सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ मनातला कोलाहल कमी करणारा लेख…! – भाग-१ – लेखक : श्री सुकृत करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. अंजली दिलीप गोखले ☆
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली की व्यंकटेश माडगूळकर? नक्की आठवत नाही. प्रत्यक्ष जीवनात घट्ट मित्र असणाऱ्या या दोघांपैकीच एकानं कुणीतरी लिहिलंय. सगळे शब्द जसेच्या तसे नाहीत, पण आशय हाच आहे – “जंगली कळपातला हत्ती जेव्हा वृद्ध होतो. थकतो. गात्रं शिथिल होतात. आपलं मरण जवळ आलंय याची चाहूल त्याला लागते. तेव्हा तो स्वतःहून सगळ्या आप्तेष्टांपासून, कळपापासून अलगद दूर होतो. शेवटचे दिवस एकांतवासात काढतो. अखेरच्या क्षणी एखाद्या उंच कड्यावरून स्वतःला झोकून देतो. किंवा नदीच्या अगदी डोहात जाऊन उभा राहतो आणि मृत्यूला कवटाळतो. आपलं कलेवरसुद्धा कोणाच्या नजरेला येऊ नये याची काळजी तो घेतो.”
जंगलांच्या, प्राण्यापक्ष्यांच्या संगतीत राहिलेल्या मारुती चितमपल्ली या अवलियानं शक्य झालं असतं तर कदाचित माणसांच्या गर्दीपासून दूर जात प्राण सोडले असते असं मला वाटून गेलं. ९३ वर्षांच्या शरीरानं बुधवारी (१८ जून) निरोप घेतला. या दीर्घायुष्यात मराठी ज्ञान आणि साहित्यविश्वात किती मोलाची भर टाकली त्यांनी. साहित्यिक म्हणून तर ते थोरच आहेत, पण त्यांना ‘ज्ञानवंत संशोधक’ही म्हटलं पाहिजे. काही दिवसांपूर्वीच जयंत नारळीकर गेले, ज्यांनी खगोल, अवकाशाचं विश्व मराठीत आणलं. वसुंधरेच्या अंगाखांद्यावरचं माझ्यासारख्याला रोज दिसूनही अगदी अपरिचीत असणारं पशुपक्ष्यांचं, वनांचं विश्वदर्शन चितमपल्लींनी घडवलं. मराठी साहित्यात हिरवकंच, सदाहरित जंगल लावून गेले चितमपल्ली. किती संकल्पना, शब्द त्यांनी मराठीत नव्यानं आणले! त्यांच्या पुस्तकाचं शीर्षक ‘केशराचा पाऊस’ असतं. ‘आठवांच्या पारंब्या’, ‘मृत्यूचे संमोहन’, ‘शब्दांनाही वास असतो’ यासारखी खोल, अर्थगर्भ शीर्षकं त्यांच्या लेखांना असतात.
“माणूस जसजसा म्हातारा होतो, तसा तो कुरुप होतो. झाडांचं तसं नसतं. झाडं जेवढी जुनी होत जातात तेवढी ती अधिक सुंदर होत जातात,” हे बहारदार निरीक्षण चितमपल्ली सहज नोंदवतात.
सध्या आभाळ धो-धो बरसतंय. चितमपल्लींनी लिहिलंय – “पृथ्वीला ‘गंधवती’ म्हटलं आहे. त्याचा प्रत्यय येतो पहिल्या पावसामध्ये. पावसापूर्वी ती ‘पुष्पवती’ होते. जंगलातील सारे वृक्ष फुलू लागतात. या सर्व पुष्पांचा वास कुठे जात असावा? सुगंध देखील सृष्टीतील एक ऊर्जा आहे. नियमाप्रमाणे ऊर्जा नष्ट होत नाही. ती उंच उंच आकाशाच्या गाभाऱ्यात जात असावी. किती प्रकारचे गंध त्या गाभाऱ्यात साठत असावेत! आणि हे सारे लक्षावधी गंध पावसाच्या पाण्याबरोबर मातीवर पडले की पुन्हा त्यांना बहर येत असावा. म्हणून पहिल्या पावसानं माती ओली झाली की जो गंध अनुभवता येतो ना त्याचं वर्णन करता येत नाही कारण तो संमिश्र असतो.” याला ललित म्हणायचं, अध्यात्मिक की शास्त्रीय? खरं तर पहिल्या पावसासारखंच आहे हे, शब्दात न येणारं.
टिटवीचा आवाज मी लहानपणापासून कैकदा ऐकला. तिच्या घरट्याच्या आसपास कितीदा वावरलो. तिचं तुरुतुरू धावणं पाहिलं. पण चितमपल्लींना दिसलेली टिटवी मला कधी दिसली नाही. त्यांनी लिहिलं – “टिटवीचा आवाज मी अनेक वर्षं अनेक ठिकाणी ऐकला आहे. नदीकाठच्या वन विश्रामगृहात मुक्कामाला आहे. जिकडेतिकडे विलक्षण शांतता आहे. वाहणाऱ्या नदीचा नादमधूर आवाज येतोय. मला हळूच जाग येते ती टिटवीच्या दुःखाच्या सुरानं. मध्यरात्र होऊन गेलीय. दुरून येणारा आवाज ऐकत, ऐकत मला कधीतरी झोप लागते. तो आवाज मी सागर किनाऱ्यावर असणाऱ्या वाडीतील घरातून ऐकला आहे. बाहेर पिठासारखं चांदणं पडलं आहे. समुद्राच्या लयबद्ध गाजेतून अंतरिक्षात जाणारा टिटवीचा विश्रांत स्वर ऐकू येतोय. मराठवाड्यात क्षितिजापर्यंत पसरलेली माळरानं आहेत. अशा माळरानातच टिटवीची घरटी आढळून येतात. एखाद्या वटवृक्षाच्या सावलीत पुरातन हेमाडपंती देऊळ उभे आहे. पहाटे आणि संध्याकाळी देवळाच्या पायऱ्यांवर बसून माळरानाकडं पाहणं हा एक अद्भूत अनुभव असतो. अशा समयी टिटवी आपल्या आवाजानं सारं माळरान निनादून टाकत असते. टिटवी जीवन आणि मृत्यूचं प्रतिक आहे. तिचा आवाज ऐकला की मरणाची आठवण येते. परंतु जीवनावर अफाट प्रेम करणारी टिटवी आहे. येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवित असताना ती अशीच ओरडली. पण त्या दयाघनाला वाटलं, की ती आपली चेष्टा करतेय. म्हणून त्यानं तिला शाप दिला, ‘तू अनिकेतन होऊन अशीच भटकत राहशील.’ खरोखर तिच्याइतकं अनिकेतन पाखरू कोणी नसावं.”
चितमपल्लींचे शब्द भिडतात कारण मी ते अनुभवलेले आहेत याची जाणीव मला त्यांना वाचल्यावर होते. काही गोष्टी माझ्या जाणीवेत असतील-नसतील पण नेणिवेत असतातंच. निसर्ग निरीक्षण तर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सहजच घडतं. मात्र सगळ्यांकडे चितमपल्लींची दृष्टी नसते. ‘निसर्ग निरीक्षण’ या छंदाचा पाठलाग त्यांच्यासारखा करता येत नाही. यामागं तपश्चर्या असते ती कशी हे चितमपल्लींनी एका लेखात मार्मिकतेनं सांगितलं. “मी सत्तरीच्या घरात प्रवेश करतोय,” असं सांगून चितमपल्ली म्हणतात – “छंद जोपासण्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. जंगलातली भटकंती सावकाश आणि डोळसपणे केली आहे. पर्वतावर हळुहळू चढताना आजुबाजूचं सृष्टीसौंदर्यही पाहिलं आहे. वनविद्या मला सावकाश मिळाली. ही विद्या प्राप्त करुन घेण्यासाठी शॉर्टकट नाहीच. ते पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. हे सारं काही एका संस्कृत सुभाषितात मार्मिकपणानं सांगितलं आहे.
शनै: पन्था: शनै: कन्था शनै: पर्वतमस्तके।
शनै: विद्या शनै: वित्तं पंचैतानि शनै: शनै: ।।
अर्थात – प्रवास, मार्गक्रमण सावकाश करावं. गोधडी सावकाश शिवावी लागते. पर्वतशिखरावर हळूहळू चढावं लागतं. अध्ययनही सावकाश आणि स्वस्थ चित्तानं करावं लागतं. तसेच धनसंचयही एकदम होऊ शकत नाही. तोही, हळूहळूच होत असतो. (इथं धन म्हणजे विद्या) पक्षी निरीक्षण, वन्यप्राणी निरीक्षण, वन्यजीव निरीक्षण, वनस्पती निरीक्षण, अरण्यवाचन, वनविद्या, आकाश दर्शन, वाचन, ग्रंथ संग्रह आणि लेखन असे कितीतरी छंद मला आहेत. या सर्व छंदांचं एकाच वाक्यात वर्णन करायला सांगितलं तर मी म्हणेन मला निसर्ग निरीक्षणाचा छंद आहे. हे सर्व छंद एकमेकांना पूरक आहेत.”
*****
चितमपल्ली यांना पहिल्यांदा वाचलं तेव्हा साहजिकच प्रश्न पडला. सोलापूरसारख्या कोरड्या, दुष्काळी गावात जन्माला आलेल्या या माणसाला वन्यविद्येची भूल कशी पडली? त्याचं उत्तर त्यांच्या बालपणात आहे. चितमपल्ली आईच्या सहवासात जास्त वाढले. त्यांच्या आईला शब्दांचं विलक्षण ज्ञान होतं. तिच्या बालपणापासून तिनं तिच्या अवतीभोवतीची रानं, शेतं, फार डोळसपणे पाहिली होती. तिला रानवाटांची भारी ओढ. ती गोष्टीवेल्हाळ होती. रात्री अंथरुणावर पडल्यावर ती मारुतीला आणि त्याच्या भावंडांना गोष्टी सांगायची. त्या गोष्टी जंगलातल्या असायच्या. त्या गोष्टींमध्ये वाघ, खोकडं, कोल्हे, लांडगे असायचे. ‘लांडगा बाईला भीत नाही, पण पुरुषाला घाबरतो’, ‘हुप्प्या वानर स्त्रीपुढे चित्कारतो, पुरुषापुढं गप्प बसतो’, अशी तिची म्हणून स्वतःची निरीक्षणं त्या गोष्टींमध्ये असायची. वाघाच्या डोळ्याला ‘रुपया’ म्हणायची ती. तिनं अस्वलं, कोल्हे-लांडगे, साप-नाग प्रत्यक्ष पाहिले होते. आईकडून ऐकलेल्या या गोष्टींचं चित्र मारूतीच्या बालमनावर बिब्याचा चीक उतावा तसं पक्कं उमटलं होतं. चितमपल्लींचे वडील शिंदी प्यायचे. शिंदीच्या बनात सोबतीला मारुतीलासुद्धा घेऊन जायचे. मारूती शिंदी प्यायला नाही, पण ओढ्याच्या कडेला शिंदीला लटकलेली सुगरणीची घरटी न्याहाळण्याचा छंद लावून घेतला.
बालपणातले अनुभव त्यांच्या साहित्यात उमटतात…आणि मग म्हटलं तर अत्यंत चमकदार आणि म्हटलं तर अगदी तत्त्ववेत्याच्या थाटातलं वाक्य ते सहज लिहून जातात – “पक्षी जसं स्वतःचं घर स्वतः बांधतात, तसं माणसांनाही स्वतःचं घर स्वतःला बांधता यायला हवंच.”
– क्रमशः…
लेखक : श्री सुकृत करंदीकर
प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





