नीता कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ “आजारपणाची गंमतगोष्ट…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आमच्या लहानपणी साधं सरळ आयुष्य होतं. ब्रेकफास्ट म्हणजे फोभा, फोपो किंवा पोहे… अगदी क्वचित कधीतरी रविवारी वडील पाव आणायचे. मग त्या दिवशी आम्हा तिन्ही भावंडांना चहा मिळायचा.
इतर वेळेस आई सांगायची, ” लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो. “
यावर का? कशाला? वगैरे प्रश्न आम्ही विचारत नव्हतो. कारण वडीलधारे सांगतात ते बरोबरच असणार ही खात्री होती.
जेवणात पोळी, भाजी, भात, वरण थोडीशी कोशिंबीर. सकाळचं राहिलेलंच रात्री खायचं. त्याच्या जोडीला मुगाची खिचडी नाहीतर डाळ फळ… पानात टाकायचं नाही आणि वाया घालवायचं नाही हा नियमच होता.
त्या काळी सगळेच जण असं साधं सात्विक अन्न खात असल्याने आजारपण कोणाला फारसे नसायचेच.. आणि झाले तर अगदी साधे आजार होत असत. लगेच त्यावर आजीचे घरगुती उपचार सुरू व्हायचे…
पोट दुखण… हा आजार मधून मधून व्हायचा. त्यावर कधी, काय, किती खाल्लंय याचा विचार करून आई आणि आजी कुठलं औषध द्यायचं ते अचूक ठरवायच्या.
कधी ग्लासभर लिंबाच सरबत आजी द्यायची. वर बजावून सांगायची, ” घटाघटा पिऊ नको. थोडं थोडं थांबून घे. “
आता लक्षात येतं.. साखर, मीठ, पाणी म्हणजे ते ओरल सलाईनच असायचं. रात्री थोडंसं दूध घातलेली साबुदाण्याची खीर द्यायची. त्याने दुसरे दिवशी पोट एकदम बरे व्हायचे.
दुसरा इलाज म्हणजे तिखट बाळांतशेपा चावून खायला सांगायची. ते नको म्हटलं की उकळून त्या पाण्यात साखर घालून द्यायची.
ओवा भाजून तो हातावर चोळून लहान मुलांच्या पोटाला चोळायची. त्यानी कुरकुरणारं बाळ शांत झोपायचे.
गरम दुधात तूप घालून द्यायची. त्यांनी पोट मऊ पडतं(म्हणजे काय होत कोण जाणे) असं ती सांगायची. त्या दोघी हे कुठून शिकल्या याच आम्हाला आश्चर्य वाटायचं.
खोबरेल तेल तर बहुऊपयोगी होते. कान दुखला की चार थेंब कानात, लहान मुलांचे पोट दुखलं की कोमट करून ते बेंबीत थोडं थोडं घालायचं. केस चांगले वाढण्यासाठी रविवारी अंघोळीच्या आधी केसांना भरपूर खोबरेल तेल लावायचं. नंतर एक तासाने शिकेकाईनी केस धुवायचे.
थंडीत तेल पायाला लावायचं… तेच आमचं स्क्रीन लोशन असायचं. आणि गंमत म्हणजे त्याचे कुठले साईड इफेक्ट कधी व्हायचे नाहीत.
घसा दुखत असला की लवंग भाजून पूड करायची ती मधात खलून त्याच चाटण करून द्यायची.
सुंठ पूड विकत मिळायची. पण ती महाग असायची. आजी घरीच खलबत्त्यात सुंठ कुटायची. गरम पाण्यात साखर, सुंठपुड घालून ती प्यायला द्यायची. गवती चहा पाण्यात घालून त्याच्यात अजून काही काही घालून त्याचे काढे आम्हाला प्यायला द्यायची.
एवढ्या तेवढ्याला डॉक्टरांकडे जायचं नाही हे ठरलेलं असायचं. ताप आला तर मात्र डॉक्टरांना दाखवायच.
जवळच सिंधूताई आपटे यांचा दवाखाना होता. त्यांच्याकडे गेलं की त्या आ करायला सांगून जीभ बघायच्या. श्वास आत बाहेर करायला सांगून छाती तपासायच्या. बसं ईतकच… लगेच त्यांच्याकडच्या तयार असलेल्या पांढऱ्या गोळ्यांच्या पुड्या द्यायच्या. सोबत औषधाची बाटली… त्यावर शंकरपाळ्याच्या आकाराचा पांढरा कागद डोस किती घ्यायचा याच्या खुणेसाठी चिटकवलेला असायचा. त्यातल लालसर गोड औषध आम्हाला फार आवडायचं. दोन दिवसात ताप गायबच व्हायचा.
खेळताना भावाचा पाय मुरगळला आणि सुजला होता. आईनी लगेच रक्तचंदनाची बाहुली सहाणे वर उगाळायला घेतली. त्याचा घट्ट लेप भावाच्या पायाला लावला. ” जसजसं वाळेल तसं आकसून सूज आपोआप कमी होईल. “ती म्हणाली आणि खरंच तीन-चार दिवस लेप लावल्यानंतर सूज उतरूनच गेली.
कधी पाय दुखायला लागला की आजी तिळाच तेल लावून चोळायला सांगायची. घसा दुखत असला की गरम हळद दूध ती देत असे.
“गरम तव्यावर फडक गरम करून त्याने छाती शेकली की कफ सुटतो आणि खोकला लगेच बरा होतो. “आजी हे इतकं ठामपणे सांगायची की आम्हाला ते ऐकूनच बरं वाटायला लागायचं.
पाळी आली की पोटात दुखतय म्हंटलं तर आई सांगायची,
“प्रत्येक बाईला त्या दिवसात दुखत असतं. बाईंनी तेवढं सहन करायला शिकायलाच पाहिजे. त्यासाठी औषध घ्यायचं नाही. पुढं बाळंतपणाच्या कळा सोसायला बाईच शरीर तयार होत असतं. ” आईच्या या वाक्याचा अर्थ पुढे फार उशिरा कळला.
सायकल शिकताना गुडघे फुटणार.. हे इतकं गृहीत धरलं होतं की त्याचं काहीच वाटायचं नाही. नुसतं पाण्याने धुऊनही गुडघे बरे व्हायचे.
वर आजी म्हणायची, ” पडो झडो माल वाढो”.
वडिलांची पाठ दुखायला लागली की ते भिंतीजवळ पालथे झोपत. मग मी भिंतीचा आधार घेऊन त्यांच्या पाठीवर ऊभ राहून इकडे तिकडे अस करत चेपुन देत असे. आता हा ऊपचार आठवला तरी गंमत वाटते.
सकाळी झालेला आजार आजीच औषध घेऊन संध्याकाळी एकदम बरा होऊन जायचा. शाळा बुडवली असेल तर आज बाईंनी काय शिकवलं ते विचारायला संध्याकाळी मैत्रिणीकडे पळायच. इतक सोप जगणं होत.
आत्ताही बरं वाटलं नाही की आई आजींची औषधचं आधी मी घेऊन बघते…
त्या औषधात माया, आपुलकी, प्रेम होतं. त्या औषधाने मला बरं वाटणार… ही श्रद्धा पण होती. शरीराला मनाची साथ असल्याने आजार बरे व्हायचे. आईच्या उबदार कुशीत झोपताना आईचा हात कपाळावरून फिरला की निम्म दुखणे तिथेच पळून जायचं…
किती गोड दिवस होते ते…
म्हणूनच त्या आठवणी आज तुम्हाला वाचण्यासाठी पेटीतून बाहेर काढल्या…
☆
© नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




