श्री मकरंद पिंपुटकर
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ चिता आणि चिंता ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
गोविंदमूर्ती आज जरा चिंतेतच होते. त्यांच्या शिष्याची – सुधीरची बरेच दिवसांत काही खबरबात नव्हती. म्हणजे, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर दिसत होता सुधीर, संदेश टाकत होता, चांगल्या संदेशांचं कौतुक करत होता, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता, पण ते काही त्याचं “असणं” नव्हतं.
सुधीर होतकरू लेखक होता. दर आठ दहा दिवसांतून एकदा तरी काहीतरी चांगलं वाचलेलं, चांगलं सुचलेलं, काहीतरी बौद्धिक खाद्य – तो शब्दबद्ध करे आणि त्याच्या मित्रमंडळात पाठवून देई. आणि गोविंदमूर्ती जरी सुधीरचे गुरू असले तरी त्यांनाही तो हे सगळे मेसेज पाठवून द्यायचा.
पण या वेळीस महिना दीड महिना होऊन गेला तरी सुधीरकडून असा काही मेसेज आला नव्हता, आणि म्हणूनच ते जरा चिंतेत होते.
योगायोगाने आज ते प्रवचन देण्यासाठी व्यासपीठावर स्थानापन्न झाले, आणि श्रोतृवर्गात त्यांना सुधीर दिसला – विस्कटलेले केस, डोळ्यांखाली थोडी काळी वर्तुळं, दाढीचे वाढलेले खुंट, चुरगळलेला शर्ट – सुधीर चिंताग्रस्त असल्याचा गुरुजींचा अंदाज खरा असल्याची सगळी लक्षणं त्यांना प्रत्यक्षच दिसत होती.
आजचा गुरुजींच्या प्रवचनाचा विषय होता – चिंता. गुरुजींना या योगायोगाची मोठी गंमत वाटली, त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. “एक संस्कृत सुभाषित आहे – ते सांगतं की चिता आणि चिंता या दोन्ही अगदी सारख्या गोष्टी आहेत. फरक इतकाच आहे की चिता मृत व्यक्तीला जाळते, तर चिंता जिवंत व्यक्तीला पदोपदी जाळत राहते. “
प्रवचन याच अनुषंगाने पुढे जात राहिले आणि त्या ओघात त्यांनी शाहू महाराजांच्या पदरी असलेल्या एका पहेलवानाची कथा लोकांना सांगितली.
“एका राजाच्या पदरी एक बलशाली पहेलवान होता. भरपूर पौष्टिक खुराक, प्रचंड अंग मेहनत आणि व्यायाम यामुळे ते आडदांड बलदंड झालेला. ताकत तर एवढी की एकदा एका हत्तीची शेपूट धरून त्याला याने खेचले तर तो हत्ती एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकला नाही.
त्या राजाने त्या पहेलवानाला गावाबाहेरील एका देवळात रोज सकाळी आणि संध्याकाळी बरोब्बर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावण्याचे काम दिले. वेळेच्या बाबतीत मागेपुढे झाले तर दंड केला जाईल म्हणून सांगितले.
महिनाभराने त्या पहेलवानाला हत्तीची शेपूट धरून ओढायला सांगितली, तेव्हा हत्ती सहजी त्या पहेलवानाला फरफटत – खेचत घेऊन गेला.
आपण वेळेत पोचू का नाही, वेळ चुकली तर काय दंड होईल या चिंतेने ग्रासलेल्या पहेलवानाची ताकद कमालीची घटली होती.
आपल्या आयुष्यातही असेच असते, ” गुरुजी सांगत होते, “कोणाला आई वडिलांच्या प्रकृतीची चिंता असते, कोणाला नोकरी मिळण्याची. कोणाचे लग्न होत नसते म्हणून चिंता असते तर कोणाला कजाग बायको मिळते म्हणून चिंता असते. पैसाअडका मिळवणे, कोर्टकचेरी, मुलांची शिक्षणं – चिंतेच्या कारणांची ही यादी कधीही न संपणारी आहे.
अशा वेळेस माणसाने प्रयत्नांची कास धरावी. जे घडायचे ते घडणारच आहे, आपण निमित्तमात्र आहोत, प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्यात कुचराई होता कामा नये. बाकीचे सर्व आपले गुरू आणि तो जगन्नियंता बघून घेतील. गुरू आणि देव आपल्या भल्याचे असेल तेच करतील, ही पक्की खुणगाठ उरी बांधून ठेवावी, वृथा काळजी करू नये, ” गोविंदमूर्ती समारोप करते झाले.
दुसरा दिवस उजाडला, स्नानसंध्या, ध्यानधारणा आदि नित्यकर्मे करून गुरुजींनी मोबाईल हाती घेतला, सुधीरने सकारात्मक विचारांची एक सुंदर कविता पाठवली होती.
गुरुजी स्वतःशीच हसले.
सुधीरच्या जीवनप्रवाहातील चिंतेचा बोळा दूर झाला होता, जीवन पूर्ववत प्रवाही झाले होते.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






