श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – शब्दा नाही धीर… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
शब्दा नाही धीर /
ज्याची बुद्धि नाही स्थीर //१//
*
त्याचे न व्हावे दर्शन/
खळा पंगती भोजन//२//
*
संतांसी जो निंदी/
अधम लोभासाठी वंदी //३//
*
तुका म्हणे पोटी/
भाव आणीक ज्या ओठी//४//
*
– संत तुकाराम.
तुका म्हणे
ज्या माणसाची बुद्धी स्थीर नाही त्याच्या शब्दालाही धीर धरवत नाही. अशा माणसाचे प्रत्यक्ष दर्शन ही होवू नये. त्याच प्रमाणे जो खल आहे त्यांच्या सोबत बसून पंगतीतही कधी भोजन घेवू नये.
जी व्यक्ती संताची निंदा करते ती व्यक्ती स्वतःच्या लाभासाठी अधमालाही वंदन करते. त्याचे वर्तन ओठात एक आणि पोटत एक असेच असते.
तुकाराम महाराजांचे समाज निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आणि तरल होते. त्यांना माणसांची योग्य पारख होती. माणसातली वैगुण्ये सांगताना महाराज म्हणतात. जो माणूस स्थीर बुद्धीचा आणि गंभीर वर्तनाचा नसून चंचल स्वभावाचा असतो त्याच्या शब्दाना मुळीच धीर धरवत नाही. त्याची निर्थक बडबड सतत चाललेली असते. अशा माणसांचे आपल्याला दर्शन ही घडू नये
त्याच प्रमाणे दुष्कर्म करणा-या माणसासोबत पंगतीत बसून जेवणही करू नये. जो माणूस संतांची सतत निंदा नालस्ती करतो तोच माणूस स्वतःच्या लाभासाठी, स्वार्थी साठी अधमातील अधम व्यक्तीला वंदन करत असतो. तो ओठात एक आणि पोटात एक अशा कपटी स्वभावाचा असतो. अशा लोका पासून आपण दूरचं रहाणे पसंत करावे.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







छान विवरण एका तुकारामाने दुसऱ्या तुकयाच्या केलेल्या अभंगाचे