शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “सगळंच काही वाईट नसतं…” ☆ शीला पतकी ☆
☆
काल परवा माझ्याकडे संस्थेत कार्यरत असणाऱ्या एका महिलेचा फोन आला. त्यानी माझ्याकडे क्लार्क म्हणून संस्थेचा सगळा पसारा सांभाळला होता. बाई अत्यंत हुशार, बोलक्या, बुद्धीने काम करणाऱ्या आणि संस्थेबद्दल खूप अस्था! आता त्या पुणे मुक्कामी असतात.
त्यांचा मुलगा आहे तितकाच हुशार बारावीला बोर्डात आला आता अमेरिकेमध्ये आहे. बाई आणि त्यांचे मिस्टर यांची वर्षातन एकदा अमेरिका वारी असते. त्यांनी परवा सांगितलेला अनुभव…
– – त्या म्हणाल्या, ” बाई मी मुंबई एअरपोर्टवर गेले.. तिकीट कलेक्ट करण्याच्या रांगेत उभारलो पासपोर्ट चेकिंगला दिले आणि चेक करणारा माणसाने आम्हाला सांगितले की जरा बाजूला येऊन थांबा… “त्या म्हणाल्या, ” माझ्या काळजाचा ठोका चुकला आता काय झाले? “साधी मध्यमवर्गीय माणसं असं काहीतरी झालं की घाबरणारच ना! त्या म्हणाल्या, पाच मिनिट माझा जीव वर खाली झाला त्या पस्तीस वर्षाच्या माणसाने आम्हाला बाजूला थांबून घेतले व पलीकडच्या रूम मध्ये नेऊन त्याने विचारले की आपण कुठे राहत होता त्यावर बाई म्हणाल्या मी सोलापुरात होते. तो म्हणाला मी तुम्हाला कुठेतरी पाहिले…? बाईंचा जीव थोडासा भांड्यात पडला…! त्या म्हणाल्या मी मोदीत राहत होते. तुम्हाला नाही मी तिथे नाही पाहिले मग त्या म्हणाल्या मी सेवा सदन संस्थेमध्ये बऱ्याचदा गेलेली आहे… कारण त्या आमच्या शाळेचे भांडार चालवत होत्या.. नाही माझा सेवा सदनशी काही संबंध नाही. मग त्या म्हणाल्या मी तडवळकर ट्रस्टमध्ये काम करत होते. मग बरोबर तिथेच मी तुम्हाला पाहिले तुम्ही पानसरे मॅडम आमचा फॉर्म तुम्ही भरला होता.
– – आणि मग तो भरभरून बोलू लागला. ” बाई तडवळकर ट्रस्ट मध्ये माझी दहावी झाली म्हणून आज मी या ठिकाणी आहे नाहीतर माझे काय झाले असते माहिती नाही आज मी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करीत आहे माझ्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळाली ती केवळ नापासांच्या शाळेमुळे शिकलो आज मी 10 कर्मचाऱ्या ंवरती काम करतो तुम्हाला भेटून मला खूप आनंद वाटला, सगळ्या पहिल्या गोष्टी आठवल्या खरंतर मला तुम्हाला चहा वगैरे देण्याची इच्छा आहे परंतु मला एवढा वेळ देता येत नाही” त्याने त्यांची तिकिटे पासपोर्ट वगैरे लगेच दिले.
बाईना इतका आनंद झाला.. की तडवळकर ट्रस्टचे विद्यार्थी आज यशस्वीरित्या आयुष्यामध्ये काहीतरी करत आहेत नापास मुलांना शिकवून काय करायचे? ते काय दिवे लावणार? अशा गोष्टी आमच्या कानावर यायच्या पण त्याकडे आम्ही सगळेच जण दुर्लक्ष करीत असू लोक म्हणायचे सुद्धा व नापास झालेले कुठे पास होत असतात का? पण आम्ही नेटाने ते काम 35 वर्षे चालू ठेवले आणि मग त्याची अशी सुमधुर फळ कुठे कुठे चाखायला मिळतात छान वाटतं आनंद होतो त्यांनी हा किस्सा माझ्याबरोबर शेअर केला आणि तो मी अभिमानाने तुमच्यासमोर मांडत आहे.
– – सगळंच वाईट नसतं सगळंच कधी संपत नसतं आपला विश्वास चांगुलपणावर हवा आणि त्या दिशेने काम करत राहायचं! देणार तो आहे तो काहीतरी चांगली फळे देतोच यावर श्रद्धा ठेवायची…!
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





