम चित्रवाणी’ या दूरचित्रवाणी या विषयावरील पहिल्या मराठी पुस्तकाला राज्यसरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय त्यांना गोंदियाभूषण व सेवाश्री पुरस्कारही मिळाले.
मालतीबाई किर्लोस्कर
मालतीबाई किर्लोस्कर या विख्यात मराठी संपादक व लेखक शंकरराव किर्लोस्करांच्या कन्या.
त्या सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्या अतिशय सुंदर शिकवत असत.
पक्की वाङ्मयीन व वैचारिक बैठक, भारदस्त व्यक्तिमत्त्व व विपुल व्यासंग ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये. त्या परखड व स्पष्टवक्त्या होत्या.
त्या ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ मध्ये अधूनमधून लिहीत असत.
‘भावफुले’ व ‘फुलांची ओंजळ’ हे त्यांचे व्यक्तीचित्रसंग्रह प्रसिद्ध आहेत.
13 मार्च 2017 ला त्यांचे निधन झाले.
रमेश मुधोळकर
बालसाहित्यकार व चित्रकार रमेश मुधोळकर (19.07.1935 – 13.03.2016) यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे झाले.पुढे ते मुंबईला आले. तिथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले.
1972मध्ये त्यांचे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध झाले.1974 मध्ये त्यांनी ‘शालापत्रक’ हे मासिक सुरू केले. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे 300 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यात ‘इसाप’, ‘गलिव्हरच्या गोष्टी’, ‘बिरबल आणि बादशहाच्या 175 गोष्टी’ यांचा समावेश आहे.
जयको पॉकेट बुक्स व अमर चित्रकथा तसंच एको बुक्स या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा मोठाच वाटा आहे.
देशोदेशीच्या रसाळ कथा, तसंच खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीत असे बरेच लेखन त्यांनी मराठी व इंग्रजीतून केले. त्याचप्रमाणे शंकरमहाराज व दिगंबरदास महाराज यांच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.
‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ या संस्थेचे ते संस्थापक -सदस्य होते.
2009मध्ये त्यांच्या लेखनाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली.
13 मार्च 2016 मध्ये पुणे येथे त्यांचा देहांत झाला.
कवी दत्त, आकाशानंद, मालतीबाई किर्लोस्कर व रमेश मुधोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया, इंटरनेट. मराठीसृष्टी. कॉम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वि. वा. शिरवाडकर
विष्णू वामन शिरवाडकर (27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999) हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, कथाकार, नाटककार वगैरे होते. ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या.
त्यांचे वास्तव्य नाशिकमध्ये होते.
सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती, शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वातील मानवी वृत्तीचा शोध घेतला. ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित केले आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायचा प्रयत्न केला.’पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या कवितेतून त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप प्रत्ययास येते. त्यांचे समृद्ध व प्रगल्भ व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
त्यांची पुस्तके :
‘विशाखा’, ‘ वादळवेल’ इत्यादी 22कवितासंग्रह.
‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’ वगैरे 22 नाटके.
7 लघुनिबंध व इतर लेखनाचे संग्रह.
9 कथासंग्रह.
‘कल्पनेच्या तीरावर ‘ वगैरे 3 कादंबऱ्या.
‘वाटेवरच्या सावल्या’ हे आठवणीपर पुस्तक.
काही एकांकिका संग्रह.
याव्यतिरिक्त त्यांनी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत.
‘सती सुलोचना’ या धार्मिक चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले आहे.
सुरुवातीच्या काळात ते नियतकालिकात व वृत्तपत्रात संपादक होते.
याशिवाय ‘कुसुमाग्रजां’वर इतरांनी लिहिलेली सहा पुस्तके व वि. वा. शिरवाडकरांवर लिहिलेली दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही :
1991 साली साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या ‘विशाखा’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.
1986मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान केली.
अंतराळातील एका ताऱ्यास ‘कुसुमाग्रज’ हे नाव देण्यात आले.
त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शिवाय त्यांच्या नावानेही अनेक पुरस्कार दिले जातात.
10 मार्च 1999 रोजी त्यांचे देहावसान झाले असले, तरी मराठी साहित्यात ते अमर आहेत.
त्यांना ई -अभिव्यक्ती परिवारातर्फे सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर– ई – अभिव्यक्ती (मराठी)
मराठी नाट्यसृष्टी’ असे शब्द उच्चारले, तरी एक नाव अपरिहार्यपणे डोळ्यापुढे येतं , ते म्हणजे वि. भा. देशपांडे अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे. त्यांनी काही आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवली नाही. त्यांनी नाट्यसृष्टीबद्दल विपुल लेखन केलं. ते बराच काळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. २०१५पर्यन्त त्यांनी एकूण ५१ पुस्तके लिहिली. त्यापैकी २५ पुस्तके नाट्यविषयक आहेत. मराठी नाट्यकोश हा १२०० पानी ग्रंथ लिहिला आणि कोश वाङमयात मोलाची भर टाकली.
नाटकातील माणसं, गाजलेल्या भूमिका, नाटक नावाचे बेट, निळू फुले, नाट्यभ्रमणगाथा, निवडक नाट्यप्रवेश ( पौराणिक ), वारसा रंगभूमीचा, आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा ही त्यांची गाजलेली काही पुस्तके. नाटक, साहित्य, संगीत यावर त्यांनी नितांत प्रेम केले. आजवरच्या प्रवासात त्यांना भेटलेली माणसे, आणि त्यांचे आलेले अनुभव, म्हणजेच नाट्यभ्रमणगाथा हे त्यांचे पुस्तक. अनेक मोठमोठ्या नाट्यकलाकारांशी त्यांची ओळख झाली. स्नेह जुळले. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये, वि. भां. नी ओघवत्या शैलीत लिहिली. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना- प्रसंगही त्यातून उलगडले आहेत.
वि. भां.ना मिळालेले पुरस्कार
उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
कॉसमॉस
नाट्यगौरव
नाट्यदर्पण
माधव मनोहर
रंगत संगत
राजा मंत्री
वी.स. खांडेकर नाट्य समीक्षक म्हणून पुरस्कार
पिंपरी-च्ंचवड महापालिकेने त्यांचा सन्मान करून गौरव केला.
वि. भां.चा जन्म ३१ मे १९३८ तर स्मृतिदिन ९ मार्च १९१७. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कार्याला मानाचा मुजरा.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
आंतरराष्ट्रीय महिला दिन
एखादा विशिष्ट दिवस जेव्हा एखाद्या विशिष्ट नावाने ओळखला जातो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी इतिहास घडलेला असतो.आज आठ मार्च रोजी साज-या होणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचेही तसेच आहे.
08/03/1908 या दिवशी अमेरिकेत न्यूयॉर्क येथे पंधरा हजार महिलांनी मोर्चा काढला. त्यांनी कामाचे नियमित तास, चांगला पगार तसेच मतदानाचा हक्क या आपल्या मागण्या मांडल्या व त्या मान्य करून घेण्यासाठी लढा दिला.
रशियामध्ये 1917च्या शेवटच्या फेब्रुवारी महिलांनी असाच लढा दिला. ज्युलियन कॅलेंडर प्रमाणे तो फेब्रुवारीचा शेवट चा रविवार होता. पण ग्रेगेरीयन कॅलेंडरप्रमाणे ती तारीख 08 मार्च होती.
त्यामुळे आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
जगातील अनेक देशांत 1921 पासून हा दिवस साजरा केला जातो. मात्र संयुक्त राष्ट्र संघाने जाहिर केल्यानंतर म्हणजे 1975 पासून भारतात हा दिवस साजरा होतो.
महिलांच्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेणे, महिलांचा सन्मान आणि प्रशंसा करणे, त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करणे, लिंगभेदाला विरोध करणे आणि महिलांना आर्थिक, राजनैतिक व सामाजिक दृष्ट्या जागृत व स्वयंपूर्ण करणे असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या दिनाचे आयोजन केले आहे.
महिलांनी महिलांना व पुरूषांनी महिलांना समजून घेऊन सहकार्य केले तरच हे उद्देश सफल होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समस्त महिला वर्गास हार्दिक शुभेच्छा!?
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ७ मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
प्रभाकर ताम्हणे
प्रा. प्रभाकर ताम्हणे हे प्रसिद्ध लेखक होते.’पुनर्मीलन’, ‘रात्र कधी संपू नये’, ‘जीवनचक्र’ आदी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या असल्या, तरी ते गाजले विनोदी कथाकार म्हणून. ‘सुपरस्टार ‘ हे त्यांचे एक पुस्तक.
त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांची कथा, पटकथा, संवाद लिहिले.त्यापैकी काही चित्रपट :
मराठी :आम्ही दोघं राजा -राणी’,’छक्के-पंजे’, ‘दीड शहाणे’,’एक धागा सुखाचा ‘ इत्यादी.
हिंदी : ‘बीवी ओ बीवी’, ‘लव्ह मॅरेज’ इत्यादी.
7 मार्च 2000 रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना नम्र अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी
इंटरनेट: मराठीसृष्टी, सिनेस्तान
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी वाचकांच्या मनावर ज्या साहित्यिकाच्या लेखनाची विलक्षणमोहिनी आहे, ते साहित्यिक म्हणजे रणजीत देसाई. त्यांनी ऐतिहासिक, ग्रामीण, राजे-राजवाडे, सरदार – दारकदार यांच्या वाड्यातून होंणारा नृत्य, सगीत, चित्रकला विलास या पार्श्व्भूमीवरील कादंबर्या-, कथा लिहिल्या. त्यांचं सर्वच लेखन वाचकांनी पसंत केलं, तरीही त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्याव विशेष गाजल्या. त्यातही शिवाजी महाराजांवरची श्रीमान योगी व थोरले माधवरव पेशवे यांच्यावरील ‘स्वामी’ या कादंबर्यांवनी लोकप्रियतेचा इतिहास घडवला. अतिशय रसाळ वाणी, गतिमानता, डोळ्यापुढे हुबेहुब दृश्य साकार करायची किमया अशी त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील.
रणजीत देसाई यांनी वरील कादंबर्याीव्यतिरिक्त, समीधा , लक्षवेध, या ऐतिहासिक कादंबर्याु , शेकरू, बारी, माझा गाव या ग्रामीण कादंबर्याी, राधेय, रूपमहाल, आभोगी, राजा रविवर्मा या आणखी कादंबर्याल लिहिल्या.
संकेत, मेखमोगरी, मोरपंखी सावल्या, मधुमती, बाबूल मोरा, जाण, कणव, गंधाली, कातळ, कामोदींनी इ. त्यांचे काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
रणजीत देसाई यांची नाटकेही लोकप्रीय आहेत. हे बंध रेशमाचे, हे त्यांचे अतिशय गाजलेले नाटक. याशिवाय, स्वामी, संगीत सम्राट तानसेन, सावली उन्हाची, लोकनायक, रामशास्त्री, पांगुळगाडा, गरुडझेप ही त्यांची अन्य नाटके आहेत.
रणजीत देसाई यांना मिळालेले पुरस्कार
स्वामी कादंबरीला १९६३ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. याच कादंबरेला याच वर्षी हा. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तर या कादंबरीला १९६४साली साहित्य अॅवकॅडमीचा पुरस्कार मिळाला.
१९७३ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली.
१९९० मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला.
☆ ☆ ☆ ☆ ☆
वसंत नरहर फेणे
वसंत नरहर फेणे – दिवाळी अंकांचे बिनीचे लेखक म्हणून ज्यांच्याविषयी दिवाळी अंकांच्या संपादकांना विश्वास होता, आणि वाचकांना ज्यांच्या कथा आवडत, ते लेखक म्हणजे, वसंत नरहर फेणे –वयाच्या ३५व्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि वयाच्या ९०व्या वर्षापर्यंत ते लिहीत होते. ‘कारवारची माती’ ही कादंबरी त्यांनी ९०व्या वर्षी लिहून पूर्ण केली आणि ग्रंथालीने ती प्रकाशित केली. ३५ ते ९० या कालावधीत त्यांची ३० पुस्तके प्रकाशित झाली.
कादंबरी, कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद असं विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलं. या लेखनात कथा आणि कादंबर्याा त्यांनी प्राधान्याने लिहिल्या. काळ आणि मानवी समाज यांच्या नात्याचे बंध त्यातून उलगडलेले दिसतात. सर्वसामान्य माणसाचं अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने फेणे यांच्या लेखनातून प्रगट होतं. त्यांच्या लेखनात त्यांनी व्यक्तिपेक्षा समाजाला केंद्रस्थानी ठेवलेले दिसते.
वसंत नरहर फेणे- महत्वाची पुस्तके –
सेंट्रल बस स्टेशन, सहस्त्रचंद्र दर्शन, विश्वंभरे बोलविले, या कादंबर्याम, देशांतर कथा, हे झाड जगावेगळे, ध्वज, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृदगंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावाल्यांची वसाहत, काना आणि मात्रा, काही प्यादी काही फर्जी. पिता-पुत्र, मुळे आणि पाने इ. त्यांचे कथासंग्रह आहेत.
वसंत नरहर फेणे- पुरस्कार
१. काना आणि मात्रा ला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार
२. विश्वंभरे बोलविले’ला ना.सी.फडके पुरस्कार. (२००४)
३. . शब्द – द बुक गॅलरीच्या वतीने देण्यात येणारा भाऊ पाध्ये साहित्य गौरव पुरस्कार
वसंत नरहर फेणे यांचा जन्म २८ एप्रील १९२६ तर स्मृतीदिन ६ मार्च २०१८
☆ ☆ ☆ ☆ ☆
रणजीत देसाई, वसंत नरहर फेणे, या दोघा प्रतिभासंपन्न लेखकांना शतश: प्रणाम.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अर्वाचीन मराठी वाङमयाचे जनक, विशेषत: मराठी कादंबरी आणि लघुकथांचे जनक हरी नारायण आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ मध्ये झाला. पूर्वापार चालत आलेल्या लेखनापेक्षा अगदी वेगळ्या प्रकाराचं लेखन त्यांनी केलं. त्याचा प्रभाव पुढल्या लेखकांवर पडला म्हणून त्यांच्या कालखंडाला हरिभाऊ युग असे म्हणतात आणि हरीभाऊंना युगप्रवर्तक.
हरिभाऊंनी १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक कादंबर्या् लिहिल्या. याशिवाय २ स्वतंत्र नाटके, ३ रूपांतरित नाटके व ३ प्रहसने लिहिली. त्यांच्या सामाजिक कादंबरीत तत्कालीन सामाजिक, राजकीय, संस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडवते. त्यांच्या कादंबर्यां स्त्रीकेन्द्रित आहेत. स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडणे, हेच त्यांच्या कादंबरीचे सूत्र आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुष जातीची व समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता त्यातून व्यक्त झाली आहे.
ह. ना आपटे ‘ज्ञानप्रकाश’ मासिकाचे काही काल संपादक होते. ‘आनंदाश्रम’ या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकही होते. ‘करमणूक’ या मासिकाचे संस्थापक सदस्य होते. केशवसुतांची कविता व गो.ब.देवल यांचे संगीत शारदा हे नाटक हरिभाऊंनी प्रकाशात आणले. त्यांनी अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना लिहिल्या. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली त्यांनी भास्कराचार्याँची लीलावती , राणी दुर्गावती इ. ची बोधप्रद माहिती प्रकाशित केली.
ह. ना. आपटे यांची काही महत्वाची पुस्तके – सामाजिक – १. पण लक्षात कोण घेतो? २. जग हे असे आहे. ३. चाणाक्षपणाचा कळस, ४. मधली स्थिती ५. मायेचा बाजार, ६. मी, ७. यशवंत खरे
यापैकी ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी कादंबर्यां चा मानदंड मानली जाते. १. ऐतिहासिक पुस्तके – १. उष:काल, २. केवळ स्वराज्यासाठी, ३. गड आला पण सिंह गेला, ४ चंद्रगुप्त व चाणक्य, ५ वज्राघात, ६. सूर्योदय, ७. रूपनगरची राजकन्या याशिवाय स्फुट गोष्टी भाग १ ते ६ हे त्यांचे कथा संग्रह आहेत, तर संत सखू व संत पिंगळा ही नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘हरीभाऊंची पत्रे ‘ म्हणून त्यांच्या पत्रांचेही संकलन, ससंपादन झाले आहे.
अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ह. ना. आपटे यांच्या संबंधीची काही महत्वाची पुस्तके –
१. आलोचना – ह. ना. आपटे विशेषांक (१९६३)
२. ह. ना. आपटे चरित्र – रा.भी. जोशी
३. ह. ना. आपटे चरित्र व वाङ्मय विवेचन – वेणूताई पानसे
४. ह. ना. आपटे संक्षिप्त चरित्र – बापूजी मार्तंड आंबेकर
५. ह. ना. आपटे निवडक वाङ्मय- साहित्य अकादमी – संपादक विद्याधर पुंडलिक
६ हरिभाऊ आपटे – आत्मचरित्रात्मक कादंबरी- मी – डॉ. रेखा वडीरतार्य
☆ ☆ ☆ ☆ ☆
डॉ. नारायण गोविंद कालेलकर
डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे मराठी भाषिक भाषावैज्ञानिक होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९०९चा. ५०च्या दशकात भाषाविज्ञान या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी या विषयावर मराठीतून लिहायला सुरुवात केली. भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास या अर्थी भाषाविज्ञान ही संज्ञा आज वापरण्यात येते, त्या प्रकारच्या अभ्यासाचा प्रारंभ त्या काळात झाला. नव्या अभ्यास शाखेचा परिचय करून देणारे लेखन मराठीत करणार्याा लेखकांपैकी डॉ. कालेलकर हे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते सायाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती मिळवून पॅरीसला गेले. तिथून परतल्यावर बडोदायेथील महाविद्यालयात तसेच विद्यापीठात फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्र हे विषय शिकवले.
कल्चरल एक्स्चेंज फेलो म्हणून ते पुन्हा पॅरीसला गेले. तेथील विद्यापीठात त्यांनी ‘ऋद्धिपूर’ वर्णनावरचा ( हा महानुभाव ग्रंथ आहे.) आपला प्रबंध फ्रेंचमधे सादर केला व डी. लिट. मिळवली.
१९५५-५६ ला रॉकफेलर प्रतिष्ठानची ज्येष्ठ अभ्यासवृत्ती मिळवून ते अमेरिकेत गेले. तिथे येल विद्यापीठात भाषाविज्ञान विभागात त्यांनी अध्ययन केले. पुण्याच्या डेक्कन कॉलेज – पदव्युत्तर व संशोधन संस्था इथे इंडो-आर्यन भाषांचे ते प्रपाठक होते. नंतर याच संस्थेत भाषाविज्ञान विभागाचे ते प्रमुख झाले.
लेखन- संपादन
सायाजी साहित्य मालेचे २४६वे पुष्प म्हणून रिचर्ड फिक यांच्या जर्मन ग्रंथाचा डॉ. शिरिष कुमार मैत्र यांनी केलेल्या इंग्रजी अंनुवादावरून ‘बुद्धकालीन भारतीय समाज’ हे पुस्तक लिहिले.
१. ध्वनीलहरी, २. भाषा आणि संस्कृती, ३. भाषा, इतिहास आणि भूगोल ही त्यांची भाषाविज्ञान या ज्ञानशाखेची तोंडओळख करून देणारी पुस्तके. त्यांनी भाषाविषयक पुस्तकांची परीक्षणेही लिहिली. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत त्यांनी लेखन केले.
आधुनिक मराठी वाङ्मयाचे जनक असलेल्या ह. ना. आपटे आणि मराठीतील भाषाशास्त्राचे पंडीत डॉ. नारायण गोविंद कालेलकर यांच्या कार्याला शतश: प्रणाम.?
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
गौरी देशपांडे
गौरी देशपांडे (11.02.1942 – 1.3.2003)
महर्षी कर्वे यांची नात, दिनकर व इरावती कर्वे यांची कन्या व र. धों. कर्वे यांची पुतणी गौरी देशपांडे. त्यामुळे धीटपणा, सुधारकता, वैचारिक स्वातंत्र्य या गोष्टी त्यांच्या रक्तातच होत्या.
त्यांनी इंग्लिशमध्ये एमए व नंतर पीएचडी केलं.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये नंतर पुणे विद्यापीठात त्या इंग्लिशच्या प्रोफेसर होत्या.
कथा, कादंबऱ्या, कविता, ललित व ललितेतर लेखन, भाषांतर(मराठीतून इंग्रजी व इंग्रजीतून मराठी), संशोधन वगैरे बहुतेक सर्वच साहित्यप्रकार त्यांनी सक्षमतेने हाताळले.
त्यांच्या लेखनात मुक्त विचारांचं प्रतिबिंब दिसतं. ते स्त्रीवादापलीकडे जाऊन स्वातंत्र्य वादी, व्यक्तीवादी होतं. वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्याच्या मर्यादा, त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ह्याबद्दलचे विचार त्यांच्या लेखनात दिसतात. लेखणीच्या धीटपणामुळे त्यांच्यावर ‘बंडखोर लेखिका’ हा शिक्का बसला.
पुस्तके :
‘एकेक पान गळावया’, ‘तेरूओ आणि काही दूरपर्यंत’, ‘दुस्तर हा घाट आणि थांग’, ‘उत्खनन’, ‘विंचुर्णीचे धडे’ वगैरे मराठी पुस्तके.
‘बिटवीन बर्थ्स’, ‘लॉस्ट लव्ह’, ‘बियॉंड द स्लॉटरहाऊस’ वगैरे इंग्रजी पुस्तके.
‘अरेबियन नाईट्स’ चे दहा खंड वगैरे पुस्तकांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद.
सुनीता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’चा ‘-अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट ‘, तसेच अविनाश धर्माधिकारींच्या ‘अस्वस्थ दशकाची डायरी’चा ‘डायरी ऑफ अ डिकेड ऑफ ऍगनी’ वगैरे मराठीतून इंग्रजीत अनुवाद.
गौरी देशपांडे यांच्या स्मृतिदिनी त्यांना सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड. शताब्दी दैनंदिनी. इंटरनेट.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈