उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कसा सापडला कार्व्हर?” लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

पुस्तकामागच्या गोष्टी

एक होता कार्व्हर 

 प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीची काही ना काही गोष्ट ही असतेच. मराठी मनावर गेली 45 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या निर्मितीमागे ही काही रंजक गोष्टी आहेत..

 राजहंसप्रकाशन

पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवी आवृत्तीनिमित्त खास काही आठवणी तुमच्यासाठी..

प्रसन्ना ठाकूर पानसे.

त्याचं झालं असं की आपल्या मुलांना रात्री झोपताना गोष्टी सांगाव्यात, यासाठी वीणाताई व त्यांचे पती (चंद्रकांत गवाणकर) नवनवीन पुस्तकं शोधत. एके दिवशी त्यांचे पती कार्व्हरवरचं इंग्रजी पुस्तक घेऊन आले. वीणाताईंनी त्यातल्या गोष्टी रात्री झोपताना मुलांना सांगायला सुरुवात केली. नेहमी गोष्टी सांगताना झोपणारी मुलं टक्क जागी राहिली.. आई.. पुढे काय झालं गं त्याचं? असं विचारत मुलांचे डोळे झरू लागले.. हे डोळे झरणे, मुलांना इतकी उत्कटता वाटणं, हा ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचं मूलस्थान सापडण्याचा क्षण होता..

‘तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा, “

या चिं. त्र्यं. खानोलकर (#आरती_प्रभू)च्या ओळींप्रमाणे वीणाताईंच्या हाती गंधार सापडला होता…

त्यानंतर अनेक इंग्रजी पुस्तकं, संदर्भ ग्रंथ वाचत वीणाताई माहिती मिळवू लागल्या. आई आणि मुलांच्या गोष्टीतलं हे पुस्तक कागदावर येत गेलं. ही नव्या प्रवासाची नांदी होती… बाकी सोपस्कार आपोआप होत गेले. लिखाणाचे कागद माजगावकरांच्या ‘माणूस’पर्यंत पोहोचले.

मधल्या काळात काही घडामोडी घडल्या आणि ‘माणूस’ या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी ‘कार्व्हर’ या विषयावर लिहायचं ठरलं. दिवाळीचा मूड लक्षात घेता संपूर्ण दिवाळी अंकात कार्व्हरची संघर्षगाथा मांडावी का? #मराठी माणसाला सातासमुद्रापारचा कार्व्हर आपलासा वाटेल का? अशा अनेक शंका माणूसचे संस्थापक श्री. ग. माजगावकर आणि दिलीप माजगावकर यांच्या मनात आल्या. प्रयोगावर भर देणार्‍या ‘माणूस’ मांसिकाने वेगळी वाट चोखाळायची ठरवली. दिवाळीचा संपूर्ण अंक ‘कार्व्हर’ या विषयावरच निघाला. ऐन दिवाळीत हा अंक उजळून गेला.

तो अतिशय लोकप्रियही ठरला. कित्येक महिने वाचकांची अभिप्रायाची पत्रं ‘माणूस’च्या कार्यालयात येत होती. सुरुवातीलाच ‘कार्व्हर’ला अशी अफाट लोकप्रियता मिळाली.

१९८१ मध्ये यावर पुस्तक काढायचं ठरलं. #दुर्गाभागवत यांनीही या सुमारास ‘कार्व्हर’वर लिहिलं होतं. पण आपल्यापेक्षाही वीणा गवाणकर यांना तो (कार्व्हर) सहजतेने उमगलाय, लिखाणाचा सूर सापडलाय, तेव्हा वीणाताईंनीच हे पुस्तक लिहावे, असा आग्रह दुर्गाबाईंनी धरला. एक लेखकानं दुसऱ्या लेखकाला समजून घेतलं तर किती उत्तम साहित्यकृती जन्माला येते याचं हे उत्तम उदाहरण.

दरम्यानच्या काळात #पुल देशपांडे यांना वीणाताईंनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले,

“हे पुस्तक लोकप्रिय ठरेल. पुस्तक स्वतःच्या पायांवर चालणारं आहे. त्याला कुणाच्या प्रस्तावनेच्या कुबड्यांची गरज नाही. “. त्यांच्या पत्रातील मजकूर मलपृष्ठावर छापण्याची परवानगी वीणाताईनी मागितली. त्यांनी उदारमनाने ती दिली. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवर ते पत्र छापलेलं आहे.

पुलंपासून सामान्यातल्या सामान्यांपर्यंत सर्व वयोगटातल्यांना सातासमुद्रापारचा ‘कार्व्हर’ आपला वाटू लागला. त्याच्या कथांनी मराठी माणसाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, त्याच्या संघर्षातून प्रेरणा मिळू लागली. अपयश आलं, एकटं वाटलं, की हातात ‘कार्व्हर’चं पुस्तक येऊ लागलं. ते कधी मित्र बनलं तर कधी मार्गदर्शक (सेल्फ हेल्प बुक) झालं. मराठी माणसाच्या घराघरात हृदयात विराजमान झालं.

#अक्षरधारा च्या रसिकाताई राठिवडेकर सांगतात, की ‘कार्व्हर’ हे पुस्तक विकलं जात नाही, असा दिवस जात नाही.

बघा बरं. आजच्या पुस्तक आल्यानंतरच्या ४५ वर्षानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. जेव्हा पुस्तक माणसाच्या मनामनात पोहोचतं, त्याला ते आपलं वाटतं, तेव्हा ती कलाकृती फक्त लेखकाची राहात नाही, तर आपल्या सर्वांची बनते. खरं सांगायचं तर लेखकाच्या आयुष्यात यापेक्षा आनंदाचा क्षण तो कोणता?

राहून राहून वाटतं या ‘कार्व्हर’ नावाच्या माणसाचं. तो बिचारा आयुष्यात स्वतःचं असं काही घेऊन आला नाही. आई ज्यानं पाहिली नाही, जन्मगाव नातलग कोणी नसलेलं ‘मेरी’चं पोर आयुष्यभर सर्वांना भरभरून देत गेलं. किती भाग्यवान ते अमेरिकेचे लोक.

आणि हो. ‘कार्व्हर’नं लेखिका प्रकाशकांनाही भरभरून दिलं. वीणाताईंनी त्यानंतर १५ पुस्तकं लिहिली आणि ती लोकप्रियही झाली. ‘#राजहंसप्रकाशन’ च्या गौरवशाली वाटचालीतलं ‘कार्व्हर’ हे मानबिंदू ठरलं. लेखक- प्रकाशक दोघांनी पुस्तकविक्रीतून मिळालेला मोठा भाग समाजासाठीही अर्पण केला.

आता चौथी -पाचवी पिढी ‘कार्व्हर’ वाचते. जेन झी लाही हे पुस्तक आपलसं वाटतंय… गेल्या 45 वर्षात

आजूबाजूचा समाज, समाजमाध्यमं बदलली, पण ‘कार्व्हर’ची लोकप्रियता सर्व वयोगटात कायम आहे.

‘कार्व्हर’ हा ‘कार्व्हर’ होता. एकमेवाद्वितीय होता, हे मान्य करावंच लागेल. आज अनेकदा आपल्या आयुष्यात प्रचंड निराशेचे, उदासीनतेचे क्षण येतात. सारं काही संपलं, असं वाटतं. त्या क्षणी या पुस्तकाचं कोणताही पान उघडलं आणि वाचलं की आपण पुन्हा सकारात्मक विचारांकडे वळतो.

कधीतरी वाटतं, या ‘कार्व्हर’वर #चित्रपट किंवा #नाटक अशी कलाकृती तयार व्हायला हवी होती.. पण नंतर

मनात विचार आला.. काहींच्या आयुष्यात, संघर्षात इतकी नाट्यमयता असते की चित्रपट फिका वाटावा. नाटकातली आभासी नाट्यमयता कमी पडावी.

या पुस्तकात वीणाताईंनी अनेक शब्दांपलीकडच्या गोष्टी मांडल्या आहेत. आपल्या मनात त्याचं चित्रीकरण होत राहतं. वाचताना प्रत्येकाच्या मनात त्याचा त्याचा म्हणून ‘कार्व्हर’ सापडत जातो.. अणि तो चिरंतन राहो..

* * * *

लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments