श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५७ / ५८ / ५९ / ६० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद महाराज की जय!!!

नारद भक्ति सूत्रे ५७

उत्तरस्मादुत्तरस्मात्पूर्वपूर्वा श्रेयाय भवति ||५७ ||”

अर्थ:

भक्तीच्या या तीन प्रकारांपैकी आधी सांगितलेले प्रकार हे नंतरच्या प्रकारांपेक्षा उत्तरोत्तर जास्त कल्याणकारी आहेत.

विवेचन:

तामस गुणी भक्ति, राजस गुणी भक्ति आणि सात्विक भक्ति याबद्दल आपण मागील सूत्रात थोडा विचार केलेला आहे. तरी आपण काही मुद्दे पाहू.

तमोगुणी साधकाची भक्ति सकाम असते. तो अर्थार्थी असतो. प्रपंच आणि प्रपंचातील वस्तूंच्या भोगांचे त्याला आकर्षण असते. अनेक सुखसुविधा अर्थात उत्तम भोग भोगता यावेत म्हणून तो ईश्वराकडे वळतो.

रजोगुणी भक्तास प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पाहिजे असतात. प्रपंचातील आणि परमार्थ मार्गातील विविध अनुभवांनी त्याची थोडी तयारी झालेली असते. जग नश्वर आहे, त्यातील सूखे खऱ्या अर्थांनी आपल्याला समाधान देऊ शकणार नाहीत याची अल्पशी अनुभूती त्याला आलेली असते. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न तो करीत असतो.

सत्वगुणी साधकाची भक्ति निष्काम असते. त्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागलेली असते.

असा भक्त जरी प्रपंचात रहात असला तरी त्याची प्रपंचाची आसक्ती सुटलेली असते, परिणामी त्याची अंगी खरे वैराग्य येते.

याचा थोडा वेगळा विचार केला तर या तीन पायऱ्या आहेत असे आपल्या लक्षात येईल.

१. जागे होणे म्हणजे जीवनाचे ध्येय निश्चित करणे.

२. ध्येय प्राप्तीसाठी कार्य करणे. त्यासाठी आवश्यक गोष्टींचा अंगिकार आणि त्याज्य गोष्टींचा बहिष्कार. इथे साधकाला आपल्या दोषांची जाणीव होते.

३. साधक आपले दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करू लागतो.

आपला देश कृषीप्रधान आहे. वरील तीन गोष्टी करणे म्हणजे शेतातील तण, खराब गवत आणि कचरा बाहेर काढून टाकणं. यातून शेताची अर्थात मनरूपी शेताची मशागत होऊन त्यातून चित्त शुद्ध होऊ लागते. चित्तशुद्धी होणे हा परमार्थ मार्गातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गौणी भक्तीतून साधक मुख्य भक्तीकडे जाऊ लागतो, त्याची साधना हळूहळू उच्च पातळीवर जाऊ लागते…!

जय जय रघुवीर समर्थ 

— 

नारद भक्ति सूत्रे ५८

अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ||५८||”

अर्थ : इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग जास्त सुलभ आहे.

विवेचन:

भगवंत प्राप्तीच्या इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग अधिक सुलभ आहे असे सर्व संत आपल्याला सांगतात. याचा विचार आपण या आधी पंचविसाव्या सूत्रात केलेला आहे. या सूत्रात आपण भक्तिमार्गाचे सोपेपण अर्थात सुलभता पाहणार आहोत.

योगमार्गात मनुष्याला अनेक गोष्टी अत्यंतिक काटेकोरपणे कराव्या लागतात. कारण त्या मार्गात तसेच विधिविधान आहे असे आपल्या लक्षात येईल. योगमार्गात आधी शरीरावर ताबा मिळवून मग मनावर ताबा मिळवावा लागतो. त्यासाठी त्याला युक्त आहार विहार करावा लागतो. भगवंत गीतेत म्हणतात –  

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि |

मोजूनि करितो त्यास योग हा दुःख नाशन||”

(गीताई ०६. १७)

सध्याच्या काळात आहार, विहार आणि यथायोग्य झोप घ्यायला मिळणे शक्य आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे सामान्य साधकाला योगमार्ग कठीण ठरू शकतो.

आधी कथन केल्याप्रमाणे मनुष्य कर्म सुद्धा योग म्हणून करू शकतोच असे नाही. तर तो बरेच वेळा करून टाकत असतो, उरकत असतो. अशी कर्म करून मुक्ति मिळू शकेल का? अर्थात सामान्य मनुष्याला, साधकाला कर्म करणे साधू शकते, पण *कर्मयोग* साधणे मात्र जिकिरीचे ठरते.

ज्ञान मार्ग हा बुद्धीचा मार्ग आहे. याची सुरुवात साधन चतुष्ट्याने होते. साधक वैराग्यशील असावा लागतो. अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास अंगी मुरावा लागतो. इतके सगळे करून ज्ञानप्राप्ती झाली तर त्याचा अभिमान होण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत सांगतात की भगवंताला अहंकार बिल्कुल चालत नाही.

भक्तीमार्ग हा सर्व सामान्य माणसांसाठी अगदी राजमार्गासारखा आहे. या मार्गाला अर्थात भक्तीला राजविद्या असेही म्हणतात. विद्या, संपत्ती, कुळ, वर्णाश्रम, वेदाध्ययन, कठोर तपश्चर्या इत्यादींची भक्तीला अपेक्षा नाही.

सर्वसामान्य मनुष्य आपल्या जवळच्या नातेवाइकांवर, आपल्या आवडत्या वस्तूंवर प्रेम करीत असतो. ते प्रेम कधी स्वार्थी असते तर कधी निःस्वार्थी. प्रेम म्हणजे काय हे दाखवता येत नसले तरी त्या प्रेमाची अनुभूती कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाने घेतलेली असते. हेच प्रेम भगवंताकडे वळवले की त्याचे भक्तित रूपांतर होते.

संत तुकाराम महाराज या प्रेमाने भगवंत कसा जवळ येतो याचे वर्णन पुढील अभंगात करतात. — – 

*”प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥२॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥३॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥४॥”*

(अभंग क्रमांक 432, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५९

प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् (च) ||”

अर्थ : भक्ति कोणत्याही प्रमाणावर म्हणजे पुराव्यावर अवलंबून नाही तर ती स्वतः सिद्ध आहे, म्हणून ती इतर मार्गांपेक्षा सोपी आहे.

विवेचन : कर्मयोग, ज्ञानयोग यांच्याशी तुलना करताना नारद मुनी २६ व्या आणि ३० व्या सूत्रांत याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये भक्ति स्वयं फलप्रभा आहे असे म्हटले आहे. अर्थात तिला कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही.

प्रमा म्हणजे ज्ञान. ज्यामुळे ज्ञान होते, ते प्रमाण. प्रमाणा मध्ये ज्ञानाचा उगम होतो. भारतीय तर्कशास्त्रात तीन प्रमाण मानली गेली आहेत.

१. प्रत्यक्ष

२. अनुमान

३. शब्द किंवा आप्तवाक्य

  1. इंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. (Perception)
  2. निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढणे म्हणजे अनुमान.
  3. ज्याच्यावर आपला विश्वास आहे, जो आपला हितचिंतक आहे, निःस्वार्थी आहे, त्याचे म्हणणं आपण मान्य करतो. खरे मानतो, ते आप्त वाक्य.

परमार्थ मार्गात जर कर्ममार्ग, ज्ञानयोग अथवा योगमार्गाने जायचे असेल त्यासाठी किमान त्या त्या विषयाचे प्राविण्य अथवा पात्रता (अर्हता) अंगी येणे गरजेचे ठरते.

याउलट भक्तिमार्गात कसलीच लौकिक पात्रता लागत नाही. अनेक संत निरक्षर होते, अनेक संत श्रीमंत होते, अनेक संत अतिशय गरीब होते, काही संतांनी एका नामस्मरणाशिवाय कोणतेही साधन केलेलं नाही. भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला आला, अनेक स्त्री संत आहेत. रामाच्या प्रमुख भक्तांपैकी विभीषण राक्षस, हनुमंत वानर तर शबरी वनवासी होती, पण तिघांनी आपापल्या परीने भक्ति करून रामाची प्राप्ती करून घेतली. रामाने तर हनुमतांचा भरतासारखा भाऊ म्हणून गौरव केला.

ज्याप्रमाणे मातेला आपल्या वात्सल्याचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही, त्याप्रमाणे भक्ताला आपल्या भक्तीचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ६०

शान्तिरूपात् परमानंदरूपाच्च ||६०||”

अर्थ : भक्तीमध्ये स्वभावतः शांति असल्याने आणि ती अपार आनंद रूप असल्यामुळे ती इतर साधनांपेक्षा सुलभ आहे.

विवेचन : सर्वसामान्य मनुष्य आपल्या आयुष्यात कधी प्रयत्नाने तर कधी प्रारब्धाने अनेक गोष्टी मिळवतो. पण मनःशांती मिळवणं त्याला जमतेच असे नाही.

बालपणी त्याला नवनवीन खेळणी मिळाली की सुखशांती मिळेल असे वाटते, थोडा मोठा झाला की त्याला रंगीबेरंगी कपडे, चैनीच्या वस्तू मिळाल्या की सुखशांती मिळेल असे वाटते, मग ही मालिका संपता संपत नाही आणि मनुष्याला शांती लाभत नाही…

अनुदिनी अनुतापें तापलो…! “ अशी त्याची स्थिती होऊन जाते. याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्की घेतला असेल.

साधक भक्तिमार्गात लागला की मात्र त्याला शांतीचा लाभ होऊ लागतो. “जितकी भक्ति तितकी प्राप्ति” या न्यायाने तो जितका भक्ति मध्ये रमतो, तितका तो मनाने शांती अनुभवू लागतो. भक्ति म्हणजे शीतगृह असे म्हटले तरी वावगे होऊ नये. तिथे गेले की कोणी कसाही असो, त्याला शांती मिळाल्याशिवाय रहात नाही. भक्तिसाधना दृढ होऊ लागली की साधक निःशंक आणि निर्धास्त होऊ लागतो. आपली काळजी घेणारे, आपल्याला खंबीर आधार देणारे आपले सद्गुरू आहेत, याची त्याला खात्री पटते. साधनेच्या पुढील पडावात त्याच्या लक्षात येते की सर्व काही भगवंतच करतो. आपल्या हातात काहीच नाही आणि भगवंत माझ्या भल्या साठीच सर्व काही करीत आहे, अशी त्याची धारणा होऊ लागते. त्यामुळे तो तटस्थपणे भगवंताची लिला पाहू लागतो. मग त्याचा आनंद, त्याचे समाधान, त्याची शांती कधीही भंग पावत नाही. संत तुकाराम महाराज याचे वर्णन पुढील अभंगात करतात.

आनंदाचे डोही आनंदतरंग |

आनंदचि अंग आनंदाचे || धृ. ||

*

काय सांगों जालें कांहीचियाबाई 

पुढें चाली नाहीं आवडीनें || ||

*

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |

तेथिचा जिव्हाळा तेथें बिंबे || ||

*

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |

अनुभव सरिसा मुखा आला || ||

(अभंग क्रमांक २५८२, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

जय जय रघुवीर समर्थ

– भक्ती सूत्र क्र. ५७ / ५८ / ५९ / ६० 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments