शं. वा. किर्लोस्कर ( ‘शंकर वासुदेव किर्लोस्कर) यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ साली झाला. किर्लोस्कर मासिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. सुरूवातीला ते ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रका काढत. कारखान्यात तयार होणार्या मालाच्या जाहिरातीसाठी प्रथम ‘किर्लोस्कर खबर’ ही पत्रिका सुरू झाली. त्या नंतर त्यातून ‘‘किर्लोस्कर’ हे मासिक परिणत झाले. पुढच्या काळात स्त्री व मनोहर ही मासिके निघाली. महाराष्ट्राच्या नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि कालमानानुसार त्यात झालेले बदल याचे दर्शन या मासिकांमधून घडते. ‘शंवाकीय’ हे त्यांचे आत्मकथन आसलेले पुस्तक. यातून पाच दशकाचे महाराष्ट्राचे संस्कृतिक जीवन स्पष्ट होते. ते व्यंग चित्रकारही होते. ‘त्यांचे ‘टाकाच्या फेकी’ हे व्यंग चित्रांचे पुस्तकही त्या काळात अतिशय नावाजले गेले.
उद्धव शेळके – उद्धव शेळके हे वैदर्भीय लेखक कादंबरी लेखक म्हणूनते प्रसिद्ध आहेत. धग ही त्यांची कादंबरी खूप गाजली.’शिळान’ हा यांचा पहिला कथासंग्रह. वैदर्भीय ग्रामीण बोलीत त्यांनी लेखन केले. धुंदी, पुरुष, नांदतं घर, कोवळीक, इ. अनेक कादंबर्यांचे त्यांनी लेखन केले. त्यांचाही जन्मदिन आजचाच.
कमल पाध्ये – या प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी. त्यांचे बंध- अनुबंध हे आत्मचरित्र खूप गाजले.
शैलजा राजे – या मरारीतल्या नामांकित व लोकप्रिय लेखिका. यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे ३९ कथासंग्रह, ४३ कादंबर्या व २५ बालकथा- कादंबरिका व काही गद्य लेखन प्रसिद्ध आहे.मुखवटा, यज्ञ, आठवणींचे मोहोळ,आभास, अर्थहीन, बंधन इ. त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या.
गोदावरी पारुळेकर – ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात, त्यांच्यावर होणार्या अन्यायाबद्दल यांनी मोठाच लढा उभारला होता. त्या संघर्षावर आधारित त्यांनी ‘जेव्हा माणूस जागा होतो’, हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला ‘साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. या संघर्शाच्या वेळी कायदा मोडल्याबद्दल त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथील स्त्रियांच्या कहाण्या ऐकून त्यांनी ‘बंदिवासाची आठ वर्षे हे पुस्तक लिहिले. यांचाही आज स्मृतिदिन.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आजपासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आज ७ ऑक्टोबर—- ख्यातनाम कवी केशवसुत ( कृष्णाजी केशव दामले ) यांचा जन्मदिन.
(७/१०/१८६६ – ७/११/१९०५)
मराठीतली ‘ संतकाव्य ‘ आणि ‘ पंतकाव्य ‘ ही बऱ्याच वर्षांपासून रूढ झालेली परंपरा मोडून, अन्य अनेक विषयांवर वेगळ्या धाटणीची कविता करणारे “ आद्य मराठी कवी “ म्हणजे केशवसुत असे म्हटले जाते. वर्ड्सवर्थ, शेली , किट्स , अशा परदेशी कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता, आणि त्यामुळे त्यांनी मराठीत कवितेचा एक नवा दृष्टिकोन रुजवला. १९ व्या शतकाची जन -मानसिकता त्यांनी त्यांच्या कवितेतून सादर केली असे म्हटले तर वावगे होणार नाही, कारण त्यांच्या अनेक कविता स्वतंत्रता, समानता, आणि क्रांती, या संकल्पनांभोवती गुंफलेल्या दिसतात. याबरोबरच त्यांच्या निसर्गकविता, प्रेमकविता, आणि विशेष म्हणाव्यात अशा ‘झपुर्झा‘ , ‘म्हातारी ‘, यासारख्या गूढ कविताही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. “ तुतारी “ ही त्यांची कविता तर इतकी जास्त लोकप्रिय झाली की, त्या कवितेची शंभरी साजरी करतांना , म्हणजे २०१७ साली, दादर-सावंतवाडी एक्सप्रेसला “ तुतारी एक्सप्रेस “ हे नाव देण्यात आले. विद्यार्थीदशेत असतांनाच केशवसुतांनी एक नाटक आणि एक कादंबरीही लिहिली होती हे फारसे कुणाला कळलेही नव्हते. अशा “ आधुनिक मराठी काव्याचे जनक “ म्हणूनच नावाजल्या गेलेल्या कवी केशवसुत यांना भावपूर्ण आदरांजली.
——————–
७ ऑक्टोबर —- कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव म्हणजे वि.म. कुलकर्णी यांचा जन्मदिन.
(७/१०/१९१७ – १३/०५/२०१०)
‘नाटककार खाडिलकर ‘ यांच्यावर प्रबंध लिहून वि. म. कुलकर्णी यांनी पीएच.डी. मिळवली आणि दीर्घकाळ ‘ मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ‘ म्हणून त्यांनी काम केले. त्याजोडीनेच त्यांनी काव्यलेखन, ग्रंथसंपादन, बालकविता, अनुवाद, कथा, असे विविध प्रकारचे लेखन केले. ‘ अंगतपंगत ‘, ‘ चंद्राची गाडी ’, ‘ छान छान – गाणी ‘, यासारखे कितीतरी बालकवितासंग्रह, ‘ कमळवेल ‘, ‘ पहाटवारा ‘, प्रसाद रामायण ‘, अशासारखे काव्यसंग्रह, ‘ न्याहारी ‘ हा कथासंग्रह, ‘ नौकाडुबी ‘ ही अनुवादित कादंबरी, ‘ गरिबांचे राज्य ‘ ही चित्रपटकथा, आणि ‘ झपुर्झा ‘, ‘ पेशवे बखर ‘ अशासारख्या ग्रंथांचे संपादन— असे त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या काही कवितांची गाणीही लोकप्रिय झालेली आहेत. असे चौफेर लेखन करणाऱ्या श्री. वि. म. कुलकर्णी यांना विनम्र अभिवादन.
————————
७ ऑक्टोबर– मराठी साहित्यविश्वात “ बालकवी “ म्हणून ख्यातनाम झालेले कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन.
(१८९० – १९१८)
बालकवी यांचा “ मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी “ असा यथार्थ गौरव केला जातो. १९०७ साली झालेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनात अध्यक्ष डॉ. कीर्तिकर यांनी त्यांना “बालकवी“ ही उपाधी दिली. त्यांची काव्य-क्षेत्रातली मुशाफिरी फक्त १० वर्षांची होती. त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती होता, पण रूढार्थाने निसर्गवर्णन करणे हा त्यांचा हेतू नव्हता. तर निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार असायचे, असे जाणकार म्हणतात. त्यांच्या कवितांमध्ये जसा आनंद व्यक्त व्हायचा, तशीच काही कवितांमध्ये उदासीनताही व्यक्त झालेली दिसते. “ औदुंबर “, “फुलराणी“, “श्रावणमास “, “ आनंदी आनंद गडे “, अशासारख्या त्यांच्या कविता माहिती नसलेला काव्यरसिक सापडणार नाही. त्यांच्या कवितांचे संग्रहही प्रसिद्ध आहेत, आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. असे विशेषत्वाने म्हटले जाते की, नंतरचे ख्यातनाम कवी मर्ढेकर, ग्रेस, महानोर अशा भिन्न प्रकृतीच्या कवीच्या जडणघडणीवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. श्रावण महिन्याची चाहूल लागताच ज्यांच्या “श्रावणमासी हर्ष मानसी“ या कवितेची हटकून आठवण आल्याशिवाय राहत नाही, अशा कविश्रेष्ठ बालकवी यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
——————–
७ ऑक्टोबर — प्रसिद्ध मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक श्री प्रभाकर पेंढारकर यांचा स्मृतीदिन.
(१९३२ – ७/१०/२०१०)
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र असणारे श्री प्रभाकर पेंढारकर नेहेमीच प्रसिद्धीपासून लांब राहिले. “ प्रतीक्षा “, “ आणि चिनार लाल झाला “, “ चक्रीवादळ “ या त्यांच्या कादंबऱ्या अतिशय गाजल्या. भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे अतिशय अवघड काम करणाऱ्या सैन्याच्या ‘ बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन ‘ वर डॉक्युमेंटरी बनवतांना त्यांना “ रारंगढांग “ या कादंबरीची कल्पना सुचली, आणि एखादा सुंदर सिनेमाच पाहत आहोत असं वाटायला लावणारी ही कादंबरी वाचकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. “ एका स्टुडिओचे आत्मवृत्त “ या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता. फिल्म्स डिव्हिजन मधली त्यांची यशस्वी कारकीर्दही खूप गाजली होती. उत्कृष्ट लघुपट- निर्मितीसाठी त्यांनी आयुष्यातली बरीच वर्षे काम केले, अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचा जीवनपट उलगडणारा “ प्रभाकर पेंढारकर — एक परीसस्पर्श “ हा लघुपट तयार केला गेला आहे. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आज महामहोपाध्याय द.वा. पोतदार (दत्तो वामन पोतदार) यांचा स्मृतीदिन. (६ ऑक्टोबर १९७९) . ५ ऑगस्ट १८९०ला त्यांचा जन्म झाला. हे मोठे इतिहासकार, लेखक आणि वक्ते होते. भारताच्या केंद्रशासनाचे ते मान्यता प्राप्त पंडित होते. १९४८ मधे भारत सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी दिली. १९६१ ते१९६४ ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. ‘मराठी शुद्धलेखन महामंडळा’चे ते अध्यक्ष होते. ‘मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. १९३९ साली अहमदनगर येथे झालेल्या साहित्य समेलमनाचे ते अध्यक्ष होते.हिन्दी साहित्य समेलनात त्यांना ‘साहित्य वाचस्पती’ ही पदवी दिली होती.बनारस हिंदू विश्व विद्यालय आणि पुणे विद्यापीठ या दोन्हीही संस्थांनी त्यांना डी. लिट. पदवी दिली होती. ‘त्यांची ऐतिहासिक चरित्र लेखन’, ‘भारताची भाषा समास्या’, ‘मराठी इतिहास व संशोधन’, ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार इ. अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत. १९६७ मधे त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार मिळला होता.
☆☆☆☆☆
ग.रा. कामत यांचाही आज स्मृतीदिन. (६ ऑक्टोबर २०१५). त्यांचा जन्म १२ मार्च १९२३ चा. मराठी आणि हिन्दी चित्रपटांचे कथा लेखन त्यांनी केले. मौज व सत्यकथा या मासिकांचे ते काही काळ संपदक होते. ‘नवसाहित्य या शब्दाचे ते जनक. जसे नवकविता, नवकथा इ.. कन्यादान, लाखाची गोष्ट, (ग.दी.मांसहित), शापित इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या होत्या. त्यांची कथा असलेल्या ‘शापित’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.त्यांनी लिहीलेल्या पटकथांचे हिन्दी चित्रपटही गाजले. कच्चे धागे, कला पानी, मेरा गाँव मेरा देश इ. चित्रपटांच्या कथा त्यांच्या होत्या. त्यांना सह्याद्री वाहिनी आणि झी मराठीचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला होता.
☆☆☆☆☆
वा.रा.कांत ( वामन रामराव कांत ) या कविवर्याँचा जन्म ६ऑक्टोबर १९१३चा ‘विहंगमाला’ या नियतकालिकाचे ते संपदक होते. निजाम सरकारच्या हैद्राबाद आणि औरंगाबाद या आकाशवाणी केंद्रावर ते मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. मुंबई आकाशवाणी केंद्रावरून ते निवृत्त झाले. त्यांनी कविता, समीक्षा, अनुवाद या क्षेत्रात लेखन केले. त्यांचे दोनुली, पहाटतारा, रुद्रवीणा इ. १० कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी तू हसत रहा, बगळ्यांची माळ फुले इ. त्यांची गाणी लोकप्रिय झाली. वेलांटी (कविता संग्रह ), दोनुली (कविता संग्रह) मरणगंध (नाट्यकाव्य) या संग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
☆☆☆☆☆
निरंजन उजगरे या कवीचा जन्मही ६ ऑक्टोबर(१९४९)चा. तेही लेखक, कवी आणि अनुवादक होते. ते बहुभाषिक असून मराठी, हिंदी, इंग्लीश, तेलुगू, सिंधी , रशियन इ. भाषा त्यांना येत होत्या. काव्यपर्व, जायंट व्हील, म्हराष्ट्राबाहेरील मराठी, फळणीच्या कविता, दिनार प्रहार इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना सोव्हिएत लँडचा नेहरू पुरस्कार व ना.वा.टिळक पुरस्कार मिळाले होते. मालवण इथे १९९६साली झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे १९९९ साली डोंबिवलीयेथील कवि रसिक मंडळाच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
५ ऑक्टोबर : प्रसिद्ध लेखक आणि संपादक श्री. यदुनाथ थत्ते यांचा जन्मदिन……
लोकप्रिय समाजवादी नेते, “ चले जाव “ चळवळीत तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी, आणि राष्ट्रसेवादलासाठी मोठेच योगदान ज्यांनी दिले, असे श्री. यदुनाथ थत्ते हे एक प्रसिद्ध लेखकही होते. त्यांनी लिहिलेली — डॉ. होमी भाभा, नील्स बोहर, सी. व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस, यांची चरित्रे खूप प्रसिद्ध झाली. याव्यतिरिक्त, साने गुरुजी, यशाची वाटचाल, आटपाट नगर होते, आपला वारसा, चिरंतन प्रकाश देणारी ज्योत – म. गांधी, समर्थ व्हा – संपन्न व्हा, विनोबा भावे, अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्वेट मार्डेन यांच्या “ पुशिंग टू दि फ्रंट “ या पुस्तकावर त्यांनी लिहिलेली “ पुढे व्हा “ ही तीन भागातली पुस्तकमालाही प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे श्री. थत्ते यांनी पत्रकारिता आणि संपादन या क्षेत्रांमध्येही मोठे काम केले होते. “ साधना “ या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. श्री यदुनाथ थत्ते यांना भावपूर्ण आदरांजली.
५ ऑक्टोबर : प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्रीअनुराधा पोतदार यांचा स्मृतीदिन …..
(१५/१२/१९२७ – ०५/१०/२०१३)
‘आवर्त’, ‘कॅक्टस’, ‘मंझधार’ इ. काव्यसंग्रह लिहिलेल्या कवयित्री श्रीमती अनुराधा पोतदार यांनी, कुसुमावती देशपांडे , संजीवनी मराठे ,बालकवी, वि. म. कुलकर्णी यांचे कविता- संग्रह संपादित केले आहेत. तुकाराम- काथात्म साहित्य, तसेच ,” दत्तकवी आणि जीवन चरित्र “ ही पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी एकूण सहा पुस्तकांचे संपादन केले आहे. साहित्याचा वारसा त्यांना परंपरेनेच लाभला होता . कवी दत्त हे त्यांचे आजोबा, तर प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे हे त्यांचे वडील. भाषेवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. व्यवसायाने प्राध्यापक असणाऱ्या अनुराधा पोतदार यांना अनंत काणेकर, कुसुमाग्रज, शि. म. परांजपे यांच्या नावाने दिले जाणारे तसेच अन्यही काही पुरस्कार लाभले होते . अनुराधा पोतदार यांना त्यांच्या आजच्या स्मृतीदिनी मनःपूर्वक श्रद्धांजली .
सौ मंजुषा सुनीत मुळे
(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
प्रसिद्ध कवी कै. श्री. सोपानदेव चौधरी यांचा स्मृतीदिन–—-
कवयित्री बहिणाबाई यांचे हे सुपुत्र स्वतः एक उत्तम कवी होते. कविता लोकांपर्यंत पोहोचायला हवी या उद्देशाने १९२० च्या दशकात तेव्हाच्या काही नावाजलेल्या कवींनी रविकिरण मंडळाची स्थापना केली होती. सोपानदेव चौधरी हे या मंडळाचे सक्रीय सभासद होते. नुसते कविता-वाचन करण्याऐवजी, कविता जर गाऊन सादर केली तर ती लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचेल या विचाराने, सोपानदेवांनी आपल्या कविता चाल लावून सादर करण्यास सुरुवात केली. आणि रसिकांना हा प्रयोग फारच आवडला. पुढे हा एक पायंडाच पडला. सोपानदेवांच्या अशा बऱ्याच कवितांची झालेली गाणी प्रसिद्ध आहेत. एकच उदाहरण द्यायचे झाले तर, “ आली कुठूनशी कानी , टाळ मृदूंगाची धून “ –हे गाणे, जे रसिकांच्या मनात कायमचे नोंदले गेले आहे.
——सोपानदेवांनी केलेले एक अतिशय महत्वाचे काम आवर्जून सांगायलाच हवे. त्यांच्या आई बहिणाबाई यांच्या, साध्या- सोप्या आणि सहज शब्दात जीवनाचे तत्वज्ञान सांगून जाणाऱ्या कितीतरी असामान्य काव्यरचना, आणि त्यापैकी काही कवितांची झालेली गाणी अतिशय लोकप्रिय झालेली आहेत हे आपण सगळेच जाणतो. बहिणाबाई स्वतः अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांना सुचणारं काव्य त्या काम करता करता म्हणायच्या. अर्थातच त्या कविता कुठेही लिहिलेल्या नव्हत्या. त्यांच्या अवतीभवतीच सोपानदेव असायचे. त्यामुळे त्यांच्या कानावर सतत त्या कविता पडायच्या. ते मोठे झाल्यावर आपल्या आईच्या कविता आठवून आठवून त्यांनी कागदावर उतरवल्या, आणि म्हणून त्या महान कवयित्रीचे अप्रतिम काव्य रसिकांपर्यंत पोहोचले, आणि याचे पूर्ण श्रेय सोपानदेवांना जाते.
कवी सोपानदेव चौधरी यांना मनःपूर्वक आदरांजली. आजच्या अंकात वाचूया त्यांची “ आमुची लिपी “ ही मराठीची लिपी म्हणून आणि बोली म्हणून असलेली वैशिष्ठ्ये सांगणारी एक वेगळीच कविता.
सौ मंजुषा सुनीत मुळे
(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठीती ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विनोदी लेखक आणि कथाकार द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने काल दि.02/10/2021 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे २४ कथासंग्रह आहेत. प्रामुख्याने ते विनोदी लेखक व कथाकथानकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे काही गंभीर कथासंग्रह आहेत आणि काही ललित लेख संग्रहही प्रसिद्ध आहेत. १९६२पासून त्यांनी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्याबरोबर कथाकथनाचे कार्यक्रम सुरू केले. या त्रयींनी३००० पेक्षा जास्त कार्यक्रम केले. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर, इतकंच काय कॅनडा – अमेरिका इथेही त्यांचे कार्यक्रम झाले. व्यंकूची शिकवणी,माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी इ. त्यांच्या कथांनी महाराष्ट्राला खळखळून हसवले. त्यांची पात्रे इब्लिस, बेरकी, वाहयात, टारगट क्वचित भोळसट आहेत. त्यांच्या कथातून ग्रामीण जीवनाचं दर्शन होते.
एक डाव भुताचा,ठकास महाठक या २ चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिक मिळालं. याशिवाय आणखी १६ चित्रपट कथा त्यांनी लिहिल्या. परळी वैजनाथ येथे १९९८ साली झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पुणे महानगर पालिकेचा वाल्मिकी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संस्कृतिक मंडळाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.
विनोदी कथा,पटकथा लेखन याबरोबरच त्यानी श्री.शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह कथाकथनाची प्रथा महाराष्ट्रात रुजवली व लोकप्रिय केली.
जगणं सुसह्य करणा-या या थोर साहित्यिकास ई-अभिव्यक्तीच्या वतीने त्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली, शब्दांजली..???
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
म.वा. धोंड (मधुकर वासुदेव धोंड ) हे मराठीतले जेष्ठ समीक्षक. आज त्यांचा जन्मदिन. (३ऑक्टोबर १९१४) ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक विश्र्लेषणापासून मर्ढेकरांच्या कवितांच्या शोधापर्यंत आपल्या विचक्षण समीक्षेबद्दल त्यांची ख्याती होती, असे ‘संजीव वेलणकर’म्हणतात. आपल्या मर्मग्राही लेखणीने मराठी समीक्षा क्षेत्रावर यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवला. मूलगामी संशोधनाची जोड त्यांच्या समीक्षेला होती. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ या त्यांच्या ग्रंथाला १९९७ चा साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. ज्ञानेश्वरी स्वरूप, तत्वज्ञान आणि काव्य ( साहित्य आणि समीक्षा) , मराठी लावणी (समीक्षा) , जाळ्यातील चंद्र, तरीही येतो वास फुलांना, काव्याची भूषणे इ. पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. त्यांचा स्मृति दिन ५ ऑक्टोबर २००७ ला आहे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
कारवारमध्ये २२ सप्टेंबर १९०९ मध्ये दत्ता तुकाराम बांदेकर या अवलिया साहित्यिकाचा जन्म झाला. कानडी भाषेत ७ बुकं शिकून, मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणारे हे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्या प्रकृतीचे मराठी लेखक. त्यांचा स्मृतीदिन आज ३ ऑक्टोबरला आहे. (१९५९)
आचार्य आत्रे यांचा ते उजवा हात होते. साप्ताहिक नवयुगमध्ये ते ‘रविवारचा मोरावळा’ हे सादर लिहीत. त्यांच्या लेखनात सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्यांच्या भानगडी यावर चुरचुरीत भाष्य असे. टवाळकीच्या ढंगात लिहिलेली त्यांची सदरे, त्यावेळी खूप गाजली. ‘सख्या हरी’ या टोपण नावाने त्यांची सदरे प्रकाशित होत. ‘आक्काबाईचा कोंबडा’, जग ही रंगभूमी’, ‘घारुआण्णांची चंची’ ही त्यांची सदरे अतिशय लोकप्रिय झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे ते लाडके लेखक झाले. ते स्वत: मात्र प्रसिद्धी पाराङ्मुख होते.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
2 ऑक्टोबर – संपादकीय – दि . २ ऑक्टोबर — आपल्या देशातल्या दोन महान नेत्यांची जयंती
स्व महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिलेले महत्वाचे योगदान सर्वच भारतीय जाणतात. १५० वर्षे पारतंत्र्यात असणाऱ्या देशाला शांतीपूर्ण मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देता येईल हा त्यांचा ठाम विश्वास त्यांनी अनेकांच्या मनावर बिंबवला. “ जनहो खादी वापरा “ हा ‘ स्वदेशी ‘ वस्तूंना पुरस्कृत करणारा संदेश लोकांना देतांना त्यांनी स्वतःपासून तो अमलात आणण्यास सुरुवात केली. भारतीयांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आवाज उठवत त्यांनी कितीतरी सत्याग्रहांचे नेतृत्व केले. तसेच अनेक सामाजिक सुधारणा करण्यात ,अस्पृश्यता-निवारण मोहिमेत, जातीय एकता प्रस्थापित करण्याच्या मोहिमांमध्ये ते नेहेमीच सक्रीय होते. त्याहीआधी , म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी ,भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते, जिथे ते तब्बल २१ वर्षे राहिले. तिथे राहणाऱ्या भारतीयांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. त्यांना तिथे वांशिक वर्णभेदाला तोंड द्यावे लागले. पण त्यांचे अहिंसावादाचे तत्व त्यांनी सोडले नाही. आणि त्याच मार्गाने स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा तिथल्या भारतीयांना दिली. १९१५ साली गोपाळ कृष्ण गोखले या उदारमतवादी नेत्याच्या सल्ल्याने ते भारतात परतले. आणि भारतात राजकीय कार्य करण्यास सुरुवात केली. मा. श्री. गोपाळ कृष्ण गोखले यांना ते आपले “ राजकीय गुरु “ मानत असत. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘ महात्मा ‘ ही उपाधी दिली. तसेच १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा त्यांना “ राष्ट्रपिता “ म्हणून संबोधले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सत्तास्थापनेच्या वेळी मात्र ते स्वतः सत्तेपासून लांब राहिले. अशा या थोर नेत्यास अतिशय आदरपूर्वक श्रद्धांजली.
स्व लाल बहादूर शास्त्री
१९०४ साली वाराणसी येथे एका प्राथमिक शिक्षकांच्या घरी लाल बहादूर यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी ऐकलेल्या गांधीजींच्या भाषणाने ते प्रभावित झाले. पुढे काशी विद्यापीठात अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी मिळवली. पण त्या आधीपासूनच, विदेशीवर बहिष्कार आणि स्वदेशीचा वापर याचा पुरस्कार करण्यात त्यांचा खूप पुढाकार होता. पुढे समानतेचे सूत्र हाती धरून शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते. “ सर्व्हन्टस ऑफ दि पीपल्स “ सोसायटीचे सदस्य म्हणून काम करता करता ते पुढे त्या सोसायटीचे अध्यक्ष झाले — आणि असा त्यांच्यातला ‘ विधायक कार्यकर्ता ‘ घडत गेला. तेव्हाच्या काँग्रेसचे मवाळ धोरण त्यांना मान्य नव्हते. पण विशेष म्हणजे सत्तेची लालसाही कधीच नव्हती. तरीही पुढे त्यांना आधी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद, नंतर काँग्रेसचे सचिवपद, मग रेल्वेमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पण एका रेल्वे-अपघाताची नैतिक जबाबदारी स्वतःची असल्याच्या धारणेने त्यांनी आपणहून ते मंत्रिपद सोडले. १९६४ साली पं. नेहरू यांच्या निधनानंतर त्यांना एकमताने पंतप्रधानपद बहाल केले गेले. ही जेमतेम दीड वर्षांची त्यांची कारकीर्द भारतीयांच्या कायम लक्षात राहील यात शंका नाही. कारण याच काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, पण भारताने त्यांना नमवले. याच काळात “ जय जवान , जय किसान “ या त्यांच्या घोषवाक्याने पूर्ण देश भारावून गेला. पण हे युद्ध संपल्यानंतर अगदी काहीच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. देशासाठी त्यांनी केलेल्या अनेक महत्वाच्या कार्यांसाठी त्यांना मरणोत्तर “ भारतरत्न “ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. खरं तर हा त्या पुरस्काराचा गौरव होता असेच म्हणावेसे वाटते. अशा या महान नेत्यास अतिशय भावपूर्ण आदरांजली .
आज २ ऑक्टोबर हा सुप्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ श्री. चिंतामण द्वारकानाथ तथा सी. डी. देशमुख यांचा स्मृतिदिन….. भारतीय रिझर्व्ह बँकेचे तिसरे, आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर असणारे श्री. देशमुख हे पंडित नेहेरुंच्या, स्वतंत्र सार्वभौम भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातले पहिले अर्थमंत्री होते. त्याहीआधीच, म्हणजे १९४४ साली, ब्रिटिश भारताच्या शासनाने त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना “ सर “ हा किताब बहाल केला होता. १९४३ ते १९४९ या काळात ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतांना, १/१/१९४९ रोजी या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले. भाषावार प्रांतरचना करतांना सरकारने बेळगाव आणि कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून त्यांनी अर्थमंत्रीपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. ते संस्कृत- पंडित होते. कालिदासाच्या “ मेघदूताचा “ त्यांनी केलेला समवृत्त काव्यानुवाद, उत्कृष्ट अनुवाद म्हणून वाखाणला गेला आहे. कै. श्री. देशमुख यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
संपादक मंडळ प्रतिनिधी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आज नाट्यछटाकार ‘दिवाकर’ यांचा स्मृतीदिन (१जाने. १९३१) त्यांचे नाव शंकर काशीनाथ गर्गे. नाट्यछटा वङ्मय प्रकारचे ते जनक. एक प्रसंग, एकच पात्र, पण दुसर्या एका पत्राशी किंवा अनेकांशी बोलत आहे, असे नाट्यछटेचे स्वरूप असते. हा गद्य लघु वङ्मयाचा प्रकार आहे. त्यांनी ५१ नाट्यछटा लिहिल्या. त्यांच्या नंतर तुरळकपणे नाट्यछटा लिहिल्या गेल्या असल्या तरी या क्षेत्रात नंतर नाव घेण्याइतकं कुणी झालं नाही.त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९चा.
* * * * *
आज लोकप्रिय अनुवादक उमा कुलकर्णी यांचा जन्मदिन. त्यांनी कन्नडमधील श्रेष्ठ, साहित्यिकांच्या गाजलेया पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे. वस्तूत: त्यांचा पदवीचा विषय ड्रॉईंग आणि पेंटिंग असा आहे. १९८१- १९८३मध्ये त्यांनी एस.एन.डी.टी मधून आर्ट आणि पेंटिंगची एम.ए. ही पदवी घेतली.
१९८२ मध्ये त्यांचा ‘तनमानाच्या भोवर्यात’ हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला. ज्ञानपीठ परितोषिक विजेते शिवराम कारंथ यांची ही कानडीत गाजलेली कादंबरी. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांची अनुवादाची ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवराम कारंथ, भैरप्पा, गिरीश कार्नाड इ. कन्नडमधील श्रेष्ठ लेखकांच्या पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. आपल्या अनुवादाच्या अनुभवावर त्यांनी अनुवादु – संवादु हे पुस्तक लिहिले. याला साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पर्व’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, याशिवाय महाराष्ट्र फाऊंडेशनचा इ. तेरा-चौदा पुरस्कार त्यांच्या विविध पुस्तकांना मिळाले आहेत. त्यांची लेखणी अजूनही लिहिती आहे.
* * * * *
आज थोर साहित्यिक ग.दि माडगूळकर यांचा जन्मदिन (२१ सप्टेंबर). कविता, कथा, ललित लेख, पटकथा, इ. साहित्य प्रकारात लीलया त्यांची लेखणी फिरली. ते उत्तम अभिनेतेही होते. सुरुवातील ते वि. स. खांडेकरांचे लेखनिक होते. नंतर ते चित्रपट व्यवसायात शिरले. त्यांनी १५८ मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. त्यातील कथा, पटकथा, संवाद त्यांचेच होते. २५ हिन्दी चित्रपटांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. तूफान और दिया, दो ऑँखे बारह हात, नवरंग, गुंज उठी शहनाई या गाजलेल्या चित्रपटांच्या कथा त्यांच्याच होत्या.
अनेक गीतातून त्यांनी सोप्या शब्दात जगण्याचे तत्वज्ञान सांगितले. उदा. दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, उद्धवा अजब तुझे सरकार इ.
त्यांनी २००० च्या वर चित्रपट गीते लिहिली. त्यांनी ४० पुस्तके लिहिली. त्यापैकी चैत्रबन (चित्रपट गीते), जोगिया ( कविता संग्रह) आणि मंतरलेले दिवस ( आत्मवृत्त ) यांना महाराष्ट्र सरकारची पारितोषिके मिळाली होती.
त्यांचे गीतरामायण खूप गाजले. त्याचप्रमाणे त्यांनी गीत गोपाल ही श्रीकृष्णाच्या चरित्रावरील आणि गंगाकाठ ही पेशवाईवरची संगीतिका लिहिली.
१९७३ साली यवतमाळ इथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला होता.
आज वाचा सबकुछग.दी.मा.
प्रस्तुती उज्ज्वला केळकर
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आजचा दिवस “ जागतिक अनुवाद दिन “ म्हणून गौरवला जातो. “ अनुवाद “ हा एक “साहित्यप्रकार“ म्हणून रुजवून, त्याला जागतिक साहित्यविश्वात मानाचे असे अढळपद मिळवून देणाऱ्या आणि त्या स्थानाला सातत्याने गौरव प्राप्त करून देणाऱ्या सर्व अनुवादकांना ई – अभिव्यक्ती साहित्यमंचातर्फे आदरपूर्वक प्रणाम आणि हार्दिक शुभेच्छा
उज्ज्वला केळकर
संपादक मंडळ ( मराठी विभाग )
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈