सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “पंढरीचा चोर” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

चोराला कोण आपलं म्हणेल, कोण त्याची पूजा करेल; पण महाराष्ट्रधर्मात चोरही वंदनीय आहे आणि त्या चोराचे नाव आहे “विठ्ठल”.

ह्या विठ्ठलाला अनेक प्रतिभावान कवींनी, संतांनी आपल्या शब्दात “धरले”. गच्चं बांधून ठेवले.

ग. दि. माडगूळकरांनी ह्याला वेडाही म्हटलं, त्यांनी लिहिलं आहे:

 घटाघटांचे रूप आगळे

 प्रत्येकाचे दैव वेगळे

 तुझ्याविना ते कोणा नकळे

 मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!

 विठ्ठला, तू वेडा कुंभार!”

प्रत्येक माणूस निराळा घडवून, प्रत्येकाचे दैव निराळे घडवणारा हा विठ्ठल कुणा मुखी लोणी टाकतो तर कुणा मुखी अंगार टाकतो, म्हणून हा वेडा कुंभार वाटतो.

विठुरायाचं वर्णन “कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार यांचा” असही झालं. कटेवर हात ठेवून, विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाचा अंतपार लागत नाही. तो अनादी, अनंत आहे.

एकूणच विठ्ठल अनेक युगे पुतळा चैतन्याचा बनून उभा ठाकला आहे. ज्याने अनेकांना विविधरंगी, विविध अंगी दर्शन दिलं आहे.

संत एकनाथ महाराज लिहितात..

 “काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल”

या ओळीचा खूप मोठा अर्थ आहे. पंढरी म्हणजे नुसतीच जमलेली गर्दी. अगदी शरीराच्या अवयवांसारखी. नुसता कलकलाट, नुसता गोंगाट.

एक एक अवयव, हळूहळू निघून गेला की गर्दी संपते. शेवटी काहीच उरत नाही.

मग विठ्ठल कुठे आहे?

एकनाथ उत्तर देतात…. “आत्मा हा विठ्ठल !”

शेवटी जो उरतो तो आत्मा, विठ्ठल !! शरीर नष्ट होईल पण आत्मा अटळ विठ्ठल अमर आहे असा धीरही एकनाथ महाराज देतात.

तसा विठ्ठल सावळा आहे; पण त्यातही अनेक रंग आहेत, त्याची रूपेही खूप आहेत. त्याचं सावता माळी ह्यांना वेगळंच रूप दिसलं.

सावता माळी आपल्या मळ्यात दिवसरात्र राबत असत. त्यांच्या मळ्याजवळून अनेक लोक पंढरपूरला जात असत. एकदा एक जण सावता माळींना म्हणाला- आम्ही नेहमी उपास-तापास करून पंढरपूरला अनवाणी जातो, तू कधीच का येत नाहीस.

सावता माळींनी उत्तर दिलं-

 कांदा-मुळा-भाजी।

 अवघीं विठाबाई माझी॥

*

लसुण-मिरची-कोथिंबिरी।

 अवघा झाला माझा हरीं॥

सावता माळी बी पेरत असत. उन्हातान्हात उभे राहून त्याला पाणी घालत असत आणि मग ते बी तरारून बाहेर येई. लसूण, मिरची, कोथिंबिरी हेच हरीसारखे प्रसन्न होत असत.

साक्षात विठ्ठल सावता माळींसमोर उभा राही!!

सावता माळींनी मनगट वापरलं, ते कर्म करत राहिले, मग विठ्ठलाने त्यांना दर्शन देण्याचं स्वतःच कर्म – स्वतःच कर्तव्य पार पाडलं.

इथे पुन्हा शब्दप्रभू ग. दि. मा. आठवतात. त्यांनी लिहिलं आहे :

 जिथे भूमिचा पुत्र गाळील घाम

 तिथे अन्न होऊनि ठाकेल श्याम

 दिसे सांवळे रूप त्याचे शिवारी!

 नसे राउळी वा नसे मंदिरी

 जिथे राबती हात तेथे हरी!

जे सावता माळींनी सांगितलं तेच माडगूळकर वेगळ्या शब्दात सांगतात.

भूमिपुत्राने घाम गाळला तर स्वतः श्याम म्हणजे देव येऊन उभा राहील. जिथे हात राबतील, तिथे हरी येईल.

विठ्ठल अनेकांना अनेक रूपात दिसला आणि महाराष्ट्रात फार मोठी संतपरंपरा उभी राहिली.

संत कान्होपात्रा, सेना महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, जनाबाई, निवृत्तीनाथ आणि अनेक ज्ञात -अज्ञातांनी विठ्ठलाला पाहिले.

नरहरी सोनारांनी देवाचे वर्णन करताना म्हटले,

 “देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार”

इथे नरहरी आणि कबीर ह्यांच्यातील साम्य दिसते. कबीर म्हणत असे की मी वस्त्र विणतो तेव्हा राम म्हणतो. नरहरीही आपली प्रत्येक कृती देवासाठी करत राहिले. तोच धागा पकडून पी. सावळाराम ह्यांनी गीत रचले,

 “धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया”

संत जनाबाईंनी म्हटले,

 हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला

 गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर

कृष्ण लोणी चोरून मित्रांना वाटत असे. विठ्ठलाचंही वर्णन करताना जनाबाईंनी “चोर” म्हटले आणि मराठी भाषेची प्रतिभा पहा, हा चोर लोकांना आवडला.

आपली संत परंपरा विवेक जागृत करायला शिकविते, अंतरीचा दिवा उजाळायला शिकविते. संत सोहिरोबाई ह्यांनी लिहिले:

 सोहिरा म्हणे ज्ञानज्योती।

 तेथ कैचि दिवस-राती।

 तयावीण नेत्रपाती हलवू नको रे।

 हरिभजनाविण काळ घालवू नको रे।

ज्ञानजोतीविना नेत्रपातीही हलवू नको रे, दिवस-रात्र या ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत आराम करू नको रे. हरिभजनाशिवाय वेळ वाया घालवू नको रे.

आणि बहिणाबाईंनी देवावर भाष्य केलं नसतं तरच नवल. अंधश्रद्धेतून देव संकल्पनेला मुक्ती देताना त्या म्हणतात:

बापा नको मारू थापा

असो खऱ्या, असो खोट्या

नहि नशिब नशिब

तया हाताच्या रेघोट्या

*

नको नको रे जोतिष्या

नको हात माझा पाहू

माझं दैव मला कये

माझ्या दारी नको येऊ

अनेकांनी देव ही संकल्पना कर्मवादाशी जोडली. महाराष्ट्रात देवाला दगडातून बाहेर काढणारी परंपरा उभी राहिली.

कवी बोबडे यांनी स्वतःमधला देव दाखवण्यासाठी लिहिले:

*

 सागर पोहत बाहू बळाने।।

 नाव तयास… मिळो न मिळो रे ॥१॥

 *

स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥

 तदगृही दीप… जळो न जळो रे ।।२॥

*

जो करी कर्म अहेतू निरंतर ॥

 वेद तयास… कळो न कळो रे ॥३॥

 *

ओळख पटली ज्यास स्वतःची ॥

 देव तयास… मिळो न मिळो रे ॥४॥

बघा या कवितेतून किती सुंदर अर्थ त्यांनी सांगितला आहे. “जो स्वतःच्या हाताने पोहत जाईल, त्याला नाव मिळाली नाही तरी चालेल. जो स्वतःच्या ज्ञानाने प्रकाशित आहे, त्याच्या घरात दीप नसला तरी चालेल. जो निरंतर कर्म करतो, त्याला वेद कळले नाही तरी चालेल आणि ज्याला स्वतःची ओळख पटली आहे, त्याला देव मिळाला नाही तरी चालेल. “

काही कारणास्तव, काही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, जवळच्या विठ्ठल मंदिरातही जाता येणार नाही. तरीही हरकत नाही. विठ्ठल तर आपल्या आत आहे. त्याला चोरून देवालयात बंद करण्याइतका पुण्यवान कोण आहे?

ग. दि. माडगूळकरांनी लिहिले आहे..

*

 देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

 देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई

*

 देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे

 देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी

 देव शोधूनिया पाही, देव सर्वभूता ठायी

*

 देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे

 देव आपणात आहे, शिर झुकवुनिया पाहे

 तुझ्या-माझ्या जड देही, देव भरुनिया राही

*

देव इतका सोपा आहे, सुलभ आहे. बस स्वतःमध्ये पाहिला की सापडतो.

।। राम कृष्ण हरी ।। 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments