श्री जगदीश काबरे

☆ “पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…☆ श्री जगदीश काबरे ☆

मृतवत झालेल्या संस्कृत भाषेतील एका वाक्याचाही धड अर्थ न सांगता येणारे म्हणतात की संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी. त्या दांभिकोत्तमांना पु ल देशपांडे यांनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या भाषणातून जे सणसणीत आणि खणखणीत उत्तर दिले आहे ते असे…

‘भाषेच्या बाबतीतसुद्धा काही संकेत ठरून गेले. तुकोबांची मराठी चेपली गेली आणि पंतकाव्याचा मराठी गद्य आणि पद्य अवतार मान्य झाला. सभ्यतेचं नातं आशयाशी न जुळता संस्कृतप्रचुर भाषेशी जुळलं! आजही आपल्या भारदस्तपणाची सांगड मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांशीच घातली गेली आहे. खेड्यापाड्यातला नव्याने शिकलेला वर्ग तर उगीचच चांगले चांगले मराठी शब्द टाकून वर्तमानपत्रवाल्यांनी पुरवलेले संस्कृत शब्द वापरतो. आमचे पुढारी चुकलो, नेते सभेला ‘येत’ नाहीत, ‘उपस्थित’ राहतात. एके काळी इंग्रजी भाषेच्या दराऱ्यामुळे बायकोची मिसेस् झाली. तत्कालीन पांढरपेशा समाजात इंग्रजीला जे सामाजिक मोठेपण लाभलं ते आता पुन्हा नवशिक्षित बहुजन समाजातल्या प्रतिष्ठितांत संस्कृतप्रचुर मराठीला लाभायला लागलं आहे. संस्कृतवर माझा राग नाही. रेडिओवरून मी संस्कृतमधल्या बातम्या ऐकतो. इतका विनोदी कार्यक्रम मला लिहिता आला नसता. ‘डॉक्टर किसिंजरेण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चे अभिभाषणम् कृतम्’ वगैरे ऐकताना इंग्रजी आणि संस्कृतचा हा व्रात्यस्तोम पद्धतीने लागलेला विवाह पाहून मीदेखील ‘अहो ब्यूटिफुलम् एतद्! ‘ असं म्हणतो. पण हे संस्कृतचं प्रकरण इतकं साधं नाही. तिच्यामागे कोठेतरी ही देववाणी आहे या कल्पनेशी जुळलेलं नातं आहे. उर्दूच्या आग्रहात मुसलमानांचा जसा धर्माभिमान दडला आहे, तसाच संस्कृतच्या मागे आमचा संस्कृतिविषयक कल्पनांचा अभिमान दडला आहे. ‘

‘कोठेतरी आपण ह्या भाषेचं अतिमानवी शक्तीशी नातं जुळवलं आहे. त्यातून आमचे राष्ट्रवादी पुढारी संस्कृतचे अभिमानी. आश्चर्य असं की, स्वतः लोकमान्य टिळक हे संस्कृतचे पंडित असून साध्या मराठीचे पुरस्कर्ते होते. मंडालेहून सुटून आल्यावर त्यांच्यावर संपादक मंडळापैकी कोणीतरी अग्रलेख लिहिला, त्याचा मथळा होता ‘लोकमान्यांची बंधमुक्तता’! लोकमान्यांनी त्याच्यावर काट मारली आणि लिहिलं, ‘टिळक सुटले’! पण असा एखादा अपवाद सोडला तर मराठी साहित्यातल्या संस्कृतच्या ह्या जन्मसिद्ध बडेजावामुळे पुन्हा एकदा जनसामान्यांची भाषा निराळी आणि मराठी साहित्याची भाषा निराळी व्हायला लागली. पुढे इंग्लिश हे मोठेपणाचं लक्षण झालं. आजही आमच्या नवसुशिक्षित श्रीमंत मराठी समाजात आपल्या पोराच्या सुंदर मराठीचं कौतुक करण्याऐवजी तो ‘ज्याक् अॅण्ड जिल्’ किती छान म्हणतो याचंच कौतुक अधिक होतं. फुल्यांची मराठी भाषा तथाकथित सुसंस्कृत समाजाच्या मताने वाचण्याच्याही योग्यतेची नव्हती! शेतकऱ्याच्या दारिद्रयाचं फुल्यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ ह्या पुस्तकात काढलेलं शब्दचित्र केवळ भाषेच्या शैलीच्या दृष्टीनं पाहिलं तरी किती प्रभावी आहे! पण आमच्यापुढे आदर्श शैली होती चिपळूणकरांची. ‘

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted