श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर

“पुण्यात पाणी कपात आणि चक्क डाव्या हाताने पुण्य कर्म”

आपल्या डाव्या हाताला छान पुण्य कर्म करण्याची संधी लाभणार आहे.

देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन्ही अगदी तंतोतंत सारखे आहेत, तरीपण का ते माहित नाही, आपण सगळेच जण उजव्या हातावर जास्त प्रेम करतो.

जेवण उजव्या हाताने करतो,

देवाची पूजा करताना देवाला गंध लावणे; हळदीकुंकू वाहणे; फुलं वाहणे; हे सगळे उजव्या हाताने करतो,

कुणी प्रसाद दिला तर तो उजव्या हातावर घेतो, दानधर्म उजव्या हाताने करतो, वगैरे वगैरे.

आणि आपण डाव्या हाताला फक्त टॉयलेट मध्ये असतानाच न आवडणारे काम देतो.

आता डाव्या हाताला पुण्य कर्म करायला देण्याची पुणेकर मंडळींना छान संधी येत आहे.

कशी ते आता बघू –

येत्या सोमवारपासून म्हणजे १५ जून पासून नळाला पाणी एक दिवसाआड येणार आहे. म्हणजे पाणी वाया न घालवता वापरले तरच साठवलेले पाणी दोन दिवस पुरणार आहे. आणि पाणी वाया न घालवणे हे छानच पुण्य कर्म आहे.

आपल्या घरांमध्ये पाणी कुठे कुठे वाया जाते याचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात येईल, बेसिन च्या नळांमधून दिवसभरात खूप पाणी वाया जात असतं.

दिवसातून आठ ते दहा वेळा आपण प्रत्येक जण नक्कीच वॉश बेसिन पाशी जातो.

सकाळी उठल्यावर दात घासणे, काही खाल्ल्यानंतर /जेवल्यानंतर तोंड धुणे; चुळा भरणे, मधून मधून चेहरा स्वच्छ करण्याकरता चेहऱ्यावर पाणी मारणे, मधून मधून नाक शिंकरणे, वगैरे वगैरे.

आणि आपल्या बहुतेकांची सवय अशी असते, की, बेसिन जवळ जायचे, नळ सुरु करायचा (काहीजण तर नळ अगदी फुल उघडतात) आणि वर दिल्याप्रमाणे दात घासणे, वगैरे कार्य करायचे आणि मग चेहरा बघायचा, आ करून जीभ बघायची / मान डावीकडे उजवीकडे वळवून आपण छान दिसतोय ना, हे बघायचे आणि शेवटी बेसिनचा नळ बंद करायचा.

थोडक्यात काय, तुमचं काम छान होते, पण ज्या कामा करता अर्धा मग पाणी पूरलं असतं, त्याकरता चार-पाच मग पाणी ड्रेनेज मध्ये जात असतं.

बहुतेक जण बेसिनचा नळ पूर्ण का उघडतात हे कोडेच आहे. आपल्याला एका हाताच्या ओंझळीत मावेल एवढेच पाणी प्रत्येक वेळी घ्यायचे असते, त्याकरता अगदी बारीक नळ पण चालतो. (प्रत्येक बेसिनच्या खाली एक कॉक असतो. आपण सगळ्यांनीच तो कॉक कायम अर्ध्याच्या वर बंद करून ठेवावा म्हणजे बेसनची धार आपोआपच लहान येते. हे जरूर करा).

आता तुम्ही म्हणाल की डाव्या हाताला पूण्य कर्म कसे करायला मिळणार.

सांगतो – 

बेसिन पाशी गेल्यानंतर डावा हात नळावर ठेवायचा. जेव्हा जेव्हा उजव्या हातावर पाणी घ्यायचे असेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाव्या हाताने नळ उघडायचा, ओंजळ भरली की डाव्या हाताने प्रत्येक वेळी नळ बंद करायचा. जोपर्यंत आपण बेसिन जवळ आहोत तोपर्यंत डावा हात नळावरच ठेवायचा.

म्हणजे आपण डाव्या हाताने काय केले आहे – पाहिजे तेव्हा नळ सोडला, नको तेव्हा नळ बंद केला. आणि यामुळे भरपूर पाण्याची बचत होणार आहे. आणि ती पण रोजच्या रोज, आणि घरामधल्या प्रत्येकाकडून.

पाणी वाचवणे / वाया न घालवणे हे पुण्य कर्म नक्कीच आहे.

आज करून बघा.

जलदेवता खुश होईल, आपल्याकडून पुण्य कर्म होत आहे म्हणून डावा हात खुश होईल, शरीर देवता पण खुश होईल. आपल्या वास्तूमध्ये हे पुण्यकर्म होत आहे म्हणून वास्तुदेवता पण खुश होईल.

वाचवलेल्या पाण्यामुळे काही लोकांची तहान भागणार आहे त्यामुळे निसर्ग देवता पण खुश होईल, आणि वरच्या देवता पण खुश होतील…

एखादी गोष्ट सतत एक महिना केली तर ती सवय लागते असे म्हणतात. पुण्यामध्ये एक दिवसाआड पाणी बंद हे महिनाभर नक्की चालू राहणार.

अशा रीतीने एक दिवस पाणी बंद यामुळे आपल्याला अगदी सोप्या रीतीने पुण्य कर्म करत राहण्याची सवय लागणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी पाणी बंदी नाही, त्यांनी पण ही सवय जरूर लावून घ्यावी, आणि पुण्य कर्म करत राहावे… आणि खुश रहावे.

खुशिया ही खुशिया हो,

दामन में जिसके,

क्यू ना खुशी से वो दिवाना हो जाये…

आणि याकरता करायचे काय आहे – तर काहीही कारणाकरता बेसिन जवळ गेल्यावर डावा हात बेसिनच्या नळावर ठेवणे, पाहिजे तेव्हा नळ उघडणे आणि नको तेव्हा बंद करणे.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted