श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – वखरे साहेबांनी सुचवल्यानुसार ‘त्या’ सर्क्युलरची एक कॉपी मी घरी जाताना सोबत घेऊन गेलो खरा पण त्या सर्क्युलरच्या एवढ्याशा एन्व्हलपचं ओझंही मला मणामणाचं वाटत राहिलं!)

त्यात काय असेल हे उत्सुकता मिश्रित दडपण होतं ते वेगळंच. उद्याच्या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा सगळा उत्साह आणि आनंद, आत्तापासूनच मनात ठाण मांडून बसलेल्या या सर्क्युलरच्या विचारानंच मलूल होऊन गेला होता! मी घरी पोचलो तोवर सांगलीहून निघालेले सलिल/आरती अजून घरी पोचलेले नव्हते. त्यांचा विचार मनात असतानाच घरी गेल्याबरोबर आईने “नितिन देशपांडे येऊन गेले. त्यांनी तुला फोन करायला सांगितलंय” असा निरोप मला दिला. त्याकाळात मोबाईल अजून अस्तित्वात नव्हते. त्यामुळे जे कांही बोलणं व्हायचं ते लँडलाईन वर किंवा असं निरोपानिरोपीच. थोडं फ्रेश होऊन मी नितिनना फोन करणार होतोच तो आता तातडीने करायला हवा होता. आईकडून त्यांचा हा निरोप ऐकला आणि हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या उद्याच्या प्रकाशन समारंभाची व्यवधानं मनात गर्दी करू लागली. कशासाठी करायला सांगितला असेल फोन? प्रिंटरकडून कथासंग्रहाच्या कॉपीज् मिळण्यात कांही अडचण आली असेल का?अजून त्या संदर्भातली ऐनवेळीच करायला हवी होती अशी बरीच कामं मार्गी लागायची होती, त्यात कांहीं अडचणी आल्या असतील कां?शन्नांकडून ऐनवेळी कांही फोन आला असेल कां? ठरल्याप्रमाणे ते येतील ना नक्की? समजा तशीच कांही अडचण असेल तर ऐनवेळी करायचं काय? कार्यक्रम रद्द करायची वेळ आलीच तर इतक्या सगळ्या आमंत्रितांना ते कळवायचं कसं? एक ना दोन. मी ऑफिसमधे असेपर्यंत तरी नितिन देशपांडेंचा फोन आलेला नव्हता. ते घरी सांगायला आले होते म्हणजे तसंच कांहीतरी महत्त्वाचं कारण असणार नक्कीच. मनात सुरू झालेल्या या सगळ्या गदारोळात मी सोबत आणलेल्या ‘त्या’ सर्क्युलरचा विचार मनाच्या पार तळाशीच जाऊन पडला!

याच सगळ्या विचारांमुळे सुरू झालेल्या घालमेलीत मी फ्रेश होऊन आलो. या क्षणी खरंच वाफाळलेल्या गरम चहाची तल्लफ होती. आई म्हणालीही, ‘चहाचं आधण ठेवते लगेच. चहा घे न् मग जा ‘ असं. पण माझं लक्ष सगळं नितिन देशपांडेना लगेच फोन करायला हवा इकडंच. त्याशिवाय मलाच चैन पडणं शक्यच नव्हतं.

“मी जवळच्या बुथवरून नितिनना फोन करून येतो न् मगच चहा कर. तोवर आरती, सलिलही येतील. आलोच. ” म्हणत मी घाईघाईने बाहेर पडलो. नितिनना फोन केला ते अचानक काय घडलं असेल हा विचार मनात घेऊनच. त्यांचं बोलणं ऐकत असताना मात्र तोवरचं हे सगळं दडपण हळूहळू निघूनच गेलं. आज ऑफिसमधून बाहेर पडल्यापासून उद्याच्या प्रकाशन समारंभाच्या सगळ्या कामांच्या विचारांनीच माझ्या मनाचा ताबा घेतलेला होता. पण माझ्याशी बोलताना नितिन देशपांडेनी मघाशी मनात येत राहिलेले सगळेच नकारात्मक विचार परस्परच मोडीत काढून टाकले होते. बोलणं संपताच मी फोन बंद करून घरची वाट धरली तेव्हा मरगळ सगळी निघूनही गेली होती. कारण नितिन देशपा़डे फोनवर जे बोलले ते मला दिलासा देत पूर्णतः निश्चिंत करणारं असंच होतं! पण तरीही मनात खोलवर कुठंतरी नितिन आणि राजलक्ष्मी यांच्याबद्दल वाटणाऱ्या कौतुकाबरोबरच अपराधीपणाची सूक्ष्म बोच मला टोचू लागली होती. त्याला कारणही तसंच होतं. ते दोघे क्षणभरही विश्रांती न घेता सगळ्याच कामात हातचं राखून न ठेवता राबत होते आणि नाईलाजाने कां असेना मी त्या सगळ्यापासून एखाद्या ति-हाईतासारखा सुरक्षित अंतरावर उभा! नितिन देशपांडेंशी फोनवर बोलल्यापासून तर ही टोचणी अधिकच वाढली होती. कारण फोनवर नितिननी सांगितल्यानुसार तोवर पूर्ण न झालेली सगळीच कामं अगदी सुरळीत मार्गी लागली होती! शन्नांसाठी डेक्कन जवळच्या त्यांनीच सुचवलेल्या एका लाॅजमधली रूम बुक करून ठेवली होती, सकाळी लवकर त्यांना रिसिव्ह करायला नितिन स्वत:च जाणार होता, नंतर त्यांचा ब्रेकफास्ट, जेवण यासाठीही तो त्यांना कंपनी देणार होता, कथासंग्रहाच्या शंभर प्रती आज रात्री नऊपर्यंत तयार होणार होत्या, त्या तो प्रेसमधून मिळाल्या की हाॅलवर नेणं सोयीचं पडावं म्हणून स्वत: आमच्या घरी पोचवणार होता,

त्यातली एक प्रत तो शन्नांना नजरेखालून घालता यावी म्हणून स्टेशनवर जातानाच उद्या सकाळी स्वतःबरोबर आठवणीने घेऊन जाणार होता, कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी चारची होती आणि टिळक स्मारक मधला हाॅल तीन वाजता ताब्यात मिळणार होता, उपस्थित रसिकांसाठी चहा-खाण्याची आॅर्डर त्यांनी केटररकडे देऊन ठेवली होती आणि त्यानुसार केटररने पाचपर्यंत गरम डिश सर्व्ह करायचं आश्वासनही दिलं होतं, व्यासपीठावरचं डेकोरेशन, बैठक व्यवस्था ही सगळी जबाबदारी राजलक्ष्मीने स्विकारलेली होती. आणि मी? मी मात्र माझ्याचसाठी सुरू असलेल्या त्या दोघांच्या या धावपळीपासून दूर सुरक्षित उभा! अपराधीपणाची टोचणी होती ती हीच. नाही म्हणायला नितिननी त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं एकचं काम माझ्यावर सोपवलं होतं तेही ते मीच करायला हवं होतं म्हणून. कारण कांही अपवाद वगळता जवळजवळ सर्व आमंत्रित माझेच नातेवाईक तसेच बॅंकेतल्या स्टाफ पैकी माझे जवळचे असे मित्र असल्याने नियोजित वेळेपेक्षा थोडं आधीच मी त्या सर्वांच्या स्वागताला तिथं वेळेआधी पोचायचं एवढंच काम मी करायचं होतं!

खरं तर हा प्रकाशन समारंभ हे माझ्यासाठी एखाद्या शुभकार्यासारखंच होतं आणि तेही सर्वार्थाने माझ्या घरचंच! तरीही स्वत:च्या सर्व कमिटमेंटस् बाजूला ठेवून, या संदर्भातल्या अगदी नियोजनापासून कार्यसिद्धी पर्यंतच्या सर्वच जबाबदाऱ्या नितिन आणि राजलक्ष्मी दोघांनीही अशा मनापासून स्विकारल्या आणि यशस्वीपणे पारही पाडल्या‌.

नाईक सरांनी राजू/ नितिनकडे ‘चिरानी प्रकाशन’ तर्फे माझा कथासंग्रह प्रकाशित करायला सुचवणं आणि ते त्या दोघांनी मनापासून मान्य करून त्या संकल्पाची अशी सिध्दी होईपर्यंत सर्वार्थाने पुढाकार घेणं हे माझ्यासारख्या नव्या लेखकाला ‘त्या’नेच घडवलेलं वाटावं असं अतर्क्यच होतं! पण हे तेवढंच नव्हतं. ‘त्या’चाच कृपालोभ वाटावा अशा, मी तोवर कधी कल्पनाही न केलेल्या एका अनोख्या अशा घटनेच्या पाऊलखुणांचे धागेदोरेसुध्दा या प्रकाशन समारंभाशीच जोडले जाणार आहेत आणि याचा मुख्य दुवा मी शांतपणे वाचण्यासाठी ऑफिसमधून घरी येताना सोबत आणलेल्या ‘त्या’ सर्क्युलर मधेच लपलेला आहे हे त्याक्षणी तरी मला जाणवलेलं नव्हतं एवढं खरं!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments