डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — पाठराखीण ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

पाठराखीण

चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा…. क्रमशः स्वरूपातील ही सिरीज!

पूर्वीची लग्नच मुळात तीन तीन दिवस चालायची. आणि त्याची तयारी तर एक दोन महिने आधीपासून सुरु व्हायची. यामध्ये गावातली सगळी मंडळी लग्न ज्याच्या घरी त्याच्याकडे न बोलावता स्वतःहून मदतीला जायची. ज्यातून सामाजिक एकोपा निकोपपणे जपला जायचा.

अर्थातच तेव्हा लग्न ठरवून (म्हणजे अरेंज मॅरेज) व्हायची. दोन्हीकडील मंडळींना ओळखणारा, खात्रीचा असा एक मध्यस्त असायचा. जो लग्न जुळवून देऊन दोन्हीघरचे आशीर्वाद घ्यायचा. मात्र एखादे लग्न फसले तर तोच बिचारा त्याची काहीही चूक नसताना शिव्यांचा धनी व्हायचा. हा भाग वेगळा.

पण खरी गम्मत लग्नाच्या विविध चालीरीतींमध्ये होती. अगदी बस्ता बांधण्यापासून ते मुलीला सासरी पाठ्वण्यापर्यंत इतक्या सुरेख चालीरीती होत्या की ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही पोस्ट सिरीज!!

बाकी रिवाजाबद्दल नंतरच्या भागात सांगेलच पण आज सांगतोय…. पाठराखीण या संकल्पनेबद्दल!

या नावातच त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं की, त्या काळी नवरी मुलगी लग्नाआधी सासरच्या घरी कधीच गेलेली नसे. आणि मग लग्न झाल्यावर अचानक अशा नव्या घरी, नव्या माणसात त्या नवरीला बिचकायला होऊ शकत. तीच मन नर्व्हस होऊ शकत. अहो साधं एका कुंडीतलं रोप जरी दुसऱ्या कुंडीत नेवून लावलं तरी पहिले एकदोन दिवस ते मुरझलेले असते. नंतर हळूहळू मूळ धरू लागून रुजते. आणि इथे तर जितीजागती एखादी कन्या परघरी जाणार असते मग तिची मानसिकता किती भांबावलेली असेल?

याचा विचार आपल्या पूर्वजांनी करूनच “पाठराखीण” हा रिवाज रूढ केला.

पाठराखीण म्हणजे नवी नवरी जेव्हा लग्नानंतर सासरी जायला निघते तेव्हा तिच्यासोबत माहेरची एखादी स्त्री सोबतीला दिली जायची. विशेषतः नवरीच्या आवडीची अशी ती स्त्री निवडून माहेरचे लोक तिच्यासोबत पाठवायचे. जास्तकरून लग्नात जी करवली असेल तिची निवड व्हायची. हिलाच पाठराखीण असं म्हणतात. जेणेकरून सासरी गेल्यावर भांबावलेली नवरीं आणि सासरचे लोक यांच्या मधला दुवा सांधला जावा. या कामासाठी पाठराखीण असायची.

नवी नवरी नव्या घरी गेल्यावर मुळात तर दोन चार दिवस तिला काहीच काम करू दिले जात नसे. “तू नवी नवरी आहे बाई…. नको लगेच कामाला लागू… पुन्हा आयुष्यभर आहेच काम तुला करायचे…. म्हणून तू फक्त बसून पहा सगळं…. आम्ही करतो कामे…. असं सासरच्या महिला त्या नवरीला सांगून आश्वस्त करायच्या. अशावेळी एखाद्या खोलीत एकटीच बसलेल्या त्या नवरीला “एकटं” वाटू नये म्हणून मग हि पाठराखीण तिच्यासोबत गप्पा मारायची. त्यामुळे नवरीचे मन जे माहेर सोडून आल्याने सैरभैर झालेले असायचे ते मग हळूहळू स्थिर व्हायचे.

किती छान संकल्पना होती न…. ही पाठराखीण! ही पाठराखीण सासरी त्या नवरीसोबत सुमारे पंधरा वीस दिवस राहायची. मग नवरीसह तिची सन्मानाने साडीचोळी देऊन सासरचे लोक माहेरी पाठवणी करायचे. या दोघीना घेऊन माहेरी नेण्यासाठी शक्यतो मुलीचा मामा गाडी घेऊन यायचा. त्यावेळी मग त्या मामाचाही धोतर टोपी देऊन सन्मान केला जायचा आणि मग या तिघांना वाटेत जेवायला म्हणून “दशम्या” (टिफिन) बांधून दिल्या जायच्या तसेच माहेरच्या लोकांसाठी म्हणून गोडधोड (शक्यतो बुंदीचे लाडू) डबाभरून दिले जायचे.

अर्थात ती पाठराखीण छुपी सीआयडी पण असायची बरं का!

म्हणजे आजच्या काळातील सीसीटीव्ही सारखी!!

माहेरून निघतानाच तिला त्याबद्दल सूचना दिल्या जायच्या. की सासरी गेल्यावर त्या सगळ्या लोकांचे बारीक निरीक्षण करणे, सासू नणंदा कशा राहतात, कशा बोलतात हे टिपून घेणे, पुरुष मंडळींचा घरात वावर किती? लक्ष किती दिले जाते… असं सगळं ती पाठराखीण मनामध्ये नोंद करून घ्यायची. आणि हि सगळी बितंबातमी नंतर माहेरी आल्यावर घरच्यांना सांगायची. यामागेही पूर्वजांनी केलेला मानसिकतेचा अभ्यास आहे. तो म्हणजे, सासरची मंडळी कशी आहेत हे एकदा कळल्यावर मग नवरीचे आईवडील किंवा जुनीजाणति मंडळी त्यावर “नवरीने पुढील आयुष्यात कसे वागायचे” यावर जणू एक रेडी रेकनर गृहपाठ नवरीला देऊन तिचा संसार अधिक सुखी कसा होईल याची काळजी घेतली जायची. उदा. सासू फटकळ तोंडाची असेल तर अशावेळी नवरीने शांत बसावे, तोंडाला तोंड देऊ नये. चुकीचे बोलत जरी असली ती तरी त्यावेळी शांत बसून नंतर वातावरण निवळल्यावर प्रेमाने सासूला ते सांगावे…. किंवा नवऱ्याला काय केलं की आवडत ते ओळखून त्या गोष्टी कराव्यात. उदा. नवरीने सकाळी उठून सगळं लवकर आवरून दारात रांगोळी काढल्यावर नवरा खुश होत असेल तर ते काम लक्षात ठेवून करावे.

थोडक्यात काय तर हल्ली नवरा बायकोच्या वादात “कौन्सेलर” जे काम करतात ते काम त्याकाळी माहेरची जाणती मंडळी करायची.

एक म्हण त्याकाळी म्हातारी मंडळी त्या नवरीला सांगत असत….

“तडजोड केली की काडीमोड होत नाही”

(काडीमोड म्हणजे डिवोर्स)!

थोडी ऍडजेस्टमेंट करून पहा…. कदाचित वाद कमी होतील असं आज जे “कौन्सेलर” सांगतात तेच त्याकाळी कोणत्याही विद्यापीठाची मानसशास्त्राची पदवी न घेतली म्हातारी मंडळी सांगायची. हे किती भारी न!

तर अशी हि…. पाठराखीण संकल्पना!! ज्यांना माहित होती त्यांना नॉस्टॅलजियाचा आनंद आणि ज्यांना माहीतच नसेल त्यांच्यासाठी रंजनातून प्रबोधन!!

डॉ. डीडी क्लास : आजकाल पाठराखीण हा रिवाज जवळपास लुप्त झालाय. त्याचे कारण चौकोनी कुटुंबात आजकाल एक तर अशी एखादी “एक्स्ट्रा” महिला घरात नसतेच. त्यातून दुसरं म्हणजे आजकाल मुलीचा साखरपुडा एकदा का झाला (किंवा लग्न ठरले जरी) तरी एकमेकांना घरी / हॉटेलात भेटण्याची मुभा आहे. गावातच सोयरीक ठरली असेल तर मग काय विचारूच नका. होणारी नवरी आधीच त्या घरी जाणेयेणे सुरु करते. दोन्हीकडची मोठी मंडळीही एकमेकांना भेटणे, घरी जेवायला जाणे सुरु करतात. त्यामुळे नवी नवरी सासरी गेल्यावर तिथं तिला सगळं सवयीचे आणि ओळखीचे झालेले असते. त्यामुळे बिचकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच मग पाठराखीण काय करायची? असं म्हणत हळूहळू ही प्रथाच कालबाह्य झाली. हे चांगलं की वाईट…. ते माहित नाही. कदाचित काळानुसार काही गोष्टी आऊटडेटेड होतात तशी हि पाठराखीण आऊटडेटेड झाली आता!

पण जेव्हा पाठराखीण संकल्पना अस्तित्वात होती तेव्हा खरेच ती व्यक्ती महत्वाची भूमिका करायची…. हे नक्की!!

धन्यवाद! भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या रिवाजाबद्दल!

तोवर स्टे ट्यून!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments