श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ काही स्मरुन गेले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
कांही स्मरुन गेले
कांही विसरुन गेले.
भरुन मेघ आले
ओसरुन तेही गेले.
शिलकीचे कांही पाणी
साचून ओघळ झाले.
पुलाखालून एरवी उरले
सर्वस्व वाहून गेले.
शैशवात सोडली जी
सैरभैर झाली नावं.
हरवून आता गेले
स्मरणातले रम्य गाव.
नकोस साकव बांधू
ऐलपैल सांधणारा.
संयमित समजुतीचा
सांभाळीन मी किनारा.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




