श्री संदीप रामचंद्र सुंकले

? विविधा ?

☆ शून्य ते पूज्य ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

भारतीय विचारधारा खूप प्राचीन आहे. निव्वळ प्राचीन नसून ती तितकीच महान देखील आहे. शून्य ही संख्या भारताने विश्वाला दिलेली सर्वात महान देणगी आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये.

शून्य म्हणजे शून्य. पण हे शून्य जेव्हा एखाद्या संख्येच्या मागे लागते तेव्हा ते त्या संख्येचे मूल्य वाढवित असते. आपल्याकडे शून्याला पूज्य म्हणण्याची पद्धत आहे. मूल्य वाढविणारे शून्याला पूज्य म्हटले जाते असे आपल्या लक्षात येईल. थोडा अधिक विचार करता, किंवा थोडी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की ज्याला आपले मूल्य वाढवायचे आहे त्याने आधी शून्य व्हावं आणि आपल्या आधी सद्गुरू, आराध्य देवता अथवा भगवंताला ठेवावे, म्हणजे तो मनुष्य खात्रीने पूज्य होऊ शकतो. आपल्याकडील अनेक संतांची चरित्रे पाहिली तर आपल्याला याची साक्ष पटू शकेल.

संत तुकाराम महाराज हे प्रापंचिक लोकांसाठी महान असे आदर्श म्हणता येईल. आधी सावकारी आणि नंतर कफल्लक झालेले तुकाराम महाराज जगद्गुरू झाले, ते त्यांनी स्वतःला शून्य केले म्हणूनच, नाही का?

मनुष्याचा जीवन प्रवास सुद्धा शून्यापासून सुरुवात होऊन शून्यापर्यंत येऊन थांबतो असे आपल्याला म्हणता येईल. बाळ जन्माला येताना ते शून्य असते आणि त्या बालकाचा जेव्हा म्हातारा होऊन मृत्यू होतो, तेव्हा तो एकप्रकारे शून्यच होत असतो…! सर्व संत असे सांगतात की शून्यापासून सुरू होणारा प्रवास शून्यापर्यंत येऊन न थांबता, तो पूज्या पर्यंत येऊन ठेपला तर त्या मनुष्याचे, जिवांचे सार्थक झालं असे नक्कीच म्हणता येईल.

शून्य ते शून्य नव्हे शून्य ते पूज्य हा प्रवास वाचायला अगदी सहज, पण आचरण करायला, क्रमण करायला तितकाच खडतर…

सर्व संतांनी हा मार्ग स्वतः आचरून दाखवला आहे. अपवाद सोडले तर अनेक संतांनी अनेक प्रकाराची सुखदुःखे सहन केली, अनंत यातना सोसल्या, उपेक्षा, मानहानी, किती सांगावे…?

पण या संतांनी कायम प्रतिसाद दिला…!

प्रत्येक मनुष्याला संत होणे जमेलच असे नाही, पण त्याला पूज्य (शून्य) होणे नक्कीच जमू शकेल…! यासाठी काही विशेष करायला लागेल असे नाही…

काही गोष्टी मनाशी दृढ करून करण्याचा प्रयत्न केला तर शून्य ते पूज्य हा प्रवास शक होईल.

बाळ जन्मते तेव्हा ते कोणाचेच नसते, त्यामुळे सर्वांचे असते. त्या बालकाची काळजी अगदी परके वाटणारे लोकं सुद्धा स्वयंस्फूर्तीने घेत असतात असे आपल्या लक्षात येईल. बाळ. जसजसे मोठे होऊ लागते, तसतसा त्याचा अहंकार मोठा होऊ लागतो. तो कोणी होत जातो, त्याच्या असण्याला, होण्याला समाज कमीअधिक प्रमाणात खतपाणी घालत असतो.

पन्नाशी पर्यंतचे आपण पाच टप्पे ठरवता येतील.

  • दहाव्या वर्षी त्याला सगळे आपले आहेत असे कळायला लागते…?
  • विसाव्या वर्षी त्याला आपल्याला काय हवे हे कळायला लागते…?
  • तिसाव्या वर्षी त्याला आपले नक्की कोण आहे कळायला लागते…?
  • चाळीसाव्या वर्षी त्याला आपले आणि परके यातील सूक्ष्म रेषा कळू लागते…
  • पन्नाशीला त्याला जग काय आहे कळते असे म्हणता येईल… (कदाचित जग काय आहे हे त्याने समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी…)

“एका वाक्यात सांगायचे झाल्यास मनुष्याचा अहंकार पन्नास वर्षाचा होतो…!! “

“पूर्व सुकृत उदयास आले आणि त्याला संताची संगत लाभली तर त्याचा विवेक जागृत होतो, पण सत्संगती लाभली नाही तर त्याचा विवेक जागृत होत नाही आणि मनुष्य अहंकाराचे टोक गाठतो…! “

काही कारणाने सत्संग लाभलेला नाही, पण शून्य होण्याची मनाची तयारी आहे, त्याने अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी संताचे ग्रंथ (संतांनी लिहिलेलं…) वाचावेत, त्यांचा अभ्यास करावा, आणि त्याच्या जोडीला नामस्मरण करावे…

मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे मानले तर पन्नास हा मध्यबिंदू म्हणता येईल…! चढत्या भाजणीने वाढत गेलेला अहंकार उतरत्या भाजणीने पन्नास ते शंभर पर्यंत शून्यावर आला तर मनुष्य पूज्य होणे सहज सोपे…!

पन्नाशी पर्यंत वाढवलेला प्रपंचाचा पसारा पुढील पन्नास वर्षात आवरता आला तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने जिंकला असे म्हणता येईल…!! शून्य ते पूज्य या प्रवासाला सुरूवात करू इच्छिणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!

मनुष्य सुरुवात तरी नक्की करू शकतो… , प्रयत्न करू शकतो…! यश देणे न देणे रामाची इच्छा!!

पहा पटतंय का?

 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Sham Nand
0

अभिनंदन सुकले सर खुप सुंदर लेख( शुन्य ते पुज्य )