सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ द्रौपदी… – लेख क्र. १० ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
स्त्री आधी आई होते मग तिच्यात वात्सल्य निर्माण होतं की आधी वात्सल्य येतं म्हणूनच मग ती आई होते? मला वाटतं दोन्हीही नाही. आपण जन्माला आल्यानंतर आई कुशीत घेते, मांडीवर झोपवते, हाताने भरवते. त्यावेळी ते वात्सल्य, माया बाळ आत्मसात करतं. मग प्रौढ झाल्यावर ती माया, वात्सल्य आपल्या बाळावर बरसतं. माझ्या बाबतीत बालपणच नव्हतं. एक प्रौढा म्हणून जन्माला आले. मग कुठलं वात्सल्य, कुठली माया? जे अनुभवलंच नाही ते बाळाला कुठून देणार? ज्यावेळी अभिमन्यूचा युद्धात मृत्यू झाला तेंव्हा सुभद्रा उत्तरेला कुशीत घेऊन किती रडली होती. पण माझ्या डोळ्यातून टिपूसही आलं नाही. एवढंच काय माझी पोटची मुलं अश्वत्थाम्याने मारली तरी मी रडले नाही. कदाचित असे असेल कि नियतीने मला तसा वेळच दिला नाही, की मी शोक करत बसेन. माझ्या डोळ्यात फक्त धगधगता सुडाग्नी असायचा आणि मग मला हवी ती गोष्ट करून घेण्यासाठी माझं कोणत्याही पायरी पर्यंत अधःपतन व्हायचं. पण मी तो सूड घेऊनच शांत व्हायची. तुम्ही याला मला जबाबदार धरू नका. कदाचित माझं सौंदर्य याला जबाबदार असू शकेल. खरं म्हणजे अर्जुनांनी ‘पण’ जिंकला होता पण मोठ्या भावाच्या आधी लग्न करणं त्यांना अवघड वाटत होतं. आणि पाचही पांडव माझ्यावर आरक्त झाले होते. स्त्रियांना पुरुषाची नजर फार लवकर समजते. पुढे एकत्र राहणं अवघड होऊ नये म्हणून मी पाच जणांची पत्नी म्हणून राहिले. आणि हेच सौंदर्य दुर्योधन, दुःशासन यांच्या मनातही असूया निर्माण करण्यास कारणीभूत ठरलं असावं.
एकाच माणसानं किती वेळा आयुष्यात अपमान सहन करायचा? यज्ञवेदीतून माझा जन्म झाला तो म्हणजे अधर्माचं निर्दालन आणि धर्माचं संस्थापन या कार्याला कृष्णाला मदत करण्यासाठी, असं म्हणतात. पण म्हणून या कार्यात मी किती वेळा माझं चारित्र्य हनन सहन करायचं? वास्तविक मी विवाहाला तयार झाले ते पण पूर्ण करणाऱ्या वल्लभ नावाच्या एका ब्राह्मण मुलाशी! पण नंतर समजलं की तो ब्राह्मण तर नाहीच पण आपल्याच वडिलांशी, द्रुपद राजाशी, युद्ध करून त्यांना हरवणारा क्षत्रिय माणूस अर्जुन आहे. माझा पांडव कुटुंबातला प्रवेशच असा फसवणुकीतून झाला. त्यातच पाच माणसांबरोबर विवाह व संसार करण्याची कसरत करावी लागली. त्यवरून कौरवांनी मला वेश्या ठरवलं. नंतर तर कहरच झाला. कौरव सभेत लक्षात आलं की आपण षंढ लोकांशी विवाह केला आहे. यांचा धर्म, पत्नीच्या चारित्र्याचं रक्षण करणं हा नाही का हो? भर सभेत तुमच्या पत्नीला विवस्त्र करण्याचा, तिच्या चारित्र्याला हात घालण्याचा खेळ चालला होता. तरी सगळे मूग गिळून गप्प, खाली माना घालून बसलेले. दुसरे कोणी असते तर एकेकाची जीभ हासडून हातात दिली असती. वेगळं काय झालं असतं? बारा, तेरा वर्षानंतर जे युद्ध झालं, त्याला त्याच दिवशी तोंड फुटलं असतं. त्या सभेने मला शिकवलं की भावनिक गुंतवणूक, ही एक मानवी भावना आहे, ती चुकीची नाही पण ती जर आपल्या आयुष्यावर, निर्णयांवर व आत्मसन्मानावर हावी होऊ लागली तर मोडायलाच हवी. आणि मी ताठ उभी राहिले. आणि विचारलं, माझ्यावर हक्क सांगणारे हे कोण हो? मी काय यांच्या दावणीला बांधलेला घोडा की हत्ती ? मला पणाला लावण्यापूर्वी यांनी मला विचारलं होतं? युधिष्ठिर जेंव्हा हरले तेंव्हा त्यांनी आपले उत्तरीय काढून ठेवले, म्हणजे त्यांनी दास्यत्व स्वीकारले. मग यांचा माझ्यावर अधिकार कसा राहतो, कफल्लक झाल्यावर ! तिथे भीम उठले आणि म्हणाले, सहदेवा जा, अग्नी घेऊन ये. दूत खेळणाऱ्या धर्माचे हात जाळून टाकतो. एवढे बोलून थांबले नाहीत तर दुर्योधन, दुःशासन यांच्या वधाच्या प्रतिज्ञा केल्या. म्हणाले, ज्या हातानं दुःशासनानं पांचालीच्या केसांना धरलं ते हात आणि पांचालीला मांडी दाखवून आवाहन करणाऱ्या दुर्योधनाची मांडी नाही फोडली तर बघा. भीमाचा तो अवतार, त्याची प्रतिज्ञा बघून धृतराष्ट्र घाबरले. आणि त्यांनी माझी सुटका तर केलीच पण पांडवांची दास्यातून सुटका करून त्यांना हरलेलं सगळं वैभव परत केलं.
मला युधिष्ठिरांचं तर इतकं आश्चर्य वाटतं. एकदा इतका वाईट अनुभव आल्यावरही माणूस शहाणा होत नाही कां हो? अपमानित पांडव सूड घेणार या भीतीने कौरवांनी पुन्हा द्यूत खेळण्यास बोलावल्यावर हे निर्लज्जपणे पुन्हा खेळायला गेले. त्यांनी पांडव वनातून परत कसे येणारच नाहीत अशी सोय करणारा पण लावला आणि आम्ही मूर्खासारखे पुन्हा त्यांच्या कपटामध्ये अडकलो.
अज्ञातवासात असताना कीचक, जयद्रथ यांनी माझ्या चरित्र्याला हात घालण्याचा प्रयत्न केला. अज्ञातवासात आहोत त्यामुळे गप्प बसूया असे सर्वांचे मत होते. म्हणजे मी वनवासातून परत यायला उरलेच नसते. कौरवांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी एक भीमाला वनवासाला जाता येणार नाही म्हणून सांगितलं असतं तर माझे अज्ञातवासात धिंडवडे निघाले असते. आणि कौरवांना असुरी आनंद उपभोगता आला असता. भीम गप्प बसणाऱ्यातले नव्हतेच, त्यांनी अपरात्री किचक व इतर राक्षसांचा वध केला, जयद्रथाला अद्दल घडवली, माझी दोघांपासून सुटका केली. सुदेष्णाची दासी म्हणून मला रहावे लागले. मी इतके अपमान सहन केले. चारित्र्याशी चाललेले खेळ पचवले. तरी लोकांच्या मते मी चुका केल्या म्हणून महाभारताचे युद्ध झाले. कुठेतरी अपमानाचा सूड घ्यावा, प्रत्युत्तर करावं अशी इच्छा होणे स्वाभाविक नव्हतं कां ?
शेवटी धर्माचं संस्थापन झालं की नाही माहित नाही. पण कुरुक्षेत्रावर प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या, भावाच्या, मुलाच्या कलेवराजवळ जाऊन मला, पांडवांना व कृष्णाला दूषण देत होती. हे पाहिल्यावर मनात आलं, आपण काय मिळवलं? लौकिकार्थानं राज्य मिळालं, राणीचा मुकुट मिळाला. पण असा एकही दिवस गेला नाही की मला भर सभेतला माझा अपमान आठवला नाही की पांडवपुत्रांची झालेली हत्या डोळ्यासमोर दिसली नाही. कुरुक्षेत्रावरचा प्रेतांचा ढीग डोळ्यासमोरून हलला नाही. मग कसला आनंद साजरा करू? भकास हस्तिनापुराचा की उध्वस्त राजवाड्याचा! आनंद इतका क्षणिक असतो की तो फक्त देहापुरता राहतो, पण दुःख इतकं अनंत असतं की ते अंतरात्म्यालाही दुखावतं आणि तिथेच घर करून राहतं!!
तुमच्यासमोर फक्त माझ्या व्यथाच मांडल्या पण माझ्या मनाचा एक हळवा कोपराही आहे, त्यात आहे माझा सखा, कृष्ण! सखा कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण! ज्याच्याशी आपलं सख्य असतं त्याला सखा म्हणावं अशी व्याख्या असली तरी सख्य असणं आणि सखा असणं यात एका हृदयाचं अंतर असतं आणि असं दुसऱ्याचं हृदय पार करून जायचं व त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं म्हणजे काय असतं —नाही ते मला शब्दात सांगता येणारच नाही.
माझ्या या सख्याला काही सललं जरी असतं तरी एक शालूच काय पण मी माझं अख्खं आयुष्य ओवाळून टाकलं असतं. त्यानं मात्र त्याचं आयुष्य खरंच माझ्यासाठी ओवाळून टाकलं. एक हाक– हाक तरी कशाला, मी संकटात आहे हे त्याला न सांगताच कळायचं आणि जीवाच्या आकांताने धावून यायचा, कधी मनानं कधी शरीरानं! सखा हे नातं असं असतं की, नाही हो, नातं नसतं हे! नात्या पलीकडे काहीतरी असतं. कारण नात्यांना बंधनं असतात, मर्यादा असतात, नात्याला समाज रचनेची बैठक असते. सखा या सर्वांपलीकडे जाऊन आपला आधार, आपला अभिमान, आपल्या दुःखातला साथी, सतत मदतीचा हात देणारा देव, अहो, दिनकरासारखा स्वार्थ परायण असतो. आपलं सर्वस्व असतो. तो नसता नां तर मी अस्तित्वहीन, अभिमान शून्य झाले असते.
पण या हळव्या कोपऱ्याला नां, एक दुखरी नस आहे. सांगू? त्याने माझ्यासाठी काय केलं, तो माझ्यासाठी कोण होता, हे सांगितलं. सखा कसा असतो तेही सांगितलं. पण मी त्याची सखीच होते नां? मी काय केलं? त्याची दुःखं त्याची संकटं होतीच की. अर्थात त्यासाठी तो समर्थ ही होता. पण मी त्याच्या हृदयाचं अंतर पार करू शकले नाही. मी माझ्यातच अडकले होते. सखी म्हणून एकदा चिंधी बांधली की झालं? कुरुक्षेत्रावरचा संहार त्यानं पाहिला, गांधारीने दिलेला शाप त्याला बोचला, नव्हे काळजातून आरपार गेला. यादवांचाही संहार त्याला पहावा लागला. आणि तो विमनस्क अवस्थेत भटकत राहिला. त्यानंही मला कांही सांगितलं नाही अन् मी ही ओळखू शकले नाही. अगदी एकटा पडला तो! खरं म्हणजे मी जर त्याच्याजवळ तेंव्हा असते नां तर त्याचा हा असा अंत होऊ दिला नसता. ही बोच, हा सल मात्र कायम मनात राहिला. खरं म्हणजे सख्या समोर मन मोकळं करता आलं पाहिजे. एकमेकांना एकमेकांची मनं कळली पाहिजेत, अगदी न सांगता सुद्धा! असा एक सखा आयुष्यात हवाच जो जगण्याची उर्मी देतो, मनोबल वाढवतो, जगण्याचा हव्यास निर्माण करतो. याबाबतीत मात्र मी फार नशीबवान ठरले. जन्मोजन्मी मला हाच सखा लाभावा आणि असाच सखा तुम्हा सर्वांना मिळावा, हीच मनीषा !!
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





