श्री मकरंद पिंपुटकर
जीवनरंग
☆ घसरगुंडी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
दुपारचा एक वाजून गेला होता. मनोजची मालगाडी लोणावळा ओलांडून कर्जतच्या दिशेने निघाली होती. मनोज गेली पंचवीस वर्षे रेल्वेमध्ये मालगाडीचा गार्ड म्हणून कार्यरत होता. मनोजने आयुष्याचा मोठा भाग घाटातल्या या रूटवर घालवला होता. येथल्या वाऱ्याचा वेग, वळणे, उतारांचे रागरंग —सगळं सगळं त्याला पाठ होतं.
आज सिमेंटच्या गोणींनी भरलेल्या ५८ वाघिणी घेऊन तो मुंबईला निघाला होता. मालगाडीच्या डब्यांना वाघीण नाव कोणी बरं ठेवलं असेल? त्याला नेहमीच गंमत वाटायची.
पळसदरी स्टेशन येत होतं, इथून कर्जत यायला साधारण पाच किलोमीटर, तिथून कल्याणला पोचेपर्यंत आणखी एक तास, मग तासाभराने ठाणे आणि आणखी एखाद्या तासाभरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गाडीचे शेवटचे स्टेशन. मनोज मनातल्या मनात हिशेब करत होता. थोडेफार सिग्नल आणि सायडिंग जरी धरलं संध्याकाळी सहापर्यंत ड्युटी संपेल असा अंदाज तो बांधत होता.
घाट संपून कर्जत ओलांडले, की मग सोबत आणलेली पोळीभाजी खावी अशी गणितं तो करत असतानाच वॉकीटॉकी खरखरली, विनेशचा – गाडीच्या ड्रायव्हरचा आवाज ऐकू येत होता – “मनोज, वेग वाढतोय गाडीचा … ब्रेक नीट पकडत नाहीयेत बहुतेक. ”
मनोज क्षणभर थिजला.
…. घाट उतरताना ब्रेक नीट लागत नाहीयेत?
मनात थंड शिरशिरी उठली, जीवाची कालवाकालव झाली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.
दुनिया जरा जास्तच वेगाने मागे पडत होती. झाडं धावत असल्यासारखी दिसत होती.
वॉकीटॉकीवर काही सेकंदातच पुन्हा विनेशचा आवाज आला – आवाजातला कंप आता स्पष्ट जाणवत होता : “एअर ब्रेक्स प्रतिसाद देत नाहीत… डायनॅमिक ब्रेक लावतोय… पण अजून तो पुरेसा होत नाहीये. ”
मनोजने डोळे मिटले.
पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेली एक गोष्ट आठवली—
…. “बिघडलेल्या ब्रेकसह घाट उतरणं म्हणजे डोंगराशी झुंज – मृत्यूशी झुंज. ”
आज ती झुंज त्याच्या वाट्याला आली होती.
मनोजने त्याच्या डब्यातील – ब्रेकव्हॅनमधील हँडब्रेकचे चक्र घट्ट पकडलं.
आणि हळूहळू, मोजक्या प्रमाणात त्याने ते चक्र फिरवत ब्रेक लावायला सुरुवात केली—
– – त्याला त्याच्या पहिल्या ट्रेनिंग ऑफिसरने शिकवलं होतं: “ब्रेक झटके देत लावू नकोस, एकदम अचानकही ब्रेक लावू नकोस….. गाडीसोबत बोल. तिच्याशी संवाद साध. ती तुला काय सांगते ते ऐक. त्यानुसार ब्रेक लाव. ”
गाडीची गती जास्त होती, हँडब्रेकचे चक्र फिरवणं कठीण होत चाललं होतं.
जोर लावून ते चक्र फिरवताना घाम फुटत होता, पण त्याने हातांची पकड सैल होऊ दिली नाही.
तिकडे रेल्वे इंजिनमध्ये, समोर, विनेश जिद्दीने लढत होता—एअर ब्रेक, डायनॅमिक ब्रेक वापरत होता, सोबत असलेली रेती ट्रॅकवर फेकत होता (सँडिंग) — मनोज आणि विनेश – दोघेही एकाच शत्रूशी झगडत होते—उतरण आणि त्या उतरणीवर गाडीचा कमी न होणारा वेग.
गाडी आता घाटात जोरात धावत होती. जिथे ताशी ६० किलोमीटरपेक्षा कमी गती असायला हवी तिथे वेग ताशी ७५ किलोमीटरच्या पुढे गेला होता.
– – वारा ब्रेकव्हॅनमध्ये चाबकासारखा घुसत होता.
– – डबे हलत होते, अडखळत होते, थरथरत होते.
मनोजचं हृदय प्रत्येक चाकासोबत धडधडत होतं.
तो हळू आवाजात पुटपुटला— “हळू धाव माझे आई, … शांत हो, … थांब ग…”
…. जणू गाडी त्याचा आवाज ऐकत होती.
विनेशचा आवाज आला – हताश, कमकुवत – “मी नाही थांबवू शकत आहे हिला, नियंत्रण सुटतंय, संपतंय सगळं. ”
मनोजचे श्वास थांबले…..
डोळ्यासमोर जीवाभावाच्या सगळ्यांचे चेहरे तरळून गेले –
सकाळी चहा करत असलेली बायको,
अजून झोपलेली मुलं,
…. आणि विनेशचाही चेहरा – विनेश आणि स्वतःला तो नेहमीच दोन डोळे म्हणायचा, “दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी” म्हणायचा. ५० च्यावर डबे, पाऊण किलोमीटर अंतर असायचं ड्रायव्हर आणि गार्डमध्ये, असायचे एकाच मालगाडीच्या दोन टोकांना, पण क्वचितच भेटायचे एकमेकांना.
मनोजने दीर्घ श्वास घेतला, स्वतःला स्थिर केलं आणि अवसान आणून, शांत स्वरात विनेशला म्हणाला: “हार मानू नकोस. आपण दोघं आहोत. दोघं मिळून थांबवू गाडीला. तू रेल्वे कंट्रोलला सूचना दे. ”
“पळसदरी कर्जत उतारावर मालगाडीचे ब्रेक लागत नाहीयेत” – कंट्रोल रूमवर जणू विजेच्या लोळासारखी बातमी कोसळली. प्रशिक्षण, अनुभव आणि धैर्य पणाला लागलं, सिग्नल adjust केले गेले, मालगाडीच्या मार्गात सुदैवाने अन्य कोणती गाडी नव्हती, कर्जत स्टेशनपुढील गाडीचा मार्ग बदलला गेला, वाहतुकीचा अडथळा नसलेला ग्रीन कॉरिडॉर तयार केला गेला, जास्त रहदारीच्या नेहमीच्या ट्रॅकवरून सायडिंगच्या कमी वापरातल्या ट्रॅकवर गाडी वळवली जाणार होती. दोन किलोमीटर नंतर या ट्रॅकला अशा प्रसंगांसाठीच बांधलेल्या कॅच सायडिंगची तयारी होती—
कर्जत स्टेशन जवळ येत होतं, स्टेशनवर रेल्वे स्टाफ सज्ज होता, सिग्नलमन, पॉईंटमन, स्टेशनमास्तर – सगळे डोळ्यात प्राण आणून धडाडत येणाऱ्या गाडीकडे पाहत होते.
विनेश ओरडला: “वेग अजून जास्त आहे! ”
मनोजने होता नव्हता तो सगळा जोर लावून हँडब्रेक पूर्ण ताकदीने फिरवला.
हात भरून आले होते, हातांना रग लागली होती…
– – – आणि गाडीचा वेग कमी होऊ लागला….
…. खरंच कमी होत होता का भास होऊ लागले होते?
नाही, हा भास नव्हता. वेग नक्की कमी होत होता, खूप नाही, पण पुरेसा.
उतरण जणू थोडी माघार घेत होती.
कर्जत स्टेशन कधीच मागे पडलं होतं, भिवपुरी स्टेशनही मागे गेलं होतं. वेग खूप कमी झाला होता, आणि शेवटी तो क्षण आला—
डायनॅमिक ब्रेक, हँडब्रेक, सँडिंग, आणि माणसांची इच्छाशक्ती — — सगळ्यांनी मिळून त्या ५८ डब्यांच्या राक्षसी गाडीला थांबवलं होतं.
गाडी एक क्षणभर थरथरली…
आणि मग घनघोर शांतता पसरली.
मनोज थकून एका बाकावर कोसळला.
डोळ्यातून घळघळा पाणी आलं. तो वॉकीटॉकीवर कसंबसं बोलला – “वाचलो आपण…”
अधिकारी आले, तपास सुरू झाला.
ड्रायव्हरचे हात अजूनही थरथरत होते.
मनोजच्या तळहातांवर टरटरून फोड आले होते.
ब्रेकच्या घर्षणाने चाकं गरम झाली होती, पण सुरक्षित होती.
लोकांनी विचारलं—
“नेमकं कशाने वाचवलं तुम्हाला? ”
मनोज फक्त एवढंच म्हणाला—
“घाट उतरायला सुरुवात करताना नियमानुसार ब्रेकची चाचणी केली होती, तेव्हा ब्रेक व्यवस्थित होते. नंतर काय बिनसलं, माहित नाही, पण आत्ता गाडी कशी थांबली विचाराल, तर रेल्वेने केलेला ग्रीन कॉरिडॉर, विनेश – मी आणि आमची ही गाडी … आणि मुख्य म्हणजे देवाने – डोंगराने – निसर्गाने आम्हाला दिलेली एक संधी – या सगळ्यांमुळे गाडी थांबली. ”
प्राथमिक तपास पूर्ण झाला, रात्री घरी आल्यावर त्याच्या लहानग्या मुलीने मनोजला विचारलं: “बाबा, आज मी बागेत खेळायला गेले होते. तिथे एक मस्त नवी घसरगुंडी आली आहे. मी तिच्यावर खूप खेळले. झूSSम करून खाली येताना पोटात गोळा येत होता. पण मज्जा आली. तुम्ही आज काय केलंत? आज काही विशेष झालं का? ”
त्याने तिच्याकडे पाहिलं…..
घाटातला गाडीचा वेग, तो सोसाट्याचा वारा, ती भीती, ते धैर्य, आणि सरतेशेवटी थांबलेल्या गाडीचा तो शांत क्षण – आजची त्याच्या गाडीची घसरगुंडी, त्याच्या पोटात आलेला गोळा – हे सगळं सगळं क्षणार्धात त्याच्या नजरेसमोर तरळून गेलं – तो हलकेच हसला…..
“हो, ” तो म्हणाला, “मी सुखरूप घरी आलो… हेच सर्वात विशेष झालंय आज. ”
(२७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे मुंबई घाट उतरताना, पळसदरी रेल्वे स्टेशननंतर एका मालगाडीचा वेग नियंत्रणात येत नव्हता. या सत्यघटनेवर आधारित हा लेखन प्रपंच. पात्रांची नावे काल्पनिक आहेत.)
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





