सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
अभंग वाणीतून कळलेले संत तुकाराम
अत्यंत तळमळीने पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या मुखातून जी अभंगवाणी निघाली आहे त्यातून आपल्यासारख्या साधक भक्तांना तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडत गेले आहे.
आता तरी पुढे/ हाचि उपदेश/
नका करू नाश/ आयुष्याचा//
सकाळच्या पाया/ माझे दंडवत/
अपुलाले चित्त/ शुद्ध करा//
हित ते करावे/ देवाचे चिंतन/
करूनिया मन/ एक विध//
तुका म्हणे लाभ/ होय तो व्यापार/
करा काय फार/ शिकवावे//
तुकाराम महाराज व्यवसायाने वाणी(व्यापारी) होते. त्यामुळे भक्तांना उपदेश करताना, ज्यामध्ये तुमचे हित आहे, असाच व्यापार तुम्ही करावा असे ते बोलतात. या ठिकाणी व्यापार या शब्दाचा अर्थ कर्म असाच घेणे योग्य ठरेल.
अर्थात स्वहिताचे कर्म करावे.
*शरणागत झालो/ तेणे मी पणा मुकलो//
आता दिल्याचीच वाट/ पाहू नाही खटपट//
नलगे उचित/ काही पहावे संचित//
तुका म्हणे सेवा/ माने तैसी करू देवा//
या ठिकाणी संसारातून मुक्त झाल्याची त्यांची अवस्था दिसते. त्यांच्यातील मी नष्ट होऊन परमेश्वरा जवळ त्यांनी पूर्णतया शरणागती पत्करली आहे. परमेश्वर जे देईल त्याचीच वाट पाहणे आहे असे ते म्हणतात. संचिता पासून सुखाची अथवा दुःखाची प्राप्ती होवो, त्यांना काही फरक पडत नाही. परमेश्वराची सेवा हा एकच त्यांचा ध्यास आहे.
खऱ्या अर्थी तुकाराम जाणून घ्यायचे असतील तर त्यांचे हे खालील १३ अभंग वाचले पाहिजेत. ते काय म्हणतात बघा…
कपट काही एक/ नेणे भुलवायाचे लोक//
तुमचे करितो कीर्तन/ गातो उत्तम ते गुण//
दावू नेणे जडी बुटी/ चमत्कार उठा उठी//
नव्हे मठपती/ नाही चाहूरांची वृत्ती//
नाही देवार्चन / असे मांडीले दुकान//
नाही वेताळ प्रसन्न/ काही सांगो खाणखूण //
नव्हे पुराणिक/ करणे सांगणे आणिक//
नाही जाळीत भणदी / उद्धव म्हणोनी आनंदी//
नेणे वादा घटा पटा/ करिता पंडित करंटा//
नाही हलवीत माळ/ भोवते मिळवूनी गबाळ//
आगमीचे नेणे कुडे / स्तंभन मोहन उच्चाटणे //
नोहे त्यांच्या ऐसा/ निरथवासी पिसा/
१) लोकांना कसे फसवावे, हे कपट मी जाणत नाही.
२) मी फक्त कीर्तन करतो आणि कीर्तनातून देवा, फक्त तुमचे गुणगान करतो.
३) लोकांना नादी लावणे हा माझा उद्देश नाही, म्हणून एखादी मुळी काढण्यासारखा कोणताही चमत्कार मी कधीच करत नाही.
४) माझे कोणीही शिष्य नाहीत, की जात वारा, मी माझे मोठेपण समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन.
५) मी मठाधिपती नाही किंवा मला कोणतीही जमीन इनाम मिळालेली नाही.
६) धूप, दीप, गंधादी पुजा अर्चनेच्या कोणत्याही गोष्टींचे दुकान मांडून मी पसारा घातलेला नाही.
७) काही लोकांच्या खाणाखुणा सांगणारा कोणताही वेताळ माझ्यावर प्रसन्न नाही.
८) पुराणाचा आधार घेऊन लोकांना एक सांगावे आणि व्यवहारात वेगळेच वागावे असा ढोंगी पुराणिक मी नाही.
९) अंबाबाईच्या नावाने उदो करत डोक्यावर अग्नीचे खापर जाळणे मला माहित नाही.
१०) घटाकाश, मटाकाश, तंतू आणि पट असे जे वेदांतातील दृष्टांत आहेत त्यांचा अनुवाद करणारा करंटा पंडित मी नाही.
११) लोकांना भवती जमवून आणि त्यांच्यात बसून जपमाळ ओढण्याचे ढोंग करणाऱ्यातला मी नाही.
१२) वेदातील जारण, मारण, उच्चाटन इत्यादी प्रयोग मला माहित नाहीत.
१३) हरीच्या भक्ती वाचून इतर प्रकार करणारा नरकवासी वेडा मी नाही.
तुकाराम महाराज हे फक्त तनाने आणि मनाने हरीचे दास आहेत, भक्त आहेत.
संत तुकाराम एक प्रापंचिक माणूस, साधना करताना त्यांचे मन मध्येच साशंक होते. आपली भक्ती खरी आहे की मी भक्तीचे ढोंग!! करतो आहे अशी शंका त्यांच्या मनात उत्पन्न होते आणि ते अस्वस्थ होतात. पांडुरंगाला सांगतात…
गातो भाव नाही अंगी/ भूषण करावया जगी//
परी तू पतित पावन/ करी साच हे वचन//
मुखे म्हणावितो दास/ चित्ती माया लोभ आस//
तुका म्हणे दावी वेष/ पैसा अंतरी नाही लेश //
ते या अभंगात स्वतःचे दोष वर्णन करतात.
हे हरी, मी तुझे नाव घेतो, परंतु त्यासाठी योग्य असा भक्ती भाव माझ्यापाशी आहे का? जगात माझा लौकिक वाढावा म्हणून तर मी हे नामस्मरणाचे ढोंग करत नाही ना? अशी स्वतःविषयी ते शंका घेतात. तू पतीत पावन आहेस, तेव्हा तूच मला माझ्या चुकीतून सावर. मी जेव्हा माझ्या भक्त असण्याचे दाखवतो, स्वतःला तुझा दास म्हणवितो, तेव्हा मला असे वाटते की भक्तीचा लेशही माझ्यात नसून माझ्या चित्तात अजूनही माया मोह लोभ आहे.
देवाला तुकारामांची ही प्रामाणिक कबुली आहे.
भक्तीचा महिमा इतका अपार आहे, की त्यामुळे तुकाराम महाराज आणि पांडुरंग यांच्यातील द्वैतभाव हळूहळू कमी होत चालला आहे. महाराज म्हणतात,
बाहिर पडलो/ आपुल्या कर्तव्ये /
संसाराची जीवे/ वेटाळीलो//
एका मध्ये एक/ नाही मिळो येत/
ताक नवनीत/ निवडिले//
झाली दोन्ही नामे / एकची मथनी/
*दुसरीया गुणी/ वेगळाली//
तुका म्हणे दाखविली/ मुक्ताफळी/
शिम्पलेची स्वस्थळी/ खुंटलीया//
महाराज स्वतःची स्थिती या अभंगात वर्णन करतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, केवळ या जीवदशेमुळे जन्म, मृत्यू, आणि संसार यात ते गुंतून पडले आहेत. पण आता प्रयत्नपूर्वक या सर्वातून बाहेर पडत आहेत. ताकापासून निघालेले लोणी ज्याप्रमाणे ताकात पुन्हा मिसळणे अशक्य, त्याचप्रमाणे आता एकदा संसारातून बाहेर पडल्यावर त्यात पुन्हा अडकणे नाही. एकाच्याच मंथना पासून वेगळ्या गुणांमुळे सार व असार हे दोन भाग झाले आणि त्यास दोन नावे पडली. एकदा मोती शिंपल्यातून वेगळा काढल्यावर त्याला पूर्ववत शिंपल्याशी जोडता येत नाही.
तुकाराम महाराजांची स्थिती या शिंपल्यातून बाहेर काढलेल्या मोत्यासारखी झाली आहे.
मोक्ष तुमचा देवा/ तुम्ही दुर्लभ तो ठेवा/
माझी भक्तीची आवडी/ नाही अंतरी ते गोडी//
आपल्या प्रकारा/ करा जतन दातारा/
तुका म्हणे भेटी/ पुरे एकची शेवटी//
तुकारामांना मोक्षाची हाव नाही. तो दुर्लभ आहे. ते देवाला सांगतात की देवा, मोक्ष काय आहे तो तुझ्यापाशीच ठेव. मला फक्त तुझ्या भक्तीची आवड आहे. तुझ्या भेटीसाठी माझा जीव व्याकुळ झाला आहे.
तुकाराम महाराजांच्या मनस्थितीची कल्पना या अभंगातून वाचकांना येते.
५००० अभंगाच्या या गाथेत वेळोवेळी तुकाराम महाराज आपल्या नजरेसमोर सतत उभे राहतात. त्यांच्याविषयी पुढील लेखात अजून जाणून घेऊ.
क्रमशः…
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





