शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ आठ आणेवाले आणि मोफत कोचिंग… ☆ शीला पतकी ☆
☆
इयत्ता आठवी ड चा वर्ग… सहामाहीचे पेपर वाटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि गणितात नापास… कारण या विद्यार्थिनी बाहेरच्या शाळेतून आलेल्या… जिथे इंग्रजी फारसे करून घेतले जात नाही… आणि गणिताची तितकी तयारी नसते. या वर्गाला शिकवणारे आम्ही दोन शिक्षक मी आणि डॉक्टर पार्वतीबाई मोहोळकर !.. दोघी आम्ही मेहनती, मुलींबद्दल कळवळा, प्रेम, आपल्या विषयात तयार असल्या पाहिजे याची जाणीव. हे सगळं आमच्या दोघींकडे होतं. मग आम्ही ठरवलं की यांचं कोचिंग घ्यायचं. कोचिंगला सकाळी या मुली लवकर येत नाहीत कारण या मुलींना घरामध्ये कामाला खूप गुंतवले जाते. अतिशय खालच्या वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांनी असतात एकल पालक विद्यार्थिनी. पैशाची चणचण आणि मुलीला कुठेतरी कामाला लावलेले असते. त्यामुळे तिला सकाळी वेळ नाही. मग आम्ही ठरवलं शाळा सुटल्याबरोबर वर्गात घुसायचे एकाही मुलीला घरी जाऊ द्यायचं नाही पालकांना तशी कल्पना दिली होती आणि गुरुदक्षिणा म्हणून वर्गाला एक रुपया फी ठेवली होती. तीन दिवस मोहोळकर बाई इंग्रजी शिकवायचे आणि तीन दिवस मी गणित करून घ्यायची. मुलींना हा तास बुडवता येत नव्हता. अगदी बेसिक पासून आम्ही शिकवायला सुरुवात केली त्यामुळे मुलींना समजायला लागलं त्या शंका विचारायला लागल्या आणि त्यानंतरच्या नऊमाही परीक्षेमध्ये थोडी प्रगती झालेली दिसली. त्यांचाही उत्साह वाढला आमचाही उत्साह वाढला. आणि वार्षिक परीक्षेला मात्र त्या मुलीने कमालच केली सर्व मुलीने उत्तम गुण मिळवले होते आता एक चार दोन असतात ते सुधारत नाहीत ते सोडले तर बाकी सगळ्या मुलींनी चांगले मार्क मिळवले चांगले म्हणजे त्यांच्या दृष्टीने जिथे आज सात आठ दहा पंधरा मार्क पडायचे तिथे ते 40 45 50 पर्यंत गेल्या मुख्य म्हणजे त्यांना विषयाची गोडी लागली, आणि आम्हाला खात्री पटली की आता या दहावीपर्यंत नापास होणार नाहीत. या वर्गाला असणारी एक रुपया फि. वर्गांची संख्या 50 ते 55. शेवटचा वर्ग असायचा. साधारणपणे महिन्याला चाळीस एक रुपये जमायचे. बाकी काही गरीब विद्यार्थीना रुपयाही माफ होता. त्यातले 20 डॉक्टर पार्वती बाई मोहोळकर आणि वीस शीला पत्की अशी वाटणी व्हायची. वीस रुपये फी मिळत असताना आम्ही तीन दिवस एक तास जीव तोडून शिकवत होतो त्या तर बाई पीएचडी करत होत्या.
दुसरी घटना मी मुख्याध्यापक झाल्यावर रिझल्ट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दहावी वर प्रयत्न सुरू झाले दहावीत जातानाच सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी एका वर्गात घातल्या जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून ठोस काही करून घेता येईल. त्या सर्व मुलींच्या पालकांची मीटिंग बोलवली आणि त्यांना सांगितले की आम्ही या वर्गाला कोणतेही शुल्क घेणार नाही. फक्त मुलींना सकाळी बरोबर आकरा वाजता पाठवा. पालकांची मीटिंग झाली ह्या मुलींवर आता काम केले तर त्या सहज दहावी पास होऊ शकतील असा विश्वास आम्ही पालकांना दिला. कारण त्यावेळेला वीस मार्काच्या कुबड्या नव्हत्या. पालकांनाही कल्पना पटली एक महिना हा वर्ग चालू ठेवला तेव्हा बऱ्याच विद्यार्थिनी उशिरा येत होत्या किंवा आल्या तर बाहेर बसायच्या असे चालू झाले. पुन्हा एकदा विद्यार्थिनी आणि पालक यांची एकत्रितरित्या मीटिंग घेतली. त्यामध्ये एक अडाणी असलेल्या पालक बाई म्हणाल्या,
“मी या सगळ्याची जबाबदारी घेते रोज अकरा वाजता मी येऊन शाळेपाशी बसते एकही मुलगी इकडे तिकडे फिरणार नाही सगळ्या आत जातील ही जबाबदारी मी घेते आणि त्या बाईने मुलींना एक लेक्चर दिले अगदी… का ग टिंब टिंब नो एवढी शाळा तुमच्यासाठी काय काय करायली,… ही बाई एवढं तळमळून सांगायली… अन तुम्हाला नग वाटते होय ग… आमच्या काळात शिक्षण नव्हतं म्हणून आमची अशी तरा झाली… तुम्हाला एवढ आम्ही शाळेत घातले चांगले शिका की
… मग बसाल आमच्यासारख्या भाकऱ्या थापत अन शेण लावत. अगं पोरींनो तुम्ही पास झाला तर तुमच्या आई बाचं नाव होईल ह्या बाईचं नाव होणार आहे का ?ऐका जरातेवढी तळमळून सांगायला लागली “
झालं या भाषणा नंतर सभेचा नूरच बदलला प्रत्येक पालकाने आपल्या मुलीची जवाबदारी घेतली वर्ग व्यवस्थित सुरू झाले आणि त्यावर्षीचा रिझल्ट सेवासदन च्या आत्तापर्यंतच्या रिझल्ट मध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्के लागला तेव्हा एवढे रिझल्ट लागत नव्हते आणि कॉपी वगैरे प्रकरणं फार प्रचलित नव्हती आणि आमच्या शाळेत तर नाहीच नाही.
हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आज एक बातमी वाचली 45 हजार रुपये देणाऱ्यांनाच मोटेगावकर प्रश्न देत असत.
फुकट शिकवल्यावर किंमत नसते म्हणून 1रू घेऊन महिनाभर शिकवणारे आम्ही शिक्षक आणि त्याला गुरुदक्षिणा हे भक्कम नाव देणारे… आणि शाळेचा निकाल उत्तम पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी मुलींच्या वर्गाचे नियोजन करूनमोफत शिकवणारे आमचे शिक्षक त्याला सहकार्य करणारे पालक या सगळ्या घटना 20-22 वर्षांपूर्वीच्या आहेत 22 वर्षांमध्ये एवढ अधःपतन व्हावे याचे वाईट वाटले…!
आता तुम्ही म्हणाल तुमचं काय नीट च नव्हतं पण आमचं त्या गरीब मुलींचं नीट व्हावं म्हणून तरी नक्कीच होतं
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




