सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆
तेलगू रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या
* *
मला एक प्रसंग आठवतो : पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हैद्राबादला माझ्या एका नाट्यप्रेमी तेलगू मित्राच्या बंगल्याच्या गच्चीवर चांदण्या रात्री गप्पागोष्टींची एक मैफल जमली होती. बहुतेक मंडळी नाटक, गाणे, वाजवणे ह्यांतली होती. तेवढ्यात कुणीतरी मला पेटीवर मराठी नाटकातले एखादे पद वाजवण्याची फर्माइश केली. मी काय वाजवावे ह्या विचारात पट्ट्यांवर बोटांची चाळवाचाळव सुरू केली. मिश्रपिलूच्या अंगाने एकदोन जागा पेटीवर निघाल्या आणि त्या गच्चीच्या कोपऱ्यातून आवाज आला, “अय्योय्यो बालगंधर्वाऽऽ! ” एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. एक गोरापान, काळेभोर कुरळे केस असलेला, अंगावर रेशमी झब्बा, पांढरेशुभ्र धोतर नेसलेला देखणा गृहस्थ तिथून उठून सरळ माझ्यापर्यंत चालत आला आणि समोर बसून त्याने चक्क आपले दोन्ही हात माझ्यापुढे केले आणि माझे हात हातात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावून म्हणाला, “बाबूजीऽऽ यह बालगंधर्वका गाना आपके उंगलीमें आके बैठा है… सत्य वदे बजाना-” ‘सत्य वदे’ हे माझेही आवडते गाणे. मी वाजवायला सुरुवात केली. ‘अश्रुनीर वाहे डोळां’ अशा अवस्थेत तो गृहस्थ समोर बसून कुठे तरी पार हरवल्यासारखा ते ऐकत होता. हे अद्भुत घडताना पाहून आमचे इतर तेलगू मित्रही चकित झाले होते. हा तेलगू रंगभूमीवरचा आणि त्यानंतर शेकडो तेलगू बोलपटांतला *श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या. *
– – त्या नंतरची ती मैफिल म्हणजे मी बालगंधर्वांची आठवतील ती गाणी पेटीवर वाजवत होतो, जमतील तशी गात होतो आणि त्यातल्या प्रत्येक गाण्याचे तेलगू भाषेतले रूपांतर बालगंधर्वांच्या गायनाच्या ढंगाने, त्यातल्या गानसौंदर्यातली जागा न् जागा दाखवत रघुरामय्या गात होते. कर्नाटक संगीताचा वापर असलेल्या तेलगू रंगभूमीवर ह्या बालगंधर्वांच्या एकलव्यासारखी विद्या मिळवलेल्या शिष्याने सारी बालगंधर्व गायकी नेऊन असंख्य लोकांची मने जिंकली होती.
पस्तिशी-चाळिशीतला वाटावा असा हा रसरशीत माणूस मला भेटला त्या वेळी सत्तरीत शिरला होता. एक केस पिकला नव्हता. चेहऱ्यावर एक सुरकुती नव्हती. त्यानंतर पुढचे आठ दिवस मला एखाद्या लहान मुलासारखा धरून होता. विषय फक्त बालगंधर्व! बालगंधर्वांसारखाच लहानपणी रंगभूमीवर आला. नवव्या दहाव्या वर्षांपासून गायला लागला. एका नाटक कंपनीवाल्याने ह्याच्या शेतकरी बापाला जमिनीचा लहानसा तुकडा देऊन हा मुलगा विकत घेतला. कंपनीच्या भ्रमंतीत कुठल्याशा गावी नाटकात चांगले काम केल्याबद्दल तिथल्या सावकाराने “हे गाणे गात जा” म्हणून ह्या बालनटाला बालगंधर्वांची रेकॉर्ड दिली, ती ‘सत्य वदे’ची. रघुरामय्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, “वह यकच प्यालामें सुधाकर जैसा पहिले पियालेमे शराबी बन गया, वैसा येक सत्य वदे’की रेकॉर्डने हमको बालगंधर्वका चरणरज बना दिया. ” रघुरामय्यांचा तो ‘चरणरज’ आजही माझ्या कानात आहे. ह्या रघुरामय्यांना आम्ही बालगंधर्व स्पर्धेची पारितोषिके द्यायला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याला बोलावले होते. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तीच मुळी, “हमने बालगंधर्वका उच्छिष्ट खाते खाते जिंदगी बितायी” ह्या वाक्याने. समोर श्रोत्यांत भीमसेन होते, हिराबाई होत्या, वसंतराव देशपांडे होते. गंधर्वप्रेमी रसिकांनी हॉल खचाखच भरला होता. आमच्या आग्रहावरून ह्या तेलगू भाषिक नटाने ‘मूर्तिमंत भीति उभी’ म्हटले. शंभर टक्के बालगंधर्वांचे स्मरण करून देणाऱ्या त्यांच्या गाण्याला सार्या सभेने डोळ्यांतून वाहणार्या अश्रूंनी दाद दिली. ते एक अद्भुत दृश्य होते. गंधर्व-गायकी त्याच्या रंध्रारंध्रांत भिनली होती. ती त्यांनी आत्मसात केली होती, केवळ भक्तिभावाने.
लेखक : श्री. पु. ल. देशपांडे
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






