सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनातला कोलाहल कमी करणारा लेख…! – भाग-२ – लेखक : श्री सुकृत करंदीकर ☆ प्रस्तुती – सौ. अंजली दिलीप गोखले

आपल्याला काय आवडतं याचा बोध त्यांना फार लहानपणी झाला. त्याच मार्गानं जाण्याचा त्यांचा निश्चय झाला असावा. म्हणून चितमपल्ली यांनी वनखात्यात नोकरी करण्यापूर्वी रितसर प्रशिक्षण घेतलं. मद्रासमधल्या प्रशिक्षण काळात देशभरातल्या जंगलांची ओळख करुन घेतली. महाराष्ट्राच्या वनखात्यात नोकरी सुरु केली. सुरवातीच्या दिवसांमध्ये वडगाव (मावळ, पुणे) इथं नियुक्ती मिळाली. गो. नी. दांडेकर तेव्हा जवळच तळेगाव मुक्कामी होते. चितमपल्लींनी ‘गोनीदा’ वाचलेले. त्या प्रेमापोटी त्यांनी गोनीदांची भेट घेऊन त्यांना वन खात्याच्या विश्रामगृहात पाहुणचाराचं आमंत्रण दिलं. गोनीदांनी ते स्विकारलं. दोघांमध्ये गप्पागोष्टी व्हायच्या. एकदा गप्पांच्या ओघात गोनीदा चितमपल्लींना म्हणाले, “संत तुकारामांचा अभंग आठवला – जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥”

चितमपल्ली विचारात पडले. गोनीदांनी मला हे का सुनावलं? नेमका हाच अभंग का सांगितला? विचार केल्यावर त्यांना जाणवलं, की मावळात अनेक समृद्ध जंगलं आहेत. ती अनेकदा गोनीदांच्या पायाखालून गेली आहेत. तिथल्या अनेक वनाधिकाऱ्यांचे अनुभव त्यांनी घेतले असणार. म्हणूनच गोनीदांनी तुकारामांचा अभंग सांगून मला गुरुमंत्रच दिला. उत्तम व्यवहार करुनच धन मिळवायचं आणि त्याची आसक्ती न बाळगता ते खर्च करायचं. थोडक्यात भ्रष्टाचार करायचा नाही. चितमपल्लींचं पहिलं मोठेपण हे, की त्यांनी गोनीदांच्या सुचकतेमधून नेमका अर्थ उचलला. दुसरं मोठेपणं म्हणजे त्याचं तंतोतंत पालन केलं. नवेगाव बांधमधल्या नितळ झऱ्याप्रमाणं चितमपल्लींची कारकीर्द वनखात्यात असूनही निर्मळ राहिली.

गोनीदांनी तेवढंच सांगितलं नाही. फॉरेस्ट खातं ही ब्रिटिशांची देणगी. ब्रिटिशांनी भारतीय जंगलांचं जेवढं शोषण केलं तेवढं कोणीही केलेलं नाही. अक्षरशः लूट आणि नासधूस. ब्रिटिश आमदानीपासून फॉरेस्ट खातं जंगलातल्या प्रत्येक झाडाकडं, स्त्रोताकडं ‘ॲसेट’ म्हणून पाहतं. ‘प्रत्येक झाडाचं व्यापारी महत्त्व, बाजार मूल्य ओळखायचं म्हणजे वनविद्या’, ही ब्रिटिश नीती. आपल्या काळ्या इंग्रजांनी तीच पुढं रेटली. चितमपल्ली म्हणतात- “जंगलांकडं व्यवहारी, व्यावसायिक वृत्तीनं पाहण्याचं शिक्षण मी घेतलं होतंच. पण मी शिकलेलं जंगल आणि गोनीदांनी मला दाखवलेलं जंगल यात जमीनअस्मानाचा फरक होता. जंगलाचं खरं सौंदर्य गोनीदांनी मला दाखवलं. वृक्ष वाढतात कसे, त्यांची हिरवाई येते कुठून, त्यांची फुलं, पाखरांची गाणी हे सगळं तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. एखादी कला तुमच्या हाती पाहिजे, हे भान गोनीदांनी मला दिलं. लेखकाला आवश्यक असणारी सौंदर्यदृष्टी गोनीदांनी दिली. गोनीदांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. तुकाराम गाथा वाचायला सांगितली. त्यातले कुठले अभंग पाठ करायचे हे सांगितलं. पुढच्या भेटीत ते माझ्याकडून या अभंगांची उजळणी करून घेत. त्यांचा अर्थ समजावून सांगत. “

नंतर चितमपल्लींची नांदेडला बदली झाली. तिथं नरहर कुरुंदकर, राम शेवाळकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. नांदेडच्या संस्कृत पाठशाळेत ते गेले, जिथं यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे होते. चितमपल्लींनी त्यांच्याकडं संस्कृतचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली. पण ‘हे साहेब फॉरेस्टमधले म्हणजे मांसमच्छी, दारू असा सगळा यथेच्छ कार्यक्रम होत असणार, ‘ असं शास्त्रींना वाटलं. ‘यांच्यामुळं आपल्या पाठशाळेचं वळण बिघडायचं, ‘ असं वाटून शास्त्रींनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. चितमपल्लींनी हे सगळं कुरुंदकरांच्या कानावर घातलं. मग कुरुंदकरांनी मध्यस्थी केली. हे फॉरेस्टमध्ये असले तरी पूर्ण शाकाहारी आहेत. मद्याला शिवत नाही. विडीकाडी नाही. हे कळल्यावर यज्ञेश्वरशास्त्रींच्या पाठशाळेत चितमपल्लींचं संस्कृत अध्ययन सुरु झालं. संस्कृत शिकायला सुरुवात केली तेव्हा चितमपल्ली चाळीस वर्षांचे होते, पण त्यांनी मोठ्या जिद्दीनं संस्कृत शिकून घेतलं. प्राचीन संस्कृत ग्रंथांमधली वनविद्या अभ्यासण्यासाठी या ज्ञानाचा त्यांना पुरेपूर उपयोग झाला. केवळ पशुपक्षिशास्त्रावर आधारीत सविस्तर म्हणावा असा हंसदेवविरचित ‘मृगपक्षिशास्त्र’ हा एकमेव प्राचीन संस्कृत ग्रंथ भारतात उपलब्ध आहे. या ग्रंथात पहिल्या खंडात १२७ पशूंची आणि दुसऱ्या खंडात ९७ पक्ष्यांची माहिती हंसदेवानं दिलीय. मोठ्या कष्टानं हा ग्रंथ मराठीत आणून चितमपल्लींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. या ग्रंथातल्या पशुपक्ष्यांची वर्णनं वाचल्यानंतर एकट्या मनुष्यप्राण्यानं किती प्रजाती मुळापासून संपवल्या याचीच खंत दाटते.

प्राचीन भारतात मोबाईल नव्हते. इंटरनेट नव्हतं. त्यामुळं त्याकाळी ऋषीमुनींची संख्या जास्त होती. प्रचंड अध्ययन करुन व्यासंगी होण्यासाठीचा अवधी त्यांना मिळत असे. निसर्ग निरीक्षण करत राहायचं आणि मिळणारे निष्कर्ष गुरु परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या नोंदवले जात. प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून हे ज्ञानभांडार आहे. त्याच ऋषीमुनींची जातकुळी सांगणारे आजचे फार दुर्मिळ संशोधक त्याचा पाठपुरावा करतात. उदाहरणार्थ : कावळ्याच्या घरटं बांधण्याच्या सवयीचं निरीक्षण करून वराहमिहीर, गार्ग्य, पराशर या मंडळींनी पाऊसमानाचा अंदाज व्यक्त करण्याचे ठोकताळे मांडले. पहिला ठोकताळा असा – की कावळ्यानं पिंपळ, करंज, अर्जून, आंबा, कडुनिंब या झाडांवर घरटं केलं तर पाऊस चांगला पडतो. बोर, खैर, बाभूळ, काटेसावर अशा काटेरी झाडांवर कावळ्यानं घरटं केलं की दुष्काळ पडणार. दुसरं निरीक्षण असं, की पूर्व, उत्तर, नैऋत्य आणि वायव्य या दिशांना घरटी केली तर पाऊस चांगला, पण हीच घरटी पश्चिम, दक्षिण, आग्नेय आणि झाडांच्या मधोमध असली तर पाऊस कमी पडणार. तिसरं निरीक्षण असं की या घरट्यात कावळीनं अंडी किती घातली? तीन-चार अंडी घातली तर पाऊस चांगला, एखादंच अंडं असेल तर दुष्काळ पडणार.

चितमपल्ली यांनी हे ठोकताळे संस्कृतमध्ये वाचले. स्वतः अनेक वर्षं निरीक्षण करुन ते ताडून पाहिले. त्यानंतर ते म्हणतात, “हे ठोकताळे अचूक असल्याचा अनुभव मी घेतला आहे. ” डॉ सलीम अली या दिग्गजाच्या सहवासात राहून त्यांनी शास्त्रोक्त पक्षी निरीक्षण आणि जागरुक पक्षी प्रेम म्हणजे काय हे शिकून घेतलं. अली साहेबांनी आधुनिक पक्षी निरीक्षण शास्त्र त्यांच्याकडून घोटवून घेतलं.

संस्कृत काव्यांमधून राजहंस, सुगरण, शुक, काक, गरूड आदी पक्ष्यांची वर्णनं आहेत. मग चकोर हा खरोखर चांदणं टिपतो का, चातक पक्षी मेघाचे थेंब पिऊनच तहान भागवतो का, राजहंसाकडं खरोखरच निरक्षीर विवेकबुद्धी असते का? . . . की या सगळ्या केवळ कवीकल्पना आहेत? याचा रहस्यभेद चितमपल्ली त्यांनी केलेल्या अभ्यासातून मांडतात तेव्हा ते वाचायला मजा येते.

***** 

चितमपल्ली म्हणतात त्याप्रमाणं त्यांनी अखंड तपश्चर्या केली. नाहीतर माझ्यासारख्या मराठी माणसाला जंगलातलं गूढ घरी बसून कसं उलगडलं असतं? पशुपक्ष्यांच्या गमतीजमती कळल्या असत्या का? त्यांच्या सवयी, लकबी आणि खोड्या मी कुठं अनुभवल्या असत्या?

कोकणातल्या खाजणाच्या जंगलापासून ते हिमालयातल्या देवदारच्या जंगलापर्यंतची जगातल्या कुठल्याही राष्ट्रात नसलेली सोळा प्रकारची जंगलं फक्त भारतात आढळतात, हे चितमपल्लींनी मला सांगितलं. नवेगाव बांध येथील प्रख्यात शिकारी माधवराव पाटील यांच्याशी त्यांनी स्वतःहून मैत्र जुळवलं. नवेगावात ते बारा वर्षं होते, तोपर्यंत दोघांनीही हा दोस्ताना घट्ट जपला. या माधवरावांनी चितमपल्लींना जंगल वाचायला शिकवलं. “माधवराव आणि नवेगावच्या गोंड आदिवासींकडून मी अरण्यविद्या शिकलो, ” या शब्दात चितमपल्लींनी ऋण व्यक्त केलं आहे. ते आदिवासी पाड्यांवर गेले, त्यांच्यासोबत राहिले. त्यांची भाषा शिकले. त्यांच्याकडून जंगलं, पशुपक्ष्यांचं परंपरागत ज्ञान टिपून घेतलं. दंतकथा, लोककथा, अनुभव ही शिदोरी चिकाटीनं गोळा केली. ती सोप्या तरीही रंजक, थरारक, वेल्हाळ मराठीतून माझ्यासमोर ठेवली. गुगल किंवा एआयलाही जे शक्य नाही ते चितमपल्ली यांनी माझ्यासाठी करून ठेवलं आहे.

वाघ, सांबर आदी वन्यप्राणी स्वतःचं मूत्र, शरीर गंध, नखांनी केलेल्या खूणा आदींच्या माध्यमातून जंगलातल्या त्यांच्या चतुःसीमा निश्चित करतात. ते त्यांचं राज्य असतं. तिथं दुसऱ्या नराला राहण्याची परवानगी नसते. निमूटपणानं निघून जायचं. तिथंच राहण्याचा त्यानं प्रयत्न केला तर दोघांमध्ये घनघोर युद्ध होतं. घनघोर म्हणजे ‘एक तर तू राहशील किंवा मी या पद्धतीचं आरपार. ‘ या क्रौर्याच्या थरारक कहाण्या चितमपल्ली मला समजावून सांगतात.

पण अलिकडं कित्येक मूर्ख वाघ पाहायला जंगल सफारी करतात. तिथं घुसखोरी करुन फोटो काढतात. ‘वाघ दिसला, बछडे पाहिले, ‘ म्हणून कौतुकानं मिरवत बसतात. वनखात्याच्या या बिनडोक ‘टायगर शो’ला चितमपल्लींचा स्पष्ट विरोध होता. लोकांना वाघ दिसावेत यासाठी ते त्यांच्या जागा सोडून येणं आवश्यक असतं. त्यासाठी सरकारी अर्धवटांनी नैसर्गिक अधिवासाच्या, पाणवठ्याच्या जागा नष्ट करुन कृत्रिम जागा निर्माण केल्या. हेतू हा की माणसांनी तयार केलेल्या ‘स्पॉट’च्या अवतीभोवती वाघांनी यावं. तसंच घडतं. नाईलाजानं वाघ सापळ्यात अडकतात आणि मूर्खांची ‘टायगर सफारी’ सफळ संपूर्ण होते.

*****

पशुपक्ष्यांची भाषा समजली पाहिजे हा माणसाचा पुरातन हट्ट आहे. अनेकांना तो साधतो देखील म्हणे. प्राचीन भारतात ही एक विद्या शाखा होती. पशुपक्ष्यांचं बोलणं समजणं, त्यांच्याशी संवाद साधता येणं या शास्त्राला ‘निळावंती’ म्हटलं जातं. चितमपल्ली म्हणतात, “माझी आई म्हणे, तुला पशुपक्ष्यांचं कळतं म्हणजे तुला ‘निळावंती’ येते. पण या ‘निळावंती’सोबत एक शापसुद्धा येतो. ‘निळावंती’ जाणणाऱ्याचा निर्वंश होतो. जगातल्या सगळ्या पक्षीतज्ज्ञांचा बायोडाटा मी पाहिला. त्यातल्या कित्येकांना मूल नाही किंवा फक्त मुलगीच आहे. ” मारुती चितमपल्ली यांनाही एक मुलगीच होती. दुर्दैवानं तीही चितमपल्ली यांच्याआधीच मरण पावली. तिच्या जाण्याचं दुःख चितमपल्लींच्या वाट्याला आलं. चितमपल्ली एकटेच मागं उरले होते.

पण त्यांचा निर्वंश झाला असं कसं म्हणणार?

ज्यांनी आयुष्यभर तुडवलेल्या जंगलांमधली जादुई दुनिया त्यांच्या अठरा-वीस पुस्तकांमधल्या मोहक मराठीतून तुमच्या-माझ्यासमोर अमर केली. आयुष्याच्या संध्याकाळी ‘मत्स्यकोश’ लिहिण्याच्या जिद्दीनं अथांग सागरात डुबकी मारली. वृक्षकोश, प्राणीकोशाचं काम केलं. माणूस, पशू, पक्षी आहेत तोवर मारुती चितमपल्ली स्वतः जिवंत राहणार. वृक्षदेवता, जलदेवता, वनदेवता या संकल्पनांवर त्यांचा विश्वास होता. हा विश्वास आपल्यात वाढीस लावणं ही मारुती चितमपल्लींना खरी आदरांजली असेल.

समाप्त –  

लेखक : श्री सुकृत करंदीकर

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted