श्री मेघ:श्याम सोनवणे
जीवनरंग
☆ मैत्री… भाग – २ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
(अचानक विचार आला. आपला एखादा मित्र कार्यक्रम सोडून इथे आला तर? त्याने आपल्याला अशा अवतारात बघितलं तर? गावातल्या एका मोठ्या, श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच वावरात राबतोय! पाण्याची बारी देतोय! चिखलाने बरबटलेले कपडे घालून लागवड करतोय! या कल्पनेनेच मला कसंतरी झालं.) – इथून पुढे – –
बघता बघता दुपार उलटली. कार्यक्रम सोडून आपल्याला बोलवायला कुणी येणार नाही हा विश्वास खरा ठरला. चुकून जर कुणी आलंच तर लागवडीला माणसं कमी आहेत, बाया घेतलेल्या आहेत, मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगता आलं असतं.
लागवडीचं काम जोरात चाललं होतं. रविवार असल्याने बायांना काम उरकून घरी जायची घाई होती. तसं बघता दुपारपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम झालं होतं. चार वाजताच लागवड उरकली तर? मग काय करायचं? बायको म्हणेल, “गेटटुगेदरला जा. ” पण मी तर तिथे जाणार नव्हतो.
आता तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम चालू असेल. मुलं-मुली एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारत असतील. जुन्या आठवणी काढून हसत असतील. एकमेकांचं कौतुक करत असतील.
नकळत मी माझी तुलना मोडकशी करू लागलो. तो जर्मनीत सेटल झाला असला तरी मीही गावातला एक मोठा शेतकरी होतो. आम्हाला मूळचीच जमीन जास्त. त्यात मी माझ्या कष्टाने अजून भर घातली होती. आज गावात माझ्याइतकं क्षेत्र कुणालाही नव्हतं. पण मोठा शेतकरी असूनही वावरात काम करायची माझी खोड मोडली नव्हती. स्वतःच्या वावरात काम करायला कसली लाज?
चार वाजता लागवड संपली. बायामाणसं घरी गेली. गडी संध्याकाळच्या धारांची तयारी करायला गोठ्यावर गेला. बायको “घरी चला” म्हणाली पण मी गेलो नाही. तिथेच बांधावर बसून राहिलो. डोक्यात पुन्हा एकदा तेच विचारचक्र सुरू झालं. एव्हाना कार्यक्रम उरकला असेल. चारपर्यंतचीच वेळ होती. आता पाच वाजून गेले होते. आता सगळे घरी निघाले असतील. मी सुटकेचा निश्वास टाकला.
पण नंतर माझ्या विचारांची दिशा बदलली. मला स्वतःचा राग आला. आपण आपल्या आयुष्यात काही करू शकलो नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपली मित्रमंडळी ‘ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही केलं आहे’ त्यांचं मला कौतुक का करावं वाटलं नाही? शाळेत ज्या मित्रांबरोबर खेळलो, अभ्यास केला, मार खाल्ला, त्यांच्या यशाचा मला हेवा वाटावा? त्यांचं कौतुक करण्याचा मोठेपणा माझ्यात नाही?
विचारांच्या या वेगळ्या प्रवाहाने स्नेहसंमेलनाला न जाऊन आपण चूक केल्याचं लक्षात आलं. जे नशिबात होतं, ते आपल्याला मिळालं. पण ज्यांनी स्वत:चं नशीब घडवलं, त्यांचं कौतुक मी करायलाच हवं! विहिरीवर जाऊन हातपाय धुवावेत, घर गाठावं आणि कपडे बदलून शाळेत जावं. तिथे गेल्यावर सांगता येईल की अचानक लागवडीचं ठरलं.
मी धावतच विहिरीवर गेलो. मोटर चालू केली. विहिरीजवळचा एक आउटलेट खोलला. पाटात उतरून हातपाय धुवू लागलो. हातपाय धुताना मला जुने दिवस आठवू लागले.
आमच्या घरापुढे पाण्याचा हापसा होता. शाळा घराजवळच असल्याने पोरं सकाळ संध्याकाळ हापशावर यायची. सकाळी पाणी प्यायला हापशावर, दुपारी डबे धुवायला हपश्यावर, संध्याकाळी हातपाय धुवायला हापशावर. घरापुढच्या बाभळीवर जशा दिवसभर चिमण्या दिसायच्या तशीच हापशावर दिवसभर पोरं दिसायची. आमचं घर माझ्या मित्रांसाठी “आओ जाओ, घर तुम्हारा” होतं.
हापशाच्या आठवणींनी मी पुन्हा एकदा लहान झालो होतो. स्वतःचं देहभान हरवून बसलो होतो. माझ्यातला लहान मुलगा पाटातल्या पाण्यात खेळत होता.
पाईपमधून बदाबदा पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने बांधावरून चालत येणाऱ्या बडबडीकडे माझं लक्ष गेलं नाही. मान वर करून पाहिलं तर काय दिसलं? सणवाराला घालावेत तसे खास कपडे घातलेल्या मित्र-मैत्रिणी बांधावरून चालत माझ्याकडे येत होत्या. त्या सगळ्यांना शेतावर आलेलं बघून मला गुदमरल्यासारखं झालं. आपण कार्यक्रमाला गेलो नाही म्हणून सर्वजण इकडे आले काय?
आज स्नेहसंमेलनाला सत्तर विद्यार्थी आल्याचं समजलं. त्यातले वीस जण माझ्याकडे आले होते. एवढ्या सगळ्यांत मी मोडकला लगेच ओळखला. तो माझ्याकडे बघून हसला पण काही बोलला नाही. तो वेळ काढून माझ्याकडे आला होता हेही महत्त्वाचं होतं. मला मोडकशी बोलावं वाटत होतं. पण एवढी पोरं-पोरी खास माझ्यासाठी आलेली. कोण काय बोलतंय कळत नव्हतं. एवढ्यातून एकट्या मोडकचीच चौकशी कशी करायची?
तसा मोडकही फारसा बोलका नव्हता. शाळेत असताना मोडक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा होता. आजही तो गालातल्या गालात हसत होता. क्षणभर वाटलं, मोडक त्याची पोझिशन दाखवायला तर आला नाही? “लोखंडे, बघ, आज मी कुठे आणि तू कुठे! ”
“गेटटुगेदरला का आला नाहीस? एवढा कामदार लागून गेलास की काय? ” बोरावकेने विचारलं. ही बोरावके वर्गातसुध्दा खूप बडबड करायची.
“तू आम्हाला भेटायला आला नाही म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो” असं म्हणून जांभळेने मला लाजवलं.
आता खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय मित्रांशी खोटं बोलणं मला जमणारही नव्हतं. “तुमच्यापैकी बरेच जण नावाजलेल्या कंपन्यांत, मोठमोठ्या पदांवर काम करत असताना मी मात्र आहे तसाच राहिलो. त्यामुळे कार्यक्रमाला यायची लाज वाटली. ” मी खरं ते सांगितलं.
“अरे राजा, आम्ही करतोय ते तर कुणीही करेल. पण तुझ्यासारखा शिकला-सवरलेला मुलगा शेती करतोय याहून चांगली गोष्ट कोणती? तू सुध्दा पोस्टग्रॅज्युएट झाला आहेस. ठरवलं असतं तर तुही हवी तशी नोकरी मिळवली असती! पण तू शेती करायचं ठरवलं. तू नुसती शेतीच केली नाहीस तर तुझ्या वडिलांच्या सातबाऱ्यातलं क्षेत्रही वाढवलं! ” बर्वेने मोठं भाषणच दिलं.
“मुख्याध्यापकांनी तर भाषणात तुझं आवर्जून कौतुक केलं. तू शेती करतोय याचा त्यांना अभिमान आहे. ” कोलतेने त्या भाषणाची आठवण करून दिली आणि इतरांनी माना हलवून माझ्याकडे कौतुकाने पाहिलं.
“तुला आमचा अभिमान आहे की नाही माहित नाही, ” शाळेत असताना वर्गात कधीच न बोललेली वरपे म्हणाली, “पण आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. ”
खरं तर मी मित्रांची चौकशी, कौतुक करायचं तर तेच माझी चौकशी, कौतुक करू लागले. मी एकटा आणि ते एवढे सगळे. ते मला बोलूही देईनात. मग विचार केला, हॉटेलात नेऊन सर्वांना चहा पाजावा. तिथं सर्वांशी बोलता येईल.
“काय लोखंडे, ओळखलं का नाही? ” बराच वेळ माझ्याकडे बघत असलेला मोडक शेवटी बोलला.
“तुला ओळखणार नाही असं कधी होईल का? ” इथेसुद्धा माझा इगो आडवा आला होता. मोडक बोलल्यावरच मी त्याच्याशी बोललो होतो. “एक काम करू. इथं एक नवीन हाॅटेल झालंय. आपण तिथं चहा घेऊ. ” मी पुढे म्हणालो.
“दोस्ता, शाळेत असताना मला घरी नेऊन जेवायला घालायचा आणि आता इथे हॉटेलवर चहा पाजून परत पाठवणार का? “
मोडकच्या प्रश्नाने मला लाजवलं. माझी त-तं-म-मं झाली. मोडकने पुढे केलेला हात मी माझ्या हातात घेतला. त्या हस्तांदोलनात तीच पूर्वीची उब होती, प्रेम होतं, आपुलकी होती.
“मी मिसेसला सांगून आलोय की भारतात गेल्यावर लोखंडेच्या घरी जाऊन बाजरीची भाकर उडदाच्या आमटीत चुरून खाणार… ”
मोडक असं बोलताच माझे डोळे भरून आले. त्याला भाकर चुरून खायला, बुक्कीत कांदा फोडायला मीच शिकवलं होतं. मोडक अजून काही बोलला असता तर मी पोरींसारखा रडलो असतो.
“काय रावऽ तुझं आडनाव लोखंडे आणि वाफ्यात पाणी शिरल्यावर ढेकूळ विरघळावं तशी तुझी अवस्था व्हावी? ” असं विचारताना घेनंदने हसण्याचा प्रयत्न केला पण तो डोळ्यांच्या खालच्या कडा बोटांनी कोरड्या करत होता. त्या क्षणी बऱ्याच जणांच्या डोळ्यांत पाणी आलेलं. आपलं रडकं तोंड दिसू नये म्हणून सर्वजण इकडे-तिकडे बघत होते.
शेवटी मीच कसंबसं हसलो. खिशातला रुमाल काढून तोंड पुसण्याच्या निमित्ताने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मित्र-मैत्रिणींना “चला, माझ्या घरी जाऊ” म्हणालो.
– समाप्त –
लेखक : अनामिक
प्रस्तुती : मेघ:श्याम सोनवणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





