श्री सुनील देशपांडे
वाचताना वेचलेले
☆ “आदिवासी लोकांची एक गोष्ट” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांची एक शिकण्यासारखी गोष्ट…
त्या भागात त्या वेळी नेमणुकीवर असलेल्या “सेंट्रल बँक ऑफ इंडिया”च्या मॅनेजरने दै. सकाळच्या मुक्तपीठमध्ये लिहिली होती.
तो दुर्गम भागात पोस्टिंग असल्याने एकटाच रहात होता. बॅंकांच्यावरच रहाण्याची जागा होती.
– –एका अपरात्री कोणीतरी दरवाजा जोरजोराने वाजवत असल्याने पाहिलं तर बाहेर आदिवासी लोकांचा जमाव जमला होता. काही ओळखीचे चेहरे पाहून घाबरतच दरवाजा उघडला तर त्या लोकांनी सांगितलं की त्यांच्यापैकी एकजण मरण पावला होता. याला कळेना की त्याचा याच्याशी काय संबंध? ते म्हणाले की त्या मृताचा अंत्यसंस्कार लगेच करायचा आहे कारण त्यांच्यात रात्रभर मृतदेह ठेवत नाहीत. तरीही याचा काय संबंध हे कळत नव्हतं.
…. पुढे ते लोक म्हणाले की त्याने बॅंकेचं कर्ज घेतलं होतं आणि ते समाज फेडणार आहे. हा म्हणाला, “ठीक आहे. उद्या सकाळी बॅंक उघडली की हिशोब करूया. ”
…. त्यावर त्यांच्यापैकी एका वृद्धाने सांगितलं की “ जोपर्यंत मृताच्या डोक्यावर कर्ज आहे तोपर्यंत अंत्यसंस्कार करता येत नाही आणि अंत्यसंस्कार तर लगेच करायचा आहे. तेव्हा बॅंक उघडून हिशोब करा आणि पैसे घेऊन मृताची कर्जाची कोणतीही थकबाकी नसल्याचं लिहून द्या म्हणजे आम्हाला त्याचे अंत्यसंस्कार करता येतील. ”
हे ऐकून बॅंक मॅनेजरची वाचाच खुंटली.
– – – कुठे कोट्यवधी रुपये बुडवणारे अब्जाधीश आणि कुठे समाजातील मृताची कर्जफेड स्वतःच्या पैशांतून करणारे आदिवासी!!!
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




