सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

राजधानी दिल्ली ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आपला संपूर्ण भारत हा त्याच्या वैविध्यपू्ण वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. संपूर्ण भारतातील वेगवेगळा प्रांत हा त्याच्या निरनिराळ्या उपलब्धते मुळे प्रसिद्धीस पावलेला आहे. ह्यामध्ये त्या त्या प्रांताची वैशिष्ट्ये हा तो प्रांत किती समृद्ध आहे हे दर्शवून देतात. ह्यामध्ये त्या भागाला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, पोषक हवामान, खानपान आणि राहणीमानातील समृध्दी ह्यांचा समावेश असतो.

ह्या प्रांतापैकीच एक प्रांत बंगाल. बंगालचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभा राहतो तेथील नवरात्र उत्सव, लाभलेला सागरकिनारा, त्यामुळे मत्स्यप्रेमी मंडळींचा तृप्त होणारा जठराग्नी, ओल्या नारळाच्या भरपूर वापरामुळे तेथील ललनांना लाभणार विपुल केशसंभार, माशांच्या सेवनाने लाभलेले सुंदर डोळे, आणि ह्याचा परिपाक म्हणजे मिष्टान्न प्रेमीची तृप्ती करणारा तो पाकात बुडलेला भलामोठा रसगुल्ला, बायकांचा विक पॉइंट असणाऱ्या कलकत्ता साड्या, आणि अजुन बरेच काहीतरी.

आता हे कलकत्ता वर्णन अजुन एका गोष्टीची आठवण करून देतं ती म्हणजे ब्रिटिश काळात भारताची राजधानी ही पण कलकत्ताच होती. आजच्या तारखेला म्हणजे 12 डिसेंबर 1911 साली भारताची राजधानी कलकत्ता ऐवजी दिल्ली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मात्र त्याची कागदोपत्री अंमलबजवणी नंतर झाली.

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा पाया तत्कालीन सम्राट जॉर्ज पाचवा यांच्या द्वारे रचण्यात आला. दिल्लीला भारताची राजधानी करण्याचा प्रस्ताव 1911 च्या दिल्ली दरबार कार्यक्रमात ठेवण्यात आला होता. शहराची वास्तुकला आणि नियोजन दोन ब्रिटिश आर्किटेक्ट सर हर्बर्ट बेकर आणि सर एडविन लुटियन यांच्याद्वारे बनविण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी 1931 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी दिल्लीचे देशाची राजधानी म्हणून उद्घाटन केले. तेव्हापासून नवी दिल्ली सरकारचे केंद्र बनली आणि देश चालविण्यासाठी आवश्यक सर्व शाखा दिल्लीमध्ये आहेत.

भारताची राजधानी दिल्ली होण्यापूर्वी 1911 पर्यंत कोलकत्ता ही देशाची राजधानी होती. तसेच दिल्ली यापूर्वी भारतावर राज्य केलेल्या अनेक साम्राज्यांचे आर्थिक आणि राजकीय केंद्र होते. यापैकी काही उत्तम उदाहरणे म्हणजे दिल्ली सल्तनत मधील मुघलांच्या कारकीर्दीची. ब्रिटिश भारतात आल्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलल्या. 1900 च्या सुरुवातीच्या काळात ब्रिटीश प्रशासनाने भारतीय साम्राज्याची राजधानी कलकत्ताहून दिल्लीला हलविण्याचा विचार केला.

राजधानी हलवण्यामागील मुख्य कारण म्हणजे दिल्लीचे स्थान. कोलकत्ता हे देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागात होते, तर दिल्ली उत्तरेकडील भागात होती. ब्रिटीश सरकारच्या म्हणण्यानुसार, दिल्लीहून राज्य करणे सोपे आणि सोयीचे होते.

हा प्रस्ताव ब्रिटीश राजांनी मान्य केला आणि त्यानंतर 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार दरम्यान तत्कालीन शासक जॉर्ज पंचम यांनी क्वीन मेरी बरोबर जाहीर केले की कोलकाता येथून भारताची राजधानी दिल्लीत हलविण्यात येईल. या घोषणेबरोबरच किंग्जवे कॅम्पच्या कोरोनेशन पार्कचे शिलान्यासही करण्यात आले. ते व्हायसरॉय यांचे निवासस्थान होते.

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने राजधानी म्हणून दुसऱ्या शहराचा विचारही केला नाही. कारण, तोपर्यंत नवी दिल्लीचा विस्तार अनेक पटीने झाला होता वेगाने विकास होत होता. स्वातंत्र्यानंतर, दिल्ली नवीन राष्ट्राची राजधानी बनली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आणि दिल्ली आता देशाची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी बनली आहे.

तसही भारताची राजधानी कलकत्त्या हून दिल्ली ला हलविण्यामागे अजुन एक प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या फाळणी नंतर कलकत्त्यातील राजकीय, सामाजिक वातावरण एकदम ढवळून निघाले होते, प्रचंड अस्थिरता आली होती.

चिरायू भारताच्या दृष्टीने राजधानी हलविण्याचा निर्णय एकदम मोलाचा ठरला ह्यात तिळमात्रही शंका नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted