सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ आमच्या डोळ्यांनी जग बघाल? – लेखक : श्री हर्षद जाधव ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

 (१५ ऑक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त….)

अंधत्व हा दैवी शाप आहे, पूर्वजन्मीचे पाप आहे, अशा पूर्वापार समाजधारणा होत्या. समाज अंध व्यक्तींना तुच्छतेची, तिरस्काराची वागणूक देत असे. पापक्षालनार्थ प्रार्थना स्थळांसमोर प्रार्थना करून भिक्षा मागणे हाच काय तो उपजीविकेचा मार्ग त्या काळात अंधांकडे होता. अंधांना दानपात्र म्हणूनही बघितले जाई. मध्ययुगात विदुषकांसारखा किंवा इतिहास कथेकऱ्यांसारखाही अंधांचा उपयोग केला जात होता.

१६व्या शतकात अंधांच्या या दयनीय परिस्थितीचा विचार काही विचारवंत करू लागले होते. ‘अंध व्यक्तींची बुद्धीमत्ता, इतर इंद्रियांची कौशल्ये व कार्यक्षमता ओळखल्या गेल्या पाहिजेत, ‘ असे विचार वॉल्टेअर यांनी मांडले होते. १७४९ मध्ये पॅरिसचे डॅनेस डिडेरो यांनी दृष्टिवान व्यक्तींसाठी दृष्टिहीनांशी संबंधित एक लेख प्रसिद्ध केला. त्यातून त्यांनी अंधांची बुद्धिमत्ता, कार्यक्षमता आणि इतर इंद्रियांच्या कुशलतेकडे समाजाचे लक्ष वेधले आणि त्याबरोबरच समाजाला आवाहनही केले. या लेखात ते म्हणतात, ‘दृष्टीअभावी अंधजनांची इतर इंद्रिये अधिक तीक्ष्ण बनत नाहीत, तर अंधत्व त्यांना आपल्या उर्वरित इंद्रियांना अधिक प्रयोगशील बनण्यासाठी प्रवृत्त करते. परिणामी, ती नक्कीच कार्यक्षम व कुशल बनतात. त्यामुळे जे काही अंध व्यक्तीकडे आहे, त्या आधारे त्याला शिकवले गेले पाहिजे, जे नाही त्याची चिंता करण्यात अर्थ नाही. दृष्टिवान समाजासोबत दृष्टिहीन व्यक्तींचे सक्रिय संबंध निर्माण झाले पाहिजेत.

आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. परिस्थिती बदलली आहे, पण अंधांविषयीचे समज-गैरसमज मात्र बऱ्याच प्रमाणात आजही टिकून आहेत. वॉल्टेअर आणि डिडेरोला जे सोळाव्या शतकात समजले होतं, ते आपल्याला आजही पुरेसे समजलेले नाही. म्हणूनच आपण अंध-अपंगांना, ‘दिव्यांग’ असा एक अतार्किक, अवैज्ञानिक आणि अर्थशून्य शब्द त्यांनी न मागताच बहाल केला आहे. या दिव्यांग शब्दामागे दडलेले एक धादांत खोटे वाक्य म्हणजे, ‘अंधांना सहावे इंद्रिय, सिक्स्थ सेन्स असतो. ‘ हा एक फार मोठा गैरसमज आहे. असे कुठलेही अधिकचे इंद्रिय किंवा सिक्स्थ सेन्स आमच्याकडे नसतो. डोळ्यांनी पाहता न येण्याची मर्यादा भरून काढण्यासाठी आम्हाला अत्यंत प्रयत्नपूर्वक इतर इंद्रियांना अधिक कार्यक्षम बनवावे लागते.

आमच्या एकूणच जगण्याचे अविभाज्य अंग असलेली ब्रेल लिपीच घ्या. ही लिपी शिकायची म्हटले म्हणजे बोटांच्या स्पर्श संवेदना तीक्ष्ण असणे अत्यावश्यक ठरते. त्यासाठी मग लहानपणापासूनच प्रयत्न केले जातात. एका वाटीत विविध कडधान्यांचे दाणे देऊन त्यांतून मूग, मसूर, मटकी, वेगळी करण्याच्या कृतींसारख्या अनेक कृती करवून घेतल्या जातात. मला स्वतःला सुरुवातीला ब्रेल नीट लिहिता-वाचता न आल्यामुळे दोनवेळा नापास व्हावे लागले होतं. पण नंतर मात्र एमएपर्यंतच्या शिक्षणात आणि आजही मी ब्रेल लिपी स्वतःला स्वावलंबी आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी वापरतोच. आज लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील माझे आरक्षित आसन मी याच ब्रेल लिपीच्या सहाय्याने सहज शोधू शकतो, कारण आसनाच्या मागील भिंतीवर ब्रेल लिपीत आसन r क्रमांक लावलेले आहेत. मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांवरील पुलांवर अंधांना फलाट क्रमांक समजावेत म्हणून पुलांच्या रेलिंग्सना फलाट क्रमांकांच्या ब्रेल पट्ट्या लावल्या आहेत. अलीकडे काही लिफ्ट्समध्येही बटनांवर ब्रेल लिपीत क्रमांक व नावे लिहिलेली असतात. मुंबईच्या रेल्वे फलाटांवर पिवळ्या रंगाच्या मूळ पृष्ठभागापेक्षा थोड्या ठळक पृष्ठाच्या लांबलचक पट्ट्या टाकलेल्या असतात. या पट्ट्या आमच्यासारख्या अंध प्रवाशांना फलाटावर सरळ रेषेत चालता यावे, फलाटाच्या कडेला जाऊन आम्ही खाली पडू नये, यासाठी आहेत. तसेच, आमच्यासाठीचा विशेष डबा जिथे येतो, त्या ठिकाणीही लादी लावलेली आहे. पायांना सहज जाणवेल, अशा ठळक पृष्ठभागाची

अंधांना ऐकूही येत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. खरे तर डोळ्यांची उणीव भरून काढण्यासाठी आम्हाला सतत ऐकण्यावाचून पर्याय नाही. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणाची पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध नसल्यामुळे आमच्या शिक्षणाचे साधन हे रेकॉर्ड केलेले ऐकणे हेच होऊन जाते. संवाद आणि पार्श्वसंगीताच्या आधारे चित्रपट, नाटक, टीव्ही मालिकांचा आस्वाद घेणे, रस्त्यावर चालताना रहदारीचा अंदाज घेणे, यासाठी आम्हाला आमची श्रवण संवेदना सतत जागती ठेवावी लागते. रेल्वे फलाटावर आपल्यासाठीचा डबा कुठे येणार, हे जसे पायाखालच्या फरशीवरून समजते, तसेच त्या ठिकाणी लावलेल्या बीपरमुळेही समजते. आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही मोबाइल, कम्प्युटरसारखी साधने त्यातल्या ‘टेक्स्ट टू स्पीच सिंथेसिस सिस्टीम’च्या म्हणजेच आवाजाच्याच आधारे सहज वापरतो.

आता इतकी सततची श्रवणसाधना करून तयार झालेल्या आमच्या कानांना, पीठ खाणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येणार नाही का? ‘हत्ती आणि आंधळे’ सारख्या अनेक जुन्या लोककथा, ‘आंधळं दळतय कुत्रं पीठ खातंय’, ‘आंधळीपेक्षा तिरळी बरी’, किंवा ‘आंधळा मारतोय डोळा’ यांसारख्या म्हणी आणि वाक्प्रचारांतून अंधांची चुकीची प्रतिमा समाजमनात निर्माण केली गेली आहे. आपल्याकडच्या नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांमधूनसुद्धा अंधांचे भिकारी, असहाय्य, परावलंबी असे पारंपरिक चित्रणच केलेले बहुतांश वेळा दिसते. त्यामुळे समाजमनही तसेच घडते. आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अंध व्यक्तीसुद्धाp विविध कामे कुशलतेने करीत आहेत, जिथे जीवघेणी स्पर्धा असते अशा कॉर्पोरेट जगतातही स्वतःला सिद्ध करत आहेत.

अलीकडे तर जे जे वाईट किंवा गैर, त्यासाठीही ‘अंध’ या शब्दाचा सर्रास वापर होऊ लागला आहे. अंधश्रद्धा, अंधभक्त, अंधानुकरण, आंधळेपणा असे शब्द, ‘आंधळ्यासारखं काय करतोस करतेस’, ‘आंधळ्यासारखं वागू नकोस’… असे वाक्यप्रयोग अगदी सहज केले जातात. विचारी म्हणवले जाणारे पुरोगामी तर ‘अंधभक्त’ हा शब्द सर्रास वापरतात. खरेतर श्रद्धा आणि भक्ती या दोन्ही शब्दांना ‘अंध’ हा शब्द विशेषण म्हणून लावण्याची काहीही गरज नाही. ते दोन्ही शब्द स्वयंसिद्ध आहेत त्यांचे अर्थ सांगायला. पण अंधत्व ही एक शारीरिक अवस्था आहे, ती बौद्धिक किंवा मानसिक अवस्था नाही, हे अजिबातच लक्षात घेतले जात नाही.

इथल्या धार्मिक परंपरांनी तर अंधांना दाणे टाकण्यासाठीची कबुतरे किंवा श्राद्धाची पाने खाणारे कावळेच करून ठेवले आहे. आजही अंधांसाठीच्या विविध निवासी शाळा आणि कार्यशाळांमध्ये जेवणावळी घालून पापक्षालन करवून घेणारी मंडळी आहेतच. छान स्वच्छ कपडे घालून ऑफिसबॅगसह रेल्वे गाडीत प्रवास करताना, केवळ अंधाला काहीतरी दिले म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल या भावनेतून मिटल्या हातात पैसे कोंबणाऱ्यांचेही अनुभव आमच्यातल्या अनेकांना आलेत. ते पैसे नाकारले की, ‘लक्ष्मी को ठुकराना अच्छा नहीं’ असे ऐकावेही लागले आहे.

‘तुम्ही काय, सरकारचे जावई. तुम्हाला नोकऱ्या सहज मिळत असणार, ‘ अशी मुक्ताफळे उधळणारेही भेटतात आम्हाला. त्यांना हे माहीत नसते की, आमच्यासाठीच्या राखीव जागांवर डल्ला मारणाऱ्या अनेक ‘पूजा खेडकर’ प्रवृत्ती आज व्यवस्थेत आमच्या जागा बळकावून बसल्या आहेत. आता शासकीय नोकऱ्या कंत्राटी झाल्यामुळे तर आमच्या नोकऱ्यांचे प्रश्न अधीकच जटिल होत चालले आहेत.

शासन स्वतःच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करते, त्यातले काही खर्चुन शासनाने आधी आपल्या अधीकारी-कर्मचाऱ्यांतील अंधांविषयीचे विविध गैरसमज दूर करायला हवेत आणि मग जनमानसातील गैरसमज दूर करण्यासाठीही काही जाहिराती, रिल्स, लघुपट बनवायला हवेत. आमच्यासाठीच्या सोयी आम्हाला नीटपणे वापरता याव्यात यासाठी तरी शासनाने लोकप्रबोधन करणे गरजेचे आहे. म्हणजे, रेल्वे फलाटावर, आम्ही ट्रॅकमध्ये पडू नये म्हणून पट्ट्या लावल्या आहेत, त्यांच्यावर आपली जनता खांबासारखी उभी असतेच, पण अनेकदा त्यांच्या बॅगाही नेमक्या त्यांवरच विसावलेल्या असतात. काठीचा आवाज करून कितीही वाट मागितली तरी काही फरक पडत नाही. रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट्स नेमक्या कुठे आहेत, हे अंध प्रवाशांना कळण्याची कोणतीच सोय नाही. तिथे बीपर असण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी आमचा प्रवास सुगम्य होईल अशा सोयी सर्वत्र व्हायला हव्यात.

नेमके हेच सगळे सांगण्यासाठी आजचा हा जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन किंवा जागतिक अंध दिन योजलेला आहे. त्याचे प्रयोजन संपेल तोच आमच्यासाठी सुदिन.

 

लेखक : श्री हर्षद जाधव

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted