श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “कथा पुण्यातील एका चौकाची…” – शब्दांकन : श्री बाजीराव जांभेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी एका महाकाय साम्राज्यात केले.
मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा संपूर्ण हिंदोस्तानात गाजत होता. अशाच वेळी अहमदशाह अब्दाली दिल्लीवर चालून आला. दिल्ली हादरली होती. मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली.
नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे… भाऊंच्या नेतृत्वाखाली होळकर, शिंदे, पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते.
दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती. एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते. याचवेळी भाऊंची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती.
अशाच एका खलबतात जनकोजी शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला. तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला. बघता बघता दहा सैन्य गारद केले.
पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले. पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्या जनकोजीला लांबूनच पहात होते. शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशिव भाऊंकडे परत आला. भाऊंनी त्याचा सत्कार केला. तसा जनकोजीनी भाऊंना प्रश्न विचारला. माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता.? आणि बळवंतराव काय करत होते, जरा विचारा त्यांना… त्यावरुन शब्दाला शब्द झाला. दरबार संपला… सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले.
पण बळवंतरावांच्या बायकोला दरबारातील घडला प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला. तिने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले. आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली. एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले. आर्यपत्नी म्हणाली, “या पराक्रम करुन आलात ओवाळते पंचारतीने.” आपण रक्ताचा थेंबही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात. बळवंतरावांनी मान खाली घातली. तसा पत्नीच्या तोंडाचा ताबा सुटला. ती म्हणाली, उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव.? एका नामर्दाचा.? की पळपुट्याचा.? लाज कशी वाटली नाही तुम्हाला.?
पत्नी ताडताड बोलत होती आणि बोलता बोलता म्हणाली, जा परत गिलच्यांना ठेचा त्याशिवाय तोंडही मला दाखवू नका. जिंकून आलात तर ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन.
गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले. सरदशी हात तलवारीवर निघाला. बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकली. बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले. हर हर महादेव… जय भवानी… जय शिवाजी अशी आरोळी घुमली. अफाट कापाकापी सूरु झाली. गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते. बळवंराव त्वेशाने दांडपट्टे फिरवत होते. त्यांचे कान फक्त आकडे एकत होते. हजार… पाचहजार… आठहजार…. एकच कापाकापी… रक्ताचा चिखल अन् प्रेतांचा ढीग दिसू लागला. एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा, हलगीचा नाद घुमला. फिरणाऱ्या दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल. साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात… बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. प्रत्यक्ष स्वामी… फक्त माझ्यासाठी…! खरंच धन्य झालो मी आज… पण एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली. एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या… भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला. सदाशिव भाऊंनी त्या अचेतन देहाला मिठीच मारली. आदर्श प्रेमाच हे उदाहरण…
भाऊंनी देह मागे आणला. पानिपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली. बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली. त्या सती जाणार्या पत्नीला सदाशिवराव भाऊ सांगत होते. बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे. किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको. पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली. तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की, याचा सांभाळ आपण करा आणि मोठा झाला की, एव्हडच सांगा त्याला… “तुझे आई वडील का मेले” हीच आठवण द्या. बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल. कारण तो वीराचा पुत्र आहे. पुढे १४ जानेवारी १७६१ पानिपतचा रणसंग्राम झाला. मराठे तळहातावर शीर घेऊन लढले. देशासाठी… धर्मासाठी… महाराष्ट्राची एक तरुण पीढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली.
पण पानिपतात जय मिळवून ही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची… अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला.
पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा… राष्ट्रभक्तीचा आणि १७७५-७६ च्या वर्षात मराठ्यांनी पुन्हा दिल्लीला धडक दिली. पार सिंधूपर्यत भगवा रोवला… यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता. पानिपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता.
आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले… तो पोर म्हणजेच… लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा.
आप्पा बळवंत मेहेंदळे… आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा…
त्याच्या पराक्रमावर बहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली करुन दिली आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नांव ठेवले गेले.
“आप्पा बळवंत चौक…”
या चौकाच्या नावाच्या निमित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे, स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्या सदाशिवरांवांचे आणि आई वडीलांचा शब्द साकार करणार्या त्या आप्पा बळवंतांचे… राष्ट्रासाठी स्वतःची आहूती देणार्या या सार्या वीरपुरुषांना दंडवत…!
******
‘आप्पा बळवंत चौक ‘ नावाचा आज अर्थ उमगला.
आजकाल मॉडर्न झालेली लोकं त्या चौकाला पुण्यात ‘ ABC चौक ‘ म्हणून पुकारतात. तसंही नवीन पिढीने सगळीकडे shortcut नावे कशी वापरता येतील याचा ध्यासच घेतला आहे. पण त्यामुळे त्या ABC चे नाव अप्पा बळवंत चौक आहे याचा विसर पडायला नको एवढेच! असा आप्पा बळवंत चौक अनेक दिवसांपासून ठाऊक होता पण त्या नावामागे असा अफाट प्रचंड ताकदीचा इतिहास होता हे आज लेखाच्या निमित्ताने समजले तेव्हा उर अभिमानाने भरून आला
शब्दांकन:- बाजीराव सुधाकर जांभेकर
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





छान लेख!