श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या देवी सर्वभूतेषु भक्ती-रूपेण संस्थिता। 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”

सगुणोपासना करायची याचा सरळ अर्थ म्हणजे मूर्तीची, छायाचित्राची, प्रतिमेची, प्रतिकाची पूजा करायची. मनुष्याला स्वाभाविकपणेच चांगुल्याची आवड असते. जरी मनुष्याला नित्य आदर्श वागता आले नाही, आदर्श राहता आले नाही तरी समोरच्या मनुष्याने मात्र आदर्शच वागावे असे त्याला मनोमन वाटत असते. ही सुद्धा एक प्रकारची सगुण उपासना म्हटली पाहिजे. सगुणोपासना म्हणजे एक मूर्तीची म्हणजे त्या मूर्तीत प्रत्यक्ष भगवंत सजीवरूपात अवतीर्ण झाला आहे असे मानून केलेली उपासना किंवा आराधना.

मूर्तिपूजा भारतात खूप आधी पासून अस्तित्वात किंवा प्रचलित आहे. ती आज आहे आणि जोपर्यंत ह्या भूमीवर शेवटचा मनुष्य राहील, तोपर्यंत ती नक्कीच अस्तित्वात राहील, असे म्हणता येईल. भले मनुष्य कितीही स्खलनशील असला तरी आपण किती खोल गेलो हे कळण्यासाठी का होइना त्याला एका प्रतिमेची, मर्यादेची स्वाभाविक गरज असते. अशा मर्यादापुरुषोत्तमापुढे (इथे स्त्री सुद्धा असू शकते) नतमस्तक व्हायला मनुष्याला आवडते. मनुष्य कितीही वाईट मार्गात असला, तरी आपल्या संततीनें आपला वाईट मार्ग अनुसरावा असे त्यास कधीच वाटत नाही, म्हणून तो आपल्या संततीस मर्यादापुरुषोत्तमाचा आदर्श घालून देतो आणि तसे होण्याचा प्रयत्न कर असे सांगतो. या नश्वर जगात जन्म घेतलेल्या मनुष्याला खरं तर पूर्ण पुरुष (म्हणजे खरा देव: माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा) बनायचे असते, पण मनुष्य आपल्या पूर्व संस्कारामुळे किंवा वृत्ती बदलू शकत नसल्यामुळे एक प्राणी बनून या जगात वावरतो आणि हा मनुष्य एक प्राणी म्हणूनच अखेरचा श्वास घेतो. खरंतर प्ररमेश्वराने फक्त मनुष्यालाच ‘मनुष्य ते देवत्व’ असा अनंताचा प्रवास करण्याचे वरदान दिले आहे, पण मनुष्य धड मनुष्य होत नाही आणि देवत्व तर खूप दूर राहते.

सर्व संतांनी मनुष्य प्राण्याची ही खूप जुनी खोड बरोबर समजून घेतली आणि भक्तिमार्गासारखे सुंदर आणि सुलभ तंत्रज्ञान पुन्हा एकदा आपल्या हाती दिले. ज्यामध्ये मूलभूत असे सगुण भक्ती आणि निर्गुणभक्ती असे दोन प्रकार सांगितले आहेत. सामान्य मनुष्याला आचरणीय असा मार्ग म्हणजे सगुणभक्ती. साधुसंतांनी सगुणभक्तीचा उच्छेद करून निर्गुण भक्तीचे प्रतिपादन केलेले आही. समर्थ म्हणतात,

“सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें ।सारासारविचारें । संतसंगें ॥”

(दास. ०६. ०६. ५५)

संत चोखामेळा म्हणतात,

‘निर्गुणाचे भेटी आलो। सगुणाचे संगे।’

श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात – ‘गाईच्या वासराला गाईचे दूध प्यायचे असेल तर त्याला गाईच्या आचळालाच तोंड लावावे लागेल, इकडे तिकडे लावून चालत नाही ? त्याप्रमाणे निर्गुणाचा अनुभव घ्यायचा असेल तर सगुणातूनच घ्यावा लागतो. सामान्य माणूस सगुणभक्तीच करतो पण आंधळेपणाने करतो, ती डोळसपणे करणेच आवश्यक आहे. सगुणात आपल्या आराध्यदेवतेची पूजा करायची असते. ती आर्तभावाने करावी, भक्तीत भावाला महत्त्व आहे. भाव शुद्ध हवा. ‘ समर्थांनी केवळ सगुण भक्ती सांगितली आणि ते चुप बसलेत असे नाही तर त्यांनी सगुण भक्तीकरता श्रीराम हे दैवत जाणीवपूर्वक निवडले. कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होता, कुशल राज्यकर्ता होता, दैवी गुणसंपन्न होता. तो अलौकिक पुत्र होता, अलौकिक शिष्य होता, अलौकिक बंधू होता, अलौकिक पती होता, अलौकिक मित्र होता आणि अलौकिक शत्रूही होता. अशा अलौकिक रामाचा आदर्श समर्थांनी लोकांपुढे ठेवला. उद्देश हा की त्यातील एकेक गुण, एकेका व्यक्तीने जरी उचलला तरी त्याची प्रचंड शक्ती समाजात निर्माण होईल. त्या प्रचंड शक्तीने समाजाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून त्यांनी श्रीरामाची उपासना सांगितली. श्रीरामाचे दैवत समाजापुढे ठेवले. श्रीगुणांच्या सामर्थ्याची शक्ती म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान!

उपासनेची शक्ति आणि शक्तीची उपासना. सध्या समाजाला या दोन्हीची तितकीच गरज आहे.

गुरूला आवडते ते करणे म्हणजेच सद्गुरुंची सेवा करणे होय. बरेच वेळा साधक त्याच्या आवडीची कृती करतो आणि सद्गुरूंची सेवा करीत आहोत असे दर्शवितो. परमार्थाची चार चाके आहेत. एक अखंड रामनाम, दुसरे शरणागती, तिसरे सत्संग आणि चवथे रामकृपा होय. संसारामध्ये अहंकार व स्वार्थ हे वैराचे मूळ आहे. वैराचे मूळ स्मृती मध्ये आहे. निर्वैर होण्यासाठी स्मृती नाहीशी झाली पाहिजे. स्मृतीमध्ये रामनाम सतत भरले पाहिजे. म्हणजे परमार्थ उत्तम चालतो. भूतकाळाची स्मृती नाही व भविष्याची चिंता नाही. असा जीव फक्त वर्तमानातच जगतो. हाच जीव निवैर होऊ शकतो. या मार्गाचा अवलंब भक्तीमध्ये होतो. तो ईश्वराचा दास होतो व त्याच्या हृदया मध्ये सतत ईश्वराचे चिंतन चालू असते. असा जीव कालातीत होतो, निर्वैर होतो. देहबुद्धीचे देवबुद्धीमध्ये रुपांतर प्रयत्न साधकाने करावा. त्यासाठी आपल्या सर्व कृती कडे तो परमात्मा पाहत आहे अशी भावना तीव्र करावी. असा भाव वाढीस लागल्यास त्यास परमात्मा सर्व ठिकाणी दिसू लागतो. हेच सगुण भक्तीचे बृहत रूप होय. यालाच साक्षात्कार असे म्हणतात.

सगुणभक्ती ही सर्वार्थाने सुलभ अशीच आहे, कोणीही त्याचे अनुसरण करू शकतो. सगुण हा शब्द ऐकून मूर्तिपूजा करणारे सगुणाची पूजा करतात असे म्हटले तर ते अर्धसत्य होईल असे मला वाटते. सगुण याचा सरळ अर्थ, स म्हणजे चांगले आणि गुण म्हणजे गुण. जिथे चांगल्या गुणांची कदर होते, पूजन होते ती सगुणभक्ती. कोणत्याही चांगल्या मनुष्याच्या अंगचे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून प्रयत्न करणे हे सगुणभक्ती म्हटली पाहिजे. प्रचलित सगुण भक्ती म्हणजे पाणी, पुष्प, गंध, वस्त्र आणि नैवेद्य किंवा संपूर्ण षोडशोपचारे पूजा करणे म्हणजे सगुणभक्ती असे मानले जाते, हे स्थूलमानाने योग्य असेलही, पण आराध्य देवतेचे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न सुरु केला जातो तेंव्हा खरी सगुणभक्तीला सुरुवात झाली असे म्हणता येईल. नाहीतर ते “नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा” असे व्हायचे. षोडशोपचार करणे हे म्हणजे hardware म्हणता येईल आणि आराध्य देवतच्या गुणांचे दैनंदिन व्यवहारात आचरण करण्यास सुरुवात करणे हे सॉफ्टवेअर समजावे. हे सर्व समजायला थोडं जड आहे पण थेट अंतर्मनात बदल घडविणारे आहे. ह्या सोबत नाम घेता आले तर दुधात साखरच!

समजा एखाद्याने रामास आपले आराध्य मानले तर त्याने रामचरित्र वाचावे. रामाचा भक्त आहे, म्हणून त्याचीही पत्नी चोरायला कोणी रावण येईल आणि त्यालाही रामासारखा पराक्रम गाजविता येईल असे नाही. तर दैनंदीन जीवनात आपले आचरण रामासारखे ठेवण्याचा प्रयत्न त्याने करावा. आपली पत्नी सितारुप आहे, वडील दशरथा समान आहेत, थोडक्यात राम जसा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी वागला, तसे त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांशी वागावे. नाम घेतले तर उत्तम, पण असे आचरण मात्र काटेकोरपणे करावे. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकामध्ये एकच राम आहे हे जाणून त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजेच सगुण भक्ती करणे.

सध्या कलियुग आहे, त्यामुळे जरी श्रीकृष्णाने गीतेत मी परत अवतार घेईन असे सांगितले असले तरी गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी जशी सर्व गोपांनी आपापली काठी लावली अगदी तसेच आपल्या आपली साधना करायला हवी. आपण सर्वांनी आपापली काठी लावली की आपले काम झाले. कारण भगवंत आहेच, तो करंगळी लावतोच.

आपल्याला दैनंदिन जीवनात आधीपासून उपस्थित असलेले परमेश्वराचे अस्तित्व जाणवायला लागले म्हणजे आपली प्रगती सुरु झाली असे म्हणता येईल. अशी भक्ती करावी की आपल्याला डोळ्यात पाणी आले तर भगवंतांच्या डोळ्यात पाणी यावे. अशी भक्ती संतांनी करून दाखवली. याचे सर्वात चांगले आणि आपल्या घरातील उदाहरण म्हणजे आपली आई. आपल्या डोळ्यात पाणी आले तर आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते. किंबहुना आपल्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये म्हणून प्रत्येक आईचा प्रयत्न असतो, मग ती आई गोरी असो व काळी, गरीब असो व श्रीमंत. आई आईच असते, तीला पर्याय नाही.

आपल्या ‘आईची’ मान जगामध्ये कायम ताठ राहील, तिला समाजात आपली ओळख करू देताना आपण अमक्याची आई आहोत असे सांगण्यात गौरव वाटेल आणि आपल्याला आपल्या आईमध्येच देवाचे अस्तित्व जाणवेल तीच खरी सगुणोपासना !!

पूजा करण्या आधी आतुरता, पूजा करताना आनंद आणि पूजा करुन झाल्यावर चित्त शांत होत असेल, समाधान लाभत असेल तर आपली सगुणोपासना योग्य दिशेने चालू आहे असे म्हणायला हरकत नाही…… !

साधनेच्या अंतिम टप्प्यात साधकाला भागवतांचा साक्षात्कार झाला तरी तो साधक आपले साधन, अर्थात सगुणोपासना सोडत नाही. सगुणोपासना करताना चाखायला मिळणारा भक्तिरस काहीतरी और असेल, अन्यथा स्वतः पांडुरंग झाल्यावरही संत तुकाराम बुवांनी विठ्ठलाची पूजा केलीच नसती…. ! ते एका ठिकाणी म्हणतात,

“आधी होता वाघ्या | दैवयोगें झाला पाग्या | त्याचे यळकोट राहिना | देहस्वभाव जाईना ||१|| आधी होता ग्रामजोसी। राज्यपद आले त्यासी ॥ त्याचें पंचांग राहीना। देहस्वभाव जाईना ||२|| आधी होती दासी। पट्टराणी केलें तिसी ॥ तिचें हिंडणे राहीना। देहस्वभाव जाईना ||३|| आधी होता संतसंग| तुका झाला पांडुरंग | त्याचे भजन जाईना |मूळ स्वभाव जाईना ||४||”

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted