मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”कभी हां कभी ना” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “कभी हां कभी ना!” ☆ संध्या बेडेकर ☆

काल ताईकडे नातवाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्य मोठा कार्यक्रम होता. तसा आता थोडक्यात कार्यक्रम करायची पद्धत राहिलेली नाहीच. कार्यक्रम कोणताही असो, कार्यक्रम लहानसा असू शकतो पण तो event म्हणून जोरदार पद्धतीने साजरा होतो.

एकतर आता एकच एक चा जमाना आहे ना. म्हणजे मुलगा एक, त्याचे सर्व कार्यक्रम एकदाच, मग त्या मुलाचा मुलगा.. तो पण एकटाच. म्हणून कोणताही कार्यक्रम एकदाच करायचा, त्यामुळे तो event म्हणून करायचा असतो. पैसा भरपूर आहे, जवळचे मित्र मैत्रिणी High status चे मग… त्यांच्या status प्रमाणे करायचे असते. या अशा कार्यक्रमात कधी बायको, तर कधी नवरा दबक्या आवाजात विरोध करत असतो. पण शेवटी एकदाच तर करायचय… अस म्हणत सर्व तामझाम होतोच.

मित्र मैत्रीणिंच्या गृपमध्ये कार्यक्रम करायचा म्हणजे पाकिटावर जरा जास्त भार पडतो. कारण तेंव्हा स्वतःचे social status चा पण विचार असतो / किंवा दाखवायचे पण असते…

 नातेवाईंकासाठी करायचा असेल तर… त्यावेळेस नातेवाईकांचे status बघून कार्यक्रम होतो. Status प्रमाणे मेन्यू ठरतो. कोणाला बोलवायचे? कोणाला नाही? हे ठरत. status प्रमाणे हाॅटेल ठरत. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांकडे लक्ष दिलच पाहिजे, अशी जबाबदारी वगैरे नसते. किंवा कधी कधी तर दुर्लक्ष केल तरी चालत.. कभी हां कभी ना कॅटेगरीतील नातेवाईकही असतातच की.

म्हणजे काही नातेवाईक असे असतात, म्हणजे बोलवाव लागतय म्हणून बोलवलय.

बाकी खूप लक्ष वगैरे द्यायची गरज नसतेच. पण असे लोक जेंव्हा नात कस असाव? या विषयावर बोलतात, तेंव्हा आ हा हा!!!. ऐकत रहावस वाटत. म्हणजे एवढी समज असलेले great च नाही का? म्हणजे मला वाटत राज्य स्तरीय स्पर्धेत या भाषणाला पहिल बक्षीस नक्की मळेल.

 हे लोक आयुष्यात कस वागतात? हे त्यांनाही माहित असत आणि आपल्यालाही. ते अगदीच तस वागत नाहीत, अस म्हणता येणार नाही. काही specific मोजक्या लोकांबरोबर तस वागतात. वेळ पडली तर झुकतात. आपला फायदा लक्षात ठेवून चमचेगीरी पण व्यवस्थित करतात.

शेवटी Status हा एक Issue सध्या खूप महत्वाचा झालाच आहे. दुसर्यांच status तेच ठरवतात.

पैसा बोलता है। म्हणतात ना ते खरच आहे.

 status issue म्हणजे पैसा, मोठ्ठ घर rather बंगला, मोठी कार, आणि मुख्य म्हणजे तो कामाचा आहे का? हे सर्व त्या माणसापेक्षा जास्त महत्वपूर्ण असत. अशा माणसाबरोबर काढलेली Selfie म्हणजे पण एक achievemet च असत. त्या माणसाबद्दल रंगवून रंगवून सांगण, हा त्यांचा छंद असतो.

 कधी बोलवून अपमान होणे, किंवा न बोलवून अपमान करणे ही या so called / self proclaimed high status वाल्यांचे common behavior असत. केंव्हा पलटी मारतील ते सांगता येत नाही.

काल एक so called/ self proclaimed श्रीमंत नातेवाईक भेटले. मागच्याच आठवड्यात त्यांच्या मुलाचे लग्न झाले. या वेळेस आम्ही कभी ना या option category त होतो. आम्हाला म्हणाले… तुम्ही आला नाहीत हो लग्नाला.

 खर म्हणजे ही गोष्ट खूप जूनी विसरण्यासारखी नव्हतीच.

मी आणि ताई एकमेकींकडे बघतच राहिलो. अरे! म्हणजे तुम्ही काहीही करा, चूक आमचीच.

अशा लोकांच काय करायच? समजत नाही.

एकदा वाटत स्पष्ट उत्तर द्याव. हे आपल्याला बुद्धु समजतात बहुतेक.

आपली चूक पण दुसर्यांच्या माथी मारायचा प्रयत्न करतात

We r different. असा समज असणारे हे लोक 

Occasion प्रमाणे this time only few dignitaries r invited. Not everyone. अस सहज वागतात…

ही अशी कभी हां कभी ना. वाली नातेवाईकांची category पण असते बर का…

आपण नाही का? काही वस्तू गरजेनुसार वापरतो, गरज संपली की आपण सहज म्हणतो… आता जरा बाजूला, वर माळ्यावर ठेवा. सध्या आपल्याला यांची गरज नाही ना, मग नंतर जर गरज लागली तर, तेंव्हा बघू. असा विचार करून ती वस्तू बाजूला ठेवतो.

ही वस्तुंची कभी हां कभी ना वाली कॅटेगरी झाली.

तसच माणसांच्या बाबतीत पण असत.

कभी हां, कभी ना.

हे असे equations समजायला वेळ लागतो. एकदा समजल्यावर त्रास होतो. रागही येतो. स्वतःशीच खूप वाद/ संवाद होतात. एका दृष्टीने बर होत. आपल्याला आपली पूढची line of action ठरवायला सोप्प होत. आपल्यालाही कुठे लाईन ओढायची हे ठरविता येत.

समोरच्याला आता आपण नकोय हा विचार मानसिक त्रास देणारा नक्कीच आहे.

उद्या या म्हणतील, तेंव्हा आपण नाही गेलो तर तुम्ही आला नाहीत? का बर?

म्हणजे चित भी मेरी, पट भी मेरी.

या अशा परिस्थितचा आनंद घेणारे/ आग लावणारे पण असतातच की. लगेच कधी कधीच फोन करणारे, पण अशा वेळेस नक्कीच फोन करतात…

हो का? अग बाई! तुम्हाला मेसेज नाही मिळाला का? अस नक्कीच म्हणतील…

वाढत्या वयाबरोबर, अनुभवांवरून बरच काही समजू लागल आहे.

नात सांभाळण ही फक्त एकाच पार्टीची जबाबदारी नाही/ नसते.

हे खरय… At the same time…

You cannot force someone to 

respect you. but you can choose to walk away when they don’t. and that decision can change the direction of your life.

हर तकलीफ से इंसान का दिल दूखता बहुत है। पर हर वह तकलीफ से वो सीखता भी बहुत है।

आजकाल दिवसातून शंभरदा फोनवर डिलीट चे बटन दाबतोच ना. आपण unwanted messages delete कतोच ना.. तसच आपले विचार शांतमनाने फिल्टर करायचे, आणि आपली माणसांची लिस्ट Review करायची आणि जिथे आपल्याला

 value नाही, त्यांना महत्व द्यायची गरज नाही. तेथे डिलीट चे बटन दाबायचे. Option कॅटेगरीत स्वःतला ठेवायचे नाही.

तिथे आपला वेळ एनर्जी, वाया घालवायची गरज नाही. लगेचच आपल्या महत्वाच्या कामांची लिस्ट काढायची आणि त्यावर फोकस करायचे.

Distance is the new and only answer for such people.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्ही स्वतःचे कौतुक करता का? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ तुम्ही स्वतःचे कौतुक करता का? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

या धावपळीच्या जगात आपण इतरांच्या यशाचे कौतुक करायला कधीच विसरत नाही. मित्राने पदोन्नती मिळवली की आपण टाळ्या वाजवतो, कुणी छान जेवण बनवले की आपण त्याची स्तुती करतो. पण, कधी आपण आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यांत बघून “शाब्बास! ” म्हटलं आहे का?

… स्वतःचे कौतुक करणे म्हणजे स्वतःला जगापेक्षा श्रेष्ठ समजणे नव्हे, तर स्वतःमधील चांगल्या गुणांची प्रांजळ कबुली देणे होय.

… आपण दिवसभरात कितीतरी लहान-मोठ्या लढाया लढतो. कधी मनातील नैराश्यावर मात करतो, तर कधी थकलेले असतानाही कुटुंबासाठी हसून काम करतो. या प्रत्येक छोट्या विजयासाठी आपण कौतुकास पात्र आहोत.

… आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की;”स्वतःची स्तुती स्वतः करू नये. “

.. पण विचार करा, जर आपणच स्वतःच्या कष्टाची किंमत जाणली नाही, तर जग तरी ती का जाणेल? स्वतःचे कौतुक केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की;”मी आजचा कठीण प्रसंग धैर्याने हाताळला, “तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच उभारी मिळते.

… आज तुम्ही एखादे काम वेळेत पूर्ण केले? स्वतःची पाठ थोपटा.

.. आपण माणूस आहोत, चुका होणारच पण, त्या चुकांमधून शिकून पुढे जाण्याच्या वृत्तीचे कौतुक करा.

.. दिवसातून एकदा आरशात पाहून स्वतःला एक छान स्मितहास्य द्या. म्हणा की;”तू जसा आहेस, तसा उत्तम आहेस. “

… स्वतःचे कौतुक करणे ही एक मानसिक गुंतवणूक आहे. यामुळे आपण केवळ आनंदीच राहत नाही, तर इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो.

.. लक्षात ठेवा, या जगाच्या रंगमंचावर तुमची भूमिका तुमच्याइतकी उत्तम दुसरं कोणीच साकारू शकत नाही.

.. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि हक्काने स्वतःचे कौतुक करा! कारण….

.. कारण तुम्ही ‘खास ‘आहात.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरणगाव सोलापूर आणि दहा तारीख… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ गिरणगाव सोलापूर आणि दहा तारीख… ☆ शीला पतकी 

सोलापूर शहर हे 60 /65 वर्षांपूर्वी गिरणीवर चालणारे गाव होतं. गिरणगाव या नावानेच ते ओळखलं जायचं. सरकारी कार्यालयातील कर्मचारी म्हणजे सरकारी नोकर, एसटीतील कर्मचारी, रेल्वेतील कर्मचारी आणि उरलेली तमाम जनता जुनी गिरणी नरसिंग गिरजी, लक्ष्मी विष्णू मिल जाम मिल आणि फुटाणे गिरणी नावाची गिरणी होती. मला त्याबद्दल फारशी माहिती नाहीये पण तिचं नाव मी ऐकले आहे..

हे संपूर्ण शहर आर्थिक व्यवस्थापनासाठी गिरण्यांवर अवलंबून होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेला, एसटी वाल्यांचा पगार सात तारखेला, आणि सर्व गिरण्यांचे पगार मात्र दहा तारखेला होत. त्यामुळे दहा तारखेला सोलापुरात दिवाळी..! 

75 टक्के गाव हे गिरणीवर अवलंबून… वडिल कुठे काम करतात विचारलं तर वर्गातील किमान 30 पोरं तरी सांगायची गिरणीमध्ये काम करतात. गिरणीचा पगार हा दहा तारखेला होत असे त्यामुळे दहा तारीख ही सर्व कामगार वर्गाच्या आयुष्यामध्ये दिवाळीची तारीख असायची… म्हणजे किशोर कुमारच गाणं आहे की खुश है जमाना आज पहिली तारीख है तस आज दस तारीख है.. अशी परिस्थिती होती.

दहा तारखेला सकाळपासूनच घरामध्ये आज वडिलांचा पगार होणार म्हणून मुल आनंदी, नवऱ्याचा पगार होणार म्हणून बायको आनंदी, लेकराचा पगार होणार म्हणून आई बाप आनंदी! त्यादिवशी सगळे गाव आनंदाच्या आगमनाच्या लगबगीत असायचं कारण शेवटचे चार-पाच दिवस हे उसनवारीत गेलेले असायचे. त्यामुळे दहा तारखेचा उत्साह वेगळा असायचा. तो केवळ घरातच नाही तर गावातही वेगळा असायचा. गिरणीत जाणारा प्रत्येक माणूस येताना खिशात पगार घेऊन येत असे त्यामुळे जाताना त्याचे चेहरे आशावादी आणि येताना प्रफुल्लीतच…. असं शहराचं वातावरण…!

अगदि हे तसंच असायचं गिरणीच्या रस्त्यावर…. संध्याकाळी दुतर्फा मिठाईच्या गाड्या लागलेल्या या गाड्यावर रंगीबेरंगी दाणे असलेले बुंदीचे लाडू.. शेवेने भरलेली गच्च ताट… तिच्यातही बारीक शेव जाडी शेव गोडी शेव असे प्रकार…. चिवड्याची टोपली… जिलबीची केशरी परात…. त्या सगळ्यांना रंगीबेरंगी कागद..! गाडीवाल्याच्या गाडीत वजन मापाचा काटा… वर्तमानपत्राची रद्दी आणि सुताचा गुंडा इतकं सामान…! प्रकाशाची फारशी व्यवस्था नसलेल हे गाव त्या दिवशी या गाड्यांवरती पेट्रो मॅक्स म्हणजे बत्त्या किंवा टेंभे यानी झगमगून जायचे. बाजूला असणाऱ्या फाटकावर, मरीआई चौकात, भैया चौकात भरपूर भाज्या घेऊन बसलेले भाजीवाले अस एक फार उत्साही दृश्य असायच. त्याचबरोबर बाहेर उभी असणारी काही दांडगट माणसंही असायची… ते असायचे रोहिले पठाण…. हे या गरीब कामगारांना व्याजाने कर्ज द्यायचे…. कामगाराकडे महिन्याचा पगार जेमतेम कुटुंब भागवणे एवढा असायचा. जुजबी आजारासाठी गिरणी दवाखाने मोफत होते पण मोठ्या आजारावर बाहेरचा औषध उपचार करावा लागायचा त्याला पैसा खर्च व्हायचा असे विमे वगैरे त्या काळात नव्हते. त्यासाठी, पोरबळांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा प्रपंचाला कमी पडतं म्हणून ्या बिचार्‍या गरीब कामगारांना कर्ज काढावच लागायचं… या कर्जाला व्याज असायचा आणि त्या व्याज वसुलीसाठी ही पठाण मंडळी दहा तारखेला गिरणीच्या दारात उभे….! प्रत्येक गिरणीच्या दाराशी असे पठण दिसायचे त्याची नजर चुकवून जाणं केवळ अशक्य..! तिथेच त्या पगारातले व्याजापुरते रक्कम काढून द्यावी लागायची आणि मग उरलेला पगार तो कामगार घरी घेऊन यायचा….!तरीही येताना आपल्या लेकरा बाळांसाठी लाडू चिवडा ते वर्तमानपत्राच्या दोऱ्याने बांधलेल्या पुडयात आनंदाने घेऊन यायचा.

लेकर बाळ दारामध्ये बापाची वाट बघत बसलेली असायची. तिथेच जुन्या गिरणीच्या चाळी नरसिंग गिरजि चाळी आहेत. भैय्या चौकात हीआहेत सगळी गिरणीच्या आसपास राहणारी मंडळी. प्रत्येक घरातलं पोर बापाला लांबून येताना पाहून आनंदित व्हायचं बापाच्या हातातली पिशवी घेण्यासाठी ते आनंदाने धावायचे जगातली सगळी सुख देणारा बाप त्यांना त्या दिवशी खूप मोठा वाटायचा…. कारण त्याच्या हातात जिलबी शेव चिवडा लाडू ही स्वप्नवत वाटणारी खाद्य श्रीमंती असायची…! आज या पदार्थाकडे डुंकुनी न पाहणारी पिढी पाहिली की आमचे दिवस आम्हाला आठवतात. जिलब्यांच्या वेटोळ्या प्रमाणे गोल गोल फिरणार आमचा आयुष्य तिथेच रिंगणात राहणार होतं. बुंदीच्या लाडवातला एकही बुंदीचा कण सांडणार नाही अशी दक्षता घेऊन आणि ते खाद्यपदार्थावर कागदाच्या तुकड्यावर संपवत असू.

प्रत्येक घरातला बाप आणलेला पगार खिशातून काढून म्हाताऱ्या आईच्या हातात ठेवत असे. देवाजवळ दिवा लावून ती सुद्धा पांडुरंगा समोर तो पगार ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असे आणि मग तो पैसा घर खर्चाला वापरला जायचा. त्या तोकड्या पैशात ते घर समाधानांन भरून जायचं कारण… घरात विठ्ठल रुक्माई सारखे आईबाप आणि श्रीकृष्ण पेंद्या यांच्यासारखाच गोकुळ असायचं. घरात आजीच्या भोवती गोळा झालेली मुलं बापान आणलेला खाऊ आजीने वाटून दिला की आनंदाने खाऊन पसार व्हायची. फार पैसा नसला तरी समाधान होतं आणि त्या समाधानाच सुखही ही मोठं होतं.

त्यादिवशी चाळीतल्या भजनाला मोठी रंगत यायची किती थोड्या पैशात किती समाधानी होती माणसं..! आमच्या घरी त्या दिवशी बेकरीतला मोठा ब्रेड यायचा तो दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर खायला मिळायचा त्यामुळे रात्री ब्रेड खाण्याचे स्वप्न उराशी घेऊन आम्ही झोपायचं.. इतकं साधं जीवन होतं पगाराच्या दुसऱ्या दिवशी गिरणीच्या बाजूचे चौक फुललेले असायचे. भैया चौकात कॅन्टीनस सगळी भरलेली असत भजी आणि चहा यांच्यावर ताव मारत… विविध पक्ष संघटना तिथे चर्चा करायच्या.. कामगारांच्या हक्काच्या… त्यांना काय काय मिळालं पाहिजे याच्या. कामगार पुढारी तिथे असायचे ते आपल्या मागण्यांसाठी काही कार्यक्रम आखायचे… आंदोलन व्हायची चळवळी व्हायच्या… चहा पिणारे चहाचे हॉटेलात…. दारू पिणारे दारूच्या गुत्त्यात जायचे पण… दारूबंदीच कार्य प्रभावी असल्यामुळेदारू झोकून माणसअशी राजरोस रस्त्यावरून फिरत नव्हती किंवा त्याला आळा तरी होता. दुकानातून औषधाची बाटली विकत आणावी इतकी सहजासाची दारू उपलब्ध नव्हती आणि दारू प्यायला जाणारा माणसाला समाजात फारसा मान नसायचा त्यामुळे ते सगळं चोरून व्हायचं. एकत्र कुटुंब असल्यामुळे आई बापाचा धाक असायचा. मोठा भाऊ बापाच्या जागी त्यामुळे एक चांगली भीती असायची. गिरणीतली तरुण पोर सहजासहजी चुकीच्या मार्गाला जात नव्हती खरं तर ही गिरणीत काम करणारी मंडळी शेजारच्या खेड्यातन आलेली एक भाऊ थोडी शेती करतोय दुसरा नोकरी करायला आला त्यांन आणखीन आपल्या धाकट्या भावाला बोलवून घेतलं अशी त्यांची कुटुंब शहरात वाढलेली. गिरणीच्या मालकाने त्यांच्यासाठी चाळी बांधून दिलेल्या त्यामुळे जुनी गिरणीच्या चाळी, नरसिंग गिरजीच्या चाळी अशा चाळीने त्यांच्या घराच्या राहण्याचे प्रश्न सोडवूनच टाकले होते पाणी दोन्ही वेळा यायचं कारण गिरण्या तीन पाळ्यात चालायच्या त्यामुळे पाण्याच व्यवस्थापनही त्यांच्या वेळेनुसार असायचे गिरणीच्या भोंग्यानी शहर जागे होत असल्यामुळे शहराला उद्योगाचे वळण होते.

कामगारांच्या विकासासाठी सरकारने स्थापलेली कामगार कल्याण केंद्र असायची ते अशाच गिरण्यांच्या आसपास किंवा कामगारांच्या वसाहतीत होती. ती केंद्र तरुण मुलातून खेळाडू तयार करायचे गिरणीतल्या तरुण मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वर्तमानपत्र आणि उत्तम पुस्तक ठेवायचे म्हणजे त्यांचे ग्रंथालय होते खेळाचे सामने भरवायचे… नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या…! दुपारच्या वेळेला हेच केंद्र महिलांसाठी उघडे असायचे. तिथे शिवण वर्ग, विविध कलाकुसर शिकवणारे शिक्षक येऊन शिकवायचे, महिलांच्या विविध विषयावर वेगवेगळ्या व्याख्यातांना बोलवून व्याख्यानं व्हायची, त्यामध्ये मुलाचे संगोपन कसे करावे… गरोदर स्त्रीने कोणती काळजी घ्यावी… यासारख्या असंख्य विषयावर मार्गदर्शन होत असे… शिवण्याच्या मशीन असायच्या त्यामुळे बायका कपडे शिवून घेऊन जायच्या… मुलींची त्यांची नाटकं व्हायची छोट्या मुलांना सिनेमे दाखवले जायचे… सिनेमा म्हणजे ते माहितीपट असायचे.. पण केंद्रात सिनेमा आहे म्हटलं की सगळी पोरं धूम केंद्रात पळायची. केंद्र चालवणारी मंडळी खूप छान होती तळमळीने काम करणारे होती. ह्या कामगार कल्याण केंद्रा संदर्भात एक स्वतंत्र विषय करून लिहीन तेव्हा अशी कामगार कल्याण केंद्र ह्या गिरणीतल्या कामगारांच्या कलागुणांना वर्धिष्णू करीत मनोरंजन करीत आणि संस्कारही करीत होते… त्यावेळी कामगारात गुंड होते गटबाजी करणारे होते पक्ष वाले होते त्यांच्या त्यांच्यात इंटक वगैरे अशी काही संघटनांची आम्ही नाव ऐकत असू व्यंकप्पा मडूर हे चळवळीतलं नाव अशी बरीच नाव त्यावेळेला कानावर येत होती त्यांचे मोर्चे असायचे आंदोलन असायची पण गिरणी पेटवली… गिरणी जाळली… गिरणीत दगडफेक झाली… असे मात्र होत नव्हते. कारण काम करायच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा होती हे हिंसक प्रकार आंदोलनात नव्हते… काय ते रस्त्यावर थोडे व्हायचे… अर्थात हे शहर धाडसी मर्दांच होतं आहे. प्राणाची पर्वा न करता लढणारी माणसं या शहराने दिली. खून व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या तशी थोडी सोलापूरची दहशत होती लोकांना, अगदी इंग्रजांना सुद्धा…! आम्हाला असं सांगायचे की इंग्रज, वर्तमानपत्रात सोलापूर हे नाव वाचले तर त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र कापायचं इतकी दहशत नावात होती. इंग्रजांच्या नकाशात लाल रंगाने स्पॉट केलेल आपलं गाव होतं पहिला हुतात्मा या देशाला सोलापूर ने दिलाय तो शंकर शिवदारे… त्यांच्या आत्मसमर्पणाने स्वातंत्र्य चळवळीला ही उधाण आले होते.. अशा झोकून देऊन काम करणाऱ्या कामगारांचे जगत असलेले गाव…. सगळ्या गिरण्या राजकीय निष्क्रियतेमुळे कटकारस्थानामुळे हळूहळू बंद पडल्या.

तीन मोठ्या गिरण्यांची मिळून झालेली एक सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल म्हणजे जुनी गिरणी पहिल्यांदा बंद पडली ती अनेक वेळा बंद पडत होती पण 64 स*** पूर्ण बंद झाली खूप आंदोलन झाली चळवळी झाल्या माणसं 50 दिवस उपोषणाला बसली लोक भाबडे आणि गरीब होते आणि नेते लबाड होते आपलीच गिरणी बंद पाडून स्वस्तात विकत घेणारे मुरारका यांना मदत करून आपलं उखळ पांढरं करून घेणारे नेतेही होते. बघता बघता एक एक गिरणी बंद पडत गेली सोलापूर बेकारीच्या खाईत गेलं… मधले अनेक वर्ष सोलापूरचा विकास थंड झाला… त्याला कारण उद्योग नाही!आजही फरशा उद्योगाची निर्मिती नाहीच आहे…

असो एकेकाळी चारच्या भोंग्याला उठणारे गाव निवांत म्हणून ओळखलं जाऊ लागलं याचं वाईट वाटतं डोळ्यात फक्त समाधानी होण्याचं स्वप्न घेऊन झोपणारा सोलापूरकर गिरणी बंद पडल्यानंतर ना सुखी झाला ना समाधानी राहिला. मधल्या एका पिढीच्या अफाट संघर्षानंतर गिरणगाव ही ओळख संपत आली तिथे काम करणारे आणि गिरणीवर अवलंबून असलेली गिरणीच्या पगारावर मोठी झालेली आणि गिरण्या बंद झाल्यानंतर होरपळून निघालेली तीआमची पिढी आता संपत आली. आता सोलापूर नवनविन उद्योगाने पुन्हा भरारी घेत आहे. चांगले नेते मिळाले तर कदाचित सोलापूरला हे पुनर्वैभव प्राप्त होईल. दुर्दैव हे आहे की आम्हाला मतदानापुरतं वापरलं जातं असो तो आजचा विषय नाही. आता सोलापुरात पगार एक तारखेला होतात विविध चांगल्या वाईट उद्योगातून सोलापूरकर मुलांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत तरुणांनी आपापले छोटे छोटे उद्योग शोधले आहेत माणसं पोट भरत आहेत काहीनी पुणे मुंबई जवळ केली तरीही सोलापूरची लोकसंख्या वाढली दोन तीन लाख वस्तीचं गाव बारा लाख वस्तीत रूपांतरित झाले. खूप चांगले बदल झालेत पण दहा तारखेची ती मजा ते पेट्रोल मॅक्स च्या गाडीतले हिरवे पिवळे कागद गुंडाळलेले लाडू जिलबी शेव चिवडा त्याच्या त्या गाड्या… भरगच्च भरलेली भजनी मंडळी हे सारं सार आजही डोळ्यासमोर येतं आणि दर दहा तारखेला वर्तमानपत्राच्या पुड्यात खाऊ बांधून आनंदाने आपल्या लेकरांसाठी हातात घेऊन येणारा बाप डोळ्यासमोर दिसतो… फार छान होते दिवस… सुखाचे नसतील पण समाधान मात्र होते कॅलेंडर वरची दहा तारीख पाहताना आजही गाणं तोंडावर येतं…

‘खुश आहे जमाना आज दसवी तारीख है…!’

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ फ्रेंडशिप डे – – लेख क्र. ३ ☆ श्री सुधीर करंदीकर

त्या दिवशी फ्रेंडशिप डे असल्यामुळे भरपूर मित्रांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. काही मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा पण झाल्या.

… तुमचे पण मेसेजेस आणि गप्पा नक्कीच झाले असतील.

काल सकाळी नात तन्वी हिचा फोन आला : “ हॅपी फ्रेंडशिप डे. ” 

मी पण तिला हॅपी फ्रेंडशिप डे म्हणालो.

मी : अगं आज फ्रेंडशिप डे आहे, ग्रँड फादर डे नाही.

तन्वी : आबा माहिती आहे. ग्रँड फादर च्या आधी यु आर माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही माझ्याशी नेहमी मस्त गप्पा मारता. समजावून सांगता. म्हणून यु आर माय फ्रेंड.

… या संवादावर मी सहज विचार केला आणि लक्षात आलं की आजोबा आणि नात या नात्याला मित्र मित्र ही पण जोड दिली तर जास्तच मजा येईल.

आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या मागे अनेक विशेषणे लावून, स्टेटस लावून वावरत असतो. माझा धर्म, माझी जात, पोटजात वगैरे वगैरे ओळख लावून आपण आपसांमध्ये दुरावा निर्माण करत असतो. घराबाहेर खरंतर फक्त स्वतःचे नाव आणि सगळ्यांचा मित्र एवढीच आपली ओळख असावी.

घरामध्ये असताना नवरा, बायको, आई, वडील वगैरे विशेषणे आपल्या मागे असतात, त्यामुळे आपला अधिकार जागृत होतो. असं करू नका, तसं करू नका, असे आपले उपदेश सुरू होतात.

वयस्कर आई-वडिलांना मुलं असं करू नका, तसं करू नका, असे बजावत असतात. वयस्कर वडील मुलांना/ नातवंडांना सारखे सल्ले देत असतात. नवरा बायको यांच्यामध्ये पण हीच भाषा असते. पुढे त्याचे रूपांतर वादावादी आणि घरामध्ये ताण तणाव यामध्ये होते. घरातले संवाद, हसणं खिदळणं हे सगळचं लोप पावतं. आणि सगळे फेसबूक आणि व्हाट्सअप ला आपला कृत्रिम मित्र करतात. आणि यांचा अतिरेक तब्येती करता कसा त्रासदायक ठरतो हे आपण बघतोच

… म्हणून नातं या विशेषणातून बाहेर काढणारा सोपा मार्ग म्हणजे, आपल्या नात्याच्या बरोबर मित्र हा शब्द सोडायचा….. नवरा मित्र, बायको मित्र, सासु मित्र वगैरे.

… घरची जबाबदारी पार पडताना मी बायको करता नवरा असणार आणि इतर वेळा मित्र असणार.

… घरामध्ये वयस्कर वडील आहेत त्यांची जबाबदारी पार पाडताना मी त्यांचा मुलगा असणार, इतर वेळेला त्यांचा मित्र असणार.

आपण सगळ्यांनीच जर हा विचार अमलात आणला, तर “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” असेच छान वातावरण घरात आणि बाहेर नेहमीच राहणार हे नक्की.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पिशव्यांची पिशवी!… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्यं असतात – – – 

.. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं.

.. घरात कुठेतरी एक डबा असतो, ज्यात स्क्रू, खिळे, रबरबँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट असतात.

आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते— पिशव्यांची पिशवी!

तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं.

…… भाजीची पिशवी आली—आत.

मेडिकलची आली—आत.

कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन—

“ही ठेव हं. चांगली आहे!”

आता आपल्या घरात ‘चांगली पिशवी’ ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही, ती चांगली!

कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावू लागते.

…. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो,

“एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? ”

त्यावर उत्तर येतं,

“तुला काय त्रास होतोय? राहू दे. कधी तरी लागतील!”

मध्यमवर्गीय संसारात ‘कधी तरी’ या दोन शब्दांनी जेवढी जागा व्यापली आहे, तेवढी बहुधा फर्निचरनेही नाही.

दहा वर्षांपूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्टसुद्धा इतिहासजमा झाला—पण चार्जर आहे.

दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे. त्यात मिठाई नाही. सध्या काहीच नाही. पण डबा फेकायचा नाही… कारण? “चांगला आहे!”

आणि एक शर्ट आहे. तो सध्या बसत नाही.

पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही.

“पाच किलो कमी झालं की होईल!”

तो शर्ट कपडा नसतो. तो आशावादाचा पुरावा असतो!

मला कधीकधी वाटतं, आपण वस्तू साठवतच नाही.

आपण ‘कधी तरी’ साठवत असतो.

.. कधी तरी लागेल.

.. कधी तरी उपयोग होईल.

.. कधी तरी वेळ मिळेल.

.. कधी तरी मी पुन्हा तसा होईन.

आणि मग एक दिवस जाणवतं—

आपल्या मनातसुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे.

.. दहा वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे.

.. पाच वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे.

.. एक निर्णय चुकीचा घेतला होता, तो आहे, त्याचं गिल्ट आहे.

.. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं, त्याची अपेक्षा आहे.

.. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय!

…. कशासाठी?

.. बहुधा…“कधी तरी लागेल!”

भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात—

विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः ।

निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥

“माझं’ म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही, तोच शांततेकडे जातो.

गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही.

…. ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते.

कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते.

…. मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं.

…. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा—सगळंच ‘कधी तरी लागेल’ म्हणून जपून ठेवलं, तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे?

कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. तर कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं, हे ठरवता येणं.

.. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली, तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया.

.. मनातली पिशवी |

…. उपयोगाचं असेल ते ठेवू… शिकण्यासारखं असेल तेही ठेवू.

बाकीचं?

सरळ टाकून देऊ.

…… कारण प्रत्येक गोष्टीला—

“कधी तरी लागेल!”.. असं म्हणत राहिलो, तर एक दिवस *आज* ठेवायलाच जागा उरणार नाही.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आबई” ☆ श्री अशोक ल. देशपांडे ☆

श्री अशोक ल. देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “आबई” ☆ श्री अशोक ल. देशपांडे ☆

जन्मांध आबई ही गावकऱ्यांची आधार होती आदिवासी समाजाची प्रनिनिधी. एकटीच. नाही म्ह‌णायला मुंगशी नावाची एक गोरीभराड बहिण, तीचा नवरा दगड्या व त्यांचं एक अपत्य ‘ मानीक ‘ हा आबईचा गणगोताधार होता. सबंध उमरी गावं आबई‌ची काळजी वहात होता.

आबईच्या हातात काठीचा आधार फार उशीरा आला. मारोतीच्या पारासमोर एका खोपटात ती एकटी रहात होती. समोरच असलेल्या बिन-खिराडीच्या (चाकाच्या) विहीरीवर ही रात्री सुद्धा बिनदिक्कत पाणी भरायची. स्वतःची भाजी भाकर स्वतःच करायची.

दळण कांडण हा तीचा मुख्य धर्म होता. त्याची मजुरी हीच तीची मिळकत. ही मजुरी पैशाच्या तसेच वस्तुरुपानं तर कधी भाजी भाकर तर चहा अशा अनेक स्वरुपात असायची. अर्थात ‘चहा’ हा काही मजुरीचा भाग नसायचा तसेच तीला खाऊ घालणं हे देखील मजुरी म्हणून नसायचे. अर्थात उमरी गावानं तीला सांभाळून घ्यावं हीच तीची अपेक्षा नव्हे पण भावना असावी.

त्यावेळी गावाल चक्की (पीठाची गिरणी) नुकतीच सुरु झाली होती. त्यापूर्वीपासून व चक्की सुरु झाली तरी आबईच्या पाठचे दळण कांडण काही सुटले नाही. सपीट, ज्वारीच्या कण्या, बाजरीच्या कण्या, बेसन (चून), भाजलेले तांदूळ, भरडा, उडीद – मुगाच्या डाळी दळून भरडून देणे.

या अव्याहत कामानं आबईचे हात सतत गुंतलेले असत. आज काय पाटलीनबाई कडे तर उद्या काय पांडेबुवाकडलं तर परवा काय महादूमाळया कडलं असा तीचा संचार असायचा. दुपार झाली की कामाच्याच ठिकाणी तीची थोडी विश्रांती असायची. दुपारचा चहा झाला की परत जात्याची घरघर, खलबत्याचा खणखणाट, तर कधी उखळातील मुसळासोबतची धपधप. घरच्या मिरच्याचं तीखट व विकतच्या हळकुंडा ची हळद हा ही प्रकार तीच्या नित्यकर्माचा भाग होता. अर्थात हे प्रकार वर्षातून एकदा किंवा दोनदा होत असत.

आबई ने लुगडं कधी विकत घेतलं नसावं. पाटील पांडे बुवा कडील बायकांची जुनेरं तीच्या कामी येत असत.

काळा म्हणता येईल असा वर्ण, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा कधी तरी डोक्याला लागलेले खोबरेल तेल, अंध असल्याने तीक्ष्ण असेलेले कान, गावातील प्रत्येकाच्या आवाजावरून माणूस ओळखण्याची प्रचंड क्षमता, अंगावर जुनेर, डोक्यावरून नीट पदर घेतलेली, गावचे तीन चारच रस्त्ये पाठ असलेली, कुणाचाही आधार न घेता कामाच्या ठीकाणी पोहचणारी, गावाच्या कुत्र्याच्याही ओळखीची असलेली आबई-हळूवार पायाने गंतव्य स्थानी सुखरूप पोहचणारी व दिवेलागणीच्या ठीक आधी परत एकटीच आपल्या झोपडीत विसावणारी अशी विलक्षण, सर्वांच्या जीवनाची अविभाज्य भाग असलेली.

आम्ही पोरं तिच्या समोर उभे राहून “मला ओळखलं का व आबये’ असं मुद्दाम विचारित असू “.. आम्ही वर्षभर यवतमाळला शिक्षणाकरीता रहात असू, सुट्यात घरी आलो की कुतुहलाने हा प्रश्न आबईला हटकून विचारित असू. ती लगेच म्हणायची ” मले का म्हाईत न्हाई काय रे असोक ” तसेच विलास ला सुद्धा. माहेरपणाला आलेल्या पोरींचा आवाज ऐकला की ” सुमनबाई कवा आली? ” ‘ईमलबाई कवा आली ” असं म्हणायची.

सतत कष्टरत असलेल्या आबईला “पांडुरंग प्रिय होता. पण अंध, असहाय्य अशा तीला पंढरपूरची ओढ लागून काय उपयोग होता? तीला ती यात्रा व दर्शन कोण घडविणार? पण नित्यनेमाने पंढरपूर यात्रा करणारे, सात्वीक प्रकृतीचे, अत्यंत साधे भोळे असे आमच्याच गावचे “महादू माळी ‘’, ह्यांनी ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली व इतरही गावकऱ्यांना सोबत घेऊन एकदा आबईला विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले.

आबई ने हातातील हार पांडुरंगाकडे दूरुनच फेकला व आश्चर्य असे की तो हार पांडूरंगाच्या गळ्यातच पडला. आबईला महादजी म्हणाले, “बरुबर पडला व माय तुहा हार पांडूरंगाच्या गळ्यात “.

आबई, कृतकृत्य झाली. जे कधीही घडणे संभव नव्हते ते घडले होते. आबईचा चेहरा शेवटपर्यंत ह्या दर्शनाने प्रसन्नच होता.

– — – हाच उजळ चेहरा घेऊन आबई आपल्या गावी परतली होती.

© श्री अशोक ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जग सुंदर करणारे अनामिक देवदूत – – – लेखक : श्री विशाल अडे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?  

☆ जग सुंदर करणारे अनामिक देवदूत – – – लेखक : श्री विशाल अडे ☆ प्रस्तुती –  अंजली दिलीप गोखले ☆

भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरूणास विचारले,

“नुसताच भिजतो कश्याला? “

तो उत्तरला “नही साब”..

त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

“इधर निचे बडा मेन होल का गार है. ढक्कन निकल गयेला है”

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता?

रस्त्याखालचे मेनहोल भरले असावे, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते.

फुटभर उंचीचे पाणी वरून वेगाने जात होते.

पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचे मेनहोल आहे?

मी अवाक झालो?

कोण होता हा?

कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिलायं?

मी भर पावसात खाली उतरलो.

त्याला म्हटले,

“बहोत बढिया, भाई?”

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

“बस, कोई गिरना नै मंगता इधर”

“कबसे खडा है? “

“दो बजे से”

घड्याळात पाच वाजले होते..?

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणारं.

दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते.

सगळी दुकानेही बंद.

हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते?

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता?

त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता?

आणि का?

दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार.

कोणाला त्याची जाणीवही नव्हती, नसेल.

खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

*ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात?*

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘कालनिर्णय’ विकतं बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“केवढ्याला ‘कालनिर्णय’, काका? “

“फक्त बत्तीस रूपये, साहेब”

केविलवाणे तो म्हणाला.

सकाळपासून एकही विकले गेलेले दिसत नव्हते.

मी एक घेतले.

पन्नासची नोट होती. ती त्याला दिली.

हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता, तेवढ्यात अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

“कितने का है ये? “

“बत्तीस रुपया”

“कितने है? “

“चौदा रहेंगे, साब”

ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले?

मी आश्चर्यचकित..?

छापील किंमतीत विकत घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेत नाहीये.

तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल.

मला राहवलेचं नाही.

मी थांबवून त्यांना विचारलेच?

हे मुळचें लखनौचे महोदय.

एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते.

शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते.

एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता.

लठ्ठ पेन्शन येत होती.

“वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा?

सौ, डेढसौ?

वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था.

मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया.

बस इतनाही?”

मला काही बोलणेचं सुचले नाही?

पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

“सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा?”

मी दिग्मूढ?

“तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता?”

मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा?

*माणूसकी याहून काय वेगळी असते? *

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तात्काळ रक्त हवे’ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात?

ते ही रांग लावून?

कोण असतात हे?

कुठल्या जातीचे?

कोणत्या धर्माचे?

‘भैये’ असतात की ‘आपले’ मराठी?

हिन्दू की मुसलमान?

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘चायवाले’ आहेत.

सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘चायवाला’ मला माहिती आहे?

सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो?

“बरकत आती है” एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.

काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले.

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले.

ते पाणी कुठे फेकले?

बाजुच्या शेतजमिनीत.

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले.

एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान?

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीविषयी विचारले.

” नुकसानीचे काय एवढं?

मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल.

मुलांचे प्राण परतं आणता आले असते का? “

हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आले?

हे जग सुंदर आहे.

ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे?

*”सोप्पं आहे. चला, जमवू या?”*

 

लेखक : विशाल अडे 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ निद्रेच्या उंबरठ्यावरचे गूढ ध्यान – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

रात्र हळूहळू पृथ्वीवर उतरते. दिवसाचा गोंगाट शांत होऊ लागतो. मनाच्या आकाशात दिवसभर उडणारे विचारांचे पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागतात. आणि मग येतो तो क्षण—जेव्हा मनुष्य डोळे मिटतो.

पाहता पाहता एक अद्भुत घटना घडते.

… दिवसभर “मी”, “माझं”, “माझ्यासाठी” या भावनांनी व्यापलेला मनुष्य अचानक सर्व काही सोडून देतो. पद, प्रतिष्ठा, संपत्ती, नाती, चिंता, स्वप्नं, संघर्ष, यश-अपयश—सगळं काही मागे राहतं. झोपेच्या दारातून आत जाताना तो काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

हे केवळ झोपणं नसतं… हे एका अज्ञात शक्तीसमोर केलेलं पूर्ण समर्पण असतं.

.. कारण झोप म्हणजे एक छोटासा मृत्यू आणि सकाळ म्हणजे एक नवा जन्म. रात्री आपण स्वतःला विश्वाच्या स्वाधीन करतो. आपल्या हृदयाची धडधड, श्वासांची लय, शरीरातील असंख्य प्रक्रिया—हे सर्व आपण नियंत्रित करत नसतो. तरीही काही अदृश्य कृपा आपल्याला सांभाळत असते.

कधी विचार केला आहे?

झोपताना आपल्याला खात्री नसते की पहाटे डोळे उघडतीलच. तरीही आपण निर्धास्तपणे निद्राधीन होतो. हा विश्वास कुठून येतो?

… कदाचित तो विश्वास आपल्या आत्म्याला त्या परमचैतन्याशी असलेल्या नात्यातून मिळत असावा.

ध्यानात साधक जाणीवपूर्वक स्वतःला शांततेकडे नेतो. पण झोपेत निसर्ग स्वतः आपल्याला त्या शांततेच्या गर्भात घेऊन जातो. म्हणूनच गाढ झोपेत एक अवर्णनीय आनंद असतो. त्या क्षणी ना इच्छा असते, ना अपेक्षा, ना दुःख, ना सुख.

… फक्त अस्तित्व असतं…

.. निराकार…

.. निर्विचार…

.. निशब्द…

आणि कदाचित त्या गहन शांततेत आत्मा क्षणभर स्वतःच्या मूळ स्वरूपाला स्पर्श करत असतो.

पहाट होते.

पूर्व दिशेला प्रकाशाचा पहिला किरण जन्म घेतो.

आपले डोळे उघडतात.

श्वास अजूनही सुरू असतो.

हृदय अजूनही धडधडत असतं.

आणि जीवन पुन्हा एकदा आपल्याला हाक देतं.

… तो क्षण साधा नसतो. ती कृपा असते.

… कारण प्रत्येक सकाळ ही आपल्या पात्रतेमुळे मिळत नाही; ती आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते.

विश्व जणू हळूच सांगत असतं—

“अजून तुझा प्रवास पूर्ण झालेला नाही… अजून काही अनुभव घ्यायचे आहेत… अजून काही कर्म पूर्ण करायची आहेत… “

अध्यात्माची सुरुवात कदाचित याच जाणिवेतून होते—

… की जीवनावर आपला अधिकार नाही, फक्त सहभाग आहे.

… आपण या विश्वाचे मालक नाही.

… आपण केवळ निमित्त आहोत.

जेव्हा मनुष्य रात्री झोपताना संपूर्ण समर्पण करतो आणि सकाळी उठताना कृतज्ञतेने मस्तक झुकवतो, तेव्हा त्याचं प्रत्येक श्वास ध्यान बनतो, प्रत्येक दिवस साधना बनतो आणि प्रत्येक रात्र ईश्वराच्या कुशीत विसावल्यासारखी वाटू लागते.

… मग झोप ही फक्त विश्रांती राहत नाही.

… आणि जाग येणं ही फक्त दिनचर्या राहत नाही.

… तो दररोज घडणारा एक गूढ आध्यात्मिक उत्सव बनतो—

… जिथे प्रत्येक रात्र अहंकाराचा विसर्जन सोहळा असते,

… आणि प्रत्येक पहाट आत्मजागृतीचा नवीन उदय.

ज्याला या रहस्याची अनुभूती आली, त्याला समजतं की जीवन हे जगायचं नसतं—ते कृतज्ञतेने स्वीकारायचं असतं. 

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ स्वतःवर प्रेम करा☆ सुश्री सुरेखा चिखलकर

आपण अनेकदा म्हणतो, “कोणी माझी काळजी घेत नाही, कोणी मला समजून घेत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही “

… पण या प्रत्येक प्रश्नापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा; मी स्वतःसाठी काय करतो? जो माणूस स्वतःच स्वतःला सतत दोष देतो, स्वतःची किंमत कमी करतो आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो, त्याला इतरांनी कायम आनंद द्यावा, ही अपेक्षा पूर्ण होणे कठीण असते.

स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आरशात स्वतःचे रूप पाहून आनंदी होणे एवढेच नाही.

… स्वतःच्या चुका स्वीकारून त्यातून शिकणे, स्वतःला माफ करणे, स्वतःचा सन्मान राखणे आणि गरज पडल्यास स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे हेही स्वतःवर प्रेम करण्याचेच रूप आहे.

जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा इतरांकडून प्रेमाची भीक मागावी लागत नाही. कारण त्यावेळी आपला आनंद इतरांच्या स्वीकृतीवर नाही, तर स्वतःच्या आत्मविश्वासावर उभा असतो.

… म्हणून आयुष्यात सर्वप्रथम स्वतःशी मैत्री करा. कारण जो स्वतःचा होऊ शकत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्यांचे प्रेमही अनेकदा अपुरे ठरते. *_

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “तुझ्यासारखा तूच मित्रा.. ”  ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

यावर्षी ३० जुलै आणि २ ऑगस्ट अशा दोन दिवशी “ मैत्रीदिन “ साजरा केला गेला. तसा बरेचदा तो असाच दोन वेळा जगात साजरा केला जातो, आणि याचे कारण असे की ३० जुलै ही तारीख “ UN International Day of Friendship “ म्हणून जागतिक पातळीवर ‘मैत्रीदिन’ म्हणून साजरी केली जाते. तर दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी.. जो यावर्षी २ ऑगस्ट रोजी होता.. भारत, अमेरिका, आणि यू. के. मध्ये ‘ मैत्रीदिन ‘ साजरा केला जातो.

… दरवर्षीप्रमाणे यंदाही, उपलब्ध असलेल्या सर्व सामाजिक माध्यमांवरून या दोन्ही दिवशी शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडला आणि मैत्रीला चिंब भिजवून गेला… आनंद आणि समाधान दोन्ही भरभरून देऊन गेला.

… वाचता वाचता सहजच असं लक्षात आलं की अशा बहुतेक सर्व शुभेच्छा “ मैत्री “ चे महत्व, प्रत्येकाच्या आयुष्यात तिची असणारी आवश्यकता, आणि अर्थातच त्यामागची कारणं, ‘मैत्री’ या शब्दाशी मूलतःच जोडल्या गेलेल्या भाव-भावना, आणि त्या भावनांबद्दल व्यक्त करावीशी वाटणारी कृतज्ञता … हेच सगळं ठळकपणे सांगणाऱ्या होत्या.. नेहेमीसारख्याच…आणि यात आक्षेप घेण्यासारखं खरोखरच काहीच नाही.

पण एका सुहृदाने मात्र मला एक हिंदी कविता पाठवली होती जी फक्त मैत्रीबद्दल न बोलता, स्वतःच्या एका जिवलग मित्राला उद्देशून लिहिलेली होती…भावना त्याच पण व्यक्त करण्याची पद्धत वेगळी.. आणि त्यामुळे अर्थातच ती मनाला फार भावली … त्या मित्राच्या आपल्या आयुष्यात असण्याबद्दल.. व्यक्तिशः त्याच्याबद्दल वाटणारा विश्वास आणि त्याच्याबद्दल मनात सतत असणारी कृतज्ञतेची भावना ठळकपणे व्यक्त करणारी ती कविता … आणि म्हणूनच त्या कवितेचे हे वेगळेपण मनाला थेट भिडले.

…. आणि त्या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा मोह टाळताच आला नाही.

हिंदी कवी श्री. विजय सिंह चौहान यांच्या.. ।। तुमसा कोई नहीं ।।.. या हृद्य कवितेचा हा स्वैर भावानुवाद ……

☆ तुझ्यासारखा तूच मित्रा.. ☆

भेटण्यासाठी कुठलंच कारण नको 

अन गप्पा मारण्यासाठी एखादा विषयही नको 

शब्दांचं अवडंबर नको… बस् फक्त तुझा आपलेपणा पाहिजे 

बाकी काहीच नको रे मित्रा …

 

मन जेव्हा मनाशी जुळतं..

नातं आपसूकच विणलं जातं 

मग कितीही वर्षं का उलटेनात..

मनात उजळणारे स्नेहाचे दिवे विझू शकतच नाहीत रे मित्रा …

 

भेट कितीही दिवसांनी होवो..

डोळ्यात तो पूर्वीचाच विश्वास असतो 

मग काही न बोलताही खूप काही बोललं जातं 

मनातल्या मधुर संवेदना एकमेकांच्या मनाला लगेच जाणवतात मित्रा …

 

कुठलाही स्वार्थ नाही.. कसलीच अपेक्षाही नाही 

फायदा- नुकसान याचा हिशोब तर नाहीच नाही 

तूच तो मित्र जो सदैव सोबत उभा असतोच असतोस 

प्रत्येक सुखाचे वा दु:खाचेही उत्तर तूच देऊ शकतोस मित्रा …

 

अशा तुझ्या सुंदर पवित्र मैत्रभावनेला माझा मनापासून सलाम मित्रा 

माझ्या मनातल्या मनात तुझा सततच सन्मान मित्रा 

हे आपलं मैत्रीचं घट्ट नातं आयुष्यभर असंच दरवळत राहू दे..

माझा-तुझा स्नेह अविनाशी आणि विश्वास असाच अतूट राहू दे मित्रा… 

खरंच.. तुझ्यासारखा फक्त तूच मित्रा…

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares