श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ गेलो तरी असेन मी..! ☆ श्री संभाजी बबन गायके 

राम चाले वाटे… लक्ष्मण झाडी काटे! आजीच्या मांडीवर डोकं टेकवून त्या दोघांनीही आजीच्या गोष्टींत कधीतरी हे शब्द ऐकले असावेत. प्रभू रामचंद्र यांच्या पदरी वनवासाचा निखारा पडला… तोच निखारा आपल्याही पदरात बांधून घेणारा लक्ष्मण हे बंधूप्रेमाचे एक महान उदाहरण म्हणून जगाने स्मरणात ठेवले आणि पुढच्या पिढ्यांना सांगितले!

वनातली वाट म्हणजे पायांची कसोटी पाहणारी… अणकुचीदार दगड, टोकदार काटे यांचे आच्छादन असते या वाटांवर. प्रभू याच वाटेवर चालू लागले… सीतामाई त्यांचे अनुसरण करीत निघाल्या होत्या… धाकटे लक्ष्मण यांचे सारे ध्यान या दोघांच्या पायांकडे लागून राहिलेले होते… या चरणकमलांना इजा होता कामा नये! लक्ष्मण पुढे झाले… त्यांनी वाटेलगतची झुडपे तोडून त्यांचा झाडू बनवला… आणि ते प्रभूंच्या पुढे झाले…. खाली वाकले आणि त्यांनी मार्ग निष्कंटक करायला आरंभ केला! भावाने आपला बंधूभाव असा प्रकट केला आणि सा-या जगाला एक उदाहरण घालून दिले!

पण कलियुगात कुणी कुणाचे राहिले नाही…. पण कुठेतरी एखादे राम… एखादे लक्ष्मण मात्र जन्म घेत होते… असेच एका आईच्या पोटी दोघे जन्मले… पण इथे थोरल्या रामाने धाकटया लक्ष्मणाचा मार्ग निष्कंटक केला… स्वत:च्या पायांत काटे रुतवून घेत!

निसर्गाने मानवाला दोन मूत्रपिंडे प्रदान केलीत. एक नादुरुस्त झाले तरी दुस-यावर काम सोपवता येते. पण जेंव्हा दोन्ही निकामी होतात… तेंव्हा देह अंतर्गत विषबाधेने जेरीस येतो आणि त्याचा अकाली अंत होतो. वैद्यकशास्त्रात प्रगती होत गेली, विविध प्रयोग होत गेले. एका देहातील अवयव दुस-या देहात प्रत्यारोपित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली… आरंभी प्राण्यांचे मूत्रपिंड माणसाच्या शरीरात बसवण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. मानवी शरीर बाहेरचे काहीही लगोलग स्विकारत नाही! एकाच आईच्या पोटी जन्मलेली दोन शरीरे मात्र याबाबतीत एकमेकांना पूरक ठरू शकतात… कारण रक्ताचे नाते अधिक जवळचे! १९५४ मध्ये रोनाल्ड आणि रिचर्ड हेनरिक या जुळ्या भावांवर हा प्रयोग झाला… डॉक्टर जोसेफ मरे, डॉक्टर जॉन मेरील, डॉक्टर हॅरिसन यांनी रोनाल्डची एक किडनी काढून रिचर्डच्या शरीरात बसवली…. आणि रिचर्डला पुढे आठ वर्षांचे वाढीव आयुष्य लाभले! पण यासाठी रोनाल्डने सुद्धा रिचर्डएवढ्याच वेदना सहन केल्या!

एक अवयव काढून दुस-या शरीरात बसवणे ही प्रक्रिया दाता आणि स्वीकारकर्ता या दोघांनाही सारखीच वेदनादायी प्रक्रिया असते.

आजपासून बत्तीस वर्षांपूर्वी असेच एक प्रत्यारोपण झाले.

मोठ्या भावाने धाकट्याला त्याचं एक मूत्रपिंड (किडनी) दिली. साधारणत: १९९३ मधील ही गोष्ट असावी. त्यावेळी आजच्या इतकी अवयवदान जागृती आणि आधुनिक साधनेसुद्धा नव्हती. उपचारांसाठी शहरात जावे लागे! धाकट्या भावाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान झाले! एकच पर्याय होता…. मूत्रपिंड प्रत्यारोपण!

 अशावेळी थोरले बंधू पुढे सरसावले… केवळ भावावरील निस्सीम प्रेमापोटी हे दान झाले… दान नव्हे जीवनदान…. पंधरा वर्षांच्या श्वासांचे दान.

 महर्षि दधिची यांचे येथे स्मरण होते…. एका भयावह असूराशी लढण्यासाठी देवांना एका वज्राची गरज होती… आणि ते वज्र केवळ हाडांपासून बनवण्यात येऊ शकत होते… यासाठी देवांनी दधिची यांना प्रार्थना केली… आणि महर्षि दधिची यांनी देहत्याग केला! त्यांच्या हाडांपासून वज्र बनवले गेले आणि त्या असूराचा नाश केला गेला! पुढे महर्षींच्या उर्वरित हाडांपासून गांडीव, पिनाक आणि सारंग नावांची धनुष्ये बनवली गेली, असे पुराणात सांगितले जाते!

ऋषींनी दान देण्याची रीत समाजाला समजावली… लक्ष्मण यांनी सेवेचा, त्यागाचा मार्ग अवलंबला!

माऊली ज्ञानोबाराय म्हणतात.. येथ वडील जे जे करिती, तया नाम धर्म धर्मु ठेविती… तेचि येर अनुसरिती सामान्य सकळ! वडील म्हणजे मोठी माणसे जे काही करतात त्याचे अनुकरण सामान्य माणसे करीत असतात. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या मातोश्री म्हणाल्या होत्या.. “केवळ माझे मूत्रपिंडच नव्हे.. तर गरज पडली तर माझे सर्व अवयव घ्या.. पण माझ्या मुलाला वाचवा! “

आपल्या या प्रस्तुत सत्य कहाणीमधल्या थोरल्या भावाच्या रक्ताने धाकट्या भावाच्या रक्ताचा गंध जाणला… एकाच मुशीत तयार झालेले हे दोन जीव… एकमेकांशी यांनी जुळवून घेतले… शरीराने हा नवा अवयव स्वीकारला… धाकट्याचे जीवन पंधरा वर्षांनी वाढले… त्याचा संसार झाला! ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकऱ्याने, त्याकाळी मर्यादित साधने असताना हे धाडस केले होते.. ही मोठी गोष्ट होती.

इकडे एकाच किडनीवर थोरल्या बंधूंची मदार होती. आता त्यांना स्वतःच्याही तब्येतीची जास्त काळजी घ्यावी लागणार होती. शेतातली कामे तर होतीच. मुले अजून हाताशी यायची होती. पण आपले घर अजून एकसंध आहे याचे समाधान पदरी होते. या सर्व गदारोळात पत्नीने जणू जबाबदारीच्या धनुष्याला स्वतः प्रत्यंचा लावली होती… आणि ते पेललेही.

त्यांनी आयुष्याला निर्धारित वळण लावून घेतले. नवा जन्म लाभलेल्या बंधूंनी सुद्धा आहार विहार सांभाळला, पथ्यपाणी कसोशीने पाळले. थोरल्याने अध्यात्माची कास धरली. हरिपाठ, भजन यांत हजेरी नियमित ठेवली… एक एक दिवस कारणी लावला. पाऊस असला तरी घराच्या ओसरीत ठरवलेली पावले चालण्याचा नेम चुकवला नाही… पावले मोजण्यासाठी जपमाळ हाती घेतली… स्वार्थाच्या जोडीने परमार्थ साधला जाऊ लागला!

कालांतराने धाकट्याची प्राणज्योत मालवली… तो आघात सोसला आणि संसाराचे ओझे खांद्यावर पेलले!

पुढे देहाने वार्धक्य अंगिकारले.. वयाची ऐंशी पंच्याऐंशी वर्षे उलटली…. संसार मार्गी लागला होता… कन्यादानाचे पुण्य लाभले होते.. दोन्ही चिरंजीव शेतीत, जबाबदारीच्या नोकरीत स्थिरावले! नातवंडांचा गराडा अवती भवती होता… काळया आईची सेवा धनधान्य देत होती.

पण.. निसर्ग आपल्या वेगाने पावले टाकीत आला… शरीर आणि अवयव आता थकत चालले होते…. देहावसान अपरिहार्य!

वेदना झाल्या.. मात्र आधुनिक उपचार, कुटुंबियांची सेवा यामुळे अंतकाळी त्या सुसह्य झाल्या!

दादा म्हणत सर्वजण त्यांना.. दशक्रियेच्या दिवशी हजारोंनी समाज लोटला… प्रत्येकाने हीच भावना व्यक्त केली… कीर्ती रुपे उरावे ते असे!

बत्तीस वर्षांपूर्वी जी आर्थिक, सामाजिक, मानसिक परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाला असलेला धोका पत्करून धाकट्याचे प्राण वाचवण्याची हिंमत दाखवणे किती जिकिरीचे असेल.. याची कल्पनाच करता येईल… ज्यांनी हे प्रत्यक्ष भोगले त्यांच्या जीवालाच त्या कळा ठाऊक!

सोपानरावांना हे जग सोडून आता वीसेक दिवस झाले असतील… पण त्यांच्या दातृत्वाचा, बंधुप्रेमाचा आदर्श पुढील कित्येक पिढ्यांना पुरेल असाच ठरेल!

(माझे आप्त कैलासवासी सोपानराव सखाराम गोगावले यांना नुकतीच देवाज्ञा झाली… त्यांच्या दातृत्वाला वंदन करण्यासाठी हा लेखन प्रपंच. यानिमित्ताने अवयवदान करणाऱ्या, प्रेमासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सर्वांना नमस्कार! दादांना भावपूर्ण श्रद्धांजली… राम कृष्ण हरी)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted