श्री मकरंद पिंपुटकर
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ श्रावणदान… लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मकरंद पिंपुटकर ☆
मावशी अनेक वर्ष मुंबईत एका माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. अगदी सात्विक आणि शांत स्वभाव. एकट्याच राहायच्या. लग्न न केल्यामुळे स्वतःचा गोतावळा नव्हताच पण इतर नातेवाईक वगैरेही फार कुणी नाही. जे थोडेफार असतील तेही लांबचे. त्यामुळे जाणं येणं तर नाहीच. नाही म्हणायला एकमेव विश्वासू भाचा आणि वरच्या मजल्यावर राहणारी समवयस्क मैत्रीण हे दोघेच त्यातल्या त्यात जवळचे. भाचा बडोद्याला रहायचा त्यामुळे प्रत्यक्ष भेट कमी व्हायची पण तरीही बऱ्यापैकी संपर्कात असायचा. मैत्रीण मात्र जाता येता दिवसातून एकदा तरी भेटायची. दोघींची चांगली गट्टी होती. मावशींना आता निवृत्त होऊनही दोनेक वर्ष झाली होती त्यामुळे निवृत्तीनंतरच्या दिनक्रमात देखील व्यवस्थित रुळल्या होत्या. दिवसभराची घरची कामं, पूजाअर्चना, वाचन, वामकुक्षी, थोडाफार टीव्ही, फेरफटका या सगळ्याच्या जोडीला काही सामाजिक संस्थांमध्येही सक्रिय असायच्या.
मुळात गरजा कमी त्यात एकटा जीव. त्यामुळे पेन्शन मध्ये व्यवस्थित भागायचं. इतक्या वर्षांच्या नोकरीमुळे आज दोन पैसे गाठीशी असले तरी मावशींचं बालपण मात्र बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीत गेलं होतं. पण त्या परिस्थितीतही मावशींना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्यांच्या आईवडिलांनी काबाड कष्ट केले. स्वतः अनेक हाल सोसले, तडजोडी केल्या पण मावशींच्या शिक्षणात कुठलीही कसर सोडली नाही. दुर्दैवाने, मावशी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांची आई गेली आणि त्यानंतर अगदी तीन महिन्यातच वडील सुद्धा हे जग सोडून गेले. आपल्या आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची त्यांना नेहमीच जाणीव होती. कॉलेज पूर्ण झालं आणि त्यावर्षीच्या श्रावणात मावशींच्या एकदम मनात आलं की आपल्या आईवडिलांच्या नावे गरजूंसाठी काहीतरी दान करावं. त्यायोगे आईवडिलांबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटलं असेल. श्रावणदानाचं मनात आल्याआल्या लगेच त्याच दिवशी त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षण झालेल्या शाळेत जाऊन यथाशक्ती देणगी दिली. त्यानंतर आजतगायत अगदी वयाच्या साठीपर्यंतही प्रत्येक श्रावणात दान करण्याचा नेम कधीही चुकला नव्हता.
शिक्षिका असल्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा वेगवेगळ्या संस्थांतर्फे अनेक मुलांना ज्ञानदान तर त्या करायच्याच पण दर श्रावणात मात्र कधी देणगी स्वरूपात तर कधी गरिबांना अन्नदान, कधी एखाद्या अनाथाश्रमात मुलांना कपडे, खेळणी, एखाद्या वर्षी वृद्धाश्रमात राहणाऱ्यांसाठी औषधं, रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं असं दरवर्षी काही ना काही दान श्रावण महिन्यात करायच्याच. आणि विशेष म्हणजे याचा कुठे गाजावाजा नाही की कधी साधी वाच्यतही नाही. अगदी भाच्याला आणि मैत्रिणीलाही या श्रावणदान संकल्पाची काहीही कल्पना नव्हती. आपल्या आईवडिलांचं स्मरण आणि त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्या सगळ्याची जाणीव ठेवून कुणा गरजूच्या आयुष्यातली एखादी उणीव कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी निरपेक्ष वृत्तीने दान हाच एकमेव हेतु.
असाच एक श्रावण उजाडला आणि यावर्षी काय दान करता येईल हा विचार मावशींच्या मनात घोळू लागला. लवकरच ठरवून त्याप्रमाणे वस्तु घेऊन या वर्षीचे श्रावणदान पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानंतर ८-१० दिवस झाले असतील. मावशी बाजारातून भाजी घेऊन येत होत्या. इतक्यात घरासमोरचा रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या एका वाहनाची धडक लागली आणि मावशी खाली कोसळल्या. बेशुद्धावस्थेत असलेल्या मावशींना आजूबाजूच्यानी हॉस्पिटलमध्ये नेलं. भाचा काही तासात पोचला पण शेजारची मैत्रीण मात्र नेमकी अमेरिकेत लेकाकडे गेली होती. पुढच्या महिन्यात येणार होती. पुढे ३-४ दिवस मावशींच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही. मावशी जरी बेशुद्ध असल्या तरी त्यांच्या मनात यावर्षी श्रावणदान करणं शक्य होणार नसल्याची हुरहूर नक्कीच असणार.
अपघाताची बातमी ऐकल्यापासून अस्वस्थ झालेल्या मैत्रिणीला कधी एकदा भारतात येऊन मावशींना भेटतेय असं झालं होतं. शेवटी न राहवून लेकाला मिळेल तितकं लवकरचं तिकीट काढायला सांगितलं आणि अखेर ४ दिवसांनी मुंबईसाठी प्रयाण केलं. विमानतळावरून थेट हॉस्पिटल गाठलं आणि मैत्रिणीच्या उशाशी जाऊन बसली. बेशुद्धावस्थेतल्या मावशींना बघून मैत्रिणीला अश्रु अनावर झाले आणि त्यांचा हात आपल्या हातात घेऊन शांत बसून राहिली. १०-१५ मिनिटांनंतर मावशींच्या सभोवताली जोडलेल्या विविध उपकरणांतून दिसणारे आकडे बघून डॉक्टरांची फौज धावत आत आली. तातडीने मावशींची तपासणी केली. पण जे घडू नये असं वाटत होतं तेच घडलं. मावशी सगळ्यांना सोडून गेल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
भाचाही तिथेच असल्यामुळे लगेच पुढची प्रक्रिया सुरू झाली. अमेरिकेच्या मोठ्या प्रवासातून परस्पर आलेल्या मैत्रिणीला हॉस्पिटलमधली प्रक्रिया होईपर्यंत थोडा वेळ विश्रांती घ्यायला घरी जाण्याचा आग्रह सगळ्यांनी केल्यामुळे ती जड अंतःकरणाने निघाली. गाडीपाशी आली आणि अचानक थबकली. काहीतरी आठवलं अन् एकदम वीज संचारल्यासारखी पळत पुन्हा वर हॉस्पिटलमध्ये गेली. मावशींनी ५-६ महिन्यांपूर्वी नेत्रदानाचा फॉर्म भरला होता ते तेव्हा तिच्या कानावर घातलं होतं. पण “ याची तुला इतक्यात गरजच पडणार नाही. शतायुषी होशील तू !” असं मैत्रीण तेव्हा थट्टेने म्हणाली होती. आजही आपली मैत्रीण आता काही दिवसात बरी होऊन घरी येईल याच आशेवर ती लगबगीने आली असल्यामुळे मावशींच्या नेत्रदानाचा विषयही मनाला शिवला नव्हता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मावशींच्या शेवटच्या क्षणी मैत्रीण तिथेच असल्यामुळे लगेचच नेत्रदानाबद्दल समजलं, संबंधित संस्थेशी त्वरित संपर्क केला आणि नेत्रदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला अवधी मिळाला.
अनेक दिवस निपचित पडून असलेल्या मावशींनी मैत्रीण येताच प्राण सोडले. किंवा आता आपलं जाणं अटळ आहे पण त्यामुळे आपल्या आईवाडिलांसाठी इतकी वर्ष नेटाने केलेल्या श्रावणदानात खंड पडू नये असा विचार कदाचित त्या अचल शरीरातल्या सक्रिय मनात सुरू असेल. जणू काही म्हणूनच नेत्रदानाबद्दल माहिती असलेली एकमेव मैत्रीण येईपर्यंत मावशींचे श्वास विधात्याने सुरू ठेवले होते. या सगळ्यामुळे एका दृष्टिहीन व्यक्तीच्या काळोख्या आयुष्यात उजेड तर येणारच होता पण श्रावण संपायच्या केवळ ३-४ दिवस आधी मावशींच्या पश्चातदेखील नियतीनेच पूर्ण करून घेतलं होतं मावशींचं…. “ श्रावणदान “
लेखक : श्री क्षितिज दाते
ठाणे
प्रस्तुती – श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खूप हृदयस्पर्शी!