श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वाचनाचं खरं महत्त्व…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“गुरुजी, मी कितीतरी पुस्तकं वाचली… पण त्यातलं बहुतेक विसरलोय. मग वाचनाचा उपयोग काय?” एका जिज्ञासू शिष्याने गुरुजींना प्रश्न विचारला.

गुरुजींनी काही उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले.

काही दिवसांनी ते नदीकाठी बसले होते. अचानक गुरुजी म्हणाले –

“मला तहान लागली आहे. पाणी आण. पण त्या जुन्या चाळणीत भरून घे.”

शिष्य चकित झाला.

ही कसली विनंती?

चाळणीतून पाणी आणायचं? त्यात तर सगळीकडे छिद्रं आहेत!

पण त्याने वाद केला नाही.

त्याने चाळणी उचलली आणि प्रयत्न सुरू केले.

एकदा.

दोनदा.

पुन्हा पुन्हा…

कधी तो वेगाने धावला,

कधी कोन बदलून पाहिला,

कधी छिद्रं बोटांनी बंद करून पाहिली.

पण काही उपयोग झाला नाही.

एक थेंबही पाणी टिकेना.

शेवटी तो दमून-भागून गुरुजींच्या पायाशी चाळणी ठेवून म्हणाला –

“माफ करा, मी अपयशी ठरलो. हे अशक्य होतं.”

गुरुजी प्रेमाने म्हणाले –

“तू अपयशी झालास नाहीस. जरा चाळणीकडे नीट बघ.”

शिष्याने खाली पाहिलं…

आणि त्याला काही जाणवलं.

ती जुनी, काळी, घाणेरडी चाळणी आता स्वच्छ व चमकदार झाली होती.

पाणी जरी टिकून राहिलं नाही, तरी सतत वाहत राहिल्याने ती चाळणी झळाळून निघाली होती.

गुरुजी पुढे म्हणाले –

“वाचन असंच असतं. तुला प्रत्येक गोष्ट लक्षात राहिली नाही तरी हरकत नाही.

ज्ञान पाण्यासारखं हातातून निसटतं… पण मन मात्र ताजंतवानं होतं.

वाचनाने विचार स्वच्छ होतात,

आत्मा ताजातवाना होतो,

कल्पना प्रफुल्लित होतात.

आणि कळत-नकळत तू आतून बदलत जातोस.”

वाचनाचं खरं उद्दिष्ट म्हणजे स्मरणशक्ती भरून काढणं नव्हे…

तर आत्म्याला स्वच्छ, समृद्ध आणि प्रबुद्ध करणं आहे.

* * * *

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments