श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सैनिकांना काय हवे?…” ☆ श्री संभाजी बबन गायके

वीर चक्र विजेते कर्नल (निवृत्त) ललित राय साहेब

पलटणीत विजयी जल्लोष सुरू आहे. पण सैन्य नायकाच्या काळजात एक वादळ घोंघावत आहे.. त्याने पाहिलेली दृश्ये त्याच्या नजरेसमोरून काही केल्या हटत नव्हती. रात्रीचा प्रचंड काळोख, जीवघेणी थंडी, धुकं! प्रचंड गोंधळाची स्थिती. चोहीकडे यमदूत तयारीत. त्यात त्याच्या कित्येक सैनिकांच्या छातीत गोळ्या घुसलेल्या होत्या.. पण लढाईच्या धुमश्चक्रीत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देता येत नव्हती…. सतरा हजार फूट उंचीवरल्या त्या पहाडांवर त्यावेळी मदत पोहोचवणं अशक्यच होतं. नायकाने त्या पोरसवदा पोरांच्या भळभळणाऱ्या जखमांवर बर्फाचे गोळे दाबून बसवले… शून्याच्या कितीतरी सेंटीग्रेड खाली गेलं होतं तापमान… सर्वकाही गोठून गेलेलं… बधीर झालेलं. मी येतो.. तोवर तग धरून रहा.. पोरा! इथून बसल्या जागेवरून जमेल तशी फायरिंग करीत रहा.. आम्हां वर चढत जाणाऱ्या सैनिकांना कव्हर फायर देण्याचा प्रयत्न कर! आपण जिंकण्याच्या अगदी जवळ आलो आहोत! पहाटेचा सूर्य उगवायचा अवकाश… पहाडावर तिरंगा लावतो आणि परत येताना तुम्हांला खाली घेऊन जातो! …

त्या जवानांचा आणि सेना नायकाचा परिचय केवळ तीस दिवस जुना… पण रक्ताचे नाते मात्र आधीपासूनच होते. साहेब त्यांच्याच इलाख्यातील मूळचे. ते नुकतेच पलटणीमध्ये रुजू झाले होते अगदी तातडीने. कामच तसे होते. साहेबांनी योजना आखली… पण ते काम सोपे नव्हतेच. शत्रू अतिशय भरभक्कम स्थितीमध्ये होता. अगदी मन मानेल तेव्हढा गोळीबार करू शकत होता आणि तोही अचूक. मिनिटाला हजार गोळ्या डागणारी शस्त्रे होती… बाकी हत्यारे तर होतीच. पलटण जिथून वर चढण्याचा प्रयत्न करीत होती त्या जागेवर शत्रू अक्षरशः चारही बाजूंनी गोळीबार करीत होता… कारण शत्रू अशाच ठिकाणी बसला होता जिथून सर्वकाही दिसू शकेल.

साहेब स्वतः एका तुकडीसोबत वर चढत होते. इथपर्यंत पोहोचायला सहा सात तास लागले होते… हवेत प्राणवायू नव्हता… शत्रूने डागलेल्या गोळ्यांच्या, गन पावडरचा वास मात्र पुरेपूर भरून उरला होता. एरव्ही सपाटीवर शंभर किलोचे वजन सहज उचलणारे जवान पाठीवरच्या वीस पंचवीस किलोच्या वजनाने मेटाकुटीला आले होते. या पोरांनी अन्नाचे वजन नको म्हणून अन्नापेक्षा दारूगोळा जास्त नेणे पसंत केले होते! काहींनी तर इतरांकडून गोळ्या, हातबाँब चक्क मागून घेतले होते. शत्रूच्या त्या मरण वर्षावात न्हात न्हात छोट्या छोट्या गटांत सैनिक आणि अधिकारी वर चढत गेले. थोड्याशा सपाटीवर असलेल्या शत्रूच्या खंदकाजवळ जायचे तर जमिनीवर लोळण घेऊन.. सरपटत जावे लागते… डोक्यावर गोळ्या आवाज करीत.. “वाचलास यावेळी, तुझं नाव नव्हतं माझ्यावर” म्हणत पुढे निघून जात होत्या.

आडबाजूला शत्रूचे चार बंकर आहेत, असा नायकाचा अंदाज होता.. त्याच्या एका आदेशावर एक तरुण अधिकारी पुढे सरसावला… हातगोळे भिरकावत त्याने तीन बँकर्समधले शत्रू टिपले… पण तिथे चार नव्हे सहा बंकर होते… त्यातील एका बंकर मधून आलेल्या गोळ्यांनी या अधिकाऱ्याच्या थेट कपाळाचा वेध घेतला…. मोहरा कोसळला.. पण प्राण सोडताना म्हणून गेला… छोडना नहीं! मग उर्वरित जिवंत देह त्या आगीत शिरले…. काही मिनिटांत बंकर मधील श्वापदे मारली गेली! पण नायकाच्या डोळ्यांदेखत एक तरणाबांड सिंह बळी पडला होता… हा विजय खूप काही हिरावून घेणारा होता! पण मागे हटलेला शत्रू पुन्हा मोठ्या संख्येने चालून आला… कारण त्याच्या तोंडचा मोठा घास आपल्या सैनिकांनी हुसकावून घेतला होता. त्यांच्याशी मुकाबला करण्यात दोन दिवस गेले! थोडी शांतता झाल्यावर, खालून आणखी कुमक आल्यावर साहेब खाली उतरू लागले!

‘मी येतो माघारी’.. म्हणून ते ज्यांना त्या दगडांमागे ठेवून आले होते, त्यांना पाहिल्याशिवाय साहेबांच्या जीवात जीव येणार नव्हता.. साहेब सरसर खाली उतरत होते…. त्या जागी पोहोचतात तो त्यांना ते तिघे दिसले…. गोळीबार करण्याच्या पवित्र्यात दगडावर टेकून उभे होते… रायफल्स वरच्या बाजूला नेम धरलेल्या अवस्थेत रोखलेल्या होत्या… बोटं ट्रिगर मध्ये होती… रायफल मधील सर्व गोळ्या डागल्या गेलेल्या होत्या… शरीर बर्फाचे झाले होते… थिजलेले सैनिक… आणि पुतळे बर्फाचे.. वाटलं.. आता आदेश कानी पडताच ताठ उभे राहतील… जयहिंद साब म्हणतील! पण तसे होणार नव्हते… त्या देहांत प्राण उरले नव्हते! फार मोठी किंमत अदा केल्यावरच विजय पदरात पडला होता… आणि पदर विदीर्ण झाला होता!

साहेब त्यांच्या कार्यालयात विषण्ण अवस्थेत बसलेले आहेत. आपण कुणासाठी, का लढलो? कुणाला याचं काही घेणं देणं आहे का नाही? त्यांच्या मनात रागाची भावना दाटून आली होती… जवान पोरांचे छिन्नविछिन्न देह दिसत होते! साहेबांच्या हृदयात पडलेला खड्डा अधिकाधिक खोल होत होता!

एवढ्यात साहेबांचा सहाय्यक सैनिक सेवक साहेबांना त्यांची परवानगी विचारून आता आला! “साहेब, तुमच्यासाठी पत्रं आली आहेत, आणू का आपल्याला दाखवायला? “

साहेबांनी मानेने होकार देताच तो सैनिक दोन मोठ्या सुटकेस घेऊन आता आला!

“एवढी पत्रं? ” साहेबांनी एक सुटकेस उघडायला लावली… शिगोशिग भरलेली होती सुटकेस. साहेबांनी एक लिफाफा उघडला!

– – कुठल्याशा शाळेतील एका मुलीने लिहिले होते… “अंकल, आप थे इसलिये हम है! हम यहाँ आराम से रह सकते है.. क्योंकी आप सीमा पर खडे हैं… हम ने टीवी पर देखा आपका पराक्रम! हम बडे आभारी हैं.. जय हिंद! “

साहेबांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले! साहेबांनी सर्वच्या सर्व पत्रं नजरेखालून घातली. एकेक पत्र त्यांना एकेका मेडल सारखे वाटत होते. आपल्या पोरांचे बलिदान या नव्या पिढीला माहीत आहे, त्याचे महत्त्व त्यांना समजले आहे, या विचाराने त्यांच्या मनावरील ताण कमी झाला.. हृदय अभिमानाने भरून आले!

आपल्या जवानांच्या कहाण्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवल्याच पाहिजेत.. असा त्यांनी निर्धार केला… ते सेनापती, सेनानायक आहेत…

दोन जुलै १९९९ रोजी कारगिल येथील खालुबार हे शत्रूने ताब्यात घेतलेले सैन्य ठिकाण, १/११ गोरखा रायफल्स/रेजिमेंटचे नेतृत्व करून, स्वतः लढून, प्रचंड पराक्रमाने परत मिळवण्यात यश मिळवलेले 

वीर चक्र विजेते कर्नल (निवृत्त) ललित राय साहेब.

निवृत्तीनंतर कर्नल साहेबांनी देशभर विविध ठिकाणी कारगिल युद्धाबाबत अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली आहेत. आपल्या शूर वीरांच्या कथा कर्नलसाहेब मोठ्या उत्साहाने सांगतात आणि श्रोत्यांच्या मनात देशप्रेम जागृत करतात!

– – जनतेने सैनिकांच्या पराक्रमप्रती किती जागरूक असायला हवे, त्यांच्याबद्दल किती आदर व्यक्त करायला पाहिजे, हे कर्नल साहेबांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.

एका मुलाखतीत साहेब म्हणतात… जवान शत्रूशी लढतो ते शत्रूशी वैरभाव असतो म्हणून नव्हे.. तर आपल्या देशातील नागरिकांविषयी अत्यंत प्रेमभाव असतो म्हणून. सैनिक फार काही मागत नाहीत… फक्त कौतुकाचे चार शब्द, थोरामोठ्यांचे आशीर्वाद!

अन्यथा.. भगवद्गीता आश्वासन देते त्यानुसार… सैनिक हुतात्मा झाला तर स्वर्ग भोगतो आणि जिंकला आणि जीवित राहिला तर पृथ्वीचे राज्य त्याचेच असते!

या वर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय सव्वीस वर्षांचा झाला आहे. हुतात्मा सैनिक, त्यांचे नातेवाईक, सध्या कार्यरत असलेले सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांसाठी आपण काय करू शकतो? यावर निश्चित विचार करूया! जय हिंद!

– – शाळकरी मुलांनी सैनिकांना पत्र लिहिणे, राख्या पाठवणे हे उपक्रम खरोखरीच उत्तम परिणाम घडवून आणतात!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted