सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ इतरांच्या घरात भांडणं लावू नका… – लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

इतरांच्या घरात भांडणं लावू नका….

एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते: “बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली? ”

मैत्रीण म्हणाली, “काहीच नाही! “

तेव्हा ती विचारते, “हे बरोबर आहे का? म्हणजे त्याच्या लेखी तुझी काही किंमतच नाही का? “

हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते.

संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि पाहतो की बायकोचा चेहरा उतरलेला आहे. मग दोघांमध्ये वाद होतो. एकमेकांना दोष दिले जातात.

शेवटी मारहाण होते आणि घटस्फोट होतो.

तुम्हाला माहितीये सगळ्याची सुरुवात कुठून झाली?

त्या एका निष्कारण प्रश्नातून, जो केवळ विचारपूस करण्यासाठी विचारला गेला होता.

रवि आपल्या जिवलग मित्र पवनला विचारतो: “कुठे काम करतोस? “

पवन – “अमुक एका दुकानात. “

रवि – “किती पगार मिळतो? “

पवन – “१८ हजार. “

रवि – “फक्त १८ हजार? इतक्यात कशी चालते तुमची रोजची जिंदगी? “

पवन – (खाली मान घालून) “काय सांगू रे… बस तसंच. “

या छोट्याशा संवादानंतर, पवनच्या मनात आपल्या नोकरीविषयी असमाधान निर्माण होतं.

त्याने पगारवाढीची मागणी केली, मालकाने नकार दिला. पवन नोकरी सोडतो आणि बेरोजगार होतो.

पूर्वी त्याच्याकडे काम होतं… आता काहीच नाही!

एका गृहस्थाने एका वृद्ध पित्याला विचारलं, “तुमचा मुलगा तुमच्याकडे फारसा येत नाही का? म्हणजे त्याला आता तुमच्याबद्दल प्रेम उरलेलं नाही वाटतं? ”

वडील म्हणाले, “तो खूप व्यस्त असतो. त्याला त्याची कामं, बायको, मुलं… वेळ मिळत नाही. “

ते गृहस्थ म्हणतात, “हे काय उत्तर झालं? तुम्ही त्याला वाढवलंत, सगळं दिलंत, आता तो म्हणतो त्याला वेळ नाही? “

त्या संभाषणानंतर, बापाच्या मनात मुलाबद्दल शंका निर्माण झाली.

जेव्हा मुलगा भेटायला यायचा, तेव्हा त्याला बघूनही त्याच्या मनात असंच चालायचं.. “माझ्यासाठी वेळच नाही… “

एक गोष्ट लक्षात ठेवा:

आपण सहज म्हणून बोललेले शब्द एखाद्याच्या मनात खोल परिणाम करू शकतात. कधी कधी आपले प्रश्न निष्कपट वाटतात, पण ते दुसऱ्याच्या आयुष्यात विष पेरू शकतात. उदाहरणार्थ:

“तुम्ही हे का नाही घेतलंत? “

“तुमच्याकडे हे का नाही? “

“तुम्ही याच्यासोबत कसं राहू शकता? “

“तो तुमच्या योग्य आहे का? “

हे असले बिनधास्त प्रश्न, जे कधी कधी आपण नक्कीच चुकीच्या हेतूने विचारत नाही, पण हे विसरतो की, याचा परिणाम समोरच्याच्या आयुष्यावर किती खोल जाऊ शकतो. आज समाजात जे काही तणावाचे वातावरण आहे, त्याच्या मुळाशी गेलं, तर अनेकदा असं आढळतं की कोणाच्या तरी चुकीच्या बोलण्यामुळे हे निर्माण झालं आहे. जाणीवपूर्वक किंवा अज्ञानात, आपल्या शब्दांनी आपण कोणाच्या तरी आयुष्यात वादळ निर्माण करू शकतो. म्हणून एकच विनंती….

लोकांच्या घरात अंधासारखं शिरा आणि मुक्यासारखं बाहेर या!

आपल्या शब्दांनी कुणाच्या घरी फूट न पडो, हीच खऱ्या माणसाची ओळख आहे.

लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

खूप छान लेख! खरंच काही जण असं मुद्दाम वागतात तर काही नकळत!