श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

विम्बल्डनची भैरवी ! … लेखक – श्री नवीन काळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

अख्खं जग ‘विम्बल्डन’ हे तिथे होणाऱ्या मॅचेससाठी पाहातं. मला देखील अर्थातच मॅचेस आवडतात, पण मला सर्वात आवडतो तो फायनल झाल्यानंतर तिथे होणारा तो छोटेखानी बक्षीस समारंभ ! लहानपणापासून मी या ‘समारोपाच्या’ प्रेमात आहे. मोजून दहा मिनिटं असतो तो कार्यक्रम. पण त्याच्याइतका आटोपशीर, देखणा आणि ग्रेसफुल कार्यक्रम मी आजतागायत पाहिलेला नाही. 

सुमारे एकशे सेहेचाळीस वर्षात या स्पर्धेने जगात किती बदल पाहिले असतील? काळाप्रमाणे  काही लेयर्स सोडले तर ही स्पर्धा त्याच ग्रेसने भरावली जाते. सध्या अमुक एक पॉप स्टार लोकप्रिय आहे, म्हणून त्याला परफॉर्म करायला बोलवा वगैरे गोष्टींची त्यांना गरज वाटत नाही. ‘सर्वोत्तम दर्जाचे टेनिस’ हाच इथला हिरो राहिलाय आणि राहील. संपूर्ण आयोजनामधली शिस्त वगैरे याबद्दल आपण इथे बोलूयाच नको ! (संपूर्ण मॅच सुरु असताना मी कुठल्याही लाईन अंपायरला दुसऱ्या लाईन अंपायरबरोबर गप्पा मारताना, टाळ्या देत हास्यविनोद करताना, वेगवेगळ्या तऱ्हेने खुणा करताना वगैरे पाहिलेलं नाही !)         

दरवर्षी तिथे होणारा तो कार्यक्रम मला एक प्रेक्षक, रसिक, आयोजक आणि माणूस म्हणून श्रीमंत करत असतो. सलग पाच सहा तास दुसऱ्याला पॉईंट मिळू नये म्हणून जीवाची बाजी लावणारे मॅच संपल्यावर एकमेकांविषयी किती आदराने बोलतात ! शेवटच्या त्या दहा मिनिटांच्या कार्यक्रमात भावभावनांचा किती सुंदर पट उभा राहतो ! किती मोजकं पण छान अर्थपूर्ण बोलतात हे खेळाडू ! यावरून त्यांच्या सरावामधून टेनिस इतकेच मानसिक दृष्ट्या सुद्धा किती प्रगल्भ झालेत याचं पदोपदी दर्शन घडत असतं. जय-पराजयाकडे हे लोकं कसे पाहतात याचा एक सुंदर वस्तुपाठ म्हणजे ही शेवटची दहा मिनिटं असतात. काल जोकोव्हिच मोजकंच पण खूप सुंदर बोलला. ‘मी माझ्यापेक्षा सरस खेळाडूकडून हरलोय… मी स्वतःला लवकरच भावनिक दृष्ट्या सावरून घेईन – पण ते उद्या सकाळी ! हा पराभव मी निदान आजतरी पचवू शकणार नाही !… २३ ग्रँड स्लॅम्स जिंकून सुद्धा पुन्हा पुन्हा जिंकण्याची उर्मी कशी टिकवून ठेवत असतील ही माणसं ! आज आपण हरलो असलो तरी निदान आपला मुलगा आपल्याकडे पाहून आश्वासक हसतोय, असं म्हणून स्वतःचे अश्रू थोपवू न शकलेला कालचा जोकोव्हिच मला खूप आवडला. 

मग प्रश्न पडतो, फायनल संपल्यावर त्या काही क्षणांपुरता खरंच कोणाचा पराभव झालेला असतो का? की ते दोघेही त्याक्षणी जय आणि पराजयाच्या पलीकडे गेलेले असतात? गेले काही दिवस जय-पराजयाचे युद्ध सुरु असलेल्या विम्बल्डनचा हा समारोप मला एखाद्या जमून आलेल्या भैरवीसारखा वाटतो. 

…. बहुदा हीच भैरवी अनुभवण्यासाठी माझ्यासकट संपूर्ण जग त्या विम्बल्डन मैफिलीची दरवर्षी वाट पाहातं !

लेखक : श्री नवीन काळे

प्रस्तुती :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted