नीलिमा खरे
काव्यानंद
☆ अश्रु ढाळले किती… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆
डाॅ. निशिकांत श्रोत्री
☆ अश्रु ढाळले किती ☆
तुला न जाणिव स्मृतीत तुझिया अश्रु ढाळले किती
भान विसरले सुन्न जाहले रडले मी एकांती ||ध्रु||
*
पुष्प बहरल्या उपवनातुनी लपेटून गंध
भृंग-कळ्यांना खिजवित दावून अपुली प्रीत धुंद
उरात जपुनी धुंद आठवणी दिवस कंठले किती
अश्रु ढाळले किती ||१||
*
तरूतळी संध्यालाली पसरे मृद्गंधाची साथ
आणा भाका कितीक शपथा हाती होते हात
आता अंधुक सांजेपाठी काजळलेल्या राती
अश्रु ढाळले किती ||२||
*
प्रेम आपुले शोभतसे ते मनिच्या क्षितिजावरती
सौंदर्याची केवळ पखरण काही नाही हाती
जीवन झाले आता मृगजळ उगीच आशा होती
अश्रु ढाळले किती ||३||
*
तुझ्याचसाठी जीवन जगणे जपले स्वप्न उरी
तुझ्याविना हा काळ कंठला मुग्ध राहुनी जरी
कवटाळुनिया मरण उराशी जगत राहिले अति
अश्रु ढाळले किती ||४||
☆
©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
रसग्रहण: अश्रु ढाळले किती
माणसाचे आयुष्य म्हणजे केवळ वय वाढणे नक्कीच नाही. नानाविध भावनांची अनुभूती व त्यांचा अविष्कार जीवनात होत असतो.. या भावनांचे प्रकटीकरण करणे, त्यांचे विवरण यथार्थ शब्दातून मांडणे ही आंतरीक भावना सर्वांना असते. कवी मनाच्या लोकांना तर ती नेहमीच खुणावते.. अर्थात काही वेळा हे असे अनुभव कवीचे स्वतःचे ही असूच शकतात.. भावनांना शब्दांचे साज देऊन कवी कविता रुपात ही अनुभूती काव्यरसिकांसमोर सादर करतो. यथार्थ, अर्थवाही, अर्थपूर्ण काव्यरचना करताना कवी त्याच्याकडील शब्दभांडार कवितेच्या रूपावर उधळून देतो. कवितेचे हे शृंगारलेले रूप पाहून, वाचून वाचक /रसिक सहजपणे मोहित होतो. भावनेची प्रांजलता आणि तिचे हे साजिरे रूप घेऊन आलेली, मनावर गारुड करणारी अशीच एक भावकविता वाचण्यात आली. कवी आहेत डॉक्टर निशिकांत श्रोत्री… त्यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहातील हे भावगीत. आज या कवितेचा आस्वाद घेऊ या.
“अश्रु ढाळले किती” या शीर्षकावरून या कवितेत विरह /दुःख भावनांचा आविष्कार असणार हे रसिक वाचकांच्या लक्षात येतेच. यथार्थ व अर्थपूर्ण काव्यशीर्षकामुळे वाचकांच्या मनात मनोज्ञ भावनेचे शब्दचित्र नक्कीच तयार होते. या जाणिवेला अतिशय उच्च स्तरावर नेणारी आणि तितकीच भावगर्भितता देणारी ही कविता. काव्यशीर्षकातून उमगलेल्या भाववृत्तीचे अतिशय सुंदर शब्दचित्रण या कवितेत केलेले दिसते.
सर्वप्रथम या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते की ही संपूर्ण कविता “तिच्या” भावनेशी निगडित आहे. तिच्या अंतरंगातून उमटलेल्या आवाजांचा नाद आहे. कवी पुरुष असूनही त्यांनी या स्त्रीच्या भावनेला पूर्णपणे न्याय देऊन त्या प्रकारची शब्दयोजना आणि भाव या कवितेतून व्यक्त केले आहेत. त्यासाठी लागणारे तरल मन कवीपाशी असल्यामुळेच हे शक्य झाले आहे हे निश्चित…
तुला न जाणिव स्मृतीत तुझिया अश्रु ढाळले किती
भान विसरले सुन्न जाहले रडले मी एकांती ||ध्रु||
कवितेतील “ती” परिस्थितीवश एकांत भोगते आहे खरं तर एकटी पडली आहे हे म्हणणे योग्य ठरेल. कारण हा एकांत तिच्या दृष्टीने अजिबात सुखावह नाही. तिला अतीव प्रिय असलेल्या प्रियकराचा शाश्वत विरह घडवून नियतीने हा तिच्यावर लादलेला आहे. साहजिकच या नकोनकोशा एकांतात ती स्वतःबरोबरच आजूबाजूच्या लोकांचे ही भान विसरली आहे. “भान हरपणे” न म्हणता “भान विसरले” अशी शब्दयोजना केल्याने कवीचे साहित्यिक भान लक्षात येते. दुःखामध्ये सर्व गोष्टींचा विसर पडतो हे लक्षात घेऊन अशी सुयोग्य शब्दरचना केली आहे. विरहाचा दुःखद धक्का प्राक्तनाने जीवनात तिला दिला आहे. अशा परिस्थितीत अटळ सत्याचे भान ती विसरली आहे हे गर्भित अर्थाने सूचित केले आहे. वरवर साधा सोपा सरळ अर्थ वाटतो पण कवीने सहजपणे गहन अर्थ यातून व्यक्त केला आहे. या सहेतुकपणामुळे कवितेतील तिच्या भावावस्थेकडे प्रकर्षाने लक्ष जाते. ती सुन्न, बधिर होवून जाणिवेच्याही पलीकडे गेलेली आहे. एकांतात ती केवळ रडली आहे. त्याच्या नसण्याने त्याच्या स्मृती तिच्या मनात प्रकर्षाने उचंबळून येतात. आपसूकच तिने अश्रू ढाळले आहेत. “किती” या शब्दांतून अगणित, गणना करता न येणारे हा सूचक भावार्थ अपेक्षित आहे. तिच्या या जाणिवेची त्याला जाणीव नसणारच कारण तो या “अशा” भावनिक जाणीवेच्या पलीकडे गेलेला आहे. ही जाणीव आता त्याला कधीच जाणवणार नाहीये. अतिशय सहजपणे साध्या, सोप्या शब्दांतून मृत्यूचे अटळ सत्य उलगडले आहे. मोजक्या व यथार्थ शब्दातून तिच्या भावनेचा स्तर आणि तीव्रता या ध्रुवपदातून लक्षात येते. अन् म्हणूनच सहजपणे वाचक तिच्या भावनांशी नकळतच जोडला जातो.
पुष्प बहरल्या उपवनातुनी लपेटून गंध
भृंग-कळ्यांना खिजवित दावून अपुली प्रीत धुंद
उरात जपुनी धुंद आठवणी दिवस कंठले किती//१//
सुमनविकसित उपवनात गंधांची उधळण झालेली असणार हे गृहीत आहे. येथे पुष्पबहर म्हणजे प्रीतीचा बहर. प्रेमाच्या उपवनी प्रीतपुष्पे बहरली.. त्यांचा
गंधदरवळ तनामनावर/तनामनाशी लपेटून घेतला. “लपेटून”शब्द फारच सुंदर व सुयोग्य.. भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला व काळजाजवळ असलेला गंध.. लपेटून हा अर्थपूर्ण व अर्थवाही शब्द यासाठी वापरला आहे. विकसित फुलांवर रुंजी घालणारे भुंगे तसेच इतर
अविकसित, अजून न फुललेल्या कळ्या यांना आपल्या धुंद प्रीतीचे प्रदर्शन करुन या युगुलाने खिजवले आहे. इथे भुंगे म्हणजे इतरेतर जे प्रीतीचा गंध व अनुभव घेत आहेत. त्यांच्यापेक्षा आपली प्रीती उच्च दर्जाची तसेच अधिक गहिरी आहे हे जाणवून दिले आहे. कळ्यांचा संदर्भ ज्यांनी अजून प्रेमाचा अनुभव घेतला नाही त्यांच्याशी आहे. “खिजवित” या शब्दातून स्वतःच्या गहिऱ्या प्रेमाचे जाणूनबुजून प्रदर्शन केले हा भाव व्यक्त केला आहे.
या कडव्यात अतिशय कल्पकतेने रूपक, चेतनागुणोक्ती तसेच अतिशयोक्ती अलंकारांचा वापर करून कवीने प्रेमाचा अनोखा स्तर वर्णिला आहे. अशा या धुंद प्रीतिच्या धुंद आठवणी मनात नव्हे तर उरात जपून तिने कितीतरी (अनेक असा अर्थ)दिवस कंठले आहेत.. “उरात”शब्दातून आत्यंतिक जवळ हा अर्थ लक्षात येतो. “कंठणे”म्हणून नाईलाजास्तव ती जगत आहे याकडे निर्देश केला आहे. पहिल्या दोन चरणातले यमक व तिसऱ्या चरणाचे ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज सुंदर… साहजिकच कवितेला मोहक लय व गेयता लाभली आहे.
तरूतळी संध्यालाली पसरे मृद्गंधाची साथ
आणा भाका कितीक शपथा हाती होते हात
आता अंधुक सांजेपाठी काजळलेल्या राती
अश्रु ढाळले किती ||२||
समय /काळ सरत राहिला. सांजवेळ सामोरी आली. अशावेळी झाडाच्या मुळात/अंतरंगात संध्येची लाली पसरते. अन् कातरवेळी कातर झालेल्या काळजाला जणू काही फक्त ओलावलेले डोळे साथ व साद देतात, घालतात. हे वाहणारे अश्रूं जमिनीवर पडून त्याचा गंध (मृद्गंध) मनाला साथ देतो. झाडाची मुळे जशी जमिनीत खोलवर जातात तसेच तिच्या ही मनात प्रीत खोलवर रूजलेली आहे. येथे तरू म्हणजे ती व संध्या म्हणजे वाढलेले वय/आयु… तसेच केवळ त्याच्या आठवणीने तिच्या गाली लाली पसरली असा अजून एक अर्थ.. माणूस अंतिमतः मातीत मिसळतो हे सत्य नाकारता येत नाही. तो गंध तिला साद घालतो आहे असा ही भावार्थ… अतिशय सुंदर रूपक… कवितेतील भावनेला अधिक अर्थ देणारे.. तिला अशा वेळी मनात जाग्या असलेल्या, कधी काळी घेतलेल्या साऱ्या आणाभाका, शपथा पुन्हा एकदा आठवतात. तेव्हा एकमेकांचे हात हातात होते… एकमेकांना एकमेकांची साथ होती, संगत, सोबत होती. आता मात्र अंधुक सांजेपाठी अटळपणे येणाऱ्या काजळलेल्या, काळोख्या रात्री नजरेतून, काळजातून व्यक्त होत आहेत. त्याच्या नसण्याने तिचे आयुष्य अंध:कारमय झाले आहे. प्रीतिचा अस्त म्हणजे रात्र झाली आहे.
प्रेम आपुले शोभतसे ते मनिच्या क्षितिजावरती
सौंदर्याची केवळ पखरण काही नाही हाती
जीवन झाले आता मृगजळ उगीच आशा होती
अश्रु ढाळले किती ||३||
या साऱ्या सुखद व दु:खद आठवात तिला प्रकर्षाने जाणवते की त्यांचे हे प्रेम तिच्या मनाच्या क्षितिजावरती शोभून दिसते आहे. अर्थात क्षितिजाप्रमाणे आता ते भासमान व दूरवर आहे. थोडक्यात तिला वास्तवाची जाणीव ही आहे. या रम्य आठवणी आता केवळ मनात जाग्या आहेत. प्रीतिच्या सौंदर्याची काल्पनिक पखरण फक्त हृदयात व हृदयातून आहे. यातले काहीच आता पुन्हा प्रत्यक्षात घडणार नाही. “काही नाही हाती”यातून हातात हात नाहीत, सोबत उरली नाही. शब्दशः हातात हात नाहीत हे जाणवून दिले आहे. तसेच “हाती न लागणे”म्हणजे न गवसणे.. श्लेष फारच छान… प्रीतभावनेने समृद्ध झालेले भावविश्व आता काळाआड गेले आहे.
जीवन हेच मृगजळाप्रमाणे भासमान झाले आहे. त्याच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची भावना खरी नाही हे तृषार्त मनाला जाणवले आहे. मृगजळाची आशा जशी खोटी असते तशीच आशा आता जीवनाविषयी वाटते आहे. जीवन या शब्दावरील श्लेषही अत्यंत समर्पक. जीवन म्हणजे पाणी व आयुष्य. तिच्या जीवनाला लागलेली प्रेमाची तहान कधीच भागणार नाही हे सत्य तिच्या मनाने स्वीकारले आहे.
तुझ्याचसाठी जीवन जगणे जपले स्वप्न उरी
तुझ्याविना हा काळ कंठला मुग्ध राहुनी जरी
कवटाळुनिया मरण उराशी जगत राहिले अति
अश्रु ढाळले किती ||४||
त्याच्या अनुपस्थितीत केवळ त्याच्याचसाठी जीवन जगणे हे स्वप्न तिने उरात बाळगले होते. तुझ्याचसाठी मधील “च” भावनेची सत्यता व तीव्रता जाणवून देणारा. तिला स्वतःला जीवनाविषयी कुठल्याही प्रकारची आस राहिलेली नाही. केवळ त्याच्यासाठी जगणे हाच तिच्या जीवनाचा उद्देश होता, ते तिचे स्वप्न होते. ते तिने प्रामाणिकपणे उरात जपले. त्याच्याशिवाय जगताना हा सर्वकाळ तिने मुग्ध राहून, अबोल राहून कंठला. मुग्ध
शब्दातून एखाद्या कळी प्रमाणे ती विकसित न होता जगली. नाईलाजाने जगताना जाणीवपूर्वक मुग्धता राखली. परंतु हा काळ बिलकुल सोपा नव्हता. मरणाला उराशी कंटाळून ती जगत होती. “अति”, या शब्दातून तिला नकोसे असताना व तिला वाटणाऱ्या गरजेपेक्षाही जास्त ती जगली अशी तिची भावना जाणवते. अर्थात त्याच्या शिवाय जगताना सारे आयुष्य “अति” झाले, जास्त झाले. एखादी गोष्ट नको असताना जेव्हा प्रमाणाबाहेर घडते तेव्हा हे “अति झाले” असे आपण म्हणतो.
“जीवन जगणे जपले”, “काळ कंठला” यातील अनुप्रास, पहिल्या दोन चरणातील यमक व शेवटच्या चरणातील ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज व अर्थपूर्ण वाटते.
मनातल्या प्रांजल प्रीतीच्या प्रांजळ भावनेला व आपल्या प्रियकर / पतीच्या शिवाय जगताना जाणवलेल्या अंतरीच्या अनुभूतीला अतिशय काव्यात्मतेने, विविध साहित्यालंकारांनी नटवून या कवितेत प्रस्तुत केले आहे. नैसर्गिक भावनेतील खरेपणा जपून तो लयबद्ध पद्धतीने व्यक्त केला आहे. ही कविता सूर्यकांत या मात्रावृत्तात रचली आहे. काव्यवाचकांना हृदयाला थेट भिडणारे हे सुंदर भावगीत नक्कीच आवडेल. कवीचे तरल मन व साहित्यिक जाणीव कौतुकास्पद.. , मनाला भुरळ घालणारी…
© नीलिमा खरे
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈





