श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ हाच मोक्ष अन् इथेच मुक्ती… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
म्हणो कुणी की ब्रह्म सत्य अन् विश्वचि अवघे मिथ्या, माया
मातीमधुनी यावे जन्मा, केवळ अंती माती व्हाया
*
व्यर्थ न आलो आभाळातुन, घेउन आलो निरोप त्याचा
होउन आलो गगनगंध मी, सखा व्हावया मृद् गंधाचा
*
नवरस आणिक सतरंगी ह्या, आलो जन्मी चिंब भिजाया
सुंदरता अन् चिरंजीविता, दोन घडींना थोडी द्याया
*
पाच इंद्रिये पाची खिडक्या, सताड उघड्या सदैव ठेवू
ऋतूऋतूंचे नित्यनूतनी, वैभव सारे भोगत राहू
*
भासभ्रमांची मायानगरी, कसे म्हणू या आयुष्याला
सत्य फुले ही, सत्यचि काटे, सत्य चांदणे, सत्यचि ज्वाला
*
फुलवू येथे अशी उपवने, यावे भेटी नंदनवनही
शाश्वतासही खिजवू थोडे, ईश्वर बनवू नश्वरासही
*
हटयोगी ना वितरागी मी, इहलोक खरी माझी प्रीती
हाच विठोबा, हीच पंढरी.. हाच मोक्ष अन् इथेच मुक्ती !
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




