श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “देवदूताच्या नावानं चांगभलं..!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

आम्ही नागपूरचा दौरा आटोपून यवतमाळला निघालो होतो. यवतमाळला माझा जुना जिवलग मित्र प्रकाश गायकवाड याची मृत्यूशी झुंज चालू होती. प्रकाश माझा नांदेडला ‘लोकमत’मध्ये असतानाचा सहकारी, मित्र. लोकमतच्या त्या काळात आम्ही कित्येकदा रात्री रस्त्यावर भटकत बातम्यांचा शोध घेतला होता. चहा टपरीवरच्या गप्पांपासून ते संपादकीयच्या गंभीर चर्चांपर्यंत प्रकाश हा माझा सततचा साथीदार होता.

आता मात्र तो जीवन-मरणाच्या सीमारेषेवर उभा होता. रुग्णालयाच्या त्या खोलीत प्रवेश करताच मन सुन्न झालं. प्रचंड औषधोपचार, डॉक्टरांची धडपड, तरीही त्याच्या अंगातली शक्ती रोज थोडी थोडी निघून जात होती.  पण डोळ्यांतली चमक मावळली नव्हती. मला पाहताच त्याने ओठांवर हलकं हसू आणलं आणि म्हणाला,

“अरे, तू आलास! आता मला काही चिंता नाही.” त्या क्षणी माझे शब्द ओठांवर अडखळले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मनात विचार आला.

आपण आयुष्यभर लोकांच्या समस्या लिहितो, त्यांना आवाज देतो; पण जेव्हा आपल्या जवळचाच एखादा मित्र मृत्यूच्या झुंजीत असतो, तेव्हा आपण किती असहाय होतो.

त्याचा हात हातात घेत मी शांत बसलो. कित्येक आठवणींनी मन व्यापलं. रात्रीच्या जागरणानंतर पहाटेपर्यंत चाललेले डेडलाईनचे युद्ध, गावोगाव केलेल्या धावपळीच्या बातम्या, सायकलवरून केलेला प्रवास आणि प्रकाशचा खणखणीत हशा. पत्रकारितेतील हा योद्धा आज जीवनमरणाच्या सीमारेषेवर उभा आहे, ही कल्पनाच मनाला चिरून गेली.

प्रकाशला कॅन्सर झाला होता. तो शेवटच्या टप्यातून बाहेर येण्यासाठी इलाज घेत होता. प्रकाशची आई माझ्याशी बोलत होती. ती म्हणाली, “मुंबईत नऊ महिने काढले. आता तो जरा बरा आहे. येथे या दवाखान्यात दोन वर्षांपासून इलाज चालू आहे.”

आईच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या आसवांत मला तिच्या मनातील प्रचंड यातना दिसत होत्या. तिने मागच्या सगळ्या हालअपेष्टा सांगितल्या. ती म्हणाली, “प्रकाशला सतत बाहेर खाण्याचा चटका होता, म्हणूनच कॅन्सर झाला, असं पहिल्याच भेटीत डॉक्टरांनी सांगितलं.”

मलाही प्रकाशच्या सवयी माहीत होत्या. मी प्रकाशकडे पाहिलं आणि आईकडे वळून विचारलं,  “आई, एवढा खर्च झाला, तो तुम्ही केला कसा?”

काकूंनी संपूर्ण कहाणी सांगितली. ऐकून मी थक्क झालो. त्या म्हणाल्या, “तीस लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. पण डॉ. ओमप्रकाश शेटे  यांच्यामुळे ते सगळं केवळ तीस रुपयांत झालं.”

त्यांच्या बोलण्यात सतत एक नाव येत होतं, डॉ. ओमप्रकाश शेटे.

काकूंचा आवाज थरथरत होता.

“प्रकाशच्या एका मित्राने डॉ. शेटे यांच्याशी ओळख करून दिली. त्या दिवसापासून त्यांनी आम्हाला सोडलं नाही. एवढा मोठा माणूस देवासारखा धावून आला आणि मुंबई सोडेपर्यंत सावलीसारखा सोबत राहिला. चार दवाखाने बदलले, पण कुठेच एक पैसाही लागला नाही. उलट, खर्चासाठी लागणारे पैसेही त्यांनी पदरमोड करून दिले. प्रकाशची लहान लहान मुलं पाहून, पहिल्याच भेटीत शेटेसाहेबांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.”

आईच्या या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. माझ्या डोळ्यांसमोर डॉ. शेटे यांचा प्रत्यक्ष देवदूतासारखा चेहरा दिसू लागला. त्यांच्या कृपेने, त्यांच्या सहकार्यामुळे, प्रकाशसारख्या कित्येकांच्या घरात पुन्हा उजेड परतला होता.

प्रकाश ज्या दवाखान्यात होता, त्या दवाखान्यात अनेक रुग्ण होते. त्यांपैकी  अनेक जण डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या कृपेने मोठ्या मोठ्या आजारांवर उपचार घेत होते. मी दवाखान्याच्या वार्डांतून फेरफटका मारत होतो. ज्यांना ज्यांना भेटलो, त्यांच्या डोळ्यांत एकच भाव दिसला, आस्था आणि कृतज्ञता.

त्या प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर मला डॉ. शेटे यांच्याविषयीची न विसरता येणारी अपार श्रद्धा दिसत होती. मला डॉ. शेटे यांची ओळख नवी नव्हती; पण या क्षणापर्यंत त्यांचं कार्य किती अफाट, किती सर्वव्यापी आहे याची मला कल्पना नव्हती. एकेक रुग्ण त्यांच्याकडे जणू देवाप्रमाणे पाहत होता.

तेव्हाच माझ्या मनात एक विचार घुमला,

“जगात देव कुठे आहे?”

त्याचं उत्तर त्या क्षणी मला सापडलं.

देव म्हणजे डॉ. ओमप्रकाश शेटे.

ज्याच्या हाताने लाखो लोकांना जीवनदान मिळालं, ज्याच्या डोळ्यांत दुसऱ्याच्या दुःखाने पाणी येतं, ज्याच्या पावलांनी गरिबांच्या दारात आशा उभी राहते.

डॉ. शेटे यांचं नाव उच्चारलं की प्रत्येकाच्या मनातून एकच शब्द उमटतो, “देवदूताच्या नावाने चांगभलं!”

मी यवतमाळवरून मुंबईच्या दिशेने निघालो.  प्रवासात असताना मी डॉ. ओमप्रकाश शेटे यांना फोन केला. प्रकाशची खुशाली त्यांना सांगितली आणि भेटीसाठी वेळ मागितला. त्यांच्या आवाजातली माया आणि साधेपणा जाणवला. त्यांनी मला तत्परतेनं भेटीसाठी बोलावलं.

भेटीला जाण्यापूर्वी मी एक पत्रकार म्हणून डॉ. शेटे यांच्या कार्याची  माहिती काढली आणि त्या शोधयात्रेतून मला जे कळलं, ते अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं. एक माणूस, सरकारी यंत्रणेचे गुंतागुंतीचे कारस्थान भेदत, अनेकांचे स्वार्थ आडवे येऊनही, सत्ताधाऱ्यांची नाराजी सहन करूनही, हा माणूस लाखो लोकांच्या जीवनासाठी झटतो आहे. डॉ. शेटे यांचं काम म्हणजे केवळ वैद्यकीय सेवा नव्हे, तर मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माणसाच्या श्वासाला नवी उमेद देणारा संजीवनीचा झरा आहे. समाजातल्या कित्येकांना शत्रू करून घेतलं, पण तरीही त्यांनी गरिबांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. माझ्या डोळ्यांसमोर एक सत्य उभं राहिलं, देव मूर्तीमध्ये नसतो, तर अशा माणसांच्या रूपांत आपल्यातच असतो, आणि म्हणूनच लोक त्यांना ‘देवदूत’ म्हणतात.

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मंत्रालयात २०१५ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना केलेली कामगिरी संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. त्यावेळी शासकीय व्यवस्थेवर त्यांच्या सामाजिक कार्याच्या मोहोरामुळे विश्वासार्हतेची मुद्रा उमटली होती.

राज्यातील तब्बल साडेतीन हजार दवाखान्यांची दारे गरिबांसाठी खुली करणारा मसीहा म्हणून जनतेनं डॉ. शेटे यांच्याकडे पाहिलं. आयुष्याच्या अखेरच्या खडतर टप्प्यावर असलेल्या हजारो रुग्णांना त्यांनी ५९८ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली, ही खरी त्यांची ऐतिहासिक कामगिरी ठरली.

याच कार्याचा गौरव करूनच १ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्णी राज्याच्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या प्रमुख पदावर लावली. आज ते जीवनदायी आणि महात्मा फुले या दोन्ही महत्त्वाच्या योजनांना दिशा देतात. राज्याची आरोग्यव्यवस्था आता त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. त्यांच्याकडे आता ‘अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन समिती, महाराष्ट्र शासन’ हे पद आहे. त्यांनी केंद्रात काम केल्यामुळे तो अनुभवही उपयोगाला आला आहे.

केंद्र आणि राज्य यांचा समन्वय साधत त्यांनी राबवलेल्या आरोग्यविषयक धोरणांमुळे, दीर्घकाळ आजारी असलेल्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला जणू नवसंजीवनी मिळाली आहे. लादलेलं ओझं दूर सारून आरोग्य विभागाने डॉ. शेटे यांच्यामुळे मुक्त श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. मी या प्रवासात डॉ. शेटे यांच्याबद्दल वाचत होतो. वरळीला आरोग्य विभागाचे ‘जीवनदायी’ नावाचे मोठे कार्यालय आहे. मी तिथे पोहोचलो. संपूर्ण परिसरात मोठी गर्दी होती.

डॉ. शेटे अजून आले नव्हते. मी बाहेर बसलेल्या लोकांशी बोलत होतो. त्या प्रत्येकाच्या डोळ्यांत एक वेगळीच आशा होती. कुणाला ऑपरेशनसाठी मदत हवी होती, कुणी दवाखान्याचं कमी करायचं बिल घेऊन आले होते, तर कुणी आरोग्याच्या मोठ्या संकटातून सुटण्यासाठी केवळ एक आधार शोधत होता.

अनेकांच्या हातात एक गुलाबाचं फूल होतं,  आभार मानण्यासाठी. ते फूल जणू त्यांच्या मनातील कृतज्ञतेचं प्रतीक होतं. डॉ. शेटे यांची वाट पाहात ते सर्व जण शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यांवरची ओढ, आतली धडपड, आणि आशेचा किरण मला स्पष्ट दिसत होता.

मी ज्या कोणाशी बोललो, त्याची एक वेगळी कहाणी होती. कुणी आरोग्याच्या प्रचंड संकटातून जात होतं, तर कुणी नुकतंच त्या संकटातून बाहेर पडून आलेलं होतं. पण एक गोष्ट मात्र सारखीच होती—सर्वांच्या कहाणीत डॉ. ओमप्रकाश शेटे यांचं नाव हेच ‘जीवनदाना’चं प्रतीक होतं.

तपस्या तेरटी ही चार वर्षांची छोटी मुलगी आणि तिचे आई-वडील भेटले. त्यांना डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे आभार मानायचे होते. तपस्याच्या वडलांशी मी बोललो आणि जे काही त्यांनी सांगितलं ते ऐकून मी थक्कच झालो.

तपस्याचे वडील एका छोट्या गावात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.  मुलगी गंभीर आजारी पडली, तेव्हा संपूर्ण कुटुंबावर जणू आकाश कोसळलं. तपस्याला लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण) करणं गरजेचं होतं. पण खर्च तब्बल २५ लाखांहून अधिक! त्यात वडलांचं दारिद्र्य, मुलीचं लहान वय आणि प्रचंड असहाय्यता, या सगळ्याने त्यांना खोलवर घेरलं होतं.

तपस्याचे वडील अनेकांचे दरवाजे ठोठावत फिरले, पण कुठेच काही उपयोग झाला नाही. शेवटी एका मित्राच्या मदतीने त्यांनी डॉ. शेटे यांच्याशी संपर्क साधला आणि तिथेच आशेचा किरण दिसला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted