प्रा. सुनंदा पाटील
विविधा
☆ आम्ही चालवू हा पुढे वारसा… भाग- २ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
(काकडा संपत येत असताना तिथेच ठेवलेल्या एखाद्या ताटलीत शेवटी तो ठेवला जातो. अजूनही चांदण्यांचा अस्त न झालेला, सूर्योदय व्हायचाच आहे आणि तशात मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात काकडा उजळलेला दिसला की तारांगणातून एक एक तारका पृथ्वीवर आली की काय असा भास होतो. यावेळी कोणत्या आरत्या म्हटल्या जातात हे बघूया.)
(१)
भक्तीचिये पोटी बोध काकडा ज्योती
पंचप्राण जीव भावे ओवाळू आरती*
*
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा
दोन्ही कर जोडूनी चरणी ठेविला माथा
*
काय महिमा वर्णू आता सांगणे किती
कोटी ब्रम्ह हत्या मुख पाहता जाती
*
राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही
मयूर पुच्छे चामरे ढाळती ठाईच्या ठाई
*
सत्व रजतमात्मक काकडा केला
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला
*
तुका म्हणे दीप घेऊनि उन्मनीत शोभा
विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा ॥
(२)
सहस्र दीपै दीप जैसी प्रकाशली प्रभा
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा
*
काकड आरती माझ्या कृष्णसभागीया
चराचर मोहरले तुझी मूर्ति पहाया
*
कोंदलेसे तेजे प्रभा आलीसे एक
नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख
*
आरती करता तेज प्रकाशले नयनी
तेणे नेत्रे मिळाला एका एकी जनार्दनी ॥
*
अशा अनेक आरत्या होऊन शेवटी तुळशीची आरती होते.
*
जय देवी जय देवी जय माये तुळशी
निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी
*
ही आरती सर्वांना ठाऊक आहे. पण माझ्या लहानपणी आम्ही विठ्ठल मंदिरात काकड आरतीला जात होतो, तेव्हा तुळशीची एक वेगळी आरती म्हटली जायची. ती छोटीशी आरती या ठिकाणी देते आहे.
*
श्री तुळशी जय तुळशी मानव बोलता वदनी
ऐकून यमदुत बहु दूर पळती दिशा उल्लंघुनी
*
कोमल तुळशी वनी पाहुनिया हरीशी आनंद
अखंड राहे तेथे राधा रमणा गोविंद
*
या तुळशीची सेवा करता पुण्याच्या राशी
अपार संकट भोगुनी प्राण्या जाय मुक्तिशी
*
ओवाळू आरती तुळशी हरी पंकजनयना
कृष्ण तनया म्हणे सरली भ्रांतीची भ्रमणा ॥
*
यानंतर नियमितपणे सद्गुरुची आरती, कापूर आरती होत असे. याच ओघात सर्वांसाठी एक मागणं मागितलं जायचं.
*
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा /माझीया सकळा हरीच्या दासा
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी /ही संत मंडळी सुखी असो
अहंकाराचा वारा न लागो राजसा/ माझ्या विष्णू दासा भाविकाशी
नामा म्हणे जया असावे कल्याण /द्या मुक्ती निधान पांडुरंग ॥
*
नंतर सगळ्यांना आरती दिली जायची. सर्वांचा सुका प्रसाद, फळं, तीर्थ एकत्र करून सर्वांना तीर्थप्रसाद दिला जायचा आणि हळुवार पूर्वेला सूर्यबिंब प्रकट व्हायचं. आजही ही प्रथा खेड्यापाड्यांमधून आणि मंदिरांमधून सुरू आहे. मात्र तथाकथित आधुनिकतेचा वारा लागलेले लोक यापासून दूर आहेत. काही लोकांनी तिथेही ह्या परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. त्याला यश देणं हे आपल्याच सर्वांच्या हातात आहे !
विस्तारभयास्तव आज इथेच थांबते. अजून अनेक काकडआरत्या आणि भुपाळ्या आहेत. त्या आपल्यालाही ठाऊक आहेत.तुळशी विवाह होतो. नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड आरतीची समाप्ती ही सहसा गोपालकाल्याने केली जाते. यावेळी कुठे कुठे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह ही आयोजित केला जातो. येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या आणि आश्विन /कार्तिक महिन्यातल्या काकड आरतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद !
– समाप्त –
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




