श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – विटाळ तो परद्रव्य परनारी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
विटाळ तो परद्रव्य परनारी/
येथुनि जो दुरी तो सोंवळा//१//
*
गद्य पद्य काहीं न धरावी उपाधी/
स्वाधिनची बुद्धि करुनी ठेवा//२//
*
विचारांचे काही करा रे स्वहित/
पापपुण्यातीत भांडवल//३//
*
तुका म्हणे न लगे जावें वनांतरा/
विश्व विश्वंभरा सारिखेचि//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
समाज सुसंस्कृत, नीतीमान, आणि परस्पराचे हीत जोपासणारा असायला हवा. त्यासाठी आपल्या आचारविचारावर आणि वर्तनावर आपलेच नियंत्रण असायला हवे. योग्य वर्तनाने आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती करू शकतो. समाजाला शांतता व स्थिरता देवू शकतो. यासाठी तुकाराम महाराजांनी आपले वर्तन कसे असावे हे सांगताना महत्वाचे मार्गदर्शन केले आहे.
ते म्हणतात. परनारी आणि परद्रव्य यांना विटाळ समजून आपण आपले शुद्ध चारित्र्य सांभाळले पाहिजे. या बाबतीत तुम्हाला कुठल्याही ग्रंथातिल किंवा पोथ्यातील लिखीत मार्ग दर्शनाची गरज नाही. तुमच्या जवळ तुमची स्वतःची बुद्धी आहे. म्हणून तुम्हीच सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावयाचा आहे. याच विचाराने आपले हीत कशात आहे हे ठरवायचे आहे. तुमचे हीत आणि तुमचे पापपुण्य कशात आहे हे ठरवण्यासाठी तुमच्या बुद्धीचे महत्वाचे भांडवल तुमच्या जवळच आहे. त्याच्या योग्य वापराने तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवावे. आणि आपले हीत साधावे. परमेश्वर प्राप्ती साठी रानावनात भटकण्याची गरज नाही. कारण हे जग म्हणजेच परमेश्वर आहे. दुस-याचे धन, दुस-याची पत्नी याना विटाळ माणने हाच देवाजवळ जाण्याचा साधा सोपा सरळ मार्ग आहे. त्यासाठी कोणत्याही पुराण श्रुती स्मृती यातील पुराव्यांची जरुरी नाही. तुमची बुद्धी जागृत ठेवा. हे सगळे विश्वच परमेश्वर आहे. कारण ते परमेश्वरानेच निर्माण केले आहे.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





