📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रिरूट… लेखक : श्री राजन पोळ ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

नक्की समजत नाही, पण हल्ली खूपच कंटाळा येऊ लागलाय. रिटायर झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटणे, इकडे तिकडे भटकंती करणे, आवडीची गाणी ऐकणे, अधून मधून नाटक-सिनेमा एन्जाॅय करणे यात कशी गेली समजलंच नाही. त्यानंतर मात्र दिवस मोठा वाटू लागला. मग मॉर्निग वाॅक, घरातील कामे, बाहेरची स्वच्छता आणि जमेल तसं बागकाम इत्यादीत मन रमवू लागलो. पण कुठं माशी शिंकली, कळलं नाही. थोडसं आजारी पडल्याचं निमित्त झालं आणि सारंच बदलून गेलं. अंगात कुठून आळस शिरला, पत्ताच लागला नाही. थकवा जाणवू लागला, कशातच मन लागेनासं झालं. काहीसं एकटं एकटं वाटू लागलं, पहिल्यासारखा उत्साह, जोम राहिलाच नाही. कालचा, आजचा आणि उद्याचा दिवस सारखाच वाटू लागला. प्रत्येक कृती यांत्रिक बनत चालली. आजूबाजूची सारी दुनिया मजेत असताना माझ्याच वाट्याला हे का आलं, याचा विचार करताना माझ्या बायकोकडे माझं लक्ष गेलं.

ती अगदी टवटवीत आणि फ्रेश दिसत होती. चोवीस तास तिचा उत्साह ओसंडून वाहत असायचा. नातवंडांत ती अशी काही रमायची की त्यांच्यापेक्षा तिचंच हसणं, गाणं आणि नाचणं जास्त व्हायचं. शेजारचा कार्यक्रम, मग ते हळदी कुंकू असो वा लग्न, ओटीभरण असो वा बारसं तिच्या सहभागाशिवाय पूर्ण होतच नव्हतं. इतकंच काय, कॉलनीतली गौरी-गणपती, नवरात्र, दांडीया हे सारं काही करताना तिला रात्र कमी पडायची.

खरंतर तिच्यापेक्षा केवळ दोन वर्षांनीच मी मोठा होतो. तरीपण तिच्यात आणि माझ्यात इतका कसा काय फरक असू शकतो, हे मोठं कोडंच होतं. यामागे ओल्डएज या फॅक्टरचा दुरान्वयानेही संबंध येत नव्हता, याची मला खात्री होती. कारण बायकोच्यात आणि माझ्यात तसं फारसं अंतर नव्हतंच. शिवाय माझी प्रकृती अगदीच एथलॅटिक नसली तरी चारचौघांसारखी होती. सुदैवानं अजूनतरी बीपी, शुगरादी मित्रांची चाहूल लागली नव्हती. तरीही हल्ली कशातच मन लागत नव्हतं, ही गोष्ट मात्र खरी होती. इतकंच काय पूर्वीसारखं थोडंसं वावडं खाण्याची किंवा पिण्याची इच्छाही होत नव्हती. थोडक्यात वयाचा प्रश्न नव्हता, तब्येतही तशी ठीक होती. तरीही असं उदास, निरुत्साही आणि मरगळल्यासारखं का वाटतंय, हा संशोधनाचा विषय बनून राहिला होता.

मग म्हटलं, एखाद्या डॉक्टरकडं जावं. पण त्यानं भलतंच काहीतरी सांगितलं. म्हणे माझी ही लक्षणं सायकोडिप्रोफ्रेझिया किंवा अशाच काहीश्या गंभीर रोगाशी साम्यभाव दाखवतात. अर्थात डॉक्टर काय म्हणतात, ते मला काहीच समजलं नव्हतं. पण घरच्यांच्या प्रेशरखाली कौन्सिलिंग, मेडीसीन यात बराच पैसा व वेळ खर्च केला आणि त्यातून काहीच निष्पन्न झाल नाही.

त्यामुळे मला नक्की काय होतंय, हे समजून न आल्यानं खूपच काळजी वाटू लागली. कॉन्फिडन्सलेस वाटू लागलं. दाढी न करताच बाथरूमला जाताना टॉवेल विसरणं, माझी समजून मुलाची अंडरवेअर घालणं, भाजी मंडईत गाडी नक्की कुठे पार्क केली हे न समजणं असं वारंवार घडू लागलं.

खूप विचार केला. मग लक्षात आलं, काहीतरी नक्कीच चुकलेलं आहे. कॉलेजमधे असताना मित्र- मैत्रिणीत रमणारा, कथा-कविता करणारा, समाजसेवेची आवड असणारा माझ्यातला हरहुन्नरी मी, नोकरी आणि लग्नानंतर संसाराचा रगाडा हाकताना दुनियादारीच्या दुष्ट चक्रव्यूहात कुठंतरी हरवून गेलेला होता.

तरुणपणी स्वीकारलेले सारे छंदमार्ग केव्हाच दृष्टीआड झाले होते. त्यातील एखाद्या मार्गावर थोडीसी जरी वहिवाट ठेवली असती, तरी आत्ताच्या कंटाळवाण्या परिस्थितीला सामोरं जायला लागलं नसतं.

पण आता, केलेल्या चुका पुन्हा पुन्हा उगाळून काहीच उपयोग नव्हता, हेही खरंच होतं.

मग, असंच एकदा ठरवलं-

चला. एक दिवस सगळे पाश तोडूया, सगळं काही विसरूया आणि थोडसं रूमानी होत मनसोक्त उनाड भटकंती करूया.

मग, घरी कुणालाही न सांगता हळूच माझी जुनी मारुती काढली. पेट्रोलटाकी फुल्ल केली. खिशातलं पैशाचं पाकीट चेक केलं. एटीएम कार्ड घेतल्याची खात्री केली आणि गाडी स्टार्ट केली.

आता गाव कधीच मागं पडलं होतं. दुपारची वेळ झाली होती. नक्की कुठे आलो होतो, माहीत नव्हतं. पण समोरच एक डिसेन्ट गार्डन रेस्टॉरंट दिसत होतं. गर्द झाडीत गाडी पार्क करून बिनधास्त आत शिरलो. चमचमीत, चटपटीत, चरचरीत, सामिष वगैरे जे जे काही उपलब्ध होतं, त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. एकदोन आइस्क्रीम रिचवली आणि पान टपरीवर येऊन मस्तपैकी शिगार शिलगावली.

सहज घड्याळात लक्ष गेलं.

बापरे! संध्याकाळचे चार वाजत होते. पाठोपाठ बायकोचाच फोन वाजला…

“अहो, कुठे गेलात? इतका उशीर?आणि सांगायची वगैरे पध्दत आहे की नाही?”

अचानक झालेल्या या नेमक्या हल्लाबोलामुळं मी थोडासा बिथरलो. तरीही धाडस करून तिला सांगितलं…

“हे काय इथंच आहे, येतोय तासाभरात. घरीच येतोय… ”

आता मात्र पंचाईत झाली होती. गावापासून मी किती दूर आलेलो आहे आणि नेमका कुठे आहे याची काहीच कल्पना येत नव्हती. आलेला मार्ग, जायचा मार्ग, लांबचा मार्ग, जवळचा मार्ग, नेमक्या कोणत्या मार्गाने परत जायचं, काहीच सुचत नव्हतं.

मग, पटकन गाडीत बसून इंजिन स्टार्ट केलं आणि मोबाइल वरचा गुगल रोडमॅप ऑन केला.

ओके! …

आता काहीच काळजी नव्हती. खरंतर येताना नुसतंच भटकायचं होतं, कोणतंही डेस्टिनेशन नव्हतं, पण आता मंजिल मालूम थी म्हणजे घराचं लोकेशन माहीत होतं. सिर्फ गुगलको फॉलो करना था और सफर काटना था.

पण गंमत अशी झाली की, कधी कधी गुगल काय सांगतोय, हे ध्यानी न आल्यानं मी भलतीकडेच वळायचो.

कधी, ‘काम चालू रस्ता बंद’ हा बोर्ड पाहून गाडीसहित गुगलही तिथेच थबकायचा. मग मी मनातल्या मनात एखादी शेलकी…. हासडून रागाने उजव्या किंवा डाव्या बाजूला गाडी वळवायचो.

पण यावर गुगलवरची गोड आवाजाची निवेदिका अजिबात रागवायची नाही. त्याच मधुर आवाजात ती पुन्हा परतीच्या मार्गाचं रिरूट सादर करायची. असं करता करता मी जवळच्या रस्त्याने अगदी अर्ध्या तासातच चक्क घराच्या गेटपाशी येऊन थडकलो.

आणि त्याच वेळी मला माझ्या कंटाळ्यावरचं रामबाण उत्तर मिळालं..

“रिरूट ”

खरंतर कार चालवतानाच माझ्या ते लक्षात आलं होतं.

मी कार चालवत असताना गुगलवरची स्वर्गीय स्वरमाधुर्यात चिंब झालेली निवेदिका मला इनडायरेक्टली सांगत होती…

‘प्रिय मित्रा,

काळजी करू नकोस.

तू फक्त तुझं डेस्टिनेशन ठरव.

मग तू कितीही चुकीची वळणं घेतलीस, कितीही वेळा रस्ता चुकवलास, कुठेही भरकटलास तरी हरकत नाही.

मी तुझ्यावर अजिबात रागावणार नाही. तुला वचन देते की तुझ्या इच्छित स्थळी मी तुला नक्की पोहचवेन. ‘

आपल्या जीवनाचंही असंच आहे. पाठीमागे वळून पाहिलं की झालेल्या चुका, चुकलेले मार्ग पटकन नजरेसमोर येतात, पण गुगलची स्वरलता भूतकाळाची आणि चुकलेल्या वळणांची चर्चा न करता अपेक्षित डेस्टिनेशनला भिडणाऱ्या रस्त्याचा मॅप पुन्हा पुन्हा रिरूट करत असते.

अगदी तसंच, झालं-गेलं विसरून आपण स्वतःलाच रिरूट करत राहिलो तर…

तर, मला वाटतं, जीवनपटलावरच्या इंद्रधनूत पुन्हा पुन्हा रंग भरायला कोणतीच हरकत राहणार नाही.

तुम्ही हत्तीची गोष्ट ऐकली आहे काय? हो नक्कीच ऐकली असेल.

तरी पण आणखी एकदा नव्यानं ऐकूया…

एका राजाचा एक हत्ती असतो. राजाला तो अतिशय प्रिय असतो. प्रत्येक युद्धाच्या प्रसंगी तो राजासोबत असतो.

निसर्गनियमाप्रमाणे हत्ती म्हातारा होतो. मग राजा त्याला युद्धभूमीवर सोबत घेत नाही. त्यामुळे हत्ती उदास राहू लागतो. चालता चालता एकदा हत्तीचे पाय चिखलात रुततात. काही सैनिक धावतच येऊन राजाच्या लाडक्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण आत्मविश्‍वास गमावून बसलेला हत्ती जागचा हलत नाही. मग कोणालातरी कल्पना सुचते. युद्धभूमीवरची तुतारी अशी काही वाजवली जाते की हत्ती अंगातली सगळी मरगळ झटकून, झटक्यात चिखलातून बाहेर येतो.

मित्रहो, निवृत्तीनंतर बऱ्याच जणांची अवस्था हत्तीसारखी होते.

चला तर,

कुणीतरी तुतारी वाजवेल याची प्रतीक्षा न करता आपणच ती स्वप्राणाने फुंकूया…

आनंदाचं डेस्टिनेशन पक्कं करूया…

झालं गेलं विसरून जाऊया…

रस्ता पुन्हा रिरूट करूया…

आणि आनंदमार्गी होऊया.

लेखक : श्री. राजन पोळ

प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments