श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ बुद्धिबळ – दोन घडीचा डाव… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
” बुध्दीबळ” खेळणे हे जरी बुध्दीचे काम असले तरी एकंदर सोयी- सुविधा मिळण्याबाबत आजची पिढी नशिबवानच.
हा खेळ खेळावा असे वाटल्या क्षणी संगणक, मोबाईल, टॅब वर क्षणात ‘पट’ तयार असतो. टिचकीचा अवकाश!
(आमच्या वेळेला पट आणि सोंगट्या हुडकायला २ दिवस जायचे आणि मिळाल्यावर समोरच्याने आपल्यापण सोंगट्या मांडाव्यात ही सुप्त इच्छा असायची)
कुणाशी खेळायचे? हा प्रश्न आज पडत नाही. अभासी व्यक्तीही (मशीन) तुम्हाला (सहज) हरवू शकते
(आमच्या वेळी, आपल्या शिवाय कोण जास्त बुध्दीचे असणार हा विचार एकदा मनात आणला की काम संपायचे)
तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आमच्यावेळी नसायची ती म्हणजे १६+१६ = ३२ सोंगट्यां पैकी एक ही न हरवणे.
माझ्या कडच्या सेटमधील एखादे प्यादे खेळ सुरू व्हायच्या आधीच वझीर बनलो आहोत या थाटात कुठेतरी मोहिमेवर गेलेले असायचे तर त्याच सेट मधील दुस-या रंगाचा उंट कपाटातील कुठल्या कप्यात लपलाय हे कळायचे नाही मग ही ‘मिसिंग लिंक’ जोडण्यासाठी घरातील वस्तू पटावर यायच्या. मग पहिले ध्येय असायचे एखादे प्यादे मुद्दाम धारातीर्थी देऊन मग त्या वस्तूच्या ठिकाणी त्याला विराजमान करायचे
प्यादे सहज रिप्लेस व्हायचे पण उंट, घोडा, हत्ती रिप्लेस करे पर्यत गेम व्हायचा. त्या पटावरील त्या मिसिंग लिंक साठी ठेवलेली वस्तू घोडा, ऊंट हे समजवून घेण्यात इतर चालींकडे लक्ष लागायचे नाही
आजच्या पिढीला काय कळणार हा ‘स्ट्रगल’?
आमची पण बुध्दी ना! अधूनमधून आम्हाला अशा आठवणींच्या पटावर घेऊन जाते अर्थात निमित्य ठरले ते कालच जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य ठरलेली महाराष्ट्र कन्या ‘दिव्या देशमुख‘ तिचे खूप खूप अभिनंदन – – –
अवांतर : तिच्या विजयी चित्रात ती काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होती आणि काळेवाले, गो-यांपेक्षा ब-याचदा उजवे ठरतात या माझ्या मताचा आणखी एक विजय झाला आहे
© श्री अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com






