सुश्री शांभवी मंगेश जोशी
क्षण सृजनाचे
☆ ‘‘देवा…’ ☆ शांभवी मंगेश जोशी ☆
क्षण सृजनाचे:
दि. ३/४/२०२६ या ई-अभिव्यक्ती मध्ये खालील लेख आला आहे. तो वाचल्यानंतर मला माझी एक कविता येथे द्यावी असे वाटले. प्रथम तो लेख व नंतर माझी कविता आपल्यासाठी.
☆ निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆
मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..
प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..
आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..
कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..
पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.
तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..
ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..
माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.
हे जगणे सोपे नसते..
या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..
ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..
पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..
जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..
ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..
अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..
हे एक नितांत सुंदर सत्य आहे..
*
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: स्वाती मंत्री
—–
☆ कविता – 😀 देवा, 🙏🌹🙏 ☆
☆
आले कशी कळेना, दारी तुझ्या दर्शनास
नसताच कारण आणि इच्छा जराही मनात😞
तरीही आस उगा मनात, भेटशील इथे तू खचित!
वाटले…! वाटले पाहू तरी, असतो कसा तो देव!
भ्रमनिरास माझा देवा नक्कीच तू केला😢
साधून ते तुजला, आनंद कुठला मिळाला?
रांगेत मी भक्तांच्या, तू वेढ्यात सुरक्षारक्षकांच्या
तिथेच भक्ती माझी टिचकली, जी बळेच होती मी जपलेली 🙃
ढकलाढकली अन् धक्काबुक्की ती अशी
आले क्षणभर तव सामोरी कशीबशी
तशाच धक्क्याने नेले क्षणात दूरदूर
तनाने तसे मनानेही खूप खूप दूर दूर 👎👎
सांगते हात जोडुनि शपथ घेउनि तुझी, 🙏🙏
हात जोडण्यासही जमलेच नाही, त्या एका क्षणात! 😢
किंचितही वळून ना पाहिले पुन्हा
परी
सोडला श्वास सुटकेचा, संपला सोहळा दर्शनाचा
आली कीव तुझीच! वाटले, हवी तुलाच सुटका
येथुनि
निघाले तडक जरी माघारी… तरी…
तरी पावलांमागोमाग हा कसला भास? 🤔🤔🤔
आलास की काय सोडुनि तू तुझ्या राउळास?
संशय खरा की खोटा, छळतो मनाला
परी त्या क्षणापासुनिवाटते निश्चिंत माझ्या मनाला👍🙏😀🙏
☆
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, shambhavijoshi76@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




