तृप्ती कुलकर्णी
🪷 मनमंजुषेतून 🪷
☆ ज्याचा त्याचा नरसिंह आणि…☆ तृप्ती कुलकर्णी ☆
ज्याचा त्याचा नरसिंह आणि – – –
– – – ज्याचा त्याचा हिरण्यकश्यपू !
नरसिंह म्हटलं की सगळ्यात प्रथम डोळ्यापुढे येते ती अत्यंत नम्रपणे हात जोडून लीन आणि कृतज्ञ भावनेने उभी असलेली भक्त प्रल्हादाची मूर्ती. आणि त्यानंतर मग आठवायला लागते ती भक्त प्रल्हाद, हिरणकश्यपू, आणि नरसिंह यांची सुप्रसिद्ध गोष्ट. लहानपणापासून अनेकदा गोष्टी रुपात वाचलेली, कधी प्रवचनात ऐकलेली ही गोष्ट मनावर इतकी बिंबली गेली आहे की नुसतं नरसिंह म्हणलं तरी संपूर्ण गोष्ट पटकन आठवते. लहानपणापासूनच आजही या गोष्टीचा माझ्या मनावर असलेला प्रभाव किंवा पगडा हा तसाच आहे. फक्त याच्यामध्ये केवळ शब्दशः भाव न पाहता, त्याच्या चमत्काराकडे न पाहता त्या घटनेची व्यक्तिगत जीवनाशी कशी सांगड घालता येईल असा विचार मनात सुरू झाला. एखाद्या परंपरागत गोष्टीचे किंवा कथेचे, प्रसंगाचे, नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांमधले संदर्भ हे जसेच्या तसे राहतातच असे नाही. तर ते त्या त्या काळाप्रमाणे प्रवाही होत राहतात किंबहुना रहायला हवेत तरच ती श्रद्धा किंवा तो भाव हा टिकून राहू शकतो.
आतापर्यंत वेगवेगळ्या उदाहरणांमधून परमेश्वराचं अस्तित्व हे चराचरात व्यापलेलं आहे, अणूरेणूत आहे असे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. त्यामुळे खांबामधून नरसिंह प्रगट होणं ही गोष्ट आपल्याला चमत्कारी वाटली तरी त्याचा सद्यस्थितीत काय महत्त्व असेल. हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली यामध्ये खांबच का? असा प्रश्न मनात निर्माण झाला. केवळ भक्त प्रल्हादाने ‘होय इथेही आहे’ असे सांगितले म्हणून की या खांबाचं काही वेगळं महत्त्व असावं. हा विचार करताना जाणवलं की खांब ही गोष्ट म्हणजे कुठल्याही इमारतीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. खांबाच्या जोरावर संपूर्ण इमारत व्यवस्थितरित्या तोलली जाते. तिला एक सौंदर्य प्राप्त होतं. खांब जितके अधिक तितकी ती वास्तू बळकट मानली जाते. त्यामुळे हा खांब हा फक्त एक वास्तू मधला घटक नसून तो त्याला सौंदर्य देणारा, आधार देणारा असा त्याचा कणाच मानला गेला पाहिजे. आता इथे हा खांब जर प्रतिकात्मकरित्या मानायचं झाला तर तो श्रद्धेचा खांब म्हणता येईल.
मानवी जीवनामध्ये श्रद्धेशिवाय कोणत्याच गोष्टी साध्य होत नाही. इथे श्रद्धा हा शब्द फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक अर्थाने न घेता तो एक वेगळा आणि व्यापक स्वरूपात घ्यायला हवा. तो म्हणजे श्रद्धा ही प्रत्येक कृतीमध्ये असते. अमुक एक प्रकारची घटना घडेल असं मानून वर्षानुवर्षे प्रयोग करत राहणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मनातसुद्धा आपल्या प्रयोगाबद्दल सश्रद्ध भावच असतो. अन्यथा यातून यश मिळेल किंवा नाही याची खात्री नसताना वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीवर चित्त केंद्रित करून प्रयोग करण्यात कुणालाही काय स्वारस्य वाटलं असतं. श्रद्धाच असते की जी परिणाम काय होईल याचा विचार न करता तुम्हाला आतून सतत कार्यरत ठेवते. त्यामुळे तिला कुठल्याही एका दृष्टीतून बघणं म्हणजे तिच्यावर आणि पर्यायाने स्वतःवरही अन्याय केल्यासारखं आहे.
तर हा श्रद्धा रुपी खांब भक्त प्रल्हादाचा डळमळीत करणं हा हिरण्यकश्यपूचा मुख्य उद्देश होता. म्हणून त्याने त्या श्रद्धेच्या खांबालाच लाथ मारून तो पाडण्याचा, नाहीसं करण्याचा प्रयत्न केला. पण इथे प्रल्हाद इतका अढळ, अचल होता की त्याच्या श्रद्धेनेच परमेश्वराला किंवा त्या ईश्वरी शक्तीला आवाहन केलं आणि ती साक्षात प्रगट झाली. म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट काय तर श्रद्धा ही इतकी दृढ हवी, ठाम हवी की एखाद्या गोष्टीच्या प्रत्यक्षात असण्यानसण्याने ती नाहीशी व्हायला नको. आणि जेव्हा अशी श्रद्धा अढळ असते तेव्हा आपल्याला त्यातून अपेक्षित ते ध्येय गाठता येतं, साध्य साधलं जातं. माझ्यासाठी गोष्टीतलं हे सार फार महत्त्वाचं आहे.
गोष्टीमध्ये भक्त प्रल्हाद असो वा हिरण्यकश्यपू या दोन्हीही फक्त व्यक्तिरेखा असल्या तरी केवळ त्यादृष्टीने न पाहता त्या स्वतंत्र वृत्ती म्हणून पहिल्या तर जाणवतं की यांचा झगडा अनंत काळापासून चालू आहे. आणि या दोन्ही वृत्तींचा अंश प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना आहे. त्यामुळे आपल्या एखाद्या सत्कार्यात काही अडचणी निर्माण झाल्या आणि आपण त्या अडचणींचाच विचार करून निराशेच्या गर्तेत चुकीच्या दिशेने जाऊ लागलो, तर समजावं आपल्या मधला हिरण्यकश्यपू जागा झाला आहे. आणि त्याला नाहीसा करण्यासाठी चांगल्या सकारात्मक विचारांशी, श्रद्धेची, कृतज्ञतेची भावना मनात निर्माण करणे गरजेचे आहे. जी भावना प्रल्हादाच्या मनात होती आणि त्यामुळेच तो आपल्या संकटावर मात करू शकला. माझ्यासाठी चमत्कार याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती घडून येणार परिवर्तन. जे दीर्घकाळ टिकतं. प्रल्हादाच्या जीवनावरच्या संकटाच्या समयी त्याच्या या दृढ भावनेने प्रत्यक्षात तो घडला आणि त्याचा जीव वाचला. पण असा हा चमत्कार एकाएकी घडलेला नसून तो त्याच्या अढळ, अविचल आणि निरंतर असणाऱ्या श्रद्धेमुळे घडला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे नरसिंहांनी येऊन संकटाचा नाश करावा असं जर मनापासून वाटत असेल तर भक्त प्रल्हाद होण्याला पर्याय नाही. ते होता यावं हीच इच्छा!
© तृप्ती कुलकर्णी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





