मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विदाई… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ विदाई… ☆ डॉ. शैलजा करोडे

“भरली, भरली, भरली मंगलघटिका भरली “… तशी लग्न मंडपातील धावपळ वाढली. घोड्यावरून नवरदेव आला. त्याच्या स्वागताला वधुकडील मंडळी मंडपाच्या दाराशी मंगल कलश, पुजेचं ताट घेऊन उभी होती. आगत स्वागत झालं.

” वधूला आणा ” माझे काका म्हणाले, तसे मामांनी मला उचलून मंडपात आणले.

नवरदेवासह मला फुलांच्या राशिवर चालवत स्टेजवर आणले, डी जे वर गाणे वाजत होते ” बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है “

 

अंतरपाट धरला गेला व मंगलाष्टकं सुरू झाली.

: तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि ॥

या मंत्रोच्चाराबरोबर

गुरूजींनी दोन्ही हात वर नेले टाळी वाजवून वाजंत्रीला इशारा देण्यासाठी. अक्षतांची बरसात आमच्यावर होऊ लागली. आंतरपाट दूर झाला व मी वरमाला घालणार तोच अशोकला त्याच्या मित्रांनी वर उचलले. मी बावरले, आता कशी घालणार वरमाला. तोच माझा भाऊ व त्यांच्या मित्रांनी मलाही वर उचलले. मी आणखीनच गडबडले. मी वरमाला घालण्यासाठी वाकले, तोच अशोकच्या मित्रांनी त्याला मागे खेचले. या गडबड, गोंधळ, हसी मजाकमध्ये एकदाची मी अशोकच्या गळ्यात वरमाला घातली.

आम्हांला खाली उतरविले तसा मी निःश्वास सोडला. शालूचा पदर व शाल सावरत रूमालाने मी घर्मबिंदू टिपले. नजरेच्या कडेतून अशोक मला न्याहाळत होते, तशी नकळत मी ही लाजले. आरक्त गाल आणखी लाल झाले.

सप्तपदी, कन्यादान सगळे विधी पार पडले. जेवणावळी उठल्या. व प्रत्येक वधूला हळवा करणारा विदाईचा क्षणही आला. फुलांनी सजवलेली कार तयारच होती. आई बाबा, काका काकी, मामा मावशी माझ्या मैत्रिणी सगळ्यांचा निरोप घेऊन साश्रू नयनांनी मी लग्नमंडप ओलांडून बाहेर आले.

कारजवळ भाऊ उभा आपले दोन्ही हात पसरवून, मी रडतच त्याच्या कुशीत शिरले. डोळ्यातील पाणी थांबवत भाऊने कारचा दरवाजा उघडला मला विदाई देण्यासाठी. ” ताई, तुला काय भेट देऊ मी. ” ” अरे हा एवढा मोठा आनंद दिलास तू. मला लग्नाच्या बोहल्यावर चढवलंस. आणखी काय हवं आणि हे केवळ तुझ्यामुळे तर शक्य झालं, विद्येचं दान तू मला भरभरुन दिलंस “

मी सासरी निघाले, हळूहळू निरोप देणारे हात मागे पडले अन मी भूतकाळात शिरले.

“सोनाली, ए पोरी प्रकाशचा डबा भरलास काय? त्याची तयारी कर, आटप लवकर आणि शाळेला सोडून ये त्याला. सोनालीची आई रखमा बोलत होती.

” हो मी केलीय त्याची तयारी, नेते त्याला शाळेत “

“अन हे बघ, शाळेतून लवकर घरी ये, इकडे तिकडे भरकटू नकोस, घरातलं सगळं आवर आणि शेवंता आजीने बोलावलंय, त्यांची मोलकरीण चार दिवस रजेवर आहे, त्यांची कामं करशील, चार पैसे मिळतील तर घरखर्चाला कामा येतील. चल मी निघते कामावर “

प्रकाशचा हात धरून आम्ही दोघी भावंडं शाळेकडे चालू लागलो.

प्रकाशला सोडलं आणि माझी पावलं तिथंच थबकली. प्रार्थना सुरु होती 

” खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ” नकळत माझेही मन गुंतले. प्रार्थना संपवून मुले वर्गात केव्हा गेली मला कळलेही नाही. वर्गात गणिताचा तास सुरु झाला. आणि माझेही कुतूहल वाढले. मी वर्गाच्या खिडकीशी लपून तर मध्येच डोकावून गुरूजींनी शिकवलेले, ऐकत होते, पाहात होते.

” काय गं, सोनाली शेवंता आजीकडे इतक्या उशीरा का कामाला गेलीस? कोठे होतीस तू? “

” काही नाही आई, घरातलं काम आवरलं नी गेली की त्यांच्याकडे “

” खोटं नको बोलूस? उद्या वेळेवर जा त्यांच्याकडे ” ” हो आई, जाईन मी वेळेवर “

प्रकाशला शाळेत सोडले, पण आजही माझा पाय तेथून निघत नव्हता. आज इतिहासाचा तासात पानिपतचे तिसरे युध्द शिकवले जात होते, मराठा साम्राज्य व अहमदशाह अब्दालीचे अफगाण सैन्यात हे युध्द झाले. या युद्धात मराठ्यांचा दारूण पराभव झाला व अहमदशाह अब्दाली विजयी झाला. पण त्याला फारसा लाभ झाला नाही व नरसंहारात त्याचेही सैन्य बरेच मारले गेले.

संध्याकाळी आई घरी परतली ती संतापातच. ” कार्टे कुठे भटकत असतेस ग. आज शेवंता आजीकडे गेलीच नाहीस म्हणत फाडकन माझ्या मुस्कटात मारली. मी कळवळले. प्रकाश माझा भाऊ मध्ये आला, नको आई, ताईला मारु नकोस, ताई माझ्यासाठी शाळेच्या आवारातच होती. ” ” आवारात होती, तिथे काय करत होती ही ” ” आई, ताई माझ्या वर्गाच्या खिडकीतून अभ्यासाकडे लक्ष देत होती. तिलाही शिकायचंय आई, तिलाही येऊ दे ना शाळेत ” ” हिला शाळा शिकवू? मग घरातल्या भाकरी कोण भाजणार? तू? का मी काम सोडून घरी बसू. मी घरी बसली तर तुम्ही खाणार काय? हवा कि पाणी? हवा खाऊन, पाणी पिऊन जगता आलं असतं ना तर काहीच कमवायची गरज नसती पडली रे. पण खायला तर कमीत कमी दोन टाईम तर लागतंच. महागाई या प्रकारची, एकट्या तुझ्या बापाच्या कमाईत काय भागतं.? पुढे हिचं लगीन पण करावं लागील ना, कोठून आणायचा एवढा पैसा? आता शिक्षण, पुढे लगीन. बस झाली तुझी बडबड. तुला शिकवतोय आम्ही हेच भाग्य समज. जास्त शहाणपणा करू नकोस. ‘ प्रकाश गप्प झाला.

रात्री झोपतांना माझा दुर्मुखलेला चेहरा पाहून प्रकाश म्हणाला, तू काळजी करू नकोस ताई, रोज शाळेत काय शिकवलं ते मी तुला शिकवत जाईन. दुपारी माझी शाळा सुटली कि मी तुला शिकवत जाईन. आई बाबा दुपारी कामावर गेलेले असतात. मी तुला घरकामातही मदत करीत जाईन. ‘ ” पण प्रकाश मला परीक्षा कशी देता येईल, माझा जर शाळा प्रवेशचं झाला नाही तर ” ” ताई परीक्षा नाही देता येणार, पण मी घरी आल्यावर प्रश्नपत्रिका सोडवत जा ना. म्हणजे तुला प्रश्नांचे स्वरूप कळत जाईल, परीक्षा, गुणांकन, निकाल या गोष्टी तुझ्यासाठी नाही घडल्यात तरी तुझं ज्ञान तर वाढेल.

मी अठराव्या वर्षात पदार्पण केलं तशी आई बाबांना माझ्या लग्नाची चिंता सतावू लागली. स्थळ पाहणी सुरु होती, , रुप रंग जरी असलं तरी माझ्याकडे शिक्षण नव्हतं. मध्यंतरीच्या स्त्री भ्रूण हत्येमुळे सगळ्याच समाजातील मुलींची संख्या घटली होती, त्यामुळे मुलींच्या बाबतीत हुंडा, मान पान, रूप रंग या बाबी गौण ठरू लागल्या. फक्त मुलगी द्या, खर्च आम्ही करू म्हणणारी मंडळींचे प्रमाण वाढले होते.

अशोक चे स्थळ माझ्यासाठी सांगून आले. पण माझ्याकडे रूप रंग असले तरी शिक्षण नव्हते. अशोक शिक्षित व आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर होता. मुलगी फार शिकलेली नसली तरी त्याला अशिक्षित नको होती. रूपाने देखणा उंचपुरा, अशोक मलाही भावला होता, पण माझं शिक्षणचं आडवं येत होतं.

बैठकीत मंडळी बसली होती. ” मुलगी पसंत आहे, पण शिक्षण नाही, फार नाही पण नवर्‍याला व्यवसायात मदत होईल एवढं शिक्षण हवं होतं ” ‘ नमस्कार, मी तुम्हां सगळ्यांमध्ये लहान आहे तरी बोलण्याचं धाडस करतोय. माझी बहीण अशिक्षित नाही, तिला सगळं लिहिता वाचता येतं, हवं तर यावर्षी दहावीच्या परिक्षेला बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून फाॅर्म भरावा, ती नक्कीच पास होईल याची मी गॅरंटी घेतो, व लगेच पुढच्या वर्षी बारावीचीही परीक्षा देईल. “प्रकाश बोलत होता.

” मग हरकत नाही. मुलीचं शिक्षण होईल व तोपर्यंत ती 21 वर्षांचीही होईल. चालेल आम्हांला “

आणि आज प्रकाशने माझी विदाई केली होती. त्याच्यामुळेच तर मला शिक्षणाचं अनमोल रत्न मिळालं व अशोकसारखं सोनं लाभलं. तरी माझा भोळा भाऊ म्हणतो ताई तुला मी काय भेट देऊ “

सनईचे सूर वाजू लागले. स्वागताला सवाष्णी आल्या, तशी माझी तंद्री भंग पावली. ” ये सुनबाई, पहिला उजवा पाय टाक ” म्हणत कुटुंबातील जेष्ठ स्त्रियांनी माझा गृहप्रवेश केला, व मी एका नव जीवनाला सुरूवात केली.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आजोबा आणि बुढ्ढाश्रम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ आजोबा आणि बुढ्ढाश्रम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

दर शनिवारी, आजोबा आणि मी आमच्या घराजवळ असलेल्या बुढ्ढाश्रमात तिथल्या आजीआजोबांना भेटायला जातो. “त्याला बुढ्ढाश्रम नाही म्हणत, ” आजोबा मला सांगत, आणि मग काहीतरी खूप जोडाक्षरं असलेला एक कठीण शब्द म्हणत, पण मला काही तो शब्द म्हणता येत नाही.

तिथे आजोबांचे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना भेटायला आजोबांना आणि मला फार आवडतं. शिवाय आजोबा नेहमी म्हणतात, “जे आजारी लोकांना भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांचं मनोरंजन करतात, ते त्यांना नवीन उभारी देतात, खूप पुण्याचं काम करतात. ” 

तिथं आम्हाला अन्नपूर्णाअम्मा भेटायच्या. त्या चेन्नईजवळील एका गावाहून आलेल्या आहेत. त्या नेहमी त्यांच्या गावातील एकाहून एक सरस खाद्यपदार्थांबद्दल सांगायच्या. त्यांचे तिथं एक छोटे हॉटेल होतं आणि त्यांच्या हातचं इडलीसांबार खायला लोक दूर-दूरहून येत असत.

नंतर भेटायचे पेस्तनकाका, ते खूप गमतीशीर बोलायचे. त्यांच्या पारशी ढंगात वेगवेगळे जोक्स सांगायचे. त्यांचे काही जोक्स फार फनी असत, काही मला समजतही नसत. पण ते स्वत:च्याच विनोदांवर जोरजोराने हसत, हसताना त्यांची ढेरी अशी गदागदा हलायची आणि नुसतं ते बघूनही मला हसू यायचं.

त्यांच्या शेजारी संगीतकाका असतात, हे नेहमीच काहीतरी गुणगुणत असत. खूप मूडमध्ये असले की ते आम्हालाही कोरसमध्ये गायला लावायचे.

मग भेटतात मेहताआजी! त्या नेहमी आपल्या नातवंडांच्या गोष्टी सांगतात, त्यांच्याकडे त्यांच्या नातवंडांचे ढीगांनी फोटो आणि अल्बम आहेत.

बापटकाकू शाळेत इतिहासाच्या शिक्षिका होत्या. त्या नेहमी आम्हाला जुन्या काळातल्या पौराणिक, ऐतिहासिक कथा सांगत.

सिंग साहेब सैन्यातून निवृत्त झाले आहेत. एका युद्धात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला होता. ते आम्हाला सैनिकांच्या शौर्याच्या कथा सांगतात.

गुप्ताकाका फार बोलत नाहीत, फक्त माझी वटवट ऐकतात, मान डोलावतात आणि “पुढच्या शनिवारी परत ये ग” असं मला म्हणतात.

मला आणि आजोबांना या सगळ्यांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं आणि ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो, दर आठवड्याला आम्ही त्यांना भेटायला जायचोच.

पण एकदा माझे आजोबा आजारी पडले आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. “ते क्रिटिकल आहेत, कोमात गेले आहेत, ” असं काहीतरी डॉक्टर म्हणाले, म्हणजे काय ते मला नीटसं कळलं नाही, पण एवढं नक्की समजलं, की या शनिवारी ते माझ्याबरोबर त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटायला येऊ शकणार नाहीत.

मग मी त्या शनिवारी एकटीच बुढ्ढाश्रमात गेले. सगळे मला पाहून खूप आनंदी झाले. आजोबा का नाही आले असं सगळ्यांनी विचारलं, मी त्यांना हॉस्पिटल, क्रिटिकल, कोमा वगैरे सांगितलं. त्यांना काय कळलं कोणास ठाऊक, पण आज ते सगळेच मला हसवण्याच्या प्रयत्नात होते. अन्नपूर्णाअम्मानी त्यांची फेवरेट रेसिपी मला सांगितली, पेस्तनकाकांनी जोक्स सांगितले, मेहता आजींना माझा रेड फ्रॉक खूप आवडला असं त्या म्हणाल्या, बापट काकूंनी एका शूर छोट्या मुलीची गोष्ट सांगितली.

मी परत जायला निघाले, तेव्हा का कोणास ठाऊक पण सगळे आजीआजोबा डोळे पुसत होते. मी पुढच्या आठवड्यात नक्की आजोबांना घेऊन येईन असं त्यांना प्रॉमिस केलं आणि निघाले.

पण पुढच्या शनिवारीसुद्धा आजोबा हॉस्पिटलमध्येच होते. ते काही खातपीत नव्हते, बोलत नव्हते, हसत नव्हते, नुसते छताकडे बघत पडून राहायचे. बाबा गप्प गप्प असायचे, आईचे डोळे लाल दिसायचे.

आजही आजोबा माझ्यासोबत येणार नाहीत हे मला कळलं, मग मी पाचच मिनिटांसाठी बुढ्ढाश्रमात जाऊन आले. त्यांना सांगितलं की आजोबांना अजून बरं वाटत नाहीये आणि आई बाबा पण बोलत नाहीयेत, तर मी आज त्यांच्याशी गप्पा मारायला जाते.

आजी आजोबा काही बोलले नाहीत. का माहीत नाही, पण गुप्ताकाकांनी मला जवळ घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि “सगळं ठीक होईल, बरं, बाळ! ” असं मला म्हणाले.

“मला कुठं काय झालं होतं? ” या आजोबांची गंमतच आहे, मला वाटलं.

दुसऱ्या दिवशी, रविवारी, आईबाबांसोबत मी हॉस्पिटलमध्येच होते. आता ते डोळे उघडत होते, पण ते काही खातच नव्हते, त्यामुळे त्यांना ताकद येत नव्हती. मी त्यांना कित्ती कित्ती सांगितलं, की vegetables खाल्ल्या पाहिजेत, दूध प्यायलं पाहिजे, पण ते ऐकतच नव्हते.

एवढ्यात आजोबांच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर खूप आवाज ऐकू यायला लागले. “ऐसा कैसा खबर नहीं? मेरे को पक्की खबर हैं के इधर आज पार्टी है! ” असं मोठमोठ्यांदा बोलत पेस्तनकाका आजोबांच्या खोलीत घुसले. अम्माने गरमागरम इडलीसांबार आणलं होतं. सिंगसर बाबांशी बोलत होते, बापट काकू आईच्या पाठीवरून हात फिरवत होत्या, मेहताआजी त्यांच्या नातवंडांनी केलेलं “get well soon” ग्रीटिंग कार्ड आजोबांना देत होत्या, संगीतकाका कुठलं तरी, जुन्या काळातलं “सुहाना सफर, और ये मौसम हसीन” वगैरे गाणं म्हणत होते, गुप्ताकाका माझा हात घट्ट धरून उभे होते.

रूममध्ये नुसता आरडाओरडा चालला होता, इतका की तिथल्या नर्सताईसुद्धा काय चाललं आहे बघायला, आम्हाला गप्प करायला खोलीत आल्या. पण ही सगळी मंडळी पाहिली, नर्सताईला काय झालं माहित नाही, पण त्या डोळे पुसत – आम्हाला काहीच न बोलता बाहेर निघून गेल्या.

आजोबांनी हाताने खूण करून बाबांना बोलावलं, “मला जरा बसतं करतोस का? मला भूक लागली आहे, ” एकदम हळू आवाजात ते म्हणाले.

मग त्यांनी अम्माने आणलेली इडली खाल्ली.

आई बाबा आणि आलेले सगळे आजी आजोबा वेडे आहेत! तिकडे आजोबा खात होते, आणि इकडे या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं.

“आता तुझे आजोबा लवकर बरे होणार, बरं का! ” माझ्या डोक्यावर टपली मारत डॉक्टरकाका सांगत होते, आणि मी आजोबांबरोबर पुढच्यावेळी बुढ्ढाश्रमात गेले की काय करायचं याचे प्लॅन्स करण्यात गुंग झाले होते.

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.) 

इथून पुढे – – 

दिपूच्या आईने अंगण शेणाने सारवले. पानंदीपासून घरापर्यंत रांगोळी घातली. आता तिचे लक्ष येणाऱ्या एसटीवर होते. कधी एकदा पैसे हातात येतात आणि दुकानाचे मन आणतो असे तिला झाले होते.

त्यांच्या गावात एसटी नदीपलीकडे थांबत असे. टिपूच्या घरातून गाडी आल्याचा अंधुकसा आवाज येत असे. इतक्या वर्षाच्या सरावाने गाडी थांबल्याचा आणि वळण्याचा आवाज कळत असे.

दोन वाजायला आले आणि दिपूची आई आत बाहेर करू लागली. पण दुपारच्या गाडीने दिपूचे बाबा आले नाहीत. पण तिला निश्चित माहित होते चारच्या गाडीने ते येणारच. पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा तिच्या आत बाहेर सुरु झाल. साडेपाचच्या सुमारास गाडीचा आवाज आला तशी ती बाहेर येऊन उभी राहिली. लांबून तिला दिपूचे बाबा येताना दिसले. तसा तिला खूप आनंद झाला, तिने दिपूला हाक मारली ” दिपू ती सामानाची यादी आणि पिशव्या घेऊन ये बाहेर. बाबा आले, त्यांचे कडून तीन चार हजार घे आणि यादी घेऊन दुकानात जा. आणि सर्व सामान व्यवस्थित आण. ‘

” हो आई येतो, म्हणत दिपू यादी आणि पिशव्या घेऊन आला. तोपर्यंत दिपूचे बाबा घराजवळ पोहोचले होते. पण तिच्या लक्षात आले त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.

” मिळाले ना पैसे? दिपूच्या आईने विचारले. बाबा रडविले होत म्हणाले ” नाही, बँकेत त्यांच्या अकाउंट वर पैसेच नाही ‘.

” काय? दिपूची आई रडविली होत किंचाळली.

” सकाळपासून बँकेत होतो, स्टेट बँकेच्या अकाउंट वर त्यांच्या अकाउंटला फक्त 220 रुपये होते, म्हणून परत त्या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. तेव्हा तेथे मॅनेजर म्हणाले ” काळजी करू नका, आजच एक मोठा चेक पास होऊन गेला म्हणून पैसे कमी झाले. मी दोन वाजता पुन्हा पैसे भरतो. तुम्ही दोन नंतर तुमचा चेक पास करा. म्हणून न जेवता परत दोन पासून बँकेत उभा. अडीच वाजता चेक बँकेत दिला तर तो बँकेचा माणूस म्हणाला अहो या लोकांनी अनेकांना असे चेक दिलेत, सर्वांचे चेक परत गेलेत, यांच्या अकाउंटला काही रक्कम नाहीच आहे. त्यामुळे कुणाचे चेक पास झालेले नाहीत. ‘ मी परत या संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसला भले मोठे कुलूप. चार वाजेपर्यंत मी तेथे वाट पाहिली आणि शेवटी कंटाळून एसटी पकडली “.

दिपूच्या बाबांचे शब्द दिपूच्या आईच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिच्या लक्षात आले आपल्या डोळ्यासमोर अंधार येतोय. आता आपण निश्चित खाली पडणार हे तिला कळत होते. पण तिच्या मनाने उसळी घेतली. ” छे छे, मला खाली पडून चालणार नाही. आपला नवरा साधा आहे. तो हातपाय गळून बसेल. आपल्याला धडपड करायलाच हवी ‘. पटकन ती सावरली. खुर्चीला धरून उभी राहिली. आईला बरं वाटत नाही हे पाहून दिपू घरात धावला आणि पाणी घेऊन आला. त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास तिने तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायली. दिपूचे बाबा डोकं धरून बसले. शेवटचा प्रयत्न म्हणून ती दिपूला म्हणाली ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज म्हाई येणार आमच्याकडे,. एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘. दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटात दिपू धावत आला. ” आई वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही. ‘ तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते. एवढ्या माणसांचे जेवणखांन व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकर यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाही? ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी घोडे ठेवले होते, रोज दहा वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधन बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार म्हाईसाठी माल नाही म्हणतो?? “.

दिपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली ” दिपू चल माझ्याबरोबर. ‘

” कुठे आई?

” रघु सोनार किती पर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.

” सहा पर्यंत ‘.

” मग चल चप्पल घाल ‘.

तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली एवढ्याच संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजय कडे पहात म्हणाली ” काय हे संज्या?

” आईने पाठवले तुमच्याकडे, ‘. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दिपूची आई पहातच राहिली. टोपली तीन चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.

” अरे हे कोणासाठी संज्या? दिपूची आई आश्चर्याने ओरडली.

” तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे म्हाई येणार ना, मग हा दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ” संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला, आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस पंचवीस लोक असणार त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही ‘. माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली” संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले, आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि आणि तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं ‘.

दिपू ची आई रडत रडत खाली बसली. ” काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्याच रूपात आत्ताच भेटली. ‘. दिपू ची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. ” बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात ‘. संजाने आणि दिपू ने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.

आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापवून पुऱ्या करायला घेतल्या.

इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम.. ढम, ताशांचे आवाज ताड ताड ताड, शिंग वाजले पु… उ… पु…

म्हाई निघाली, म्हाई निघाली, भक्तांच्या भेटीला म्हाई निघाली. सगळ्या गावात उत्साह संचारला.

दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन अडीच तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी पूजा बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने अंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती दिसली. दिपू ही आंघोळ करून तयार झाला.

साडेअकरा वाजले आणि ढोल ताशे जवळ वाजायला लागले. ढम… ढम… ढम, ताड.. ताड… ताड… , शिंग वाजू लागले. दिपूच्या बाबांनी म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजार्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकर यांच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपू च्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी ” पुंडलिक वरदे ‘ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाण्याची बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले. आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली.

रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजय ची आई म्हाई सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर…

दिपू च्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एक सारखी आठवण येत होती.

सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयाची खीर आणि पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली. आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच अळीत शेवटचं घर संज्याच. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने सध्याच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली ” संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडाव लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारसमोर घराण्याची अब्रू जाणार होती. सज्यांच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली. संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई “.

” असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.

” कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत. आमची म्हाईत्यांना शिक्षा देत नाही. संज्यच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाय. ‘.

संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजय ची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे रडणे ऐकून तेथे आलेले संजय चे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.

समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

शांती भाजीवाली डोक्यावर भाजीची टोपली घेऊन आळीत घरोघरी फिरत होती. दिपूच्या आईचं घर येताच तिने टोपली जमिनीवर ठेवली आणि मोठ्याने हाळी दिली ” ओ दिपूच्या आई, भाजी घेणार काय? ‘

तिची हाळी ऐकून दिपूची आई पदराला हात पुसत बाहेर आली.

” घेणार का भाजी, कांदापात हाय, माठ हाय, मुळा हाय, कोबी हाय. “

शांतीला पाहतात दिपूच्या आईला आनंद झाला. तशी दोन दिवसाआड येणारी शांती ही त्यांची मैत्रीणच. दोघी एकमेकांसमोर आपलं मन मोकळ्या करायच्या.

” होतीस कुठे इतकं दिवस? लय दिसानं आलीस? ‘

” ताप येत होता दादल्याला, त्याला डागदर कडे नेत व्हते ‘.

आता बर हाय का?

” व्हय, घेणार का भाजी? ‘

” लाल माठ दे दोन जुड्या, “.

शांतीने माठाच्या दोन जुड्या दिपूच्या आईच्या हातात दिल्या.

” मग दिपूच्या आई, म्हाई येणार की आता लवकरच ‘. “म्हाई ‘ म्हटल्याबरोबर दिपूच्या आईचा चेहरा चिंताग्रस्त झाला.

“काय झालं, गप का रवला? शांतीने विचारले.

” काय सांगावं शांते, घर वाल्यांची नोकरी राहिली नाही, पैसे मिळाले होते फंडाचे ते त्या संस्थेत ठेवले होते नव्हे “. कुठल्या? ती

ती बुडाली त्या संस्थेत की काय?

” होय बाई, ‘

” लई लोकांचे बुडाले बघा, मग मग आता म्हणणं काय त्यांचं? ‘

” पैसे मिळणार, बुडायचे नाहीत म्हणत्यात, पण आता”म्हाई ‘ यायची झाली आणि खिशात पैसे नाहीत अशी परिस्थिती.

” होय बाई, आणि दिपू अजून लहन हाय.

” हो बाई, खूप दिवसांनी झालाय ना तो. ‘

” पण तुम्ही देवीचे मानकरी, म्हणजे तुम्हास्नी म्हाईचा लई खर्च असणार?

” होय बाई, आम्ही मानकरी देवीचे, म्हाई आमच्याच घरी येणार, सोबत वीस पंचवीस देवीचे भक्त पण असतात, एवढ्या मंडळीचे जेवण व्हायला पाहिजे. 50 60 लोकांचे चहापाणी, देवींची पूजा, ओटी भरणे हायचं. “

मग दिपूच्या बाबांनी काहीतरी व्यवस्था केलीच असेल?

” ते काय करतात, साखर कारखान्यातून रिटायर झालेत, त्यात त्यांचा पगार तो कितीचा होता, पेन्शन वगैरे काही नाही, काय फंड मिळाला तो त्या संस्थेत घातला, चार वर्षात डबल होणार म्हणून सांगितलं, ठेवून दोन वर्षे झाली, सहा लाखाचे बारा लाख होणार म्हणून ठेवले, पण आता संस्था बुडाली म्हणे “.

” अरे देवा, मग फुड काय व्हायचं ‘.

” बघूया ‘ असं म्हणून दिपूच्या आईने माठाच्या दोन जुड्या घरात नेल्या. शांतीला दहा रुपये दिले तशी शांती गेली.

दिपूच्या आईच्या लक्षात आलं, फेब्रुवारी महिना आला म्हणजे, या महिन्यात “म्हाई ‘ येणार, त्यात आपण देवीचे मानकरी, उत्पन्न काही नसलं तरी खर्च थांबत नाहीत. तिने डबे उघडले. तांदुळाच्या डब्यातले तांदूळ तळाला टेकले होते. पिठाच्या डब्यात जेमतेम चार दिवसापूर्वी पीठ शिल्लक होते. तेल जवळ जवळ संपले होते. वाटाणे हरभरे शेंगदाणे सर्व संपत आले होते. अजून पंधरा दिवस आहेत म्हाईला. अजून पंधरा दिवसाला खायला तर पाहिजे.

एका महिन्यापूर्वी तिच्या आईने धान्य पाठवलं होतं. जोंधळे, शेंगदाणे, तांदूळ गहू इत्यादी. आता परत तिच्याकडे कसे मागायचे? आता आईचे काही चालत नाही घरात. भावजई चा कारभार. आणि तेथे सुद्धा रयत फारसे देत नाहीत. आपला भाऊ तसा सतत आजारीच असतो. त्यांची परिस्थिती पण आता फारशी बरी नाही. त्यांच्याकडे परत मागायला नको. तिने नवऱ्याला हाक मारली “अहो, ऐकलंत का, घरातलं धान्य तसेच पीठ संपत आलंय. पाच-सहा दिवसा पुरते आहे. या महिन्यात”म्हाई ‘ येणार, तिच्या पालखीसोबत वीस-पंचवीस माणसे असतात. त्यांना दरवर्षी आपल्याला जेवण खान करावे लागतं. आणि 50 60 माणसांना चहा पाणी.

” मग मी तरी काय करू? सगळे पैसे त्या संस्थेच्या बोडक्यावर टाकलेत ना?

” पण मी म्हणत होते, असल्या संस्थेमध्ये पैसे ठेवू नका, ते पैसे घेतात आणि मग खाका वर करतात, “

” बघू, आबा म्हणत होता, रिझर्व बँक काहीतरी करेल.

” त्या आबावर विश्वास ठेवून पैसे ठेवलेत ना, मग मग आबाला सांगा आमचे पैसे दे म्हणून ‘.

” आबा काय देतो, त्याचा पोरगा त्या संस्थेत मॅनेजर होता म्हणून तो सर्वांना तेथे पैसे ठेवायला सांगायचा, आता सर्वजण त्याला विचारतात, तेव्हा तो रिझर्व बँकेकडे बोट दाखवतो “.

” म्हणजे पैसे मिळवले ह्या लबाडानी आणि पैसे कोण देणार म्हणे तर रिझर्व बँक. ते काही नाही, तुम्ही या पतसंस्थेच्या तालुक्याच्या ऑफिसात जाऊन खडसावून विचारा, म्हणावं आम्ही खावं काय? आमचे फंडाचे सर्व पैसे विश्वासाने तुमच्याकडे ठेवले, पैसे तुम्ही खाल्ले आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाने पुसलात “.

” जातो मी उद्या’. “

” चावाच आणि खडसावून विचारा, त्यांना सांगा पंधरा दिवसांनी आमच्याकडे “म्हाई ‘ येणार आहे, आम्हाला मोठा खर्च आहे, तोपर्यंत आम्हाला काहीतरी पैसे द्या ‘. शेवटी मानकरी ना तुम्ही देवीचे, उत्पन्न काही नसले तरी मानकरी, जमीन सगळी कुळांना गेली. पण मान फक्त तुम्हालाच. खर्च फक्त तुम्ही करायचे “.

दिपू च्या आईचा संताप संताप झाला. खरं तर ती आपल्या नवऱ्याला जास्त बोलायची नाही. कारण तिला माहीत होते आपला नवरा स्वभावाने गरीब आहे. त्यांचा जन्म झाला जमीनदाराच्या कुटुंबात पण चुलत भावांनी फसविले. घरातील दाग दागिने, सोने, रोख रक्कम घेऊन पळाले. मोठ्या शहरात जाऊन स्थायिक झाले. आता ढुंकूनही गावाकडे पाहत नाहीत. कुळांकडे असलेल्या जमिनी आपल्या नवऱ्याकडे आल्या. कुळ कायद्याने त्या जमिनी गेल्या. राहिले फक्त फुकटचे मोठेपण. हे जुने मातीचे पडणारे घर सोडून दुसरे काही नाही. आपल्या नवऱ्याचे शिक्षण फारसे झाले नाही. या जमीनदार कुटुंबाकडे पाहून आपल्या वडिलांनी आपल्याला या घरात दिले. त्यावेळी घर गजबजलेले होते. येणे जाणे होते. कुळाकडून वसुली करण्यासाठी घोडे ठेवले होते. स्त्रियांसाठी मेणे होते. सर्व गेले. राहिली फक्त भोके. उत्पन्न काही नाही.

नशीब त्यावेळी खासदार जयवंतराव नवीन साखर कारखाना काढत होते. आम्ही या गावचे मानकरी म्हणून देवीला नमस्कार करून सरळ ते आमच्या घरी आले. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. आमच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नाही हे त्यांना सांगितले. त्यांनी नवऱ्याला कारखान्यात नोकरी देण्याचा शब्द दिला. दोन वर्षांनी कारखाना उभा राहिला तेव्हा जयवंतरावांना मी परत भेटले. त्यांनी आपल्या नवऱ्याला नोकरीला ठेवले. पण शिक्षण जास्त नसल्याने उसाच्या वजन काट्यावर वजन नोंदवून ठेवण्याचे काम दिले. थोडाफार पगार घरात येऊ लागला आणि संसार टुकूटुकू का होईना चालू झाला.

बारा वर्षांपूर्वी दिपू चा जन्म झाला, दोनाची तीन माणसे झाली. पण दोन वर्षांपूर्वी आपला नवरा निवृत्त झाला आणि पगार थांबला. दिपू शाळेत. उत्पन्न काही नाही. फंडाची रक्कम आली ती गावातल्या आबांना कळली. त्यांच्या रोज सायंकाळी फेऱ्या वाढू लागल्या. चार वर्षात डबल पैसे होतील, तुझ्या दिपूच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे येतील अशी आश्वासने देऊ लागले. आम्हाला ते खरेच वाटले, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आता हा पश्चाताप झाला. नवऱ्याने पतसंस्थेचे सर्टिफिकेट दाखवली तेव्हा आपण पण खुश झालो. आपले शिक्षण पर फारसे नाही. बाहेरच्या लबाड जगाची एवढी कल्पना नव्हती. पैसे डबल झाले म्हणजे दिपूला शिकवायचं, मग घर बांधायचं, मग दिपूला नोकरी मिळेल, मग दिपू च लग्न…

पतसंस्था अडचणीत आल्याचे कळले, लोकांचे पैसे मिळत नाहीत याची कल्पना आली आणि पायाखालची वाळू सरकली. मग संस्थेत आपल्या नवऱ्याच्या रोज खेपा सुरू झाल्या. आपल्यासारखे शेकडो लोक रोज संस्थेत येत होते. मॅनेजरला भंडावून सोडत होते. मॅनेजर हाता

पाया पडून पुढची आश्वासने देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने तालुक्याच्या गावी गेले. त्या संस्थेच्या मुख्य ऑफिसमध्ये जाऊन साहेबांना भेटले.

” साहेब मी गरीब माणूस. कारखान्यातून मिळालेली सर्व फंडाची रक्कम तुमच्या संस्थेत ठेवली. आम्हाला पेन्शन वगैरे काही नाही. आमच्या पैशांचे काय? पंधरा दिवसांवर आमच्या गावातली “म्हाई ‘ आली. आम्ही देवीचे मानकरी. आम्हाला दरवर्षी मोठा खर्च असतो. तातडीने काहीतरी पैशाची व्यवस्था करा.

” अहो काका, इथे रोज शेकडो माणसे येऊन गर्दी करतात. सर्वांचेच पैसे अडकले. अडकले याचा अर्थ बुडाले असे नव्हे. पैसे मिळणार पण ते केव्हा ते मी सांगू शकत नाही. रिझर्व बँकेने तात्पुरते निर्बंध घातलेत. आपले चेअरमन जाऊन दिल्लीला अर्थमंत्र्यांना भेटलेत. सर्व व्यवस्थित होणार काळजी करू नका ‘.

” पण साहेब पंधरा दिवसावर आमची म्हाई आली. खर्चाला आमच्याकडे पैसे नाहीत ‘.

” हो का केव्हा आहे तुमची म्हाई? ‘

” या महिन्याच्या 22 तारखेला साहेब ‘. 22 तारखेला ठीक आहे, मी 22 तारीख ची तुमची व्यवस्था करतो. तुम्हाला 22 तारीख चा स्टेट बँकेचा चेक देतो. त्यादिवशी येऊन बँकेतून पैसे घेऊन जा ‘. साहेब यांनी 50 हजाराचा चेक लिहून दिला. खाली आपली जोरदार सही केली. दिपूचे बाबा खुश झाले. दुपारच्या एसटीने गावी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी दिपूच्या आईला पन्नास हजाराचा चेक दाखवला. ती पण खुश झाली. आता निर्धास्तपणे 22 तारखेच्या म्हाई ची तयारी सुरु केली.

गावात सगळीकडे लगबग सुरू होती. देवीच्या देवळात झाडलोट केली गेली. देवळाला नवीन रंग दिला. देवीची पालखी तसेच भांडीकुंडी सर्व काही झकपक झाले. गावातील प्रत्येक घराघरात म्हाईची तयारी सुरू झाली. घरांची साफसफाई झाडलोट सुरू होती.

दिपूच्या घरी दिपूच्या आईने घर वर पासून खालपर्यंत झाडलं. प्रत्येक भांड धुतलं. घरातली अंथरूण पांघरून पुन्हा टाकली. घराकडे येणाऱ्या पानंदी स्वच्छ केल्या.

नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले लोक आपल्या गावात यायला लागले. वर्षभर बंद असलेली घर उघडून साफसूफ करायला लागले. गावाला जाग आली. अनेक चाकरमानी गावात दिसायला लागले.

दिपूचे बाबा परत परत तो 50000 चेक पाहत होते. त्या खालची ती झोकदार सही पाहत होते. 22 तारखेला सकाळी आठच्या गाडीने दिपूचे बाबा तालुक्याच्या गावी गेले. दिपूच्या घरची तशी सर्व तयारी झाली होती. फक्त घरात धान्य सामान आणि साखर वगैरे नव्हते. पैसे आले की ताबडतोब वासूच्या दुकानातून सर्व सामान आणण्याची तयारी दिपूच्या आईने केली. सामान घरात आले की ताबडतोब जेवण करायला सुरुवात करायची. दिपूच्या आईने दिपूला कागद पेन घेऊन लिहायला सांगितले. दिपूच्या आईने यादी करायला घेतली

तांदूळ पाच किलो, गव्हाचे पीठ पाच किलो, साखर पाच किलो, वाटाणे दोन किलो, बटाटे दोन किलो, कांदे दोन किलो, गोडेतेल दोन लिटर, शेवया दोन पॅकेट, वेलची 100 ग्रॅम, गूळ दोन किलो.

दिपूच्या आईने दोन चुली तयार केल्या. चुली सारवून ठेवल्या. टिपूला मदतीला घेऊन परसातील लाकडे जमवून ठेवली. अगदी आगपेटी पण तयार ठेवली. आता पैसे आले की दुकानातून सामान आणायचे आणि रात्र 11 पर्यंत स्वयंपाक पुरा करायचा, एवढेच बाकी होते.

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका स्त्रीचा अपूर्ण श्वास… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ एका स्त्रीचा अपूर्ण श्वास… ☆ सौ.प्रभा हर्षे

रात्रीचे अकरा वाजले होते. संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं.

फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छन-छन आवाज त्या शांततेला भेदत होता.

टेबलवर अर्धवट जेवलेले ताट ठेवलेलं होतं… भाजी थंड झाली होती, पोळी कडक झालेली,

आणि अनाया त्या ताटाकडे बघत होती.

तिच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त थकवा आणि ओलसरपणा होता.

दाराच्या पलीकडून कुणीतरी डोकावलं, पण तिला पाहणारा कोणीच नव्हता.

पहाटे पाच वाजता घरातील सगळे अजूनही निजलेले, आणि अनाया झाडू हातात घेऊन स्वयंपाकघरात कामाला लागलेली.

– – गॅसवर दूध ठेवलेलं, सासूबाईंसाठी चहा तयार होत होता, मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले होते,

आणि नवरा रोहनचा शर्ट प्रेस होत होता.

“इतका उशीर का झाला? माझा चहा थंड झाला! ”.. सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावर पडला.

अनाया काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून तिने पुन्हा चहा बनवला – जणू तिने आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं.

रोहन ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला, “कपडे नीट ठेव, मीटिंग आहे, उशीर होतोय मला. ”

ना “निघतो” म्हटला, ना “काळजी घे. ”

– – फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि निघून गेला.

दुपारपर्यंत घर चमकत होतं,… पण ती स्वतः मात्र फिकी दिसत होती.

.. सासूबाई त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या,

.. सासरे टीव्हीवर बातम्या पाहत होते,

.. मुलं शाळेत होती..

.. आणि ती भिंतीला टेकून बसली होती.

– – तिच्या बोटांपर्यंत थकवा पोहोचला होता, तरीही ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती.

जेव्हा ती स्वतः जेवायला बसली, तेव्हा भाजी थंड, पोळी कडक झाली होती.

तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. शेजारच्या माधवीताई आल्या… 

“अगं अनाया, तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असतेस! थोडा वेळ स्वतःसाठीही काढ ना! ”

अनाया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली – (ते हसू तोंडावर होतं, मनात नव्हतं)

“वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडी घेऊनच आला आहे, ताई. ”

सायंकाळी मुलं परत आली.

त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयार होता.

रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी बोलत हसत होता.

“आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का? ” अनायाने हळूच विचारलं.

तो म्हणाला, “हो, थकलोय, ” आणि थेट टीव्हीसमोर बसला.

– – अनाया काही बोलू पाहत होती…

“मीसुद्धा थकलेय, रोहन…”

पण तिचे ओठ बंद झाले. कारण तिला ठाऊक होतं, या घरात तिला थकण्याचा हक्क नव्हता.

रात्र गडद झाली. मुलं झोपली, सासू-सासरे त्यांच्या खोलीत गेले.

अनाया अजूनही स्वयंपाकघरातच होती – गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती.

– – अचानक तिचं डोकं गरगरलं, तिने भिंतीचा आधार घेतला. डोळे मिटले,.. आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही.

रात्री दोनच्या सुमारास रोहन जागा झाला. स्वयंपाकघराची लाईट लागलेलीच होती.

तो चिडला, “ही अजून काय करतेय? ”

तो तिथं गेला.. अनाया खुर्चीवर बसलेली,.. डोकं खाली, पूर्ण शांत.

“अगं अनाया, झोपलीस का? ” – – कुठलाही प्रतिसाद नाही.

त्याने खांदा हलवला – शरीर गार झालं होतं.

त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो किंचाळला – “आई! आई! ”

सगळं घर धावत आलं. डॉक्टर आले.. पण उशीर झाला होता – – 

डॉक्टर म्हणाले,

“शरीर पूर्ण थकलं होतं… कदाचित अनेक दिवस तापात होती, पण विश्रांती घेतली नाही. ”

रोहनच्या कानात जणू कुणीतरी हातोडा मारला.

तो पुटपुटला –

“पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे. ”

डॉक्टर शांतपणे म्हणाले –

“सांगण्यासाठी ऐकणारा तरी हवा ना. ”

सकाळ झाली.

सूर्य उगवला, पण त्या घरात काळोख होता.

स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं… थंड आणि निःशब्द.

सासूबाई चहा बनवत रडत होत्या,

“कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती. ”

मुलांनी विचारलं, “आई कुठे आहे? ”

रोहन काहीच बोलू शकला नाही.

काही दिवस गेले.

घर चालू होतं, पण जीवन थांबलं होतं.

एका संध्याकाळी रोहनला कपाटात एक डायरी सापडली – वर लिहिलं होतं, “माझं मौन”.

पहिलंच पान उघडलं, आणि डोळ्यातून अश्रू ओघळले –

“आज ताप आहे, पण काम तर करायचंच आहे मला. मी थांबले तर हे घर थांबेल. कुणी विचारेल का की मी ठीक आहे का? बहुतेक नाही… मी आता एक मशीन झालेय, जी सकाळी सुरू होते आणि रात्री बंद होते. ”

“मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन, आणि कुणाला कळणारही नाही. कदाचित तेव्हा लक्षात येईल — 

– – घर भिंतींनी नाही… एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं. ”

शेवटच्या ओळीवर रोहन थांबला – “जर माझ्या जागी कधी दुसरी कुणी आली, तर तिला एवढंच विचार…

“थकलीस का? “… हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात. ”

रोहनचे हात थरथरू लागले.

… त्याचे डोळे पाण्याने भरले. पहिल्यांदा तो खऱ्या अर्थाने रडला.

त्या दिवसानंतर त्याने स्वयंपाकघरातले ते ताट जपून ठेवले… 

आठवण म्हणून की…

स्त्रीची मेहनत कधीच हलकी नसते – – जरी तिचा आवाज कुणाला ऐकू येत नसला तरीही.

प्रत्येक घरात एक “अनाया” असते… जी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःला विसरते.

ती बोलत नाही, पण तिचे हात, तिचे डोळे, आणि तिचा थकवा रोज ओरडतो.

… कधी तिच्या शेजारी बसून फक्त एवढंच विचारा –

“थकलीस का? ”

… कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – २ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

(पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…) –

इथून पुढे —-

ताकातला पालक, ताकातलं चाकवत किंवा अळूचं फदफदं… गरम गरम आंबेमोहर किंवा इंद्रायणीचा मऊसर भात, त्यावर भरपूर लोणकढं तूप… तो भात पाचही बोटांनी शिते मोडेपर्यंत कालवावा आणि एकेक घास करून त्यावर ही पातळ भाजी ओतून तो घास पुन्हा कालवावा नि पाच बोटांनी तोंडात घालावा. जिव्हा आणि आत्मा असा काही तृप्त होतो की जगणं जगणं रहात नाही.. त्याचं गाणं होऊन जातं!

बटाट्याची बातच और… वरून नशीब घेऊन आलेला… त्याचं काहीही केलं तरी सोनच व्हावं असा!

उगाच नाही राहुल गांधी बटाट्याचं सोनं बनवणारं मशीन करणार होता!

तर अशा या भाज्या… किती नावं घ्यावीत त्यांची नि किती वर्णन करावं त्यांचं?

रोजच्या जेवणात वैविध्य निर्माण करणा-या या भाज्या ” कोणती भाजी करावी? ” या रोजच्या प्रश्नचिन्हानं गृहिणींना सतावणा-या नि “अमुक भाजी करावी तर सुधानेच बरं का… ” असं प्रशस्तीपत्रक बहाल करणा-या… म्हणूनच भाजी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय..

आज विविध अॅपद्वारे घरापर्यंत भाजी येते नि फ्रीजमधे ती आठवडाभर साठवलीही जाते.

पण माझ्या बालपणी ना ऐप होते ना फ्रीज… गृहिणींना रोजची भाजी रोज आणावी लागे… टी. व्ही. , इंटरनेट, मोबाईल नसण्याच्या त्या काळात रोज संध्याकाळी बाजारात जाऊन भाजी आणणे, हा एक विरंगुळा होता… रोजची वेगळी भाजी हा जसा खाद्यजीवनातील विरंगुळा तसा भाजी आणायला जाणे हा रोजच्या जीवनातला!!

माझी आईही याला अपवाद नव्हती… चेहरा धुवून, छान साडी नेसून आई पावडर, कुंकु लावायची. कानातलं घालायची… आधीच गोरीपान, निळ्या डोळ्यांची अशी छान दिसणारी माझी आई अजूनच सुरेख दिसायची. आठ-नऊ वर्षांची मी तिचं बोट पकडून तिच्या बरोबर भाजीला जायचे. वाटेत ओळखीच्या बायका भेटायच्या. त्यांच्याबरोबरच्या गप्पा व्हायच्या. मग भाजी खरेदी व्हायची.

भेंडी, दुधी, मुळा, काकडी यांना नख लावून त्यांचं कोवळेपण पारखणे, गोल, पातळ पानांची मेथी कडू नसते, वांगी किडलेली नाही नं ते पाहून कशी घ्यायची.. अशा अनेक गोष्टी मी कोणीही न शिकवता केवळ पाहून शिकले… विविधरंगी ताज्या भाज्यांतून घडणारा निसर्गाचा अविष्कार मला तेंव्हापासून आजतागायत आनंद देतोय..

“कमी पैशांत जास्तीत जास्त खरेदीचा आनंद भाज्या देतात. “. हे सत्य मला खूप लहानपणी समजलं. म्हणूनच कदाचित आजही मला इतर कोणत्याही खरेदीत रस वाटत नाही पण भाजी खरेदी मात्र मनापासून आवडते.

कधी कलिंगडासाठी तर उसाच्या रसासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण झाल्यावर मिळालेला जग जिंकण्याचा आनंद…!! परतीला आईच्या मैत्रिणीच्या घरी जाणं, तिथे प्यालेली कॉफी किंवा सरबत… किंवा त्यांच्या पायरीवर बसून मारलेल्या गप्पा… कधी कधी बाजारात जाताना घरच्या विवंचनेनी वैतागलेल्या आईची कळी परतताना मात्र खुललेली असे!!

गवारी, घेवडा किंवा पालेभाजी निवडणे हा घरातला एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. आई गच्चीत किंवा घराच्या पायरीवर बसून भाजी निवडे. मी, माझी थोरली बहीण घरी असलो तर तिला मदत करायचो. भाजी निवडताना आई तिच्या लहानपणीच्या सुखदु:खाच्या गोष्टी सांगायची.. तिच्या बरोबर तिच्या आठवणींच्या सहलीत आम्हीही सामील व्हायचो… मोठ्या होताना आम्ही भाजी निवडतानाच तिची सुखं दु:खं वाटून घेतली.. नि तिनेही आमची!! .. सुखात आम्ही तिघीही हसलो नि डोळ्यातल्या पाण्याबरोबर दु:खही साजरं केलं!! … कदाचित त्या भाजीने आमच्यातील बंध अजूनच घट्ट केले..

” आज भरलेली वांगी करा “, ” उद्या चाकवताची भाजी करणार नां? ” बाबा हक्काने सांगायचे नि आई आवडीने त्या भाज्या करायची..

कधीतरी आईबाबांचं काहीतरी बिनसलेलं असायचं.. काही दिवस सारं घर शांत असायचं.. दोघांत अबोला.. त्या तणावाने आम्ही मुलेही गप्प गप्प असायचो..

एक दिवस पानात बाबांची आवडती भरल्या वांग्याची भाजी आणि तोंडलीभात दिसायचा … बाबांचं आईकडे पाहून खुदकन् हसणं आमच्या चिमुकल्या नजरांनाही जाणवायचं… आईचा चेहराही प्रसन्न व्हायचा नि अमावस्येचं सावट सरून सारं घर चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात हसतं खेळतं व्हायचं!!

एकदा आमच्या कारखान्यातल्या पाठीमागच्या भल्यामोठ्या मोकळ्या जागेत भाजी लावायचं आईबाबांच्या डोक्यात आलं. रोज सकाळी बागकाम सुरू झालं.. गवा-या, दुधीभोपळे जोमाने आले.. घरी, दारी, काकांकडे रोज गवा-या नि दुधी जाऊ लागले..

सुरुवातीला सगळा आनंदीआनंद होता.. नंतर मात्र गवारी नि दुधीच्या रोजच्या वासाने जेवणावरची वासना उडू लागली..

 ” चार कानाखाली द्या पण गवारी, दुधी नको ” असे शेजारीपाजारीही म्हणू लागले नि आई बाबांच्या बागकामाच्या आवडीने निरोप घेतला..

भाजी पुराण तर झालं … पण माझी आवडीची भाजी मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं…

मला ” लाल माठाची ” भाजी भयंकर आवडायची.. मी वाटीभर भाजी नुसतीसुद्धा खायचे.. पोळी, भाकरीबरोबर अगदी गरमगरम तूप भातासोबतही मी लाल माठाची भाजी मिटक्या मारत खात असे..

एखादी रविवारची सकाळ असायची.. बाबा कारखान्यात गेलेले असायचे. भाऊ बहीण जादा तासाला किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे… मी खोलीत अभ्यास करत बसलेली.. आदले दिवशी गणिताच्या पेपरात बरेच कमी मार्क पडलेले.. आईने अभ्यास घेऊनही… आईने पाठीत घातलेले दोन धपाटे नि धरलेला अबोलाही… जगणंच फोल वाटायला लावणारा… दिवसभर नि रात्रीही डोळ्यातून न थांबणारं पाणी… आई नि माझ्यात पडलेलं हजारो मैलाचं भावनिक अंतर… नि आईचा आलेला हजारो टन राग…

आदले दिवशी रात्रीच्या जेवणावर टाकलेला बहिष्कार… त्यामुळे सकाळी पोटात उसळलेला भुकेचा डोंब..!! .. स्वयंपाकघरातून जाणवणारी आईची चाहूल… हळूच सवयंपाकघरात डोकावणं… आई विळीवर एक पाय वर घेऊन बसलेली… शेजारी स्टीलच्या चाळणीत धुतलेली लालबुंद माठाच्या भाजीची पाने… आईचं ती पाने मुठीत घेऊन विळीवर चिरणं.. चिरण्याचा येणारा चरचर आवाज… आईचे भाजीमुळे लालबुंद झालेले हात… गॅसवर ठेवलेला काळाभोर लोखंडी तवा… त्यात घातलेलं तेल नि पाठोपाठ घातलेला भरपूर लसूण… नि त्यावर घातलेली चिरलेली माठाची भाजी… चर्रर्र… आवाज नि पाठोपाठ उसळलेला स्वर्गीय सुगंध… एका बाजुला पोटातली जबरदस्त भूक नि दुसरीकडे आईवरचा राग..

“हिने मुद्दाम आज माझ्या आवडीची भाजी केलीय पण मी जेवणार नाही “… मनाशी केलेला निश्चय… आईचं खोलीत येणं नि हाताला धरून स्वयंपाकघरात ओढत नेणं! दुस-या तव्यावर टाकलेली भाकरी… आता ताटलीत टम्म फुगलेली गरमागरम भाकरी, त्यावर तूप नि कडेला मला भयानक आवडणारी लाल माठाची भाजी…

आई ताटली घेऊन माझ्याजवळ बसलेली… भाजी लावून भाकरीचा एक घास माझ्या तोंडाजवळ आईने नेलेला… मला भरवण्यासाठी..

” मला नको… मी नाही खाणार “

” असं रागावतात आईवर? आई चांगल्यासाठीच रागावते नं? आता पुढच्यावेळी जास्त अभ्यास करून छान मार्क मिळवायचे.. शहाणं माझं बाळ! आणि माझे हात पाहिले का कसे लाल झालेत.. आणि भाकरी पाहिली का.. माझ्या बांगडीची कशी नक्षी उमटलीय भाकरीवर!! “

आईचे भाजीमुळे रंगलेले हात नि भाकरीवरची तिच्या सोन्याच्या बांगडीची नक्षी पाहिली नि मला हसू आवरेना नि त्याचवेळी डोळे पाझरू लागले… आईला घट्ट मिठी मारली… आईची मऊ साडी ओलीकच्च झाली नि त्याचवेळी माझे केसही…!!

माठाने रंगलेल्या आईचे हात नि भाकरीवर उमटणारी तिच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी आम्हा भावंडांना प्रत्येक वेळी हसवायची… यावेळी मात्र त्यांनी आम्हा दोघी़ंना रडवलं!!

दिवस कसे पळत होते ते कळलच नाही…

एके दिवशी डोक्यावर अक्षता पडल्या नि सासरचा मार्ग धरला… माहेर मागे पडलं.. नव्या आयुष्यात जुन्या गोष्टी दिसेनाशा झाल्या… सासरी रोज स्वयंपाक करायचे पण सोलापुरात ” तांबडा माठ ” मिळत नाही ही गोष्ट लक्षातही आली नाही… प्राधान्यक्रम बदलले होते..

मिरजेला माहेरी गेल्यावर आई विचारायची, ” उद्या लाल माठाची भाजी करू कां गं? “

पण त्या तारुण्याच्या बहरात आईनं केलेल्या लाल माठाच्या भाजीपेक्षा हॉटेलातील लाल रंग घातलेल्या बटर पनीर मसाल्याकडे जीव ओढला जायचा… अशावेळी त्या माऊलीचं अंत:करण नक्कीच दुखावत असणार.. पण तिने ते चेह-यावर कधीच दाखवलं नाही!

काळ पुढे जातच होता… त्याने आईच्या स्वय़ंपाक करणा-या हातांचा वेग कमी केला… आता आई फक्त भाजी निवडण्याचं काम करू शकायची…

… आणि एके दिवशी काळाने तिला पुर्णपणेच थांबवलं… नि तिला अनंताच्या प्रवासाला तो घेऊन गेला…!!

मानवी मन मात्रं अनाकलनीय असतं..

त्याचे हिशोब, त्याचं वर्तन सारं गूढ प्रदेशातलं…!!

आई गेल्यानंतर तिच्या आठवणींनी पिंगा घालायला सुरूवात केली.. ती असताना जी लाल माठाची भाजी मनाच्या पडद्याआड गेली होती… तिची रोज आठवण येऊ लागली…

… म्हणूनच वहिनीकडे फक्त लाल माठाची मागणी केली… वहिनीने आणलेला लाल माठ पाहून जीव सुखाच्या गावातून फिरून आला…

भाऊ वहिनी दुसरे दिवशी सकाळीच परत गेले… त्याच दिवशी लाल माठाची भाजी नि भाकरीचा बेत आखला… स्वयंपाकाच्या मावशींनी मी सांगितल्याप्रमाणे भाजी नि भाकरी केल्या… भाजी चांगलीच लागत होती… भाकरी तर आईच्या भाकरींपेक्षा पातळ होत्या..

 

– – पण… भाजी-भाकरी घशात अडकत होती… कारण लेकराला आनंदाने जेवताना पहाणारी माझ्या माऊलीची ती स्निग्ध नजर आज नव्हती… लाल माठाच्या भाजीमुळे लाल लाल झालेले आईचे गोरेपान हात नव्हते… नि ते पाहून वेड्यासारखं हसत सुटणारी माझी बहीण माझ्यासोबत नव्हती..

… आणि मुख्य म्हणजे पांढ-याशुभ्र भाकरीवर आईच्या सोन्याच्या बांगड्यांची नक्षी उमटलेली नव्हती!

– समाप्त –

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.) — 

इथून पुढे – – – 

या मधल्या काळात आणखीही काही घटना घडल्या. माझे वडील गुजरातमध्ये फिरतीवर असताना त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. मी सावत्र आईला सोबत घेऊन सुरतला गेलो. औषध उपचारांसोबतच, त्यांच्या हिंडण्या फिरण्यावर काही निर्बंध आले. शिवाय आहाराचं पथ्यही सांभाळणं गरजेचं होतं. मग त्यांनी सुरतमध्ये घर घेऊन राहण्याचं ठरवलं आणि माझी सावत्र आईही तिथेच राहू लागली. त्यांना कंपनीनं गुजरातमध्येच कमी फिरतीचं काम देण्याचं मान्य केलं. मी काॅलेज आणि नोकरीमुळे डहाणूला परत आलो.

विजयराव गेल्यापासून मी माझ्या घरात.. हाॅलमध्ये झोपायचो. आता पूर्ण घरात मी एकटाच होतो. अभ्यास आणि नोकरी सांभाळून, जमेल तशी वासंतीला मदत करत होतो. तिचे पैसे आॅफिस कडून मिळण्यासाठी, पोलीस स्टेशनला, त्यांच्या हेड ऑफिसला, मंत्रालयात अशा अनेक ठिकाणी बऱ्याच फेऱ्या माराव्या लागल्या.

विजयरावांच्या फंडाचे पैसे मिळायलाही खूप

त्रास झाला. कारण नोकरीला लागताना विजयरावांनी जे फाॅर्म भरले त्यात आईच्या नावाचं नाॅमिनेशन होतं. कायदेशीर वारसाची कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वासंती आणि तिच्या सासूला ते पैसे विभागून मिळाले. काही रक्कम खर्चासाठी ठेवून बाकी देशपांडे सरांच्या सल्ल्यानुसार पोस्टाच्या योजनेत गुंतवले, जेणेकरून वासंतीला दरमहा एक ठराविक रक्कम हातात मिळेल.

माझ्या B. Com. फायनल परिक्षेचं वेळापत्रक आलं, तशी मी देशपांडे सरांकडून सुट्टी मागून घेतली. नेटाने अभ्यास करायला हवा होता. मला नाश्ता, जेवण देण्याची जबाबदारी वासंती निभावत होती. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला देत होतो. अधून मधून वासंतीच्या छोट्याला सांभाळत होतो. एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात B. Com. ची परीक्षा एकदाची पार पडली. आता जूनमध्ये ICWA ची फायनल होती… तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं.

मे च्या तिसर्‍या आठवड्यात वासंतीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी मुलाखतीला बोलावण्यात आलं. ठाण्याच्या हेडआॅफिसला त्यासाठी तिला घेऊन गेलो. मग परत एकदा तिच्या कागदपत्रांची पडताळणी म्हणून जावं लागलं. छोट्या लेकराला घेऊन सगळीकडे एकटीनं जाणं अवघडच होतं ना! तिला इतर कोणाचा आधार नसल्याने ती माझीच जबाबदारी झाली होती. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या सिव्हिल हाॅस्पिटलला बोलावण्यात आलं. आणि वासंतीवर अजून एक बाँम्बगोळा पडला. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. साडेतीन महिने उलटले होते. ही गोष्ट आधी तिच्या लक्षातच आली नव्हती. विजयरावांच्या निधनाने झालेल्या आघातामुळे, तिचं स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच राहिलं नव्हतं. त्यामुळे तिचे इतर वैद्यकीय अहवालदेखील चांगले नव्हते. लोह आणि इतर जीवनसत्त्वांची कमतरता, वजन आणि उंचीचं प्रमाण इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे लगेच नेमणूक होणं शक्य नव्हतं. आता हे सगळं कसं निभावायचं हा फार जटील प्रश्न झाला होता. वासंती खूप निराश झाली होती. तिला डहाणू मधल्या महिला डाॅक्टरकडे घेऊन गेलो. त्यांनी वासंतीला नियमित औषधे, तपासणी आणि आरामाची आवश्यकता असल्याचं सांगितलं.

तिच्या हातात येणाऱ्या मोजक्या पैशांमुळे महिन्याचा खर्च जेमतेम भागत होता. त्यामुळे घरकामाला नोकर ठेवणं परवडणारं नव्हतंच. औषधांचा खर्च करणं तर भागच होतं. गर्भपात करणंही अतिशय जोखमीचं आहे, असं सांगून डाॅक्टरांनी त्याला नकार दिला.

मला मिळणाऱ्या पगारात माझा खर्च कसाबसा भागत होता. जमेल तेवढी मदत मी वासंतीला करत होतो. तिच्या नाजूक तब्येतीमुळे काहीवेळा रात्रीदेखील मला तिच्यासोबत थांबावं लागत होतं. स्त्री-पुरूष नात्याला एकाच दृष्टीने बघणाऱ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये यावरूनही कुजबुज सुरू होती. मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्यांची तोंड कसं धरणार? आम्ही दोघेही यामुळे दुःखी होत होतो. या सर्व तणावपूर्ण वातावरणातच माझी ICWA ची अंतिम परीक्षा पार पडली.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात माझा B. Com. चा रिझल्ट लागला. मी फर्स्ट क्लासने पास झालो. तिसऱ्याच आठवड्यात मला जे. अँड एम. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणं आलं. मी नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज करत होतो. त्यापैकी ही खूप मोठी कंपनी होती. त्यांच्या भारतभर अनेक शाखा होत्याच शिवाय काही शाखा परदेशातही होत्या. त्यांनी अकाउंटंटच्या पदासाठी मुलाखतीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर मला नरिमन पाॅइंटच्या मुख्य आॅफिसात दोन तीन वेळा जावं लागलं… प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी इत्यादी साठी. या साऱ्यात एक महिना कुठे गेला ते कळलंच नाही. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ात मला कंपनीकडून नेमणुकीचं पत्र आलं. मला प्राथमिक प्रशिक्षणासाठी एक महिना दिल्लीला जावं लागणार होतं, त्यानंतर प्रत्यक्ष कार्यालयात नेमणूक होणार होती.

इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली. वासंतीची परिस्थिती नाजूक होती. तिला एकटीला असं सोडून दिल्लीला जाणं मला अवघड वाटत होतं. पण नोकरीची एवढी चांगली संधी गमावणंदेखील शक्य नव्हतं. अखेर देशपांडे सरांकडे घरकाम करणाऱ्या मावशींच्या ओळखीने एक बाई मिळाली. ती विनापाश विधवा वासंतीकडे राहून तिची काळजी घ्यायला तयार झाली.

या एक महिन्यात वासंतीच्या मुलानं तिला खूपच त्रास दिला. त्याला माझी सवय झाली होती. मी घरात न दिसल्याने तो सारखा रडारड, चिडचिड करून वासंतीच्या मागे लागत होता.

माझं ट्रेनिंग संपण्याच्या आदल्या दिवशीच माझी नेमणूक भोपाळच्या आॅफिसला झाल्याचं पत्र मला मिळालं. एक आॅक्टोबरला म्हणजे तीनच दिवसानंतर मला भोपाळच्या कार्यालयात हजर व्हायचं होतं. कंपनीतर्फे तिथे मला राहायला जागा मिळणार होती.

मी दिल्लीहून डहाणूला आलो. भोपाळला राहण्याच्या दृष्टीने काही सामानही न्यायचं होतं. मी भोपाळला जाणार या कल्पनेनं वासंती कासावीस झाली.

वासंतीला आणि मलाही एकमेकांची सवय झाली होती. त्यामुळे असं वेगळं राहणं दोघांनाही त्रासदायक वाटत होतं. दोघांनाही जीवाभावाचं असं कोणीच नव्हतं. वासंतीचा मुलगा तर मला एक क्षणही एकटं सोडत नव्हता. मलाही त्याचा लळा लागला होताच. मी त्या दोघांना माझ्यासोबत भोपाळला घेऊन जायचं ठरवलं. पुढील आयुष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तशी सूचना विवाह-निबंधक कार्यालयात दिली. मी माझ्या वडिलांनाही फोन करून कळवलं. पण त्यांना हे अजिबात आवडलं नाही आणि यापुढे आपला संबंध संपला, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला.

मी भोपाळला कामावर रूजू झालो. एक महिन्यानंतर नोंदणी पद्धतीने आमचं लग्न झालं. मग पुढच्या आठवड्यात सर्व सामान बांधून आम्ही भोपाळच्या घरात राहायला गेलो. वासंतीची काळजी घेणाऱ्या मावशी मात्र आमच्यासोबत आल्या. त्या मग आपल्या घरातल्याच झाल्या. त्यांचे उपकार आजन्म फिटणार नाहीत.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात वरदाचा जन्म झाला. वडील म्हणून तिच्या जन्म दाखल्यावर माझंच नाव लावायचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानंतर दोघांत भावंडांच्या नावात फरक असल्याने कोणतीही भावनिक आणि कायदेविषयक समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मोठ्या मुलाला, म्हणजे तुला, मी दत्तक घेण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. मनाने तर ते नातं आधीच स्वीकारलं होतं. त्यामुळे दत्तक विधानातील अट असली तरी या दत्तक प्रकाराचा उच्चार न करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि तशी कधी गरजही वाटली नाही.

सावत्रपणाचा कटू अनुभव मी घेतला होता, तो तुम्हां दोघां भावंडांच्या वाट्याला कधीही येऊ नये ही मनोमन इच्छा होती माझी!

तुझा आय. पी. एस. चा रिझल्ट लागला आणि वासंती पुन्हा भूतकाळात गेली. त्या सर्व दुःखद घटनांची मनात उजळणी झाली आणि त्या तणावामुळेच तिचा रक्तदाब एकदम कमी झाला आणि तिला अ‍ॅडमिट करायची वेळ आली.

विराजचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते आणि त्यानी श्रीधरला घट्ट मिठी मारली. या बाप-माणसाबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता अशा अनेक भावना त्याच्या मनात उचंबळून आल्या होत्या.

– समाप्त – 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यांचा तो छोटासा व्हरांडा व्यवस्थित बंद करून घेतलेला होता. तिथे त्यांनी एक सेटी ठेवलेली होती. वडिलांच्या परवानगीने मी रात्री तिथे अभ्यासाला बसू लागलो. माझ्या सावत्र आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतंच.) 

इथून पुढे – – 

अभ्यास करता करता मी काही वेळा तिथेच झोपून जायचो. त्यांचा छोटा मुलगा कधी रात्री रडत असला, झोपत नसला तर त्याला खेळवायचो. रोजच्या सहवासाने तोही माझ्याकडे छान राहायचा. त्यामुळे वासंतीला ही जरा मोकळीक मिळायची. दिवसभर ती घरकाम आणि त्या छोट्याला सांभाळताना थकून जायची. विजयची विधवा आई गावाकडे त्याच्या भावासोबत राहायची. क्वचित कधीतरी ४-५ दिवस विजयकडे राहायला यायची. विजय आणि वासंतीला प्रेमविवाह दोन्हीकडच्या घरी मान्य नव्हता. त्यामुळे जवळचे नातेवाईकांचं येणं-जाणं असं नव्हतं च! विजयची पोलीस खात्यात नेमणूक झाली, तेव्हा वासंती सिनियर काॅलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. (एफ. वाय. बी. ए.). घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे जमवण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून मग वासंतीला अठरा वर्षे पूर्ण होताच या दोघांनी गुपचूप रजिस्टर लग्न केलं. एक वर्षानंतर मुलाचा जन्म झाला. त्यामुळे वासंतीचं शिक्षण अर्धवटच राहिलं.

नियमित अभ्यास केल्यामुळे मला बारावीत अठ्ठ्याहत्तर टक्के गुण मिळाले. मी बी. काॅम. बरोबरच ICWA ला पण अ‍ॅडमिशन घेतली. डहाणूतील अरविंद देशपांडे यांच्या सी. ए. फर्ममध्ये मी नोकरी पण मिळवली. ते बाबांच्या परिचयाचे होते, त्यामुळे मला अभ्यास, परिक्षा सांभाळून, आॅफिसचं काम करायला सवलत द्यायचे.

इकडे विजयरावही खूप धडाडीने काम करत होते. आजूबाजूच्या परिसरातील गुंडांना त्यांनी चांगलाच चाप लावला होता. एकदा त्यांच्या बदलीची आॅर्डर आली, तरी लोकांनी ती रद्द करायला लावली. त्याऐवजी मग फक्त त्यांची डहाणू तालुक्यातल्या दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. एकंदरीत सगळं सुरळीत चालू होतं.

फेब्रुवारीचा महिना होता. माझी फायनल इयरची परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे मी पण जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवत होतो. खाण्या-पिण्याची देखील शुद्ध नसायची. वासंती जबरदस्तीने मला कधी चहा-नाश्ता तर कधी जेवण घ्यायला लावायची. माझ्या सावत्र आईला माझं काही सोयर-सुतक नव्हतंच. वडील बाहेर दौऱ्यावर असतील तेव्हा ती आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून मजा करत असायची नाहीतर त्यांच्यासमवेत बाहेर भटकत असायची.

त्या दिवशी देखील मी रात्री उशिरापर्यंत वाचत बसलो होतो. आणि रात्री एक वाजता अचानक कोणीतरी दार ठोठावलं. मी भांबावून गेलो. तेवढ्यात तोआवाज ऐकून बाजूच्या घरातून माझे वडील बाहेर आले. ते नेमके त्या दिवशी घरी होते. मग मीदेखील दार उघडून बाहेर डोकावलो. एव्हाना वासंती देखील जागी होऊन व्हरांड्यात आली होती.

एक पोलीस वडिलांना हळूहळू काहीतरी सांगत होता. ते दोघेही गंभीरपणे वारंवार विजयच्या घराकडे बघत होते.

मी दार उघडलेलं पाहून वडील आणि तो पोलीस तिकडे आले. वडील मग वासंतीला म्हणाले की, विजयरावांना अपघात झाला आहे आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. तुमच्या घरच्या कोणाचा फोन नंबर असेल तर द्या. हे ऐकून वासंतीला एकदम भोवळच आली. बाळ झोपलेलं होतं. मी पटकन पाणी आणलं आणि वासंतीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. तोवर माझी आईदेखील तिथे येऊन वासंती जवळ बसली. वडिलांनी शेजारच्या वाड्यातल्या कोणाला तरी डाॅक्टरला बोलवायला पाठवले.

मला एकदम आठवलं की विजयरावांची डायरी घरात टेबलच्या ड्राॅवरमध्ये असते. मी डायरी चाळून बघितली, शेवटच्या पानावर त्यांच्या भावाचं नाव आणि एक फोननंबर लिहिलेला होता. तो मी वडिलांना दाखवला.

वडील मग त्या पोलीसासोबत हाॅस्पिटलमध्ये गेले. सारं काही संपलं होतं. विजयरावांचा बाईकला ट्रकची धडक बसल्याने, ते जागेवरच गेले होते. वासंतीला हे कसं सांगायचं हा मोठाच प्रश्न होता.

मी दिलेल्या नंबर वर फोन करून विजयच्या भावाला निरोप दिला गेला. तो फोननंबर गावातल्या – पोलीस स्टेशनचा होता. तेव्हा घरोघरी फोन आलेले नव्हते. मग तिथल्या पोलिसांच्या मदतीने एक जीप मिळवून विजयची आई, भाऊ-भावजय आणि काही गाववाले पहाटे डहाणूला पोचले. वासंतीची आई, भाऊ-वहिनी देखील सकाळी येऊन पोचले.

आल्या आल्या विजयच्या आईने हंबरडा फोडला आणि वासंतीच्या नावाने शिमगा मांडला. हिच्यामुळे माझा मुलगा गेला. तिनंच त्याला माझ्यापासून तोडलं आणि आता कायमचा दूर गेला. त्या तश्या प्रसंगीदेखील या दोन परिवारात तूतू मैमै सुरू होती. या सर्व हल्ल्यामुळे, डाॅक्टरांनी इंजेक्शन दिल्याने जरा शुद्धीवर येत असलेल्या वासंतीची दातखिळीच बसली. डाॅक्टर तिथेच थांबले होते म्हणून बरं! त्यांनी लगेच उपचार केले आणि नंतर मात्र तिला शांत झोपवून ठेवण्यासाठी एक गोळी देऊन गेले.

या प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे मलाही समजत नव्हतं. विजयच्या घरच्यांनी बाकीचे सगळे सोपस्कार पार पाडले. मी फक्त त्या छोट्याला सांभाळत होतो. कारण माझी सवय असल्याने तो फक्त माझ्याकडेच शांत राहात होता. आपल्या आईला काहीतरी झालंय एवढंच त्या छोट्या जीवाला कळत होतं.

विजयरावांचा अंत्यसंस्कार आटोपल्यावर वासंतीच्या माहेरचे लोक निघून गेले. लोकलाजेस्तव फक्त सासू आणि दीर-जाऊ तेवढी राहिली होती. दिवसकार्य आटोपल्यावर तेही निघून गेले. जाताना दीर अंत्यसंस्कारासाठी आणि दिवसकार्यासाठी खर्च केलेले पैसे मागून घ्यायला विसरला नाही. त्या दहा दिवसांतही सासूच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू होता, वासंतीला शिव्या घालण्यासाठी! आधी प्रेम नव्हतेच, पण आता विजय गेल्यावर त्याच्या बायको-मुलाशी तर त्यांना काहीच संपर्कही ठेवायचा नव्हता, मग जबाबदारी घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

एवढ्या भयंकर आघाताने वासंती पार कोलमडून गेली होती. शेजारधर्म म्हणून माझी सावत्र आई मात्र तिला दोन घास जबरदस्तीने खायला घालत होती. वासंतीची अवस्था फारच वाईट झाली होती. आपल्या मुलाला कवटाळून ती वारंवार हंबरडा फोडून रडायची आणि तिची शुद्ध हरपायची. मला अभ्यास सुचणं शक्यच नव्हतं. मी त्या छोट्याला घेऊन आत-बाहेर करत राहायचो आणि त्याला भात-खिचडी असं खाऊ घालायचो.

साधारण महिनाभरानंतर वासंती थोडीशी सावरली. आपल्या मुलाला आपणच जेवू-खाऊ घातलं पाहिजे, याची तिला जाणीव झाली. मग ती काहीतरी अन्न रोज शिजवू लागली. पोलीसस्टेशनमधून एक हवालदार काही कागदपत्रं देऊन गेले होते. नोकरीत कामावर असताना विजयरावांचा मृत्यू झाल्यामुळे नियमानुसार जे काही पैसे त्यांच्या कुटुंबाला मिळायला हवे, त्यासाठीचे अर्ज त्यात होते. शिवाय अनुकंपा तत्त्वावर वासंतीला पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठीचा अर्जही त्यात होता.

मरणारा तर निघून जातो, पण मागे राहिलेल्याला जगण्यासाठी सर्व धडपड करावीच लागते. पैशाचं सोंग तर आणता येत नाहीना! वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.

– क्रमशः भाग दुसरा 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

विराज त्याच्या सर्टिफिकेटसची फाईल घ्यायला घरी आला होता. ती त्याला स्कॅन करून मेलनी

नाशिकच्या ऑफिसला लगेच पाठवायची होती.

आजपर्यंत कधी त्याला स्वतःला फाईल कढून घ्यायला लागली नव्हती. काही हवं असलं तर बाबाच काढून द्यायचे त्यांच्या खणातून.

पण यावेळी बाबा घरी नव्हते, मग काय करणार?

त्याचं असं झालं की विराज यू. पी. एस. सी. ची परीक्षा पास झाला होता. चार दिवसांपूर्वी त्याचा रिझल्ट लागला आणि नेमकी त्याच दिवशी त्याच्या आईची तब्येत बिघडली. तिचं ब्लडप्रेशर एकदम खाली आलं आणि चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. शेजारच्या काकूंनी ऑफिसमध्ये फोन करून बाबांना बोलावून घेतलं. ते तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण त्यांनी आईला इस्पितळात दाखल करून घेतलं. त्यामुळे बाबा

सुट्टी घेऊन तिच्याजवळ थांबत होते. विराजही येऊन -जाऊन चौकशी करत होताच. पण त्याला दोन दिवसांनी नाशिकला इंटरव्ह्यूला जायचं होतं, आय. पी. एस. च्या पोस्टसाठी. त्या तयारीच्या गडबडीत असल्याने त्याला जास्त वेळ आईजवळ थांबता येत नव्हतं आणि बाबांनीही त्याला ती मोकळीक दिली होती.

त्याची धाकटी बहीण वरदा बी. काॅम. च्या शेवटच्या वर्षाला होती. तिची परीक्षा चालू होती. त्यामुळे ती देखील

आईजवळ जास्त वेळ थांबू शकत नव्हती. ती क्लास, अभ्यास आणि परीक्षा यातच गुंतलेली होती.

बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खणात फाईल मिळाली. विराज त्याला पाठवायला लागणारी सगळी सर्टिफिकेट आहेत ना हे तपासून बघत होता. पण त्याला त्याचा शाळा सोडल्याचा दाखला त्यात दिसत नव्हता. मग तो खणात खाली पडलाआहे का म्हणून शोधू लागला. तेव्हा खणात सर्वात खाली एक फाईल दिसली ती पण त्याने उघडली आणि त्यातील कागदपत्रे पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याचं डोकं गरगरायला लागलं. तो डोकं धरून खाली बसला. तेवढ्यात…

तेवढ्यात लॅच उघडल्याचा आवाज आला. त्याचे बाबा

आले होते. विराज, मिळाली ना सगळी कागदपत्रं? असं विचारत ते बेडरूममध्ये आले. विराज चटकन सावरून बसला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही आत्ता कसे काय घरी आलात? ‘अरे, सी विंग मधल्या जोशी काकू आईला भेटायला आल्या होत्या, त्या म्हणाल्या मी संध्याकाळपर्यंत थांबण्याच्या तयारीने आलेय. तुम्हाला हवं तर घरी जाऊन या. म्हणून मी आलो, म्हटलं तुला कागदपत्रं व्यवस्थित लावायला आणि इतरही काही काम असलं तर मदत होईल. मी चहा करणार आहे, तू घेणार आहेस का?

विराजनी त्यांना होकार दिला. एक तर डोकं गरगरत असल्याने ते जागेवर आणायला त्याला चहाची गरज होतीच. शिवाय या विषयावर बाबांशी बोलायला,

शब्दांची जुळवा-जुळव करायला त्याला थोडा वेळ मिळाला असता. असं काय बरं होतं त्या फाईल मध्ये?

बाबांनी चहा केला आणि दोन्ही कप घेऊन ते विराजकडे आले. चहा पिताना विराज विचारमग्न झाला होता. त्याला इंटरव्ह्यूचं टेंशन आलंय असं बाबांना वाटलं. त्यांनी चहा पिऊन कप बाजूला टिपाॅयवर ठेवला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, काय झालं रे बेटा?

विराजच्या डोळे भरून आले, त्याने ती फाईल बाबांकडे देत विचारलं, हे काय आहे बाबा?

त्या फाईलमध्ये एक ॲफिडेविट होतं आणि विराजचा जन्म दाखला. जन्म तारीख आणि आईचं नाव.. वासंती तेही बरोबर होतं. पण वडिलांचं नाव विजय पवार? त्याच्या बाबांचं नाव तर श्रीधर अभ्यंकर होतं. त्या ॲफिडेविटमध्ये श्रीधर अभ्यंकर यांनी विराजला दत्तक घेतल्याचं म्हटलं होतं. आईचे नाव पूर्वाश्रमीच्या वासंती पवार आणि आताची वासंती श्रीधर अभ्यंकर, असा उल्लेख होता. विराजला आजवर यातलं काहीच माहीत नव्हतं.

बाबा जरासे गंभीर झाले. ‘बाळा, तुला हे कधीच कळू नये अशीच तुझ्या आईची आणि माझी इच्छा होती. पण हरकत नाही. आता तू मोठा आहेस, तुला मी सारं काही थोडक्यात सांगतो. जा, आधी तोंड धुवून जरा फ्रेश होऊन ये आणि तुझी फाईल व्यवस्थित ठेव. हे बघ, शाळा सोडल्याचा दाखला पण आहे तुझ्या याच फाईलमध्ये, दहावीच्या मार्कलिस्टच्या खाली!

विराज परत आला आणि बाबा सांगू लागले.

माझा जन्म डहाणूचा. माझे बाबा एका औषध कंपनीत मार्केटिंग ऑफिसर होते. त्यांना कामानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नेहमी फिरावं लागे. माझी आई गृहिणी होती. मला भावंडं नव्हतं. शाळेत पहिल्या तीनात माझा नंबर असायचा आणि मार्क ऐंशी टक्क्यांहून अधिक. आमचं घर मोठं पाच खोल्यांचं होतं. मला अभ्यासाला स्वतंत्र खोली होती. पण मी सातवीत असताना माझ्या आईला न्यूमोनिया झाला आणि त्यातच ती देवाघरी गेली. मी सैरभैर झालो. माझं अभ्यासात लक्ष लागेना. त्यावर्षी जेमतेम पास झालो. आईचे बाबा संधिवाताने अंथरूणाला खिळलेले, त्यामुळे आजीला त्यांच्यासोबत मनमाडला राहणं आवश्यक होतं. एकुलत्या एक लेकीच्या अकाली मृत्यूने ती दोघं आणखीनच खचली होती. बाबांचे आई-वडील कोकणात एका खेड्यात राहातं होते. तिथली नारळ -सुपारीची बाग आणि घर सोडून, कायमचं डहाणूला येणं त्यांना शक्य नव्हतं. तरीही तीन -चार महिने ते माझ्यासाठी येऊन राहिले.

सहा महिन्यानंतर मात्र त्यांनी बाबांनी दुसरं लग्न करावं, असा धोशा लावला. आईच्या वर्षश्राद्धानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं आणि माझ्या नशिबी सावत्र आईचा जाच आला. तिला स्वैपाक, घरकाम यात बिलकुल रूची नव्हती. ती स्वतःपुरतं काहीतरी बनवून खायची. बाबा फिरतीवर असायचे आणि अनेकदा मला उपाशीपोटी झोपायला लागायचं. बाबा घरी असले म्हणजे निदान जेवायला मिळायचं. बाबांना सांगायला गेलं तर याचे खूप नखरे आहेत खाण्यापिण्याचे, असा कांगावा करून ती तमाशा करायची. म्हणून मी त्यांना सांगणंच सोडून दिलं. शाळेत अनेकदा मी मित्राच्या डब्यातलं खायचो. घरात असलो तर ती काही ना काही काम करायला लावून मला त्रास देत असे आणि तिचं टीव्ही बघणं, लोळत फिल्मी मासिकं वाचणं चालू असे.

दहावीला मला जेमतेम बासष्ट टक्के मिळाले आणि मी डहाणूच्या काॅमर्स काॅलेजमध्ये ॲडमिशन घेतली. घरातलं वातावरण असं असल्याने मी शक्यतो काॅलेजच्या लायब्ररीतच अभ्यास करत बसायचो किंवा मग मित्रांबरोबर बाहेर वेळ काढायचो आणि संध्याकाळी उशिरा घरी यायचो. याचा परिणाम असा झाला की, माझी खोली आणि तिला जोडून असलेली दुसरी खोली भाड्याने द्यायला तिनं बाबांच्या गळी उतरवलं. म्हणजे माझ्याच काॅलेजच्या खर्चासाठी पैसे मिळतील, असं तिचं म्हणणं.

त्याचवेळी विजय पवार नावाचे सबइन्स्पेक्टर बदलीमुळे डहाणूला आले. त्यांना भाड्याने घर हवं होतं.

मग ते त्यांची बायको वासंती आणि सहा महिन्यांचा छोटा मुलगा असे त्या घरात राहायला आले विजयराव त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे बराच वेळ बाहेरच असायचे. कधी रात्री-बेरात्री उशिरा घरी यायचे.

आता माझी सावत्र आई रात्री उशिरापर्यंत हाॅलमध्ये टी. व्ही. बघत बसलेली असायची आणि बेडरूम तर आई-बाबांची, त्यामुळे मला घरात अभ्यास करायला जागाच राहिली नव्हती. स्वैपाकघर तसं लहान होतं आणि या आईचं कामात धड लक्ष नसल्याने ते फारसं स्वच्छही नसायचं. मग मी बऱ्याचदा मागच्या व्हरांड्यात खुर्ची आणि स्टूल घालून अभ्यास करत बसायचो. विजयरावांनी ते बघितलं होतं आणि माझी कुचंबणाही त्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी एक दिवस मला विचारलं की ‘ तू रोज रात्री आमच्या बाहेरच्या व्हरांड्यात अभ्यासाला बसशील का? म्हणजे वासंतीला पण सोबत होईल. मला माझ्या ड्यूटीमुळे अनेकदा रात्री घरी यायला मिळत नाही ना! ‘ 

त्यांचा तो छोटासा व्हरांडा व्यवस्थित बंद करून घेतलेला होता. तिथे त्यांनी एक सेटी ठेवलेली होती. वडिलांच्या परवानगीने मी रात्री तिथे अभ्यासाला बसू लागलो. माझ्या सावत्र आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतंच.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आधुनिक कर्ण आणि जपलेला आत्मसन्मान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ आधुनिक कर्ण आणि जपलेला आत्मसन्मान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी डी मार्टमध्ये नोकरीला आहे, बहुतेक वेळा मी कॅश काऊंटरवर असते. इतर किराणा दुकानांपेक्षा आणि अन्य मॉलपेक्षा आमच्याकडे वस्तूंच्या किंमती खूपच कमी असल्याने आमच्याकडे नेहमीच खूप गर्दी असते.

आज दुपारी चारच्या सुमारासही तशीच परिस्थिती होती. माझ्यासमोर आमच्याच चाळीतील कुसुम तिनं घेतलेलं सामान माझ्या काऊंटरवर ठेवत होती.

कुसुम घरकाम करायची, नवरा दारूडा होता, लिव्हर खराब होऊन मेला गेल्या वर्षी. घरी सासू, एक बालवाडीत जाणारं मूल आणि एक दोन वर्षांचं बाळ – आणि या सगळ्यांचा गाडा एकटी कुसुम ओढत होती.

आजसुद्धा तिच्या खरेदीत निरमा साबण पावडर, आंघोळीचे साबण, तिखट – मीठ, तांदळाच्या कण्या आणि अशाच अगदी आवश्यक वस्तू होत्या, नाही म्हणायला दोन रुपयांचे एक लॉलीपॉप घेतलं होतं तिनं – तिच्या त्या बास्केटमध्ये बिनजरुरी असा एकच काय तो आयटम होता.

मी सराईतपणे पटापट वस्तूंची नोंद केली, अशा वस्तू होत्याच किती म्हणा! आणि बिल झालं ५३९ रुपये.

“अरं माझ्या कर्मा! पाचशेच्या वर बिल झालं! आता काय कमी करू मी?  माज्यापाशीतर पाचशेचीच येक नोट हाय.”

ती मला फारशी ओळखत नसली, तरी मी तिला चांगले ओळखत होती. बहुतेक वेळी बसचे दहा रुपये वाचावेत म्हणून मैलोनमैल पायपीट करत जायची ती, शेअर रिक्षाचासुद्धा कधी तिनं विचार केला नाही.

या जास्तीच्या ३९ रुपयांचं उत्तर तिच्याकडे नसणार, ठाऊक होतं मला. मी केली असती मदत, पण आमचीही महिनाअखेर होती, एकादशीच्या घरी महाशिवरात्र.

मी माझ्या सुपरवायझरकडे शब्द टाकणार, एवढ्यात रांगेत कुसुमच्या मागे उभी असलेली बाई खाली वाकली. कुसुमचं बोलणं रांगेतल्या सगळ्यांनीच ऐकलं होतं, या बाईनं ऐकलं असणारच.

जमिनीवर पडलेली दोनशे रुपयांची एक नोट उचलून कुसुमला देत ती म्हणाली, “ताई, तुम्ही मगाशी तुमची पर्स उघडलीत, तेव्हा तुमच्या पर्समधून ही नोट पडली, घ्या. “

काय चाललं होतं माझ्या लक्षात आलं. त्या बाईला कुसुमला मदत करायची होती, पण तिला ओशाळं वाटू द्यायचं नव्हतं.

“न्हायी वो, माज्यापाशी न्हवती दोनशेची नोट, ” कुसुम प्रामाणिकपणे सांगत होती.

त्या बाईने मदतीच्या अपेक्षेने माझ्याकडे पाहिलं, मी मान डोलावली, कुसुमला म्हटलं, “बाई, तुमच्याच पर्समधून पडली ती दोनशेची नोट. “

गोंधळलेल्या कुसुमने तिची पाचशेची आणि ही दोनशेची अशा दोन नोटा मला दिल्या, मी तिचं सामान आणि उरलेले पैसे तिला परत केले.

तिच्या मागे रांगेत उभ्या असलेल्या त्या बाईला कुसुमला पैसे देऊ करणं शक्य होतं, पण या आधुनिक कर्णानं कुसुमला दानही दिलं, आणि तिच्या आत्मसन्मानाला ठेचही लागू दिली नाही.

देव त्या माऊलीचं भलं करो!

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares