श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ वृक्षमाता सालूमरदा थिमक्का… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

काही दिवसांपूर्वी सालूमरदा थिमक्का गेल्याची बातमी आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचली असेल. सालूमरदा हे त्याचं नाव नाही. कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो ‘ झाडांची रांग. ‘ रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडांची रांग या स्त्रीने उभी केली म्हणून ती सालुमरदा.

संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या उक्तीचा अर्थ हजारो वर्षांनी एका अशिक्षित आणि गरीब स्त्रीने त्यांच्या रूपाने आपल्या कृतीने सिद्ध केला. औपचारिक शिक्षण नाही, पण पर्यावरणाचे सखोल ज्ञान उपजतच होतं. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि मोलमजुरी करणारी ही स्त्री. तिचा विवाह बिक्कल चिक्कय्या यांच्याशी झाला. पण दोघांनाही अनेक वर्ष मूल होऊ शकलं नाही. या गोष्टीला त्यांनी नियतीचा शाप न मानता, वृक्षांनाच अपत्य मानण्याचं ठरवलं. त्यांच्या पतीनेही त्यांना या कामात मनापासून साथ दिली.

त्यांच्या गावाजवळून ९४ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जात होता. हुलीकल ते कुडूर या रस्त्यावर त्यांनी वडाची काही रोपे लावली. या रोपांना वाढवणे हा जणू त्यांच्या जीवनात कामचा एक भाग झाला. उन्हाळ्यात दूरवरून पाण्याचे हंडे घेऊन येणे, रोपांभोवती काटेरी कुंपण घालणे—हे त्यांचे रोजचे व्रत होते. ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी हा निस्वार्थ त्याग केला. त्यांच्या या ‘सालुमरदा’ (झाडांची रांग) मुळेच त्यांना हे आदराचे नाव मिळाले. या वाटेवर तब्बल ३८५ वडाची झाडे त्यांनी लावली. या झाडांवर पक्षी राहू लागले. वाटसरूंना आणि गुराढोरांना रस्त्यावर सावली मिळाली. एक नवीन विश्व उभे राहिले. एखाद्या व्यक्तीने ठरवले तर ती केवढे मोठे कार्य करू शकते हे त्यांच्या या कार्यातून सिद्ध होते.

असे सांगितले जाते की एकदा या रस्त्याने कर्नाटक मधील एक खासदार जात होते. दुपारच्या उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी रस्त्यावरील या वटवृक्षांच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती घेतली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वटवृक्षांची रांग पाहून त्यांना खूप आनंद वाटला आणि हे एवढे मोठे काम कोणी केले असा प्रश्न त्यांना पडला. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना लोकांनी थिमक्का यांचे नाव सांगितले आणि अशा रीतीने त्यांचे कार्य प्रकाशात आले.

ज्या काळात पर्यावरण संरक्षणाचा फारसा गाजावाजा केला जात नव्हता अशा काळात त्यांनी ह कार्य केले. आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीच्या (Global Warming) भीषण संकटाचा सामना करत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, थिमक्का यांनी केलेले कार्य केवळ एक सामाजिक उपक्रम नाही, तर ते २१ व्या शतकातील पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी मॉडेल आहे.

त्यांनी लावलेले प्रत्येक वडाचे झाड आज एक नैसर्गिक ‘कार्बन सिंक’ म्हणून कार्यरत आहे. ही वटवृक्ष पिढ्यानपिढ्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर टाकतात. थिमक्का यांनी आपल्या निष्ठेच्या बळावर एक नैसर्गिक CO2 फिल्टर तयार केला. त्यांच्या कार्यामुळे भूजल संवर्धन झाले आणि मातीची धूप थांबली. त्यांचे कार्य म्हणजे जागतिक तापमानवाढीच्या विरोधात केलेली एक स्थलांतरित (Local) आणि अत्यंत प्रभावी कृती होती.

थिमक्का यांच्या कार्याला त्यांच्या मानसपुत्र उमेश यांचा मोठा आधार लाभला. उमेश यांनी केवळ थिमक्का यांची वृद्धापकाळात सेवा केली नाही, तर या वृक्षारोपण मोहिमेचे व्यवस्थापन केले. दूरवरून पाणी आणणे असो, की या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे असो, उमेश हे थिमक्का यांच्या कार्याचे संवर्धक ठरले. त्यांच्या मदतीमुळेच थिमक्का यांच्या निस्वार्थ कार्याला पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

२०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळी त्या १०७ वर्षांच्या होत्या. त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या. त्यावेळेस ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांनी तो स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी आपला हात आशीर्वादासारखा रामनाथ कोविंद यांच्या मस्तकाला लावला. त्यामुळे आपण भारावून गेलो अशा प्रकारचे भावपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी काढले.

सालुमरदा थिमक्का यांना वटवृक्षाप्रमाणेच ११४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे.

“वृक्ष लावणारे निघूनिया जाती, तळी विसावते सानथोर।”

या उक्तीप्रमाणे, थिमक्का आणि त्यांचे पती आज नसले, तरी त्यांनी लावलेले वटवृक्ष आजही दिमाखात उभे आहेत. त्यांच्या शीतल छायेखाली वाटसरूंना सावली मिळते, प्राणी-पक्षांना आश्रयस्थान लाभते आणि परिसर शुद्ध राहतो.

थिमक्का यांनी जगाला दाखवून दिले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज नाही; त्यासाठी मनापासून इच्छा आणि निसर्गाप्रतीचे वात्सल्य आवश्यक आहे. त्यांचे जीवन चिरंतन प्रेरणास्रोत राहील आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांची ‘वृक्षमाता’ म्हणून असलेली भूमिका जगाला नेहमी दिशा देत राहील.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments